धोकादायक ठरणारा स्वाइन फ्लू दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. या आजाराने २०१९ मध्ये अद्याप मृत्यू झालेला नसला तरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिसून येत आहे. याचमुळे गेल्या वर्षीच्या अखेरीस बंद करण्यात आलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वाइन फ्लू कक्ष जानेवारीपासून सुरू झाला असून, आजमितीस येथे चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सर्दी-पडसे, डोकेदुखी अशी साधारण लक्षणे असलेल्या स्वाइन फ्लूमुळे २०१८ मध्ये तब्बल ९१ जणांचे मृत्यू झाले होते. २००९ ते २०१८ या दहा वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक मृत्यूंची नोंद गेल्या वर्षी झाली होती. ऑक्टोबर २०१८ पर्यंत या आजाराने धुमाकूळ घातला. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मात्र स्वाइन फ्लूने विश्रांती घेतली. याचमुळे सिव्हिल हॉस्पिटलने सुरू केलेला स्वाइन फ्लू वॉर्डही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जानेवारी महिना उजाडताच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले. जानेवारीच्या २८ तारखेपर्यंत १३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यातील दोन रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर ११ रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. आजमितीस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चार रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. जानेवारीपर्यंत समोर आलेल्या रुग्णांमध्ये निफाड, नाशिक आणि येवला तालुक्यातील प्रत्येकी एक, नाशिक शहरातील पाच, मालेगाव शहरातील चार आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक अशा १३ रुग्णांचा समावेश आहे.
रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता
सध्या वातावरणात आमूलाग्र बदल होत असून, थंडी आणि वाढते तापमान याचा थेट परिणाम एचवन एनवन स्वाइन फ्लू या आजारावर पडतो. दिवसाचे तापमान व रात्रीच्या तापमानामध्ये कमालीची तफावत आढळून येत असल्याने आगामी काही काळात या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. सर्दी-पडसे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास अंगावर न काढता डॉक्टरांकडून तपासून उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
यांनी असावे सावध
हा आजार हवेमार्फत पसरतो. हा विषाणुजन्य आजार असून, पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती माता, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगाचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण, यकृत मूत्रपिंड यांचे आजार, दीर्घकाळ औषध घेणाऱ्या व्यक्तींनी याबाबत सावध राहावे.
अशी घ्यावी काळजी
या आजारांमध्ये ताप येणे, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी-डोकेदुखी, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी आणि जुलाबाची अशी लक्षणे दिसून येतात. आजाराची लक्षणे समोर येताच रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असते. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये टॅमी फ्लू हे प्रभावी औषध उपलब्ध आहे. हा आजार टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावे. पौष्टिक आहार, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या असा आहार घ्यावा. हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट