नाशिक: मुंबई आणि पनवेलच्या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर धडाडली. मैदान गर्दीने तुडूंब भरले होते. या गर्दीच्या साक्षीनेच राज यांनी सर्वात आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. नाशिकला दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारला.
नाशिकच्या ५ वर्षाच्या सत्ताकाळात आम्ही ५१० किमीचे अंतर्गत रस्ते बांधले, वाहतूक बेटं, चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे स्मारक, घनकचरा प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, मलजल प्रक्रिया केंद्र, मुकणे धरणातून थेट पाईपलाईन योजना, प्रकल्प राबवले. हे सर्व आम्ही ५ वर्षात करून दाखवलं. नाशिककरांनी जो द्यायचा तो निर्णय दिला. त्याचं वाईट वाटलं पण जी कामं केली ती छातीठोकपणे सांगितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखं, नाशिक दत्तक घेतो असली खोटी आश्वासनं दिली नाही. मला सांगा दत्तक घेतलेल्या काय केलं ह्या बापाने? स्मार्ट सिटीच्या नावाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलीच कामं भाजपने आम्ही केली असं दाखवलं. ह्या बातम्या नाशिकच्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. कोणत्या गोष्टींवर ह्या सरकारला मार्क द्यायचे?, असा जाब राज यांनी विचारला.
राज यांनी मुख्यमंत्र्यांनंतर आपला मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडे वळवत दोन्ही नेत्यांवर धारदार शब्दांत टीकास्त्र सोडले.
मोदींवर प्रश्नांची सरबत्ती...- मध्यंतरी नरेंद्र मोदींनी एक नवीन कार्ड काढलं की मी खालच्या जातीतील आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत. आम्ही जे प्रश्न विचारत आहोत त्याचा कोणाच्या जातीशी काय संबंध?
- गोरक्षेच्या नावाखाली दलित तरुणांना उना मध्ये बेदम मारहाण झाली, त्या तरुणांनी गाय मारली नव्हती तर मृत गायीचं कातडं काढायला लोकांनी बोलावलं म्हणून ते तरुण गेले. त्या तरुणांचा काय दोष होता? गोरक्षेच्या नावाखाली ४०-५० लोकं मारली गेली, त्यावर नरेंद्र मोदी कधी बोलणार?
- आज शेती तोट्यात आहे म्हणून शेतकरी कुटुंबातील मुलं-मुली शेती सोडून नोकरीच्या शोधात फिरत आहेत. ह्या तरुण-तरुणींना मोदींनी २०१४ ला सांगितलं की, आम्ही दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ. पण पुढे झालं काय? किती नोकऱ्या दिल्या गेल्या?
- रोजगार निर्माण करणं सोडाच पण उलट मोदींनी अचानक नोटबंदी जाहीर केली. ह्या नोटबंदीच्या काळातील एक चित्रफीत माझ्याकडे आहे. बँकाच्या रांगेत उभे असलेल्याना लाठ्या मारल्या गेल्या? देशाला कळत नव्हतं का हा निर्णय का घेतला?
- नाशिकमध्ये नरेंद्र मोदींनी येऊन कांदा उत्पादकांना भाव देऊ असं सांगितलं. देवेंद्र फडणवीस २ वर्षांपूर्वी म्हणाले की, आम्ही १२०००० विहिरी बांधल्या. तरीही २८,००० गावं आज दुष्काळग्रस्त आहेत. नाशिकच्या जवळच्या तालुक्यातील गावात जीवावर बेतून पाणी भरत आहेत. काय झालं त्या विहिरींचं?
- नरेंद्र मोदी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस म्हणाले होते, की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी आश्वासनांच्या पलीकडे काय दिलं? कांदा एक रुपये किलोवर येऊन थांबतो अशा वेळेस शेतकऱ्यांनी कसं जगायचं?
<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FMaharashtraNavnirmanSenaAdhikrutPage%2Fvideos%2F1014918065360620%2F&show_text=0&width=560" width="560" height="315" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>