म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नोटाबंदीपूर्वी राज ठाकरेंचे दुकान जोरात सुरू होते. परंतु, नोटाबंदीच्या निर्णयामुळे ठाकरेंचे दुकान बंद झाल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नोटाबंदीमुळे ठाकरेंचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शनिवारी दुपारी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पूर्वी लोक सायकल, मोटारसायकल, कार भाड्याने घ्यायचे, आता पवारसाहेबांनी रेल्वेचे इंजिनच भाड्याने घेतले आहे. तोंडाच्या वाफाने इंजिन चालले असते, तर आतापर्यंत ते दिल्लीत गेले असते. पण, हे इंजिन दिल्लीत काय तर आता गल्लीतही उरले नसल्याचा टोला लगावत, महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज्य व केंद्रात भाजपचे सरकार होते अन् त्यांनी पैसा पुरवल्याचा विसर त्यांना पडला, असा हल्लाबोलही मुख्यमंत्र्यांनी केला. नाशिकमध्ये आमची सत्ता आल्यापासून दोन हजार कोटींची कामे सुरू असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस यांनी यावेळी राज ठाकरेंचा समाचार घेत शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मीच ओपनिंग बॅट्समन, मीच माढातून लढणार, अशी वल्गना करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कॅप्टनने पॅड, हेल्मेट घालून पीचवर बॅट ठेवली होती. परंतु, समोर नरेंद्र मोदींचा गुगली पाहताच त्यांनी पॅव्हेलियनमध्ये धाव घेतली, असा टोला पवारांना लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था अशी झाली आहे, की त्यांना निवडणुकीत श्रोत्यांबरोबर वक्तेही भाड्याने आणावे लागत आहेत. पूर्वी लोक सायकल, मोटारसायकल, कार भाड्याने घ्यायचे, आता पवारसाहेबांनी चक्क रेल्वेचे इंजिनच भाड्याने घेतले. पण, इंजिन तोंडाच्या वाफेने नव्हे, तर इलेक्ट्रिसिटी अथवा खऱ्या वाफेने चालते हे कदाचित पवारसाहेबांना माहिती नसावे. तोंडाच्या वाफेने इंजिन चालले असते, तर ते दिल्लीपर्यंत गेले असते. पण, तोंडाच्या वाफेने चालणारे इंजिन दिल्ली काय तर गल्लीतही उरले नाही. इंजिनाला मोदींनी पछाडलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवार, राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. जेट एअरवेज नोटाबंदीने बंद झाले, जे-जे नुकसान झाले तेही नोटबंदीनेच झाले, असे सांगणाऱ्या राज ठाकरेंचेच दुकान नोटाबंदीने बंद झाले. त्यामुळे त्यांचा जळफळाट झाला असून, ते मोदींविरोधी सूर आळवत आहेत. मात्र, इंजिनाची अवस्था अशी झाली आहे, की विधानसभेतील एकमेव सदस्यही मनसेला सोडून शिवसेनेत गेला. जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्येही मनसेचे आता काही उरले नाही. त्यामुळेच आमचा राष्ट्रीय पक्ष, पण आमची कुठेही शाखा नाही, अशी अवस्था मनसेची झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना डिवचले.
--
मनसेची कामे आमचीच
राज ठाकरेंनी नाशिकच्या जाहीर सभेत जी विकासकामे दाखविली ती राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या निधीतूनच झाली, असा दावाही त्यांनी केला. कुंभमेळ्यासाठी आम्हीच पैसे दिले, असा दावा करीत त्याच पैशातून राज ठाकरेंनी शहराचा विकास केल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही काय केले, असा सवाल ठाकरे विचारत आहे. परंतु, आमची सत्ता आल्यापासून नाशिक शहरात दोन हजार कोटींची कामे सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर देशातील पहिली एकात्मिक पद्धतीची हायब्रीड मेट्रो सिस्टीम सुरू करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
--
तिजोऱ्या लुटल्यानेच भुजबळ जेलमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना 'नटसम्राट' संबोधत भुजबळांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून नव्हे, तर भ्रष्टाचार केला, काळा पैसा कमावला, जनतेच्या तिजोऱ्या लुटल्या म्हणून जेलमध्ये टाकल्याचा दावा केला. राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेत बोलताना भुजबळांना जेलमध्ये टाकले पुढे काय, असा सवाल केला होता, त्याचा संदर्भ देत 'आगे आगे देखो होता है' क्या, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला. भुजबळ आता जामिनावर आहेत. पण, त्यांच्यावर खटला चालणार आहे. त्यांची व्यवस्था 'नीट' लावून ठेवली आहे. न्यायदेवता न्याय करेल, त्यांच्या करतुतींमुळेच भुजबळ जेलमध्ये जाणार, असा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
--
'राहुल गांधींना जोडे मारा!'
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द काढले. त्यांना कायर, डरपोक संबोधून त्यांचा अपमान केला. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना भरसभेत जोडे मारण्याचे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. लोकसभेची निवडणुक राष्ट्रवाद विरुद्ध राष्ट्रद्रोही असल्याचे सांगत काही लोकांना कावीळ झाली आहे, असा टोला त्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला. काहींना सध्या जळी-स्थळी मोदी-शहा दिसतात, त्यांची कावीळ उतरविण्यासाठी येथे मुख्यमंत्री आले आहेत, असा टोलाही राऊतांनी लगावला.