म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत असलेले लघुलेखक रवींद्र सोनवणेंबाबत सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केलेल्या तक्रारीमुळे चार महापौर आणि चार नगरसचिव अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. सोनवणे कामावर नसतानाही महापौरांच्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांचे वेतन काढले गेल्याचा संशय प्रशासनाला असून, त्यांच्या हजेरीबाबतची कागदपत्रे आणि महापौरांची प्रमाणपत्रेही आता तपासली जाणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात अनेक जण गोत्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाटील यांनी पुन्हा एक लेटरबॉम्ब टाकत महापौर रंजना भानसी यांनी सोनवणे यांना वाचवू नये, अशी मागणी केल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे सोनवणेंच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी नगरसचिव विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवली असता रवींद्र सोनवणे गेल्या दहा वर्षापासून महापौरांच्या 'रामायण' या निवास्थानी लघुलेखक म्हणून कार्यरत असल्याचे कागदोपत्री आढळले. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानी काम न करताच ते गेल्या दहा वर्षांपासून बनावट सह्यांच्या आधारे वेतन घेत असल्याची तक्रार पाटील यांनी पुराव्यानिशी आयुक्तांकडे केली आहे. सोनवणे यांची बायोमॅट्रिक हजेरी तपासण्यात यावी, त्यांनी हाताळलेल्या फायलींची माहिती द्यावी, अशी मागणी करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या तक्रारीनंतर सोनवणे हे महापौरांच्या बंगल्यावर अवतरले आहेत. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, त्यात आता अनेक कंगोरे समोर येत आहेत. सोनवणे नगरसचिवांकडे कार्यरत असल्याने त्यांच्या वेतनाशी संबंधित फायलींवर नगरसचिवांच्या सह्या असतात. वेतन काढण्यासाठी महापौर कार्यालयाचे प्रमाणपत्र लागते. त्यामुळे हे प्रमाणपत्र न सादर करताच देयके काढल्याचा आरोप आता होत आहे. नगरसचिवांनी प्रमाणपत्र न घेताच वेतन कसे काढले, याबाबतचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांतील चार महापौर आणि चार नगरसचिवांचा या प्रकरणातील सहभाग तपासला जाणार आहे. परिणामी सोनवणेंच्या अडचणी वाढल्या असतानाच त्यांना या प्रकारात मदत करणाऱ्या संबंधित तत्कालीन महापौरांसह विद्यमान महापौर रंजना भानसी आणि नगरसचिव गोरखनाथ आव्हाळेदेखील अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. -- पाटलांचा लेटरबॉम्ब महापौर रंजना भानसींवर सोनवणे यांच्या वाचवण्यासंदर्भात दबाव येत असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी महापौरांसह आयुक्ताना पुन्हा पत्र लिहून सोनवणेंना मदत करू नये, अशी मागणी केली आहे. सोनवणेंना मदत केल्यास तुम्हीच अडचणीत याल, असा इशाराही पाटील यांनी दिल्याने महापौरांची कोंडी झाली आहे. पाटील यांच्या या लेटरबॉम्बनंतर भानसी यांनी आता या प्रकरणापासून अंतर राखल्याची चर्चा आहे. सोनवणेंसाठी राष्ट्रवादींच्या बड्या नेत्यांकडून आता सत्ताधारी भाजपवरच दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट