\Bपारा पुन्हा चाळीशी ओलांडण्याची चिन्हे \B म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, शुक्रवारी नाशिकचे कमाल तापमान ३९.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. शहरालगतच्या तालुक्यांतील शुक्रवारी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या बरलेल्या सरींमुळे शहरात सायंकाळी गारवा होता. पण, या बदलेल्या हवामानानुसार दोन दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी ओलांडण्याची शक्यता आहे. यंदा उन्हाची दाहकता हैराण करून सोडणार, अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. शहरातील ४ एप्रिल रोजी कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्यानंतर शहरातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, शुक्रवारी कमाल ३९.९, तर किमान २०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. ४ एप्रिलनंतर तापमानाचा खालावत असलेला पारा सोमवार (८ एप्रिल) पासून पुन्हा वधारायला सुरुवात झाली. शुक्रवारी पारा चाळीशी जवळ पोहोचला असून एप्रिल अखेरीस ४४ अंश सेल्सियसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात १३ ते १६ एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे इतर भागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूर शिंगोटे, दातली, भोकणी आणि पांगरी परिसरात अवकाळी पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. देवपूर आणि फरदापुर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतामध्ये साठवलेला चारा आणि कांदा यावर आच्छादन घालण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सटाणा आणि मनमाड ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानात बदल होत असून पुढील दोन दिवसांत शहरातील तापमान पुन्हा चाळीशी पार जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. \Bपाच दिवसांचे तापमान\B दिनांक............................ कमाल...................... किमान १२ एप्रिल........................ ३९.९........................ २०.२ ११ एप्रिल........................ ३८.९........................ १९.२ १० एप्रिल........................ ३८.४........................ १८.२ ९ एप्रिल.......................... ३६.९........................ १९.८ ८ एप्रिल......................... ३८.४........................ १८.६
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट