म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सैनिकाचे जगणे मोठे अवघड असते, त्याला राष्ट्रासाठी लढावे लागते. मनात बायको पोरांचा कितीही विचार असला, घराची कितीही आठवण येत असली तरी लढणे हेच त्याचे भागध्येय असते. परंतु आपल्याच राष्ट्राचे लोक युध्दाच्या वेळी आपल्याच सैनिकांच्या घरातील लोकांवर अत्याचार करीत असतील, तर अशावेळी ज्याचे ते घर आहे, त्या सैनिकाने काय करावे? तो सैन्यातूनच पळ काढतो अशा आशयाचे कथानक असलेले 'आधारशिला' नाटक रविवारी सादर करण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत 'आधारशीला' हे नाटक कामगार कल्याण भवन, सातपूर यांच्या वतीने रविवारी सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मुकंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन बाळ मुजुमदार यांनी केले होते. जगातील एका छोट्याशा खेड्यात ही घटना घडते. हे गाव जगाच्या नकाशावर शोधायचे झाले, तर भिंग लावून शोधावे लागेल, अशी त्याची अवस्था परंतु तेथे सुख-शांतता नांदत असते. वर्षभरातून एखादाजण मरण पावत असे त्यामुळे तितकेच काय ते दु:ख असे. परंतु, या गावाकडे शेजारील देशाच्या सैनिकांची वक्रदृष्टी पडते आणि गावातील बायका, पोरे, म्हातारी माणसे यांना नाडले जाते. बायकांवर अत्याचार केले जातात. सगळीकडे प्रेतांचा खच पडतो. अशावेळी गावात विध्वंस झालेला असताना, त्याच शत्रुराष्ट्राचा एक सैनिक या गावात येतो. आपल्याच सैनिकांकडून तो पोळलेला आहे. जीव वाचविण्यासाठी तो गावात येतो आणि गावचाच होऊन जातो. त्यांचाही त्याच्यावर विश्वास बसतो तो गावाचा आधार बनतो. परंतु, एक दिवस त्याचे सैनिक त्याला शोधत येतात आणि कोर्ट मार्शलसाठी त्याला घेऊन जातात. गाव पुन्हा एकदा निराधार बनते, अशी या नाटकाची कथा होती. नाटकाचे नेपथ्य आदित्य समेळ यांचे होते, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, संगीत अमोल काबरा, वेशभूषा अपूर्वा देशपांडे, रंगभूषा समीक्षा कानडे यांची होती. नाटकात चैतन्य गोखले, अनिल कडवे, कौमुदी गदगे, विजय सहाणे, किरण समेळ, कविता आहेर, स्नेहा ओक यांनी भूमिका केल्या. ... आजचे नाटक एक होता बांबू काका कामगार कल्याण केंद्र, बुधवार पेठ स्थळ: प. सा. नाट्यगृह वेळ : सायंकाळी ६ वाजता
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट