पौष एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरात वारकऱ्यांचा भरला मेळा
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
ञ्यंबकेश्वर म टा वृत्तसेवा
'धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा', असे म्हणत राज्यासह परप्रांतातून आलेले लाखो भाविक संत निवृत्तिनाथांच्या चरणी लीन झाले. महिनाीारापासून घरापासून दूर शेकडो मैल चालत अलेला वारकरी कुशावर्तात गोदामाईच्या स्पर्शाने आणि नाथांच्या संजीवन समाधी दर्शनाने कृतार्थ झाला. दुष्काळ आदी समस्यांनी त्रासलेला असतांनाही निवृत्तिनाथांच्या दर्शनाची ओढ त्यास दूर ठेऊ शकली नाही याची प्रचीती भक्तांची मांदियाळी पाहून आली आहे.
दोन दिवसांपासून वारकरी शहरात दाखल होत स्थिरावले होते.गुरूवारी सुर्यकिरणांच्या आगोदर आपल्या ठिकाणाहून बाहेर पडत थेट कुशावर्तावर पोहचले तेथे कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता स्थान झाले. तेथून थेट दर्शनबारीत जाऊन हरिनामाचा जप करत काही तास उभे राहून प्रतिक्षा करत दर्शन झाले. मंदिरातून बाहेर पडताच संत गजानन महाराज यांनी फराळाची व्यवस्था केली होती.तेथे प्रवासी भाविक त्याचा लाभ घेत होते.अर्थात दिंडीत आलेला वारकरी आपल्या ठेप्यावर जात भजन किर्तनात दंग झाला होता.
पहाटे झाली महापूजा
त्र्यंबकेश्वर हे ठिकाण धार्मिक टुरिझमसाठी चांगले आहे. त्यासाठी येथील शहर विकास आराखडा मंजूर होणे गरजेचे आहे, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. पौषवारी निमित्ताने गुरुवारी पहाटे पाच वाजता संत निवृत्तिनाथ संजीवन समाधीच्या महापूजाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी येथील निर्मळ वारीचे कौतुकही केले. संजीवन समाधी मंदिर जिर्णोद्धाराचे काम सुंदर होत आहे. मंदिर संस्थानाच्या अध्यक्षांनी सादर केलेला २२.५ कोटींचा परिसर विकास आराखडा मंजूर करण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक लवकरच आयोजित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
विश्वस्तांसह भाविकांची गर्दी
एकादशीच्या पहाटे पाच वाजता पालकमंत्री आणि नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर हे सपत्नीक पुजेस बसले होते. यावेळी भाजपचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांच्यासह उपनगराध्यक्ष कैलास चोथे, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक श्यामराव गंगापुत्र, आरोग्य व यात्रा सभापती माधवी भुजंग, समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय महाराज धोंडगे, विश्वस्त जिजाबाई लांडे, गटनेता समीर पाटणकर, बांधकाम सभापती सायली शिखरे,पाणीपुरवठा सभापती शिल्पा रामायणे,नगरसेवक विष्णू दोबाडे, यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
विश्वस्त पुंडलीक थेटे यांनी प्रास्ताविक केले. समाधी मंदिर उभारण्यासाठी शासनाकडून तीर्थक्षेत्राप्रमाणे निधी आणण्यासाठी संस्थानच्या पाठीशी उभे राहून वारकऱ्यांच्या आद्यपीठाचा विकास करावा अशी मागणी थेटे यांनी केली. यावेळी समाधी संस्थान व नगरपालिकेतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या संतोष भुजंग, हर्षल शिखरे. सुयोग वाडेकर, भावेश शिखरे,प्रांताधिकारी राहुल पाटील,तहसीलदार महेंद्र पवार, मुख्याधिकारी डॉ चेतना केरुरे, पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
दर्शनाचा लाभ
शासकिय पुजेनंतर नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील बारी येथील वंदना व लहानू मारुती गोडे या दाम्पत्यास प्रथम दर्शनाचा मान मिळाला. पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ते दांपत्य रात्री ११ वाजेपासून रांगेत उभे होते. या वेळेस संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या तैलचित्राचेही अनावरण करण्यात आले.
विश्वस्तच विसरले विश्वस्तांना
महापुजेनंतर झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विश्वस्त पुंडलीक थेटे करत होते. यावेळेस संजय महाराज धोंडगे, सचिव पवनकुमार भुतडा आणखी एक विश्वस्त डॉ. धनश्री हरदास आदी उपस्थितांचे सत्कार करीत होते. या संपूर्ण कार्यक्रमात रात्री दहा वाजेपासून मंदिरात उपस्थित असलेल्या विश्वस्त जिजाबाई मधुकर लांडे यांचा विसर पडला. कार्यक्रम आटोपत असतांना जिजाबाई लांडे यांनी याबद्दल तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.