म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लोकशाहीचा उत्सव अर्थात, लोकसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी (दि. २९) नाशिक, दिंडोरीसह धुळे मतदारसंघात मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ती सुरळीत पार पडावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांतदेखील मताधिकार बजावण्यासाठीची अधीरता रविवारी मतदानाच्या पूर्वसंध्येला दिसून आली.
चार हजार ७२० मतदान केंद्रांवर यंत्रसामग्रीसह निवडणूक कर्मचारी दाखल झाले असून, अनेक मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी सजविण्यात आली आहेत. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळकट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नाशिक, दिंडोरी, धुळे, शिर्डीसह एकूण १७ मतदारसंघांमध्ये आज निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून यंत्रणा राबत आहे. मतदान हा लोकशाही व्यवस्थेने प्रत्येक भारतीयाला प्रदान केलेला अधिकार असून, या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात ४५ लाख ५ हजार ३२० मतदार असून, त्यामध्ये २३ लाख ५८ हजार ६६० त्रुष आणि २१ लाख ४६ हजार ५६८ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट आदी यंत्रसामग्री घेऊन शनिवारी सकाळी यंत्रणा नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाली.
--
...तर आस्थापनेवर कारवाई
मतदान हा प्रत्येकाचा अधिकार असल्याने त्यापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता कामगारवर्गाला पूर्ण सुटी किंवा किमान दोन तासांची सुटी देण्यात आली आहे. मात्र, तरीही वेळ न दिला गेल्याने मतदानाला जाता आले नाही, अशी तक्रार कामगाराने केली, तर संबंधित आस्थापनेवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला.
--
मोबाइल नेणे टाळाच
मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाला जाताना कोणीही मोबाइल सोबत घेऊन न जाणेच सोयीचे ठरणार आहे. मतदान केंद्राच्या चारही बाजूस २०० मीटरच्या आत मोबाइलसह सेल्युलर फोन, कईडलेस फोन, मोबाइल फोन, वायरलेस सेट व तत्सम साधने, ज्वलनशील पदार्थ, अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. अनधिकृत व्यक्ती आणि वाहनालाही प्रवेशबंदी राहणार आहे.
--
चिन्हांच्या भाषेचा वापर
मतदानस्थळी गेल्यानंतर काय करावे याचे केवळ सुशिक्षितांनाच नव्हे, तर अशिक्षितांनाही सुयोग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळावे याकरिता यंदा चिन्हांच्या भाषेचाही अत्यंत कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. काय करावे, काय करू नये याबाबत सहज समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करतानाच चिन्हांद्वारेही ते निरक्षरांनाही समजू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी निवडणूक शाखेने विविध रंगसंगतीमध्ये मार्गदर्शक फलक बनवून घेतले असून, ते प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.
--
दिव्यांगांसाठी हेल्पलाइन
जिल्ह्यात दिव्यांग, दृष्टिबाधित, मुकबधिर व इतर व्यंग असलेल्या मतदारांची संख्या १२ हजार ९४८ आहे. या दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी प्रशासनाने वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. केंद्रावर व्हीलचेअरचीदेखील व्यवस्था असणार आहे. ज्या दिव्यांग मतदारांना वाहन व व्हीलचेअरची मदत लागणार असेल त्यांनी १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा समाजकल्याण विभागाचे अधिकारी नीलेश पाटील यांच्याशी ८८३००४९२२८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी केले आहे. दृष्टिबाधितांसाठी मतदान केंद्रांवर ब्रेललिपीतील मतपत्रिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
--
वाहतुकीवर साडेतीन कोटी खर्च
निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रसामग्रीच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ४८६ बसेस, १ हजार १९८ जीप, ११ टेम्पो ट्रॅव्हलर, ३८ ट्रक आणि अन्य ३६२ वाहने अशा तब्बल २ हजार ९५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यंत्रसामग्रीला मतदान केंद्रांवर घेऊन जाण्याची आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा या सर्वांना नेमून दिलेल्या ठिकाणावर घेऊन येण्याची जबाबदारी या वाहनव्यवस्थेकडून पार पाडली जाणार आहे.
--
मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. विविध प्रकारच्या सुविधा पुरवून नाशिककरांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न यंत्रणेने केला आहे. नाशिककर मोठ्या संख्येने मतदान करतील असा विश्वास आहे. मतदानापासून वंचित राहावे लागू नये याकरिता सायंकाळी सहाची प्रतीक्षा न करता नागरिकांनी वेळ मिळेल त्याक्षणी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे.
-अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी