आयुक्तांचे आश्वासन; स्थायीच्या संमतीविनाच स्लॅबमध्ये बदल म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी करयोग्य मूल्यदरवाढ वाढवण्याबरोबरच शहरातील पाणी वापराचे परिमाण बदलून करवाढीचा नवा दणका दिल्याचे समोर आले आहे. मुंढेंनी पाणीपट्टीच्या बदललेल्या परिमाणानुसार नागरिकांना बिले येण्यास सुरूवात झाल्यानंतर आगडोंब उसळला असून, नव्या परिमाणानुसार पाणी बिलात पाच ते तीसपटीत वाढ झाल्याचे पडासद महासभेत गुरुवारी पहायला मिळाले. स्थायी समितीची मंजुरी न घेताच, परस्पर ही वाढ करण्यात आल्याचे समोर आले असून, यावर नगरसेवकांनी जाब विचारल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत झालेल्या बजेटच्या विशेष महासभेत नगरसेवक गुरुमीतसिंग बग्गा आणि सुधारकर बडगुजर यांनी वाढीव पाणीपट्टीचा विषय मांडला. जेवढे पाणी कमी वापराल, तेवढा दर कमी असणे आवश्यक असताना प्रशासनाने मात्र जेवढे कमी पाणी वापराल, तेवढे जास्त बिल भरावे लागेल, असे धोरण स्विकारल्याची टिका बग्गा यांनी केली. पाणी कमी वापरले तर नागरिकांना गुन्हेगार समजले जात असल्याचा आरोप करत, 'कुणाच्या समंतीने पाणीपट्टी वाढवली,' असा सवाल केला. तर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पाणीपट्टीच्या वाढीव आदेशातील कलम १३४/२ चा संदर्भ पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रवींद्र नलावडे यांना वाचण्यास सांगितला. त्यात 'स्थायी समितीच्या पूर्वसंमतीने हा स्लॅब बदलता येईल,' असे त्यात नमूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, सदरचा स्लॅब बदलण्याचा आदेश हा स्थायी समितीच्या संमतीने काढला नसल्याची कबुली त्यांनी दिली. मान्यता नसताना अंमलबजावणी कशी केली त्यावर बग्गा यांनी जाब विचारला. त्यावर 'बघून घेतो', अशी सारवासारव नलावडे यांनी केल्याने मान्यता नसताना अंमलबजावणी केलीच कशी असा सवाल उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांनी याला मुकसंमती आहे का, असा आरोपही सदस्यांनी यावेळी केला. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत तपासणी केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे या वाढीव पाणीपट्टीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरासरी तीस पट वाढ शहरात निवासी नळजोडणी अर्धा इंचपासून ते बारा इंचापर्यंत दिली जाते. त्यासाठी एक हजार लिटरला पाच रुपये दर कायम ठेवण्यात आला आहे. परंतू पाणी वापराचे परिमाणानुसार वाढ करण्यात आली आहे. अर्धा इंची नळजोडणीधारकाला दीडशे मासिक, तीस किलो लिटरला दीडशे तर बारा इंची नळजोडणी धारकाला ४० हजार ५०० मासिक किलोलीटरला २ लाख अडीच हजार कमीतकमी पाणी वापराचा दर राहणार आहे. त्यामुळे शंभर रुपये बिल येणाऱ्यांना दिडशे, ३४० रुपये मासिक बिल येणाऱ्यांना ६०० तर ५,६०० रुपये बिल येणाऱ्यांना आता ५६०० एवढी पाणीपट्टी येत आहे. व्यापारी व औद्योगिक दरात पाणी वापराचे परिमाण साधारण तीसपटीपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे या वाढीव पाणीपट्टीच्या बिलाने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट