म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक व्यवहारपातळीवर तू-मी हे भिन्नच असतात. ते भिन्न असले तरी माणूस तर आहेतच. आत्मविसर्जित व्हायचे ते विश्वाची अनुभूती घेताना. हा सर्जनशील कलावंतांचा चिंतनपसारा आहे. पसाऱ्यातील सूत्र शोधायचे, त्याचे व्यवस्थापन करायचे, त्याचे पुन्हा सर्जन साधायचे, ही साहित्यनिर्मितीची प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. एकनाथ पगार यांनी केले. जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे रविवारी जिल्हास्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. एकनाथ पगार बोलत होते. ज्येष्ठ अहिराणी लेखक रामदास वाघ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. पगार पुढे म्हणाले की, जगाच्या कणाकणात स्वत:ला शोधायचे. त्यातूनच जग शोधून काढायचे. आत्मशोध हा जीवनशोधच असतो. लेखकाची साहित्यनिर्मिती ही शोधाची प्रक्रियाच असते. हे बाह्यवास्तव काय आहे, ते असे का भासते, जाणवते, कळते, आकळते, जवळ करते आणि दूरही का लोटत आहे. निर्मितीक्षमतेत उत्स्फूर्त अंत:प्रवाह वाहत असतो. साहित्याविष्कारातून कागदी अस्तित्त्वाचा कलात्मक वास्तवात, संरचित कल्पितात अर्थ देणे, सार्थता शोधणे हे तर कवी-लेखक, कलावंतांनी करणे अगत्याचे असते. बाजारू जगण्याचे मार्केटिंग होत चालले आहे. ते जग तरी सुंदर व्हावे, सुखकारक व्हावे असेही डॉ. पगार म्हणाले. यावेळी उदघाटक ज्येष्ठ लेखक रामदास वाघ म्हणाले की, शेतकऱ्यांच्या घरात आनंद फुलवून त्यांचे दु:ख दूर करणारे साहित्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे. समाजाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. उषा सावंत, सावळीराम तिदमे यांची उपस्थिती होती. परिसंवाद, कथा रंगल्या संमेलनात 'जागवूया स्मृती' विषयावरील परिसंवाद रंगला. त्यानंतर 'आजच्या कथा-कादंबरीत सामाजिक वास्तव कितपत दिसते?' या विषयावरील परिसंवादात अजय बिरारी, प्रा. तुषार चांदवडकर यांनी मते मांडली. कथाकथन सत्रात विजयकुमार मिठे, अलका कोठावदे, डॉ. एस. के. पाटील, सहभागी झाले. त्यांनी अभिनयासह कथा सादर केल्या. तिसऱ्या सत्रात 'शब्दझंकार' हे कविसंमेलन झाले. त्यात त्यात खलील मोमीन, रामदास वाघ, किशोर पाठक, प्रा. उषा सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाला कमलाकर देसले, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, प्रा. गंगाधर अहिरे, बालसाहित्यिक संजय वाघ आदी साहित्यिक उपस्थित होते. ज्येष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने यांना पहिला सूर्योदय शब्दरत्न पुरस्कार कवी किशोर पाठक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डिसूझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या सभागृहात दिवसभर हे संमेलन झाले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. यशस्वीतेसाठी सूर्योदय मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन, प्रवीण लोहार, डी. बी. महाजन आदींनी परिश्रम घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट