सटाण्यातील महिला रडकुंडीस; पालिका प्रशासनावर नाराजी म. टा. वृत्तसेवा, सटाणा पुनद योजनेला कळवणकरांकडून होणारा विरोध, गेल्या महिनाभरापासून पाणी नसल्यामुळे शहरवासियांची होणारी होरपळ यामुळे सटाणा शहरात पाणीसंकट कोसळले आहे. त्यातच मंगळवारी निवडणूक कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे आले असताना शहरातील महिलांनी त्यांच्या वाहनालाच घेराव घातला. पाणीटंचाईबाबत आढावा घेवून तातडीने तोडगो काढण्याचे आश्वासन मांढरे यांनी दिल्यानंतर महिलांची त्यांची वाट सोडली. सटाणा शहरातील नळांना गेल्या ३० दिवसांपासून थेंबभरही पाणी नाही. परिणामी नागरिकांसह महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शहराचा पाणीप्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्यासाठी उपाययोजना कयम पुनद धरणाचीच पाइपलाइन करून द्यावी व शहरवासियांना पाणी टंचाईपासून मुक्त करावे यासाठी शहरातील महिलांनी सुरज मांढरे यांचे वाहन अडवून त्यांना निवेदन दिले. सटाणा शहरात पिण्याच्या पाण्यासह वापराचे पाणीच मिळत नसल्याने महिलांना भटकंती करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने दोन दिवसांपासून सुरू केलेले दहा टँकर केवळ २०० लिटर पाणी एका घराला देतात. त्याद्वारेही १२ दिवसात एकदाच पाणी मिळणार आहे. अशा परिस्थितीत दिवस कसे काढावेत, असा प्रश्न महिलांना पडला आहे. त्यामुळे शहरातील महिलांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे वाहन तहसील कार्यालयात अडवून त्यांच्याशी भेट घेवून चर्चा केली. महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. पालिका प्रशासनाकडून समर्पक उत्तरे देणारी पदाधिकारी हजर नसतात. परिणामी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. उन्हाळ्याचे अद्याप चार बाकी आहेत. त्यामुळे लवकर पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांचे विलक्षण हाल होणार आहेत. विकत घेतलेले पाणी प्रचंड महाग आहे. पाण्याअभावी साथीचे रोग हात आहेत. लांबून पाणी आणल्यामुळे महिलांना कंबर, पाठ व मानदुखीचे त्रास होत आहेत. तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मांढरे यांनी प्रातांधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र इंगळे, सनपा मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रातांधिकारी महाजन यांनी शहरातील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसांत पाणी प्रश्न मार्गी लावू असे अभिवचन दिले. यावेळी अॅड. सरोज चंद्रात्रे, अॅड. स्मीता चिंधडे, अॅड. सुजाता पाठक, भारती अंधारे, रूपाली पंडीत, शितल जाधव, माजी नगरसेविका सिंधूबाई सोनवणे, अपेक्षा चव्हाण, कल्पना भामरे, अलका पिसोळकर, बेबीताई गुंजाळ, अनिता भमारे, संगिता सोनी, माधुरी जोशी, नंदीनी जोशी, वत्सला जाधव, आशा पंडीत आदींसह महिलाचा समावेश होता. पालिका प्रशासनाला पाणीपुरवठा करण्यात पूर्ण: अपयशी आले आहे. जुलै महिन्यापर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून जिल्हाधिकारी गावात येवूनही नगराध्यक्ष, नगरसेवकांनी त्यांची साधी भेट घेवून चर्चा करू नये यापेक्षा अधिक दुर्देव काय असू शकते. -अॅड. सरोज चंद्रात्रे, सटाणा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट