Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिककर गारठले; निफाड गोठले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिमालयाकडून शुष्क आणि शीत वारे मध्य व दक्षिण भारताकडे वाहत असल्याने राज्याच्या तपमानावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान निफाडमध्ये १.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते, तर नाशिकमध्ये ५.७ अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. एकाच दिवसात सात ते आठ अंशांनी हे तापमान घसरल्याने नाशिककर चांगलेच गारठले आहेत, तर निफाडमध्ये दवबिंदूही गोठल्याचे चित्र होते. राज्यात आलेली शीतलहर आगामी दोन दिवस कायम राहणार असल्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

१.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद जिल्ह्यात निफाडच्या कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्रात झाल्यानंतर गुरुवारीही नाशिककरांची हुडहुडी कायम राहिली. शहरात गुरुवारी तापमानाची नोंद ५.७ अंश इतकी घसरली आहे. गेल्या दोन दशकांतील नीचांकी तापमानात यंदाही जिल्ह्याची नोंद झाली आहे. यामुळे द्राक्ष पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपासून राज्यभरात वाढणाऱ्या थंडीच्या कडाक्यात नाशिकचे घसरते तापमानही चर्चेत आहे.

कडाक्याची थंडी

राज्यात थंडीची लाट असून, शुक्रवार आणि शनिवार असे दोन्ही दिवस उत्तर महाराष्ट्रात तपमानाचा पारा लक्षणीय घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये २०१२ मध्ये नोंदविलेला २.७ अंशसेल्सिअसचा विक्रम यंदा मोडीत निघणार का, याची उत्सुकता नाशिककरांना आहे. निफाडमधील घसरत्या तापमानामुळे पारा शून्य अंशांच्या खाली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या काही वर्षांतील जिल्ह्यातील नीचांकी तापमान

- २०१८ : १.८ अंश सेल्सिअस

- २०१७ : ५.८ अंश सेल्सिअस

- २०१६ : ५.५ अंश सेल्सिअस

-२०१५ : ५.४ अंश सेल्सिअस

-२०१४ : ६.१ अंश सेल्सिअस

-२०१३ : ४.४ अंश सेल्सिअस

-२०१२ : २.७ अंश सेल्सिअस

- २०११ : ४.४ अंश सेल्सिअस

-२०१२ : २.७ अंश सेल्सिअस

-२०११ : ४.४ अंश सेल्सिअस

- २०१० : ५.४ अंश सेल्सिअस

निफाड @ १.८

निफाड : निफाड येथील गहू संशोधन केंद्रात बुधवारी (ता. २६) ११ अंश सेल्सिअस इतकी नीचांकी तापमानाची नोंद झाली. तापमानाचा पारा अवघ्या १२ तासांत १० अंशांनी घसरल्याने निफाड तालुक्याला हुडहुडी भरली आहे. या हंगामात ६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. त्यानंतर तापमान ८, ९, १०, ११ अंशांपर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले. मात्र, गुरुवारी सकाळी सात वाजता राज्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. थंडीपासून द्राक्षबागांना ऊब मिळावी यासाठी द्राक्षबागांमध्ये शेकोटी केल्याचे चित्र काही भागात होते, तर काही ठिकाणी जुन्या साड्या आणि शेडनेट लावून थंडीपासून बचावाचा प्रयत्न करताना द्राक्ष उत्पादक दिसत होते. विशेष म्हणजे गोदाकाठच्या भागांत उसाच्या पाचटावर दवबिंदू गोठल्याचे चित्र होते. २०१२ मध्ये गहू संशोधन केंद्रात 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर ४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. यंदा १.८ अंश सेल्सिअसइतके तापमान घसरल्याची नोंद झाल्याचे गहू संशोधन केंद्राचे वेधशाळा निरीक्षक रमेश मानकर यांनी सांगितले.

ज्या द्राक्षांमध्ये पाणी उतरले आहे, अशा द्राक्षांना तडे जाण्याची भीती आहे. द्राक्षमण्यांची फुगवन क्षमता थांबण्याचीही भीती आहे. भुरी रोगाच्या भीतीने फवारणी खर्च वाढेल.

- बाळासाहेब सानप, द्राक्ष उत्पादक

फोटोओळ

कसबे-सुकेणे येथील ओझर रस्त्यावरील किशोर शेवकर यांच्या पुदिना पिकावर गोठलेले दवबिंदू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरपदासाठी भाजपतर्फे चंद्रकांत सोनार यांचा अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिका निवडणुकीत ७४ पैकी ५० जागांवर बहुमत मिळाल्याने भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. भाजपकडून गुरुवारी (दि. २७) दुपारी झालेल्या बैठकीत महापौरपदासाठी चंद्रकांत सोनार व उपमहापौरपदासाठी कल्याणी अंपळकर यांची नावे निश्चित करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही अर्ज दाखल केले असून, ही निवड भाजपकडे बहुमत असल्याने केवळ औपचारिकता ठरण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेचा निकाल १० डिसेंबर रोजी जाहीर झाल्यापासून महापौरपदाचा दावेदार कोण ठरणार याबाबत अनेक चर्चेला शहरात उधाण आले होते. मात्र, गटनेत्या वालीबेन मंडोरे व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी नूतन नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत महापौरपदासाठी तब्बल सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले चंद्रकांत सोनार यांची निवड केली तर उपमहापौरपदासाठी कल्याणी अंपळकर यांचे नाव निश्चित केले आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय आयोगाच्या आदेशानुसार या दोघांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि. २७) महापालिका सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नारायण सोनार यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत.

काँग्रेसकडूनही अर्ज दाखल
राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्र पक्षातर्फे मंगल अर्जुन चौधरी यांनी महापौरपदासाठी तर खान सुकीन हुसेन रहेमतुल्लाह यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. या वेळी राष्ट्रवादीच गटनेते कमलेश देवरे, नगरसेवक साबीर शेख, वसीम बारी, सुभाष जगताप, दीपक शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिका बलाबल...
भाजप............५०
काँग्रेस-राष्ट्रवादी.....१४
इतर पक्ष.....................२४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजदरवाढीवर एल्गार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीज वितरण कंपनीने अचानक केलेल्या अन्यायकारक वीज दरवाढीविरोधात उद्योजक, व्यापारी व वीज ग्राहकांनी एकत्र येत १५ जानेवारीपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक प्रतापराव होगाडे व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वीजदरवाढ व वीज पॉवर फॅक्टर पेनल्टीविरोधात अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी उद्योजक, व्यापारी व ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. या बैठकीत १५ जानेवारीपासून राज्यभर 'रास्ता रोको', धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याअगोदर यासंदर्भात सरकारबरोबर चर्चा केली जाणार आहे. त्यात सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता झालेल्या या बैठकीत औद्योगिक संघटना व घरगुती वीज ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी व व्यापारी असोसिएशनसह चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते. वीज वितरण कंपनीने दिलेला दरवाढीचा प्रस्ताव जसाच्या तसा आयोगाने मान्य केला. आयोग बेलगाम, एकांगी असून, ग्राहकांसाठी काम करीत नाही, असे सांगत वीज ग्राहक समितीचे सचिव अॅड. सिद्धार्थ सोनी यांनी बैठकीची भूमिका मांडली. त्यानंतर उद्योजकांनी पॉवर फॅक्टर पेनल्टीच्या बिलाचे किस्से सांगत राग व्यक्त केला. या बैठकीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राज्यस्तरीय ऊर्जा समितीचे चेअरमन मुकूंद माळी, 'आयमा'चे ऊर्जा समिती चेअरमन विजय जोशी, 'निमा'चे रावसाहेब रकिबे, ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे, 'आयमा'चे माजी अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

'पळता भुई थोडी करा'

यावेळी 'निमा'चे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर म्हणाले की, उद्योजक चोर असल्याचे अधिकारी सांगतात, पण ते स्वत:च दरोडेखोर आहेत. त्यामुळे आता त्यांना पळता भुई थोडी करू. वीज ग्राहक संघटनेचे विलास देवळे म्हणाले की, आज मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस नाशिक येथे वीजदरवाढीविरोधात आंदोलनात सहभागी झाले होते. पण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. यावेळी त्यांनी वर्गणीच्या नावाखाली लाच घेतली जात असल्याचाही आरोप केला.

खिशाला झळ

वीज दरवाढीविरोधात उद्योजक व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे उद्योजकांच्या खिशाळा छळ बसली आहे. त्याचा परतावा मिळायला हवा. वीज खरेदीबाबतही प्रश्न आहे. सर्व सिस्टिम सुधरायला हवी. एकाला जबाबदार धरता येणार नाही, असे भाजप उद्योग आघाडीचे प्रदीश पेशकार यांनी सांगितले, तर 'निमा'चे सचिव तुषार चव्हाण म्हणाले की, पॉवर फॅक्टरसाठी सहा महिने वेळ देण्याची गरज होती. वीज वितरण कंपनीकडे सहा हजार पॉवर फॅक्टरचे मीटर आहे. पण, ग्राहक साडेसहा लाख आहेत. त्यामुळे सिस्टिम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत निर्णय घेतला जातो, असे सांगत आयमा व निमाचे माजी अध्यक्ष धनजंय बेळे यांनी मत व्यक्त केले. गिरीश मोहिते यांनी या आंदोलनात सामान्य वीज ग्राहकांना सामील करून सरकारला वठणीवर आणा असे सांगितले.

अशी आहे दरवाढ

औद्योगिक दरवाढ ३ ते ६ टक्केच आहे, असा दावा महावितरणकडून केला जातो. मात्र, पॉवर फॅक्टर इन्सेन्टिव्हचा अभाव आणि पेनल्टी लागू केल्यामुळे ८० टक्के औद्योगिक ग्राहकांच्या वीजबिलात तब्बल २० ते २५ टक्के वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टिल उद्योगावर संक्रांत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीजदरवाढीमुळे २०० कोटींचा स्टिल उद्योजकांचा प्रोजेक्ट बंद झाला, तर दिंडोरी येथे ४०० कोटींचा प्रोजेक्ट आलाच नसल्याची माहिती सिन्नर येथील लक्ष्मी स्टिलचे अजय बाहेती यांनी दिली. 'आयमा'च्या कार्यालयात उद्योजक, व्यापारी व वीज ग्राहकांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बाहेतींनी स्टिल उद्योगाची व्यथा मांडली. राज्यात वीज दर सारखे नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये ७५ टक्के स्टिल उद्योग बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्टिल उद्योग वर्षाला २० कोटीचे वीजबिल भरतात, तर इतर सर्व उद्योग ४०० कोटींचे वीजबिल भरतात. पण, राज्यात दर समान नाहीत. इतर राज्यातही दर कमी आहेत. येथील उद्योगाला ७ ते ९ रुपये दर पडतो, तर सेल्वास येथे हाच दर ४ रुपये १० पैसे आहे. त्यामुळे उद्योग कसे टिकतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 'मिनिमम डिमांड'पोटी आम्ही ६० लाख पेनल्टी भरली. त्यानंतर कोर्टात गेल्यानंतर तेथेही व्याजासह पेनल्टी देण्याचा निर्णय झाला. सरकार एकीकडून सबसिडी देते व दुसरीकडून छुपे दर वाढवत ती काढून घेते. त्यामुळे उद्योग कसे जिवंत राहणार, असाही प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ग्राहकांची जनहित याचिका दाखल करावी, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली. यावेळी स्टिल उद्योगांसंबंधी त्यांनी अनेक टेक्निकल गोष्टी सांगितल्या. जीएसटीमुळे सर्वत्र दर समान झाले आहेत. अशा स्पर्धेत विजेचे दर जास्त असतील, तर आम्ही स्पर्धा कशी करू, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ कोटींचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या द्वारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्रानजीक असलेल्या सर्व्हे क्र. ७०५ च्या २१ कोटींच्या मोबदल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेण्याची तयारी सुरू आहे. प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी घाईघाईत मोबदला अदा केल्याने पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे थेट महासभेचा ठराव करण्यात आला असून कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून उडवलेल्या 'बार'वर बोट ठेवण्यात आले आहे.

२१ कोटींचे भूसंपादन प्रकरण आता भाजपच्याच अंगलट आले आहे. या प्रकरणात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या फायली व बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे हा वाद चव्हाट्यावर आला आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारकीर्दीत या मोबदल्याला ब्रेक लावला असतानाच, प्रभारी आयुक्तपदी आलेल्या राधाकृष्णन बी. यांनी उपअभियंत्याकडे पदभार देऊन २१ कोटींचा मोबदला दिला. विशेष म्हणजे पालिका आयुक्तपदाची सूत्रे राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारण्याच्या आदल्या दिवशीच हा बार उडवण्यात आला. त्यामुळे या प्रकरणावरून भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके आणि सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यात वाद निर्माण झाला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांची चूक असतानाही भाजपमधे सुरू असलेल्या या वादाची गंभीर दखल पक्षानेच घेतली आहे. दुसरीकडे महासभेनेही या प्रकरणात भाजपची होणारी बदनामी टाळण्यासाठी चौकशीचा ठराव केला आहे. हा ठराव थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पाठवला जाणार आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संबंध असल्याने राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांना या ठरावाची प्रत पाठवली जाणार आहे. राधाकृष्णन् बी. यांनी उपअभियंता अग्रवाल हा सक्षम प्राधिकृत अधिकारी नसतानाही त्याच्याकडून टिप्पणी लिहून घेतली. त्याचाही उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अडचणीत येणार आहेत.

'मिस्टर क्लीन'वर डाग

मुख्यमंत्र्यांनी दत्तक नाशिक घेताना पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले होते. परंतु,२१ कोटींच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या 'मिस्टर क्लीन' इमेजवरही आक्षेप घेतले जात आहेत. धनादेश काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप, दलालांकडून फिरणारी फाइल आणि या प्रकरणात भाजपच्या झालेल्या बदनामीचे इतिवृत्तच मुख्यमंत्र्यांकडे सादर केले जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता थेट मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसभापतींना वाहनभत्त्याची लॉटरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार पालिकेतील महिला बालकल्याण, शिक्षण, वैद्यकीय व आरोग्य, विधी व शहर सुधारणा समितीच्या उपसभापतींना दरमहा २५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता आता तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर मिळणार आहे. मुंढेंनी महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी केली नसली तरी, नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मात्र महासभेच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पाच समित्यांच्या उपसभापतींना पूर्वलक्षी प्रभावाने हा भत्ता मिळणार आहे.

महापालिकेतील महिला व बालकल्याण, शिक्षण, वैद्यकीय व आरोग्य, विधी आणि शहर सुधारणा समितीच्या सभापतींना मनपाने शासकीय वाहने पुरविली आहेत. परंतु, उपसभापतींनीही शासकीय वाहनांची मागणी केली होती. एवढ्या सगळ्यांना वाहने देणे शक्य नसल्याने उपसभापतींना वाहन भत्त्याऐवजी वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्याचा ठराव महासभेने घेतला होता. १० जानेवारी २०१८ च्या महासभेत हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, मुंढे यांनी या ठरावाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे उपसभापतींना वर्षभर हा भत्ता मिळाला नाही. मात्र, आता मुंढे यांनी घेतलेला निर्णय बदलण्याचा सपाटाच सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. आयुक्त गमे यांनी या ठरावाची अंमलबजावणी करीत उपसभापतींना दरमहा २५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वलक्षी प्रभावाने हा भत्ता अदा केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाहीचालक मद्यपानात मशगूल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

नंदुरबार आगराची नाशिक-नंदुरबार शिवशाही चालकाने बस सोग्रस (ता. चांदवड) येथे सुमारे दीड तास उभी करून मद्यपान केल्याची घटना घडली. चेतन कैलास पाटील (२८) असे बसचालकाचे नाव असून त्याच्याविरोधात वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिककडून नंदुरबारच्या दिशेने जाणारी शिवशाही बस (एमएच १८ बीजे २२५६) सोग्रस फाटा येथे शुक्रवार पहाटे साडेचार ते सहापर्यंत उभी होती. पहाटेचा वेळ असल्याने प्रवासी झोपले होते. बस उभी असल्याने प्रवाशांनी 'गाडी का उभी आहे', अशी चालकाला विचारणा केली. चालक पाण्याच्या बाटलीमध्ये दारू टाकून पित असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. या प्रकाराने संतप्त झालेल्या प्रवाशांनी पोलिसांना याची तात्काळ कल्पना दिली. यानंतर

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वस्तुस्थिती जाणून घेतली आणि चेतन पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर म्हणजे मृत्यू नव्हे

$
0
0

कॅन्सरतज्ज्ञ डॉ. मदनूरकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॅन्सर म्हणजे मृत्यू असा समज प्रत्येकाचा झाला आहे. मात्र, कॅन्सरग्रस्त प्रत्येक रुग्णाचा मृत्यू होईलच असे नाही. अनेक रुग्णांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्याची उदाहरणे आहेत. उपलब्ध उपचारांनी भारतात कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे, असे प्रतिपादन कॅन्सर तज्ज्ञ डॉ. नागेश मदनूरकर यांनी केले.

कालिका देवस्थान आणि कालिका मंदिर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने 'कॅन्सरवर बोलू काही' या विषयावर कॅन्सरतज्ज्ञ डॉ. नागेश मदनूरकर यांचे व्याख्यान झाले. कालिका माता सभागृहात हे व्याख्यान झाले. त्यावेळी उपस्थितांसोबत संवाद साधताना डॉ. मदनूरकर म्हणाले, की तोंड, घसा आणि ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण भारतात अधिक आहे. यासह इतर सर्व प्रकारच्या कॅन्सरवर उपचार उपलब्ध आहेत. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाला कॅन्सर होण्याचा धोका असतो. कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही. त्यामुळे कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर कॅन्सर होण्याचा धोका संभवतो, हा समज नागरिकांनी मनातून काढून टाकावा.

कॅन्सरवर उपचार करताना केमोथेरेपी केली जाते. या थेरपीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्यास तो पुन्हा होण्याचा धोका कमी असतो, अशी माहिती डॉ. मदनूरकर यांनी दिली. यावेळी कालिका देवी देवस्थानचे अध्यक्ष केशव पाटीव, सेक्रेटरी डॉ. प्रताप कोठावळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष परमानंद पाटील, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख यांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पारा ६.९ अंशांवर

$
0
0

पारा ६.९ अंशांवर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून बोचऱ्या थंडीने नाशिककरांना कवटाळले असून शहरासह जिल्हावासीय गारठले आहेत. वाऱ्याचा वेग ताशी नऊ किलोमीटर असल्याने नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिकांनी गारठ्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. निफाडमध्ये गुरुवारी चालू हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. १.७ अंश सेल्सियस ऐवढे निचांकी तापमान नोंदविले गेले. तर नाशिकमध्येही पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी हेच तापमान अनुक्रमे चार आणि ६.९ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले आहे. कमाल तपमानही लक्षणीयरित्या घटले आहे. शुक्रवारी २३.९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तपमानाची नोंद झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत किमान तापमानात वाढ झाली असली तरी थंड हवा मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने शुक्रवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला.

थंडीपासून बचावासाठी स्वेटर, कानटोपी, मफलर यासारखे उबदार कपडे परिधान करण्यास अबालवृद्धांनी पसंती दिली. वातावरणातील गारठा आरोग्यास हानीकारक ठरण्याची शक्यता अधिक असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळभाज्यांच्या क्रेटमधून मद्याची वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फळभाज्यांच्या आड अवैध मद्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात उघडकीस आणला. अंबोली परिसरात दोघांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून चार लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

संजयभाई सोहनभाई गांधी व नोरतमल ओनाडजी साहू (दोघे रा. गुजरात) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. नववर्ष सेलिब्रेशनच्या निमित्ताने परराज्यातून अवैध मद्यवाहतूक आणि विक्री होत असून त्यावर कारवाईचे आदेश विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रवेशद्वारांजवळ नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. शुक्रवारी (दि. २८) अंबोली शिवारात भरारी पथकाने सापळा रचून क्रमांक नसलेली बोलेरो कार अडविली. या वाहनात मागील बाजूस क्रेटमध्ये फळभाज्या भरलेल्या आढळल्या. मात्र, क्रेटच्या मागील बाजूस देशी-विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पथकाने मद्यसाठ्यासह सहा लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त केले. निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, देवदत्त पोटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंड्सतर्फे ब्लँकेट वाटप

$
0
0

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील आळंदीवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना बंड्स संस्थेतर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लिंगप्पा शेटी, उपाध्यक्ष शशिकांत शेट्टी, अध्यक्ष भास्कर शेट्टी, अमोल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक नारायण शिंदे यांसह बंड्स संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅप्पी स्ट्रीट’ची आज धम्माल!

$
0
0

कॉलेज रोडवर सायंकाळी अनुभवा उत्साहाची पर्वणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेहमी सायंकाळच्या वेळी वाहनांची गर्दी असलेल्या कॉलेज रोडवर आज कोणत्याही वाहनाचा हॉर्न नसेल अन् नसेल गोंगाट. असेल तो फक्त नाशिककरांचा कल्ला. 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'हॅप्पी स्ट्रीट'निमित्त आज, शनिवारी (२९ डिसेंबर) सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत धम्माल मस्ती करण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅप्पी स्ट्रीट' हा उपक्रम नाशिककरांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ज्या रस्त्यावर निरंतर वाहने धावत असतात, त्या रस्त्यावर मनसोक्त बागडण्याची मजा काही वेगळीच असेल. त्यामुळेच हॅप्पी स्ट्रीट या उपक्रमाला नाशिककरांनी नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नाशिकमधील कलाकारांना आपल्या कलेल्या सादरीकरणासाठी हॅप्पी स्ट्रीटने हक्काचे व्यासपीठ दिले आहे. हा आनंद पुन्हा एकदा आज सायंकाळी होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीटमधून नाशिककरांना लुटता येणार आहे. २०१८ या सरत्या वर्षाला निरोप देत, २०१९ च्या स्वागताचा जल्लोष हॅप्पी स्ट्रीटवर नाशिककरांना करता येणार आहे. तुम्हाला हॅप्पी स्ट्रीटवर हिंदी मराठी गाण्यांवर झुम्बा डान्स करता येणार आहे. यासह रस्त्यावर रांगोळी काढण्याची, स्पोर्ट्स गेम खेळण्याची, गाणे ऐकण्याची, जादूचे प्रयोग पाहण्याची अन् तुमचा छंद जोपासण्याची संधी या निमित्ताने तुम्हाला मिळणार आहे. नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, आकाशनिरीक्षण, क्विलिंग आर्ट, कॅलिग्राफी, पोर्ट्रेट, दोरीच्या उड्या, आर्ट अँड क्राफ्ट, व्हॉलिबॉल अन् सायकल राइडची गंमत अनुभवण्याची संधी मिळणार आहे. पर्यावरणविषयक खेळ आणि प्लास्टिक मॉन्स्टरही हॅप्पी स्ट्रीटवर असतील. अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, विविध स्पोर्टस गेम्स, म्युझिकल आणि इन्स्ट्रुमेंटल सादरीकरण, डान्स परफॉर्मन्स, पोलिस बँडचा ताल आदी उपक्रमांचाही आनंद लुटता येणार आहे. सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे हॅप्पी स्ट्रीटवर मोफत रक्तदाब आणि शुगर चेकअप करून घेता येणार आहे. विविध कला आणि कार्यक्रमांनी भरगच्च असा हॅप्पी स्ट्रीट उपक्रम यंदा प्रथमच सायंकाळी होणार असून, वीकेंड व इअर एंडमुळे यंदाचा हॅप्पी स्ट्रीट स्पेशल ठरणार आहे. चला तर मग, हॅप्पी स्ट्रीटची ही धम्माल पर्वणी अनुभवण्यासाठी नक्की या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजनिधीद्वारे करा सैनिक कुटुंबांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशासाठी अहोरात्र लढणाऱ्या सैनिकांविषयी प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करायला हवी. सामाजिक जाणिवेतून ध्वजदिन निधी संकलनासाठी सर्वांनी पुढे येऊन सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी केले.

सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा मुद्रांक अधिकारी अनिल पारखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) कॅप्टन विद्या रत्नपारखी आदी उपस्थित होते. यावेळी राधाकृष्णन म्हणाले, की कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता कुटुंबापासुन दूर रहाणारे सैनिक देशाच्या सीमांचे संरक्षण करतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवित नागरिकांनी बांधिलकी जपायला हवी. त्यासाठी ध्वजनिधी संकलनात प्रत्येकाने सहकार्य करावे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याकरीता संवेदनशिलतेने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

भारत-पाक युद्ध, भारत-चीन युद्ध किंवा अन्य खास मोहिमेत वीर मरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे २५ लाख रुपये किंवा पाच एकर जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबाबतची माहिती घेऊन सैनिक कुटुंबांनी या मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गणवंत पाल्यांचा सत्कार

ध्वजनिधी संकलन उद्देशपूर्तीसाठी न करता सामाजिक जाणिवेतून करावे, असे आवाहन दराडे यांनी केले. गतवर्षी ध्वजनिधी संकलनाचे ९४ टक्के काम झाल्याची माहिती प्रास्ताविकात रत्नपारखी यांनी दिली. माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ध्वजदिन निधी संकलनात चांगली कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचादेखील सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावची महसूल यंत्रणा भ्रष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव तालुक्यातील शर्तभंग झालेल्या जमिनी सरकारने जमा कराव्यात, जमिनीचा ५० टक्के नजराणा न भरता सरकारची १८ कोटींची फसवणूक करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरूड यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही गरूड यांनी केला असून, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. महसूलमधील भ्रष्टाचारी यंत्रणेला लवकरच उघडे पाडू, असा इशाराही गरूड यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मालेगाव तालुक्यातील भायगाव येथील पाच हेक्टरहून अधिक जमिनींचा ५० टक्के नजराणा भरून न घेताच उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी- विक्रीची परवानगी दिली. या प्रकरणाकडे विभागीय आयुक्तांचे लक्ष वेधले असता त्यांनीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे सरकारचे १८ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप गरुड यांनी केला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती गरूड यांनी केली. २०१२ ते २०१५ या आर्थिक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. तलाठ्यापासून महसूलमधील काही अधिकाऱ्यांनी ही रक्कम लाटल्याची तक्रार लोकायुक्तांकडे केल्याची माहिती गरूड यांनी दिली. तालुक्यातील तळवाडे येथे आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून त्यावरील विहिरीवर बिगरआदिवासींनी नावे लावल्याचा दावा गरूड यांनी केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दीड वर्षापासून याबाबतची केस सुरू असून, निकाल देण्यास विलंब का केला जातो आहे, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून चौघांची महिलेस मारहाण

$
0
0

घरात घुसून चौघांची

महिलेस मारहाण

नाशिक : मुलास नादी लावते, या कारणातून घरात घुसून चौघांनी महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर भागात घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अर्शद हजीज शेख, जमील वकील शेख, जुबेर जमील शेख व अजीम अजिज शेख अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हाजरा जहीर शेख व सायरून निसा जमील शेख (रा. सर्व खोडेनगर, वडाळा रोड) अद्याप फरारी आहेत. गोरक्षनगर भागातील रेखा मते यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुलगी दीपाली मते (वय २८) हिला चौघांनी मारहाण केली. सहाय्यक निरीक्षक भडीकर तपास करीत आहेत.

बसमधून दागिने लंपास

नाशिक : खासगी बसच्या डिक्कीत ठेवलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. बॅगमध्ये रोकड, दागिन्यांसह ८३ हजारांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषाली सचिन कापसे (रा. कोंढवा, पुणे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. त्या पुण्याहून पटेल ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने (एमएच १५ एके २७८६) मंगळवारी नाशिकमध्ये उतरल्या. त्या वेळी क्लिनरने डिक्कीत ठेवलेली बॅग लंपास झाल्याचे निदर्शनास आले. हवालदार निकम तपास करीत आहेत.

कोयता बाळगणाऱ्यास अटक

नाशिक : आडगाव नाका भागात दहशत माजविण्यासाठी धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश महादेव कदम (रा. मनकामेश्वर अपार्टमेंट, विजयनगर कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. एका बारसमोर संशयित बुधवारी (दि. २६) रात्री धारदार कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हवालदार झाडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोमट पाणी पिण्याचा डॉक्टरांकडून सल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जाणवत असलेल्या थंडीत महिनाखेरीस भर पडली आहे. गारठलेल्या अशा वातावरणात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सकाळी उशिराने प्रकटणारी सूर्यकिरणे, प्रचंड गारठा यामुळे जिल्ह्यात कडाका पसरला आहे. शहरातील तीन दिवसांपासून किमान तापमान ५ ते ६ अंशाच्या दरम्यान असून, आणखी दोन ते तीन दिवस तापमानात घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दिवसरात्र वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिककरांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढीस लागल्या आहेत. सर्दी, खोकला व ताप हे आजार बळावण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. थंडीच्या कडाक्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सातत्याने उबदार कपडे वापरावे, कोमट पाणी प्यावे, ताजे अन्न खावे, पहाटे व्यायाम करावा, असे डॉ. नितीन चिताळकर यांनी सांगितले.

वातावरण बदलाने आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. त्यावर मात करण्यासाठी व्यायाम करणे, योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. बदलत्या हवामानात संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. कोमट पाणी प्यावे तसेच सर्दी किंवा खोकला झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. आवेश पलोड,

अध्यक्ष, आयएमए नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदी विकासाचा अवलोकनात्मक विचार व्हावा

$
0
0

ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नदीला माता म्हणून त्यातच निर्माल्य टाकायचे त्यापेक्षा युरोपातील देशांमध्ये नदीला जशी वागणूक देतात तशी द्यायला हवी. तिचे अवलोकन करून तिच्या विकासाचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे चित्रकार, संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत यांनी केले.

संस्कारभारती व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, दिल्ली यांच्यातर्फे पर्यावरण प्रदूषणाबाबत कलांच्या माध्यमाद्वारे जनजागृती व्हावी या उद्देशाने ३० डिसेंबरपर्यंत आयोजित गोदास्पंदन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शालिमार येथील महात्मा फुले कलादालनात हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर राष्ट्रीय कला संग्रहालय दिल्लीचे संचालक अद्वैत गरनायक, माजी लेप्टनंट कर्नल रांगणेकर, संस्कार भारतीचे संस्थापक अध्यक्ष योगेन्द्र, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, स्वाती राजवाडे, सी. एल. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कामत म्हणाले, की फेसबूकवर दोन फोटो पाहण्यात आले. एका फोटोत युरोपातील नदी होती व दुसऱ्या फोटोत भारतातील नदी. भारतातील नदी अत्यंत अस्वच्छ होती. त्याखाली लिहिले होते, 'आम्ही नदीला माता मानतो' तर युरोपातील नदीच्या फोटोखाली 'आम्ही नदीला माता मानत नाही' असे लिहिलेले होते. त्याने मन विदीर्ण झाले. आपण नदीची किती मानहानी करतो, नदी किती अस्वच्छ करतो याला मर्यादा नाही. भारतातील प्रत्येकाने विचार केला की नदी स्वच्छ करायची आहे आणि कामाला लागले तर काही क्षणातच नदी स्वच्छ होऊ शकते. आपल्याकडे मनुष्यबळ आहे; परंतु संघटन नाही, असेही त्यांनी सांगितले.

नदीचा उगम, महात्म्य, पावित्र्य, पौराणिक संदर्भ, आध्यात्मिक महत्त्व, ऐतिहासिक घटना, तिरावरील मंदिरे, घाट, स्थानिक लोककला, लोककथा, येथील सभ्यता आदींचे संकलन व जतन तसेच सद्य स्थितीत नदीची झालेली अवस्था-प्रदूषण आणि तिच्या स्वच्छता-शुद्धतेच्या उपाययोजनांसाठी 'मी काय करू शकतो' हे भाव जागरण-प्रबोधन पथनाट्य, नृत्य, संगीत, चित्र, शिल्प, रांगोळी, सामाजिक समरसता आदी माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात महात्मा फुले कलादालन येथे शुक्रवारी झाली. नदीचे महत्त्व व नदीचे प्रदूषण या विषयावर देशभर सुमारे ९०० ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. यात नाशिकला अग्रक्रम मिळालेला आहे. त्यानुसार तीन दिवसीय कार्यक्रम होणार आहेत.

गोदास्पंदन कार्यक्रमाचा प्रारंभ त्र्यंबकेश्वर येथे सकाळी गोदा पूजन आणि स्वच्छता करून झाला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, नगराध्यक्ष स्वप्नील शेलार, पुरुषोत्तम लोहगावकर, ललित लोहगावकर, अभय मिश्रा, स्वाती राजवाडे सत्यप्रिय शुक्ल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सी. एल. कुलकर्णी, अभय मिश्रा यांची भाषणे झाली. रवींद्र बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

आज गोदास्पंदनमध्ये

गोदास्पंदनमध्ये शनिवारी, २९ डिसेंबर रोजी गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ जलतज्ज्ञ, नदीविषयक अभ्यासक, आध्यात्मिक गुरू यांच्या माध्यमातून चर्चासत्र होणार आहे. डी. एम. मोरे, सेवानिवृत्त संचालक, मेरी नाशिक हे महाराष्ट्राच्या विकासात गोदावरीचे स्थान या विषयावर बोलतील. डॉ. प्रा. प्राजक्ता बस्ते (गोदावरी नदी पूनर्जीवन), राजेश पंडित (गोदावरी पूर्वी, आता आणि पुढे), विजय निपाणेकर (गोदावरीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व), देवांग जानी (गोदावरी उपनद्या व कुंडांचे पुरातत्वदृष्ट्या महत्त्व आणि गोदावरी पुर्नवैभवासाठी अपेक्षित उपाय योजना) यांची व्याख्याने होतील. सायंकाळी साडेसहा वाजता गोदा स्पंदन स्मरणिकेचे प्रकाशन होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत कवी संमेलन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी डॉ. धोंडगे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी धोरण आखण्याच्या टप्प्यावर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. या आधी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या पदावर अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे हे चार दशकांपेक्षा अधिक काळापासून साहित्य व सांस्कृतिक वर्तुळात कार्यरत आहेत. 'संत वाड्:मय आणि शैली विज्ञानाचे अभ्यासक' म्हणून त्यांचा राज्यास परिचय आहे. 'राज्य मराठी विकास संस्था', 'साहित्य अकादमी', दिल्ली या संस्थांच्या माध्यमातूनही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ते कार्यरत राहिले आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी भाषा विभागास स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा मिळाल्याने या माध्यमातून भाषिक धोरणांना विशेष गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. दिलीप धोंडगे यांची नियुक्ती महत्त्वाची आहे.

शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन करण्याच्या उद्देशातून भाषा सल्लागार समितीची स्थापना झालेली आहे. शासन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करणे, मराठीतील शास्त्रीय आणि तांत्रिक भाषा विकसित करणे याबाबत राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली होती.

..

मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे, राज्याचे भाषिक धोरण ठरविणे, मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी धोरण आखणे व राबविणे, त्यासाठी संशोधनाच्या प्रारूपाला गती देणे आदी उद्दिष्टे पहिल्या टप्प्यात हाती घेणार आहे.

- डॉ. दिलीप धोंडगे, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकलस्वार अपघातात जखमी

$
0
0

पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली. या घटनेत मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे. पिंपळगावहून नाशिककडे मोटारसायकलने जात असताना नासीर मोहम्मद युसूफ कुरेशी यास नाशिकहून पिंपळगावकडे येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यामध्ये कुरेशी (रा. मुंबई) हा जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. या अपघाताची पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात आज काँग्रेसची बैठक

$
0
0

सटाणा : बागलाण तालुका अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी २९ रोजी साय ५ वाजता सटाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, तालुका निरीक्षक भगवान खैरणार आदी उपस्थित असणार आहेत.

या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images