निवडणूक आयोगाचे जिल्हा यंत्रणेला निर्देश म. टा. प्रतिनिधी, नाशिक मोबाइल टॉवर, इंटरनेट यासारख्या सुविधा नसलेल्या १३० मतदान केंद्रांच्या ठिकाणी लवकर कनेक्टिविटी सेवा उभारा, असे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असून आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी निवडणूकपूर्व कामांचा आणि निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रांची पाहणी करून ती सज्ज ठेवण्याबाबतची खातरजमा करा, असे निर्दश यावेळी देण्यात आले. बागलाण तालुक्यातील साल्हेर-मुल्हेरसह पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये मतदान केंद्र असली तरी तेथे मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिविटीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली. अशी १३० मतदान केंद्र असून या गावांमध्ये मोबाइल टॉवर, वायरलेस सुविधा उभारण्याचे काम लवकर हाती घ्या, असे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. पुन्हा व्हीव्हीपॅट जनजागृती यंदा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनची मदत घेण्यात येणार आहे. आपण दिलेले मत संबंधित व्यक्तीलाच मिळणार असल्याबाबतची खातरजमा त्यामुळे होणार आहे. व्हीव्हीपॅट नेमके कसे काम करते याची प्रात्यक्षिके गेल्या महिन्यात जिल्हाभर दाखविण्यात आली. जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा लोकांपर्यंत पोहोचून ही प्रात्यक्षिके दाखवा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट