भाजपने जर शिवसेनेला स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषद व पालिकेच्या सत्तेत समाविष्ट केले तरच भाजपचे काम करू, असा अल्टिमेटम सोमवारी (दि. १) झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात देण्यात आला. दि. १० एप्रिलपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली असून, ज्यांनी आतापर्यंत शिवसेना संपविण्यासाठी काम केले, शिवसैनिकांवर अन्याय, अपमान केला. जिल्हा परिषदेत काँग्रेसला घेऊन सत्ता मिळविली अशा भाजपसाठी आम्ही काम करायचे का, अशा संतप्त शब्दात भाजप-शिवसेना युतीवर शिवसैनिकांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मेळाव्यात भावना व्यक्त केल्या. या वेळी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आपला रोष प्रकट केला.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली आहे. अशा परिस्थितीत सोमवारी (दि. १) जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी काम करायचे की नाही, याबाबतच्या भूमिकेसाठी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात शिवसेनेला साडेचार वर्षांत भाजपने दिलेल्या सापत्न वागणूकीचा पाढाच शिवसेनेच्या नेत्यांसमोर वाचला. भाजपने गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिवसैनिकांना अडचणीत आणले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाचोऱ्यात शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याचा सूचना पोलिसांना दिल्या. तसेच जळगाव महापालिकेत युती करणार असल्याचे सांगत शेवटपर्यंत युती केली नाही, असा आरोपही या वेळी करण्यात आला.
‘भाजपकडून मलाही त्रासच’
भाजपने जसा शिवसैनिकांना त्रास दिला तसाच मलादेखील दिला. आईचे निधन झाले असताना भाजपच्या नेत्यांनी मला तुरूंगात टाकले यापेक्षा मोठा अन्याय काय आहे, अशी बोचरी टीका राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली युती ही शिवसैनिकांसाठीच असून, पक्षाचे संघटन वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसैनिक हे आदेशावर चालणारे आहेत. मात्र, भाजपकडून निमंत्रण आल्यशिवाय प्रचाराला जावू नका, कार्यकर्त्यांचा सन्मान राखणेदेखील महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच गुलाबराव देवकरांसंदर्भातील गोष्टी अफवा असल्याचा खुलासा गुलाबराव पाटलांनी केला. आम्ही १० एप्रिलपर्यंत वाट पाहू असेही गुलाबराव पाटलांनी सांगितले. तसेच भाजपच्या उमेदवाराबाबत आमच्यापेक्षा त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचा टोलाही राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.
महाजनांसोबत आज चर्चा
संजय सावंत यांनी सांगितले की, भाजप व शिवसेनेची युती देव, देश व धर्माच्या व्यापक जनहितासाठी केली आहे. गेल्या वर्षांत काय झाले हे विसरून आता काम करायचे आहे. आपण भाजपचे गिरीश महाजन यांची आज (दि. २) भेट घेऊन शिवसेनेच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेला सत्तेत सहभागी करून, काही सभापतिपद देण्यात यावीत. जळगाव महापालिकेत शिवसेनेला उपमहापौरपद द्यावे. पाचोरा तालुक्यातील शिवसैनिकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे. अमळनेर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी अशा अनेक मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट