म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करावी लागणार आहे. तसे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून, यामुळे नागरिकांना उमेदवारांचे चारित्र्य पडताळता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून, जिल्हा प्रशासनाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी याबाबत सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रशांत पाटील आदी या वेळी उपस्थित होते. राधाकृष्णन बी. म्हणाले, की नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणांसोबत बैठकी घेऊन आढावा घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांबाबत आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास येत असेल तर त्याची माहिती नागरिकांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला द्यावी. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम व तत्सम यंत्रसामग्री उपलब्ध झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. व्यक्ती किंवा पक्षाचा प्रचार होईल असे फ्लेक्स, बॅनर काढण्यास सुरुवात झाली असून, पदाधिकाऱ्यांची वाहनेदेखील जमा करून घेतल्याचे या वेळी सांगण्यात आले.
आचारसंहिताभंगावर करा तक्रार
निवडणुकीशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी शाखेने १९५० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला असून, त्यावर निवडणुकीशी संबंधित माहिती, तसेच शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. याशिवाय आचारसंहिताभंगाची तक्रारही या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिक करू शकणार आहेत. 'सिविजिल अॅप'वरही पुराव्यानिशी याबाबत तक्रार करता येणार आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्याची, तसेच त्याने केलेल्या तक्रारीवर कोणती पाऊले उचलण्यात आली, याची माहिती एसएमएसद्वारे संबंधित तक्रारदाराला देण्यात येणार आहे.
मतदार नोंदणी ३० मार्चपर्यंत
ज्यांची नावे मतदार यादीमध्ये नाहीत, त्यांना अजूनही मतदार नोंदणीची संधी असणार आहे. ही मतदार नोंदणी ३० मार्चपर्यंत करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी अर्ज भरता येऊ शकतो. याव्यतिरिक्त मतदार नोंदणी कार्यालयात संपर्क साधून मतदार नोंदणी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे त्यास जोडल्यास मतदार नोंदणी होऊ शकेल. नवमतदारांची नावे पुरवणी मतदार यादीत घेतली जाणार असून, त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख : २ एप्रिल २०१९
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत : ९ एप्रिल २०१९
नामनिर्देशन पत्राची छाननी : १० एप्रिल २०१९
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : १२ एप्रिल २०१९
मतदान : २९ एप्रिल २०१९
मतमोजणी : २३ मे २०१९
निवडणूकप्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : २७ मे २०१९
- आचारसंहिताभंगाच्या तक्रारींसाठी सिविजिल अॅप दोन दिवसांत होणार कार्यान्वित
- सुगम अॅपद्वारे घेता येणार जाहीर सभेची परवानगी
- निवडक मतदार केंद्रांचे होणार वेबकास्टिंग
- निवडणुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
- सुविधा, सुगम, पीडब्लूडी, सीविजिल यांसारख्या ॲपचा प्रथमच वापर
- मतदानासाठी १०,५०२ बॅलट युनिट, ६,२१५ कंट्रोल युनिट आणि ६,४८९ व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त
- निवडणुकीशी संबंधित सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली
- प्रत्येक मतदान केंद्रावर १४०० पेक्षा कमी मतदार
- निवडणूक खर्च, दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र निवडणूक निरीक्षक
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने ताब्यात.
- निवडणूक काळातील दूरध्वनीची बिलेदेखील अदा न करण्याच्या सूचना.
- उमेदवारांना सोशल मीडिया अकौंटची माहिती द्यावी लागणार.
४,४४६ मतदान केंद्रे
२३,३२,५९० पुरुष मतदार
२१,१२,८८३ महिला मतदार
०७ अनिवासी भारतीय मतदार