म. टा. प्रतिनिधी, नाशिक
स्मार्ट रोडच्या कामासाठी सीबीएस सिग्नल येथे खोदकाम सुरू झाले असून त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. त्यातच रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतुकीचा फज्जा उडत आहे. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड एकेरी वाहतुकीसाठी खुला आहे. या रस्त्यावरच एका बाजूने करण्यात आलेल्या बॅरकेडिंगला रिक्षाचालकांनी स्टँड बनवले आहे. इतकेच नव्हे, तर भर रस्त्यात रिक्षा उभी करून प्रवासी भरले जात असल्याने इतर वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. यावर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सीबीएस हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी कायम वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभ येथील रिक्षाचालकांचा त्रास सामान्यांना सहन करावा लागतो आहे. सीबीएस सिग्नल स्मार्ट रोडच्या कामासाठी बंद केल्यापासून तेथील बॅरकेडिंगला रिक्षा स्टँड बनविण्यात आले आहे. वाटेल तिथे रिक्षा स्टँड आणि मनाप्रमाणे वाहतूक करण्याचा खेळ रिक्षाचालकांनी चालविला आहे. त्यामुळे प्रवाशांसह इतर वाहनचालक हैराण झाले आहेत. सीबीएसकडून कान्हेरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यातच रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे कान्हेरीवाडीत जाणाऱ्यांना रिक्षांच्या गर्दीतून वाट काढावी लागते. सीबीएस, मेहेर आणि अशोकस्तंभ या चौकांत बॅरकेडिंगला लागूनच भर रस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर कायम वाहनकोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. टिळकवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेळा बस स्थानकाच्या बाहेर बॅरकेडिंग केले असून, त्या ठिकाणी आडव्या पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे किशोर सुधारालयामार्गे मेळा बसस्थानकात येणाऱ्या एसटी बसना अडचण होत असल्याचे दिसून येत आहे. रिक्षाचालकांच्या या मनमानीविरोधात प्रवासी अथवा वाहनचालकांनी टोकल्यास खटके उडत आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या मनमानीवर पोलिसांचा अंकुश नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
कारवाई का नाही?
सीबीएससह इतर चौकांत पोलिसांच्या समोरच बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जातात. शिवाय वाहतुकीचे नियम मोडत प्रवाशांची वाहतूक होत आहे. मात्र, पोलिस विरूद्ध दिशेने येणाऱ्या व हेल्मेट नसणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात मग्न आहेत. सीबीएस सिग्नलवर राँग साइड येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मात्र, नियम धाब्यावर बसवलेल्या रिक्षाचालकांवर मात्र मेहेरबानी दाखवली जाते. कारवाईतील या दुजाभावामुळे इतर वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्ते झाले ब्लॉक
सीबीएस, त्र्यंबकनाका, मेहेर, अशोक स्तंभ परिसरात बेशिस्त रिक्षा वाहतूक आणि अनधिकृत रिक्षा थांबे, यामुळे रस्ते ब्लॉक झाले आहेत. मेहेर, सीबीएस, अशोक स्तंभ या चौकातील एक बाजू पूर्णत: रिक्षा चालकांनी ब्लॉक केली आहे. रस्त्यात मध्येच उभ्या राहणाऱ्या या रिक्षांवर मात्र कोणतीही टोइंग कारवाई होत नसल्याने रस्ते ब्लॉक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्मार्ट रस्त्यावर सायंकाळी सहानंतर वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते आहे.
वाहनांना अडथळा
त्र्यंबक नाका ते मेहेर चौकापर्यंत एकेरी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. तरीदेखील रिक्षाचालक विरुद्ध दिशेने रिक्षा हाकतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अरुंद रस्त्यावर रिक्षाचालकांकडून होणारी दुहेरी वाहतूक इतर वाहनांना अडथळा ठरत आहे. दिवसा हे प्रमाण कमी असले, तरी सायंकाळनंतर आणि रात्री बेसुमारपणे विरुद्ध बाजूने रिक्षा चालविण्यात येत आहेत.
प्रवाशांचा गोंधळ अन् लूट
सीबीएस सिग्नलचे रस्ते बंद झाल्याने अगोदर बाहेरगावाहून येणाऱ्यांचा गोंधळ उडत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत रिक्षाचालकांनी लूट चालवली आहे. बाहेरगावच्या प्रवाशांकडून आणि उन्हाळ्यानिमित्त शहरात येणाऱ्या पर्यटकांकडून जास्त भाडे आकारण्यात येत आहे. त्यासाठी रस्ता बंद असल्याचे कारण पुढे केले जात आहे. पोलिसांचे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.