दुकाने बंद केल्यास निवडणुकीवर बहिष्कार मनमाड : लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचे कारण दाखवित पोलिस सक्तीने रात्री १० वाजता हॉटेल व दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करत ही दंडेलशाही थांबली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा शहरातील हॉटेल व्यावसायिक व व्यापारी वर्गाने पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. 'लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू' असा इशारा देणारे पत्र व्यापाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयोग, विशेष पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शासनाचे नोंदणी दाखला व तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या परवान्यात हॉटेल व इतर काही प्रतिष्ठान पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे; मात्र पोलिस अधिकारी व कर्मचारी सध्या आचारसंहिता सुरू असल्याचे सांगत रात्री १० वाजताच सक्तीने हॉटेल बंद करीत असल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शहरातील अनेक हॉटेल्स ही रेल्वे स्थानकाजवळ आहेत. १० नंतर हॉटेल बंद केल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. अगोदरच मनमाड परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे त्यातच पोलिसांच्या अशा नियमांमुळे नुकसान होत आहे, असेही हॉटेल व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट