मोदी उवाच...
- शेजारी देश भारताकडे पाहताना शंभरदा विचार करतात
- दहशतवाद्यांना पाताळातूनही शोधून मारू
- ना नजर खाली करू, ना वर; नजरेला नजर भिडवून बोलू
- शेतकरी सन्मानसाठी पाच एकरची अट रद्द करू
- देशाची सुरक्षा, सन्मान मतदारांच्या हाती
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिकचे पाणी गुजरातला पळवले जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, नाशिककरांच्या इच्छेविरुद्ध पाणी घेणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या जाहीर सभेत दिले. शेतकरी-ग्राहकांमध्ये काँग्रेसने निर्माण केलेली दलालांची साखळी मोडीत काढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, आमदार डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, महापौर रंजना भानसी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कौतुकाने केली. यानंतर मराठीत संवाद साधत त्यांनी नाशिकची संस्कृती सप्तरंगी असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता आंदोलनाचा उल्लेख करीत येथे येऊन आपण धन्य झाल्याचे ते म्हणाले. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेचा उल्लेख करीत भारतातील दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांवरून तत्कालीन यूपीए सरकारला त्यांनी लक्ष्य केले. मोदी म्हणाले, '२०१४ पूर्वी देशात काय परिस्थिती होती? देशातील विविध भागांत बॉम्बस्फोट होत होते. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार केवळ शोकसभा घेऊन जगभरात पाकिस्तानच्या नावाने गळा काढत होते. आता भारताकडे नजर वर करून पाहण्याआधी शंभरवेळा विचार करावा लागतो. दहशतवाद्यांना आता कळलंय की भारतात बॉम्बस्फोट घडवले तर येथे मोदी आहे. दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना पाताळातूनही शोधून काढून ठार मारतील.' मोदी पुढे म्हणाले, 'आम्ही नजर खाली किंवा वर करून पाहणार नाही, तर नजरेला नजर भिडवून बोलू, असे तेव्हा मी म्हणालो होतो, आज प्रत्येक भारतीय ताठ मानेने उभा आहे. जगभरात भारत आणि देशवासियांचा जो जयजयकार सुरू आहे, तो तुमच्या एका मतामुळे आहे. भारत सध्याच्या आव्हानांना सामोरा जात आहे, ही तुमच्या त्या मताची ताकद आहे,' अशा शब्दांत त्यांनी मतदारांच्या भावनांना हात घातला. देशाची सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमानाची 'चौकीदारी' तुमच्या हातात आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शेतकरी आणि ग्राहकांमध्ये काँग्रेसने निर्माण केलेल्या दलालांच्या साखळीविरोधात आपला लढा असून, ती मोडीत काढू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. देशात पुन्हा आपले सरकार आले तर शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी पाच एकर जमिनीची अट रद्द करून सर्वांना लाभ देऊ. नाशिकचे पाणी गुजरातला पळवले जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, नाशिककरांच्या इच्छेविरोधात पाणी घेतले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना करंट लागतो
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही मोदी यांनी टीका केली. 'पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. त्यातील कौल पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. मी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर बोललो की काही लोकांना कंरट लागतो आणि मला शिव्या द्यायला सुरुवात करतात', अशी कोपरखळी त्यांनी पवारांचे नाव न घेता मारली.
एचएएलचे उत्पादन दुप्पट करणार
काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात एचएएल खिळखिळी झाल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला. आमचे सरकार आल्यानंतर एचएएलला आम्ही काम दिले आहे. 'मेक इन इंडिया'अंतर्गत आम्ही एचएएलला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या दहा वर्षांत एचएएलचे उत्पादन दुप्पट करण्याचा आमचा मानस असून, एचएएलसंदर्भात उठवल्या जात असलेल्या वावड्या चुकीच्या असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.