ज्येष्ठ प्रकाशक दिनकर गांगल यांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी, नाशिक प्रसिद्धी माध्यमांच्या गदारोळात वाचन संस्कृती लोप पावते की काय, असे काही वर्षापूर्वी वाटत होते. मात्र, प्रभाकर बागुलांच्या साहित्यामुळे तो भ्रम दूर झाला. त्यांच्यासारख्या लेखकांमुळे वाचन संस्कृती आजही टिकून असून जास्त लोकांपर्यंत पोहचते आहे यात शंका नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक दिनकर गांगल यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या (सावाना) वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार दिनकर गांगल यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर बागुल यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 'सावाना'च्या मु. श. औरंगाबादकर सभागृहात बुधवारी पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. गांगल म्हणाले, की बागुल हे झपाटलेले लेखक आहे. त्यांचे साहित्य अभ्यासपूर्ण असून त्याच्या लेखनाची यादी पाहिली की त्यापुढे नतमस्तक व्हावे असे वाटते. त्यांची साहित्य निर्मिती ही त्यांच्या वेदनेतून जन्माला आली असल्याने ती अस्सल आहे. वाचन हे अनेक माध्यमांमधले माध्यम आहे. या माध्यमाला मध्यंतरीच्या काळात वाईट दिवस आले होते. बागुलांसारख्या लेखकांमुळे त्याला पुन्हा चागले दिवस आले आहेत हे नाकारून चालणार नाही. त्यांची ९७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लवकरच ते शतक पूर्ण करतील, असा विश्वस गांगल यांनी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना प्रभाकर बागुल म्हणाले, की नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असा संस्थेकडून माझा सत्कार होतो आहे, हे मी माझे भाग्य समजतो. निवृत्तीनंतरच्या १८ वर्षांच्या कालखंडात मी माझे साहित्य जास्त लिहिले आहे. राजे शहाजींना प्रकाशात आणण्याचे काम माझ्या कादंबरीतून केले आहे. या साहित्य निर्मितीसाठी अनेक रात्री मी जागून काढल्या आहेत. अनेकदा जीवनात दुखाचे प्रसंग आले. त्यावर स्वार होऊन माझी साहित्य निर्मिती केली. श्रीकंत बेणी यांनी प्रास्ताविक केले. वसंत खैरनार यांनी गांगल यांचा परिचय करून दिला. भानुदास शौचे यांनी मानपत्राचे वाचन केले. \Bफोटो : सतीश काळे \B
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट