arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhavMT
नाशिक: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात सीसीटीव्ही यंत्रणा इंदिरानगर येथील अंडरपासमध्ये बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेचा वापर २६ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. शहरात प्रथमच या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असून, 'वन वे'चा नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना यामुळे घरपोच दंडाची पावती पाठविणे शहर वाहतूक पोलिसांना शक्य होणार आहे.
छोटे आकारमान असलेला इंदिरानगर अंडरपास सुरुवातीपासूनच पोलिसांसह वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी येथे एकेरी वाहतुकीचा पर्याय निवडला. मात्र, पोलिस असेपर्यंतच येथे सर्व सुरळीत असते. पोलिस नसले की पुन्हा दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू होते आणि वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. या ठिकाणी २४ तास पोलिसांची नियुक्ती करणे शक्य नसल्याने पोलिसांसाठी ही नवी यंत्रणा मोठी फायद्याची ठरणार आहे. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांची माहिती या यंत्रणेमार्फत वाहतूक शाखेला मिळणार आहे. तसेच एकाच वाहनाने सलग किती वेळा नियम मोडला तर तेही वाहतूक पोलिसांना समजू शकणार आहे.
अॅम्ब्युलन्स अडकली अन्..
ही यंत्रणा अॅपक्राफ्टझ या सॉफ्टवेअर कंपनीच्या महेंद्र एकबोटे यांनी विकसित केली आहे. याबाबत एकबोटे म्हणाले की, एक दिवस या ठिकाणाहून जाताना एक अॅम्ब्युलन्स येथील वाहतूक कोंडीत सापडल्याचे दिसले. वाहनांच्या रांगा इतक्या विचित्र होत्या की, अॅम्ब्युलन्सची सहजतेने येथून सुटका होणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर पदरमोड करून आम्ही ही यंत्रणा विकसित करण्याचे ठरविले. यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केले. एआय संशोधन, कलर, ब्युटिफिकेशन असा चार लाख रुपयांपर्यंत खर्च गेला. पैशांचा प्रश्न होता, पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून ही योजना हाती घेतल्याचे एकबोटे यांनी स्पष्ट केले.
अशी असेल यंत्रणा
एआय तंत्रज्ञानावर अनेक अॅप यापूर्वी विकसित झाले आहेत. मात्र, वाहतूक नियोजन आणि त्यातून कायदेशीर दंड वसूल करण्याचा प्रयत्न झालेला नव्हता. त्यामुळे ही नाशिकच नव्हे तर राज्यात एकमेव अशी यंत्रणा ठरणार आहे. अंडरपासमध्ये तीन कॅमेरे बसविण्यात येणार आहे. गोविंदनगरकडून इंदिरानगरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर या कॅमेऱ्यांची नजर राहील. याशिवाय इतर भागांवरही कॅमेरे लक्ष ठेवून असतील. गोविंदनगरकडून एखादे वाहन अंडरपासच्या दिशेने आले तर एक 'वुटर' जोरात आवाज करून वाहनचालकास पुढे न येण्याचा इशारा देईल. यानंतरही वाहन पुढे आले, तर सीसीटीव्ही कॅमेरे नंबर प्लेटसह संपूर्ण वाहनाचा फोटो काढेल.
दंडाची पावती घरपोच
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेले फोटो लागलीच वाहतूक शाखेच्या सर्व्हरवर पाठविण्यात येतील. यानंतर वाहतूक शाखा वाहन क्रमांकाच्या आधारे वाहनचालकाच्या पत्त्यावर दंडाची नोटीस पाठवून देईल. दंडाची रक्कम भरली नाही तर अशा वाहनचालकांना थेट कोर्टात पाठवण्यात येते. एखाद्या वाहनाने किती वेळा नियम मोडला, याचीही नोंद होणार असून, अशा वाहनचालकांचा परवाना निलंबित करणे किंवा यापेक्षा कडक कारवाई करणे यामुळे सोपे होणार आहे.
--
२६ जानेवारीपासून कार्यान्वित
ही यंत्रणा २६ जानेवारीपासून कार्यन्वित होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सर्व लोकप्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शहर सुव्यवस्थित असणे हे त्या शहरातील प्रत्येक नागरिकांची गरज बनली आहे. वाहतूक बेशिस्त असेल तर त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रात जाणवतात. या पार्श्वभूमीवर ही योजना हाती घेतली होती. आता ती पूर्णत्वास चालली आहे, याचे समाधान मोठे आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारे प्रथमच काम होत आहे.
- महेंद्र एकबोटे, संचालक, अॅपक्राफ्टझ कंपनी
--
एआय तंत्रज्ञानामुळे मोठा डेटाबेस तयार होतो. परदेशात याचा वापर व्यापक पद्धतीने होतो. वाहतूकच नव्हे तर गुन्हेगारी नियंत्रण, प्रतिबंधात्मक कारवाई यासाठी याचा वापर होणार आहे. उद्याचे भविष्य हे तंत्रज्ञान असून, त्यामुळेच त्याचा स्वीकार आपण केला. शहरातील इतर भागातसुद्धा याच पद्धतीने काम हाती घेण्यात येईल.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त