म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक कीर्ती कलामंदिर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे रविवारी (दि. १०) सायंकाळी साडेसहा वाजता एकाच वेळी महाकवी कालिदास कलामंदिर, परशुराम सायखेडकर नाट्यगृह आणि कुसुमाग्रज स्मारक आा तीन ठिकाणी रसयात्रा या कुसुमाग्रजांच्या कवितांचा नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्ति कला मंदिर, नाशिकमधील एक नामवंत कथ्थक नृत्य संस्था असून १९७६ मध्ये ज्येष्ठ नृत्यांगना गुरू रेखा नाडगौडा यांनी संस्थेची स्थापना केली आणि नाशिकच्या रसिकजनांसाठी नृत्यकलानुभवाचे वेगळे दालन उघडे झाले. तेव्हापासून विविध विषयांना केंद्रस्थानी ठेवून नृत्यसंरचना सादर करण्याची परंपरा संस्थेने आजतागायत जपली आहे. अशाच नृत्यसंरचनांमधील एक 'रसयात्रा' हा कार्यक्रम आहे. नाशिकचे नामवंत कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मविभूषित स्व. वि. वा. शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज, ह्यांच्या कवितांवर आधारित कलाकृती आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच दिवशी तीन ग्रुप्स तीन वेगळया ठिकाणी रसयात्रा सादर करणार आहेत. एकच संकल्पना असली तरी तीन ठिकाणी 'आदिरेखा' द्वयींनी सादरीकरणात विविधता ठेवली आहे. यामध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र सेवा संघ, फ्रावशी अॅकॅडमी यांच्यासह शहरातील अनेक शाळांचा महत्त्वाचा सहभाग असेल. तसेच १९८८ मध्ये केलेल्या पहिल्या प्रयोगातील 'आगगाडी-जमीन' प्रेक्षकांच्या पुनर्भेटीला येणार आहे. नृत्यसंरचनाकार 'आदिरेखा' (रेखा नाडगौडा आणि अदिती पानसे) सह-दिग्दर्शन 'श्रीमधुर्वा' (श्रिया पांडे, मधुश्री वैद्य आणि दुर्वाक्षी पाटील), संगीत कुमुदताई अभ्यंकर आणि बाळ भाटे तसेच निवेदन सदानंद जोशी, रेणुका येवलेकर, आनंद प्रभू हे करणार आहेत. जुन्या आठवणींना उजाळा तात्यासाहेबांच्या पंच्याहत्तरीनिमित्त १९८८ मध्ये रसयात्रेचा पहिला प्रयोग सादर केला. त्यांनी भरभरून कौतुक केलेल्या या कलाकृतीचे ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान सोहोळ्यात थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरही झाले. सगळ्या नाशिककरांसाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. तात्यासाहेबांचे साहित्यातील अमूल्य योगदान पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करण्यासाठी पुन्हा 'रसयात्रा' करण्याचा विचार रेखा नाडगौडा यांच्या मनात आला. ज्यामध्ये काही नवीन कवितांचाही समावेश करण्यात आला आहे. लोगो : कल्चर वार्ता
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट