म. टा. प्रतिनिधी, नाशिक 'नाशिक वॉटर्स एज बोट क्लबच्या खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार, दोन एशियन स्पर्धा तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय नौकानयन खेळात प्रभावशाली कामगिरी केली आहे,' प्रतिपादन बोट क्लबचे संस्थापक तथा माजी महापौर प्रकाश मते यांनी केले. वॉटर्स एज बोट क्लबच्या खेळाडूंचा गौरव समारंभ नंदनवन लॉन्स येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक अंबादास तांबे, खेळाडू वैशाली तांबे, संतोष कडाळे, पूजा जाधव, राजेंद्र सोनार जागृती शहारे, तुषार कडाळे, मुकेश राजगुरू, मृण्मयी साळगावकर, मयूर मसाळ, किरण कोते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मते म्हणाले,'नाशिकच्या खेळाडूंना रोईंग या खेळामध्ये कामगिरी करता यावी या उद्देशाने बोट क्लबची स्थापना केली तो हेतू पार पाडत असून, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा विविध स्पर्धेत पदके मिळवून खेळाडूंनी नोकरीदेखील मिळवलेली आहे.' यावेळी माजी नगरसेवक दामोदर मानकर यांनीही नौकानयनमधील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी स्थापन केलेल्या नारायण मानकर प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कारासाठी मृण्मयी साळगावकर हिची निवड केली. माजी नगरसेवक तथा बोटक्लबचे उपाध्यक्ष विक्रांत मते यांनी रोईंगमधील महाराष्ट्राच्या संघात ७५ टक्के नाशिक वॉटर एज बोट क्लबच्या खेळाडूंचा समावेश असणे ही बाब नाशिककरांसाठी दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे सांगितले. बोट क्लबच्या खेळाडूंना आपण मदतीसाठी सदैव तत्पर राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निलेश साळगावकर, प्रा. हेमंत पाटील, के. बी. अडसरे, रवींद्र बोडके, शशिकांत टर्ले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशिक्षक अंबादास तांबे, सूत्रसंचलन प्रा. सोपान एरंडे यांनी तर आभार शशिकांत टर्ले यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप देशमुख मिलिंद कदम, तुषार ठाकरे, सुमंत खांदवे, डी. डी. जाधव, भाऊराव सानप, श्रावण जाधव, अविनाश देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट