म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अखेर मुहूर्त लागलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत बुधवारी (दि. ९) होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलच्या नुतनीकरणामुळे नाशिकरोडच्या विभागीय आयुक्तालयात बैठक होईल. यात पुढील वर्षासाठी ७८४ कोटींचा संभाव्य आराखडा सादर केला जाणार आहे. आदिवासी विभागातील शिक्षकांचे वेतन आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती राज्य सरकार परस्पर वर्ग करणार असल्याने हा निधी घटल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाने दिली आहे.
पुढील आर्थिक वर्षाच्या आराखड्यास जानेवारीतच मंजुरी देणे आवश्यक असते. जिल्हा नियोजन विभागाने हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या २०१८-१९ चा आराखडा बनविण्याच्या कामास नियोजन विभागाने गती दिली आहे. विविध विभागांकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. गतवर्षी हा आराखडा ९१७ कोटींचा होता. यंदा तो ७८४ कोटींचा असल्याची माहिती नियोजन विभागाने दिली आहे. सर्वसाधारण योजनांसाठी गतवर्षी ३३८ कोटींची तरतूद करण्यात आली. यंदाही ती तशीच ठेवली आहे. अनुसूचित जाती उपयोजनांवरही गतवर्षीप्रमाणे यंदाही ९८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गतवर्षी आदिवासी उपयोजनांसाठी ४८१ कोटींची तरतूद करण्यात आली. यंदा ३४८ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाने दिली आहे. गतवर्षीपर्यंत आदिवासी विकास विभाग शिक्षकांचे वेतन तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे जिल्हा नियोजन समितीकडे जमा करीत असे. या समितीच्या माध्यमातून हे पैसे संबंधितांना वितरित केले जात. परंतु, यंदा हे पैसे राज्य सरकार परस्पर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या निधीमधून तो वजा झाला आहे.
सर्वसाधारण योजनेंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक, ग्रामपंचायतींना सहायक अनुदाने, सूक्ष्म सिंचन, ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण, नाविन्यपूर्ण योजनांकरीता निधी प्रस्तावित आहे. आदिवासी योजनेमध्ये ग्रामीण स्वच्छता अभियान, लघु पाटबंधारे योजना, ठक्कर बाप्पा योजना तर अनुसूचित जाती योजनेंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान, दलित वसति सुधार आदी योजनांसाठी निधी प्रस्तावित केला जातो. यंदा निवडणुकांचे वर्ष असल्याने मंजूर निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे असेल. त्यामुळे यंदा नाविन्यपूर्ण योजनांना फारसे प्राधान्य दिले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तर विकासावर परिणाम
जिल्हा नियोजनचा आराखडा गतवर्षी ९१७ कोटींचा होता. यंदा त्यामध्ये काही प्रमाणात वाढ व्हायला हवी होती. परंतु, त्याऐवजी तो जैस थे ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास धिम्या गतीने होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याउलट आराखड्यात आदिवासी उपयोजनांच्या काही कोटींच्या विकासकामांना कात्री लावल्याचे समजते. यंदाचे वर्ष निवडणुकांचे असून फेब्रुवारीनंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. निधी माघारी जाऊ नये, यासाठी जानेवारीमध्ये कामांचे प्रस्ताव विभागाकडे पाठवून मंजुरी घेण्याचे निर्देश सर्व विभागांना यापूर्वीच देण्यात आले आहेत.
योजना................आराखड्यातील निधी
सर्वसाधारण........................३३८ कोटी
अनुसूचित जाती उपयोजना.....९८ कोटी
आदिवासी उपयोजना............३४८ कोटी
एकूण...............................७८४ कोटी
जिल्हा नियोजन समितीने सुमारे ९०० कोटींचा आराखडा तयार केला असून, विविध विभागांकडून कामांचे प्रस्ताव मागविले आहेत. ९ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असून, त्यामध्ये आराखडा सादर केला जाईल.
- योगेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी