म. टा. वृत्तसेवा, धुळे
लहानपणापासून स्वराज्य निर्मितीच्या काळापर्यंत जिजाऊ माँ साहेब शिवरायांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी केले. शहरातील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झेड. बी. पाटील महाविद्यालयात शनिवारी (दि. १२) आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न देणाऱ्या राजमाता जिजाऊ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी देशमुख म्हणाले की, जिजाऊंनी केलेल्या संस्कारांमुळेच शिवाजी राजे घडले. युद्धाच्या नियोजनात जिजाऊ या शिवबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. आदिलशाही, निजामशाही व कुतूबशाही यांच्या अन्याय व अत्याचाराने त्रस्त अशा समाजात आत्मविश्वास निर्माण करीत अत्यंत कठीण परिस्थिती जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करून स्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले, असेही ते म्हणाले.
या वेळी अध्यक्षस्थानी जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ. अरुण झुलालराव साळुंके होते. तर संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, प्रा. सुधीर पाटील, संचालक अजितराव मोरे, नानाभाऊ कोर, अनिल चौधरी, शेखर सूर्यवंशी, स्मिता साळुंके, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कर्तृत्ववान युवक घडविणे मातेचे कार्य
वर्तमान परिस्थितीत युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीसाठी दिलेले सर्वोच्च समर्पण व शिवरायांचे कर्तृत्व याचे चिंतन युवा मनावर होणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले. राष्ट्रासाठी शिवरायांसारखा न्यायप्रिय, स्त्रियांचा आदर करणारा धैर्यवान, चारित्र्यवान, कर्तृत्ववान युवक घडविणे प्रत्येक मातेचे पवित्र कार्य आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी समाजात आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शिवबांना मार्गदर्शन केल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुणराव साळुंके म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट