म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आता परिवर्तनाची आवश्यकता व राष्ट्रीय गरज आहे. देशावर भाजपची राष्ट्रीय आपत्ती आली आहे. त्यासाठी जागृत राहावे लागेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
चोपडा लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघ 'कार्यकर्ता संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळी ती यंत्रे तपासून घ्यावीत. भाजप रडीचा डाव खेळणार असले, तरी परिवर्तन होणार आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती, ती राज्ये त्यांच्या हातातून गेल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या कामांचे कौतुक करुन त्यांच्यामुळे नाशिकचा चेहरा बदलल्याचे सांगितले. नाशिकची संपूर्ण जबाबदारी भुजबळांकडे आहे. त्यामुळे या विकास पुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या शेतकरीविरोधी भाजप सरकारला हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राफेल, नोटाबंदी व भाजपच्या कारभाचे वाभाडे काढून शेतकऱ्यांना दिलेल्या योजनांवर टीका केली. रोजगार देण्यातही सरकारला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाच वर्षात माझ्या काळात जवळपास पूर्ण झालेले प्रकल्प सुरू केले नसल्याचे सांगत सरकारवर टीका केली. माजी आमदार अपूर्व हिरे यांनी सिडकोचा प्रश्न मांडत महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, गटनेते गजानन शेलार, नगरसेविका सुषमा पगारे, समीना मेमन, विष्णूपंत म्हैसधूणे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार हेमंत टकले, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी आमदार जयवंत जाधव यांनी केले.
'मुख्यमंत्र्यांनी नाशिकला काय दिले?'
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिक सोळाव्या स्थानी होते, आज ते शंभरातही नाही. आता नाशिकची जागा नागपूरने घेतली. नागपूरने पुढे जावे. पण, मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असताना नाशिक गायब झाले कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी राज्यसरकारने आपला वाटा जाहीर केला आणि त्यानंतर केंद्रीय बजेटमध्ये मंजुरी मिळाली. मात्र, अद्याप ते झाले नाही. आता पुन्हा एकदा सर्वेक्षणाचा घाट घालून जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले जात आहे. नाशिकमध्ये बोट क्लब, कालाग्रामसारखे अनेक प्रकल्प पूर्ण केले, तसेच अनेक प्रकल्पांचे काम सुरू करून दिले. ते दत्तक पित्याने पूर्ण करून प्रकल्प का सुरू केले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला नेमके काय दिले, असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'चौकीदारही चौर है' असे म्हणणारे उद्धव ठाकरे पुन्हा त्यांच्यासोबत जाऊन बसले आहेत. सरकारने जनतेला फसवले असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी कबूल केले आहे. सरकारचे निर्णय जनतेच्या विरोधात गेले असतील तर त्याला शिवसेनादेखील तितकीच जबाबदार आहे, असे ते म्हणाले.
एका परिवारावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोनच गोष्टी सांगतात. ते सांगतात 'देश मजबूत हाथों मैं हैं', तर दुसरे 'एका परिवाराने देशाचे वाटोळे केले'. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाला मजबूत करण्याचे काम केले. या परिवारातील दोन पंतप्रधानांची हत्या झाली. पंतप्रधांनानी जपून बोलले पाहिजे. इंदिरा गांधी यांनी पाकचे दोन तुकडे केले, तर राजीव गांधी यांनी देशाला विज्ञानाची दृष्टी दिली, असेही ते म्हणाले.
निवडणुका एप्रिलमध्ये
लोकसभा निवडणुका ७ किंवा ८ मार्चला जाहीर होतील व एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होईल, असे सांगत पवार यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना केल्या.