Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतदार यादीवर उद्या संयुक्त बैठक

$
0
0

लोकसभेची पूर्वतयारी सुरू, नाशिक पूर्वपासून सुरुवात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

२०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी २४ जानेवारी रोजी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदारयादीतील तपशिलासंदर्भात प्रत्येक मतदान केंद्रावर संयुक्त बैठक होणार आहे. पर्यवेक्षकांच्या अध्यक्षतेखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांची ही बैठक असेल.

मतदारयादी अधिक अचूक तयार करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत प्राप्त अर्जांवर कार्यवाही करण्यात येत आहे. मतदारयादीतील तपशिलासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. सर्व राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक न केलेल्या पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीस हजर राहून सूचना कराव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे. मतदारयादीतील तपशील www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तपासता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धावत्या कारवर फेकला दगड

$
0
0

भरधाव कारवर फेकला दगड

महिला डॉक्टर जखमी; चार दात तुटले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रात्री वेगात चाललेल्या कारवर दगड फेकण्याचा धक्कादायक प्रकार आंनदवली भागात घडला. यामुळे कारची काच फुटून पतीशेजारी बसलेल्या महिला डॉक्टरला दगड लागला. तोंडालाच दगड लागल्याने त्यांचे चार दात तुटले. गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना अटक केली. आपल्या पती समवेत डॉक्टर महिला कारने प्रवास करीत असताना हा प्रकार घडला.

गणेश तुकाराम बोसले (रा. ध्रुवनगर) आणि प्रफुल्ल अरविंद आपटे (रा.आनंदनगर, डी. के. नगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. नाशिक पुणे मार्गावरील हॉटेल कामत भागात राहणाऱ्या डॉ. अनघा अजय लोढा (रा. ड्रीम व्हिला अपा. हेमराज कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. गुरुवारी रात्री डॉ. लोढा आपल्या पतीसमेवत कारमधून प्रवास करीत असताना ही घटना घडली होती. आनंदवली भागातील जाधव मळा शिवारात संशयितांनी कुठलेही कारण नसताना कारला दगड मारून फेकला. यामुळे कारची काच फुटून चालकाच्या बाजूला बसलेल्या डॉ. लोढा यांना दगड लागला. या घटनेत डॉ. लोढा यांचे चार दात तुटले. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी लागलीच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी या प्रकरणी त्यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दोघा संशयितांनी भरधाव वेगातील कारवर दगडा का मारला, याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठी ‘मित्सुरा’ची नवलाई!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शौर्य सामाजिक संस्थेच्या विद्यमाने शनिवारपासून 'मित्सुरा' हा आर्टफेस्ट आयोजित करण्यात आला. नाशिककरांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने हा फेस्टिव्हल होता. यात विविध स्पर्धा व खेळांचे प्रदर्शन झाले. गायनापासून शिल्पकलेपर्यंत सर्वच कलागुणांचा समावेश असणारा हा आर्ट फेस्ट नाशिककरांसाठी मेजवानीच ठरला.

गोदा पार्क, आसारामबापू ब्रिजजवळ, गंगापूर रोड येथे सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत हा फेस्ट झाला. यात शनिवारी सकाळी १०.३० वाजता अनंत राजेगावकर यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. शहर विकासित झाले तर प्रगती निश्चित होणार असे सांगतानाच टाकाऊतून टिकावू वस्तू बनविण्याचा प्रघात आता मित्सुरा फेस्टिव्हल पाडत आहे, असेही ते म्हणाले.

फेस्टिव्हलमध्ये चित्रकला, अक्षरलेखन, हस्तकला यांच्या कार्यशाळा, तसेच गायन, वादन, शास्त्रीय संगीत, नाटक अशा सर्वच कलांचा या फेस्टमध्ये समावेश होता. प्रेक्षकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे अशीदेखील आयोजकांची इच्छा असून, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल यात आहे. त्यांना वेळोवेळी त्यात सहभागी करून घेण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पॉट ड्रॉइंग स्पर्धा, तसेच नृत्य, गायनाच्या स्पर्धादेखील झाल्या. गेम्स, झुम्बा व योगा, तसेच सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत डेमोस्ट्रेशन्स, विविध खेळ, प्रदर्शन, कविता, तसेच नृत्य, नाटक, सेल्फी, तसेच शिल्पकला यांचे प्रदर्शन झाले. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रॉक बँड परफॉर्मन्स, फॅशन शो, ढोल परफॉर्मन्स, शास्त्रीय संगीत, नृत्य, गायन, नाटक झाले. या स्पर्धांसोबतच प्रेक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात लहानपणचे खेळ खेळण्याची संधी देण्यात आली. फेस्टमध्ये कला व फूडसाठी विविध ५० स्टॉल आहेत.

'मित्सुरा'त आज

आजदेखील सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत हा फेस्ट होणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत डेमोस्ट्रेशन्स, विविध खेळ, प्रदर्शन, कविता, तसेच नृत्य, नाटक, सेल्फी, तसेच शिल्पकला यांचे प्रदर्शन होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रॉक बँड परफॉर्मन्स, शास्त्रीय संगीत, नृत्य, गायन व नाटक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप धोका देणारा पक्ष

$
0
0

काँग्रेस निरीक्षक रेड्डी यांची मालेगावी टीका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसून, भाजप हा धोका देणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्यासाठी एमआयएम भाजपची मदत करीत असून, भाजप हाच एमआयएमचा खरा चेहरा असल्याची टीका काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक चल्लावंशी चंदरेड्डी यांनी केली.

उत्तर महाराष्ट्राच्या दौरावर असलेल्या रेड्डी यांनी शनिवारी मालेगावी भेट दिली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर रशीद शेख, आमदार आसिफ शेख, डॉ. तुषार शेवाळे, जी. डी. पाटील, ताहेरा शेख, नगरसेवक विठ्ठल बर्वे, अस्लम अन्सारी, प्रवक्ते साबीर गौर आदी उपस्थित होते.

बैठकीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना निरीक्षक रेड्डी यांनी मालेगाव शहरात काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत असून आगामी निवडणुकीत देखील पक्ष मजबुतीने उतरेल असा विश्वास व्यक्त केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार उत्तर महारष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भेट देऊन पक्ष संघटन, वेगवेगळ्या कमिट्या यांचा आढावा घेण्यासाठी दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपवर टीका करताना रेड्डी म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड येथे काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सत्ता मिळताच पक्षाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला. दिलेला शब्द पाळणारा पक्ष म्हणजे काँग्रेस होय, हे जनतेला समजले आहे. रेड्डी यांनी एमआयएमवर देखील टीका केली. धर्मनिरपेक्ष मतांमध्ये विभाजन करण्यासाठी एमआयएम भाजपची मदत करतेय. देशाची अखंडता व धर्मनिरपेक्षता कायम राहावी यासाठी काँग्रेस हाच सक्षम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याबाबत हालचाली सुरू असून, राज्यात देखील काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत रहावेत यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले.

धुळ्यासाठी अल्पसंख्याक उमेदवार?

धुळे लोकसभा मतदार संघासाठी कोणाला उमेदवारी देणार असल्याचा प्रश्न विचारल्यावर रेड्डी यांनी उमेदवार निश्चितबाबत राज्य कार्यकारणी निर्णय घेते. पक्षाशी एकनिष्ठ असणारे जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यालाच पक्ष उमेदवारी देईल असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आमदार शेख यांनी या मतदारसंघासाठी अल्पसंख्याक उमेदवार द्यावी, अशी मागणी केली.

काँग्रेस सामान्य माणसाची शक्ती

निफाड : सामान्य माणूस हीच काँग्रेसची शक्ती असून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यातील जनतेने विकासासाठी कॉग्रेसला सत्तेवर बसवले. या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेनेही काँग्रेसला कौल द्यावा, असे आवाहन रेड्डी यांनी निफाड येथे केले. निफाड शहरातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मधुकर शेलार, राजेंद्र मोगल, गुणवंत होळकर, प्रकाश अडसरे उपस्थित होते. रेड्डी यांनी मनमाड येथील एकात्मता चौकात जाहीर सभा घेतली. सभेत रमेश कहांडळ, तालुकाध्यक्ष समाधान पाटील, शहराध्यक्ष अफजल शेख, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, बाळासाहेब साळुंके उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींनी देशाला खड्ड्यात घातले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जितके खड्ड्यात घातले आहे, तितके कुणीही घालू शकत नाही. अगदी मायावतींनी ठरवले तरी त्याही ते करू शकत नाहीत, असा घणाघाती हल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी चढविला. नाशिक जिल्ह्याच्या चार दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर चौफेर हल्लाबोल केला. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसोबत जाण्याचा सध्या विषय नसून, विमानात बसून युती आणि आघाडीच्या चर्चा होत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. माझी भूमिका निवडणूक आल्यावर जाहीर करेन, असे त्यांनी या वेळी सांगितले. काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीत सामील होणार का, यावर ठाकरे यांनी भाष्य टाळले.

निवडणुका एकत्र नाहीत

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची शक्यता ठाकरे यांनी नाकारली. भाजप फावडं व कुऱ्हाड एकाच वेळी आपल्या पायावर मारून घेणार नाही, असे त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. सर्वप्रथम फावडे मारले जाईल, मग कुऱ्हाड मारतील, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसा राममंदिराचा प्रश्न पुढे येईल आणि दंगली घडवल्या जातील हे आपण आधीच सांगितल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची काय भूमिका असेल ते त्याच वेळी जाहीर करू, असे सांगून राजकीय भूमिकेविषयी सस्पेन्स कायम ठेवले.

हा तर फटीतून पाहण्याचा प्रयत्न

इंटरनेट आणि मोबाइलमध्ये हेरगिरी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मोदी सरकारला खड्ड्यात घालणारा आहे. सार्वत्रिक निवडणुका जशाजशा जवळ येतील तसे हे सरकार अशा चुका करतील अन् स्वत:साठी खड्डा खोदतील, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. सरकारने लोकांचे मोबाइल इंटरनेट तपासले तर त्यात नरेंद्र मोदी यांना शिव्याच दिलेल्या दिसतील, असे सांगितले. इंटरनेट आणि मोबाइल म्हणजे फटीतून घरात शिरण्याचा प्रकार आहे.

मनसेची भूमिका गुलदस्त्यात... ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीवायकेचा आदित्य डावरे राष्ट्रीय संघाचा कर्णधार

$
0
0

​बीवायकेचा आदित्य डावरे राष्ट्रीय संघाचा कर्णधार

आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांतून पटकाविले यश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीवायके महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत असलेल्या आदित्य डावरे या खेळाडूने आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य पटकावित महाराष्ट्र राज्याचा संघात प्रवेश केला. विशेष बाब अशी की, आदित्यच्या गोलांदाजीतील प्राविण्यामुळे त्याची संघाच्या कर्णाधारपदासाठी निवड करण्यात आली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत बीवायके कॉलेजच्या आदित्य ठाकरे या खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी केली. यापूर्वी आदित्यने बीवायके कॉलेजकडून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत अनेकदा प्राविण्य पटकाविले आहे. जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कर्णधार असताना आदित्यने केलेल्या कामागिरीमुळे, त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी केल्यामुळे त्याची राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली. मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या निवड चाचणीत मुंबई, पुणे, अमरावती, लातूर, औरंगाबाद, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधून आदित्यची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली असून, काश्मिरमध्ये होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत आदित्य कर्णधारपद भूषविणार आहे. त्याच्या या यशाबद्दल बीवायकेचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. दिलीप जोशी, क्रीडा प्राध्यापक डॉ . सुनील मोरे आणि कुणाल महाजन यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा न्यायाधीश शिंदे यांची बदली

$
0
0

जिल्हा न्यायाधीश

शिंदे यांची बदली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांची महाराष्ट्र सहकार प्राधिकरण, मुंबई येथे बदली करण्यात आली. शिंदे यांच्या जागी आर. एन. जोशी येणार असल्याची चर्चा असली तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

गडचिरोली येथून नाशिकला बदली होऊन आलेल्या शिंदे यांनी लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी मोठे प्रयत्न केले. अगदीच काही हजारांवर दाखल होणाऱ्या खटल्यांचे प्रमाण थेट लाखांवर नेऊन पोहचवले. कोर्टातील कर्मचाऱ्यांनी मोबाइल वापरण्यावर प्रतिबंध करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काही महिन्यांपूर्वी एका गाजलेल्या खटल्यातील कागदपत्रे गहाळ झाल्याचे प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेत त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. बलात्कार, खून अशा गंभीर खटल्यांमध्ये त्यांनी दिलेले निर्णय महत्त्वाचे ठरले. मुंबईत महाराष्ट्र सहकार प्राधिकरण असून, त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. या ठिकाणी शिंदे यांची बदली झाली.

दरम्यान, शिंदे यांच्या जागी आर. एन. जोशी यांची नियुक्ती झाल्याचे सांगितले जाते. मात्र, तशी ऑर्डर आलेली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. काही वर्षांपूर्वी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून जोशी यांनी नाशिकमध्ये काम पाहिले आहे. नाशिकमधून त्यांची बदली मुंबई येथे झाल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीसाठी २९ ला निवडणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीच्या नऊ सदस्यांच्या नियुक्तीला महासभेने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता सभापती व उपसभापती पदासाठी येत्या २९ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्तांनी ही निवडणूक जाहीर केली असून, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. समितीवर भाजपचे वर्चस्व असल्याने सभापती तसेच उपसभापती पदावरही भाजपच्या सदस्यांची निवड होणार आहे. परंतु, भविष्यातील शिवसेनेसोबतच संबंध सुधारण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला उपसभापतीपद ऑफर केले जाण्याची शक्यता आहे.

तब्बल पावणेदोन वर्षानंतर भाजपच्या सत्ताकाळात शिक्षण समिती की, शिक्षण मंडळ याचा वाद संपुष्टात आला आहे. मंडळाचा वाद संपुष्टात आल्यानंतर भाजपने समिती किती सदस्य असावेत यावरून भाजपने वेळ वाया घालवला. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महासभेत शिक्षण व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतू मंडळाप्रमाणेच सोळा सदस्यांची नियुक्ती करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. प्रशासनाने नऊ सदस्यांचा प्रस्ताव सादर केला होता. परंतू नियमाप्रमाणे नऊ सदस्यांचीचं नियुक्ती करता येणार असल्याने भाजपने तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर यु-टर्न घेत नऊ सदस्यांची नियुक्ती जाहीर केली.

गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत नऊ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात भाजपच्या वर्षा भालेराव, प्रतिभा पवार, सरीता सोनवणे, स्वाती भामरे, दिनकर आढाव, यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर शिवसेनेचे चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड, सुदाम डेमसे व कॉंग्रेसच्या राहुल दिवे यांना समिती सदस्य म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे ९ पैकी ५ सदस्य हे भाजपचे असल्याने सभापतीपदावर भाजपचा सदस्य विराजमान होणार आहेत. सध्या वर्षा भालेराव यांचे सभापती पदावर नाव आघाडीवर आहे. तर आमदार देवयानी फरांदे यांच्या गटातून स्वाती भामरे यांचेही नाव येऊ शकते. त्यामुळे २९ डिसेंबर रोजीच यासंदर्भातील अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

शिवसेनेला उपसभापतीची ऑफर

भाजपचे बहुमत असल्याने सभापती आणि उपसभापती पदावर भाजप सदस्यांची वर्णी लागणार आहे. परंतु, भाजपकडून सभापतीपद आपल्याकडे ठेवून उपसभापती शिवसेनेला ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी भाजपला जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे त्याची पायरी म्हणून सेनेला उपसभापती पद देवून खूश करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. परंतु, शिवसेना त्याला किती प्रतिसाद देते, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुगेवाल्याचा सिलिंडरला मालेगावात स्फोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील मोसमपूलजवळील महात्मा फुले पुतळा चौकात एका फुगे विक्रेत्याच्या दुचाकीवरील सिलिंडरचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र सिलेंडरचे तुकडे झाले आणि दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

फुगे विक्रेता रस्त्यावरून जात असताना अचानक त्याच्या दुचाकीवरील सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे सिलिंडरचे तुकडे झाले. अर्धा तुकडा हवेत उडाला. सिलिंडर स्फोटामुळे फुगेवाल्याच्या वाहनाचे नुकसान झाले. दरम्यान वर्दळीचा परिसर असल्याने या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली. बघ्यांनी गर्दी केल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक अधीक्षक संजय पवार यांच्यासह अग्निशामक बंब व कर्मचारी, वाहतूक पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. फुगेविक्रेत्यास चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला ते कळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन चोरट्यास दीड वर्षाची शिक्षा

$
0
0

वाहन चोरट्यास शिक्षा

नाशिक : बसस्थानक परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अ. मो. शाह यांनी एक वर्ष सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. चोरीची ही घटना २८ जानेवारी २०१५ रोजी घडली होती. जक्की उर्फ जाकीर अक्तार शेख (३० रा. इस्माईल बेकरी जवळ, खडकाळी) असे वाहनचोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २८ जानेवारी २०१५ रोजी आरोपीने ठक्कर बाजार बसस्थानक भागात आलेल्या कामटवाडा येथील शरद कचेश्वर न्याहारकर यांची दुचाकी (एमएच १५ बीपी २७१६) हातोहात चोरी केली होती. मनसे कार्यालयासमोर सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप - चित्राची जागा

महदंबा पुरस्कार थोडक्यात

$
0
0

विज्ञान लोकमाध्यमला पुरस्कार

नाशिक : गिरणारे येथील श्रीदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने दत्तजयंती, दत्तमंदिर अकरावा वर्धापन दिन व मराठी भाषेच्या आद्यकवी महदंबा स्मृतिदिनानिमित्त आद्यकवी महदंबा स्मृती पुरस्कार निसर्ग विज्ञान लोकमाध्यम संस्थेस प्रदान करण्यात आला. विज्ञान व पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प.पु.महंत सुकेणकरबाबा यांच्या हस्ते संस्थेचे प्रतिनिधी अध्यक्ष प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी स्वीकारला. यावेळी श्रीदत्त मंदिर ट्रस्टचे संचालक चक्रपाणी बाबा कोठी, शिवकार्य गडकोट संस्थेचे अध्यक्ष राम खुर्दळ, निशिकांत पगारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेतून परंपरेचे दर्शन

$
0
0

कलेतून परंपरेचे दर्शन

बॉईज टाऊन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉईज टाऊन पब्लिक स्कूलच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन दादासाहेब गायकवाड सभागृहात झाले. गणेश वंदना सादर करत या सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. सोहळ्यात देशभक्तीपर गाण्यांवर नृत्याविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, केरळ, तामिळनाडू या राज्यातील परंपरा दर्शविणाऱ्या नृत्याचा बहारदार आविष्कार सादर करण्यात आला. महाराष्ट्राची आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा पोवाड्यातून मांडताना विद्यार्थ्यांनी उपस्थितांची कमालीची दाद मिळवली. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा पवार यांनी स्नेहसंमेलनात शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. सोहळ्याच्या अखेरीस शाळेचे ट्रस्टी नेवील मेहता यांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे संयोजन स्वाती कुलकर्णी, प्रभाकर मुसळे, पद्मश्री संवत्सरे आणि नीता ठक्कर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देश महोत्सवात भाऊ कदमचा धमाका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीत मंचावर प्रवेश करत सारा माहोलच ताब्यात घेणाऱ्या विनोदवीर भाऊ कदम आणि सहकलाकार रेणूका यांच्या दमदार परफॉरर्मन्सला खान्देश महोत्सवानेही उदंड प्रतिसाद दिला. भाऊ कदम यांच्या सादरीकरणासोबतच सांस्कृतिक उपक्रमांतर्गत सादर करण्यात आलेली मराठी गीते, लावण्या आदी कलाप्रकारांनाही उपस्थितांच्या प्रचंड गर्दीने टाळ्या अन् शिट्ट्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांची सायंकाळी प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते काही स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

नागरिकांच्या उत्साहामुळे खान्देश महोत्सवाची समारोपाची संध्याकाळ चांगलीच बहरली होती. आमदार सीमा हिरे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खान्देश महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी करण्यात आला. समारोपाच्या सोहळ्यासाठी विनोदवीर अभिनेते भाऊ कदम हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. सोबतच विविध कलावंतांनी नृत्य, गायन आदी कला सादर करत रसिकांची दाद मिळविली. सायंकाळी ७ वाजेदरम्यान सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने सिटी सेंटर मॉल ते एबीबी सर्कल या रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात आल्याने या मार्गावर वाहतुकीचा वेग अतिशय मंद होता. नागरिकांची वाढती उपस्थिती लक्षात घेता मंचावरील कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा यासाठी ठक्कर मैदानात व मैदानाबाहेर मोठ्या पडद्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुख दु:खाचा धांडोळा घेणारे ‘विसर्जन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्युट यांची निर्मिती असलेल्या 'विसर्जन' या नाटकाचे अश्वमेध थिएटर्स आणि सपान नाशिक या संस्थेतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात सादरीकरण करण्यात आले.

जगणं सुरु होण्याच्या उंबरठ्यावर मरण कवटाळू पहाणारा वैफल्यग्रस्त तरुण शेतकरी आनंद, लौकिकार्थान जगणं संपत आलेलं असतानाही ते सुरू होण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा करीत बसलेली आजी, आणि जगाला जगणं समजवून देण्याच्या गदारोळात हरवलेल्या थोरल्या भावाला अनंत काळ शोधत रहाणं, हेच अनादी जगणं घेऊन प्रवासत रहाणारा रंगा या तिघांच्या सुख दु:खाचा धांडोळा घेणारे 'विसर्जन' हे दोन अंकी प्रायोगिक नाटक सादर झाले.

या कथेत असलेल्या आनंदचे आई बापाचे छत्र हरवलेलं असते. त्याची आजी मात्र जिवंत असते. आजीचा नवरा व आनंदचा आजोबा हा देखील वारीत परागंदा झालेला असतो. त्याची आठवण म्हणून आजीने एक मंदिर बांधलेले असते; मात्र या मंदिराचा गाभारा रिकामा ठेवलेला असतो. परागंदा झालेल्या नवऱ्याला शोधायचे आणि येताना विठ्ठलाची मूर्ती घेऊन यायची व मंदिरात तिची स्थापना करायची ही आजीची इच्छा असते. याच वेळी रंगा नावाचा वारकरी त्याच्या भावाचा शोध घेण्यासाठी वारीत निघालेला असतो. धावत येत तो आनंदला आजीकडे घेऊन येतो पुन्हा एकदा आनंद जगण्याच्या लढाईत ढकलला जातो. त्यानंतर रंगा निघून जातो. 'स्व' विर्सजित झाल्याशिवाय 'गाभारे' भरत नसतात, म्हणूनच ही एक डोहातील आकाशशोधाची गोष्ट आहे, असे सूत्रधार म्हणतो.

नाटकाचे लेखन दत्ता पाटील व दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. नेपथ्य लक्ष्मण कोकणे, शेखर सरोदे, प्रकाशयोजना राहुल गायकवाड, संगीत संयोजन रोहीत सरोदे, राजेंद्र उगले, गीत दत्ता पाटील, राजेंद्र उगले, रंगभूषा माणिक कानडे वेशभूषा चेतन बर्वे, उर्वराज गायकवाड, पार्श्व संवाद प्राजक्त देशमुख, प्रशांत साठे, निर्मती प्रमुख विश्वास ठाकूर, सुत्रधार विनायक रानडे, सहाय्य प्रणव प्रभाकर, राजेश भुसारे, हेमंत महाजन, गिरीश गर्गे यांचे होते.

नाटकात आनंद-धनंजय गोसावी, आजी-दिप्ती चंद्रात्रे, रंगा-निलेश सूर्यवंशी, कार्तिकेय कंट्रोजवार, चेतन बर्वे, एकता आढाव, पूजा पूरकर, दामिनी जाधव, अंकिता साळूंखे, प्रतिक गोवर्धने, प्रतिक शर्मा, सुरज बोडाइ, अर्थव लाखलगावकर, प्रतिक कुलकर्णी, विनायक अमृतकर यांनी भूमिका केल्या. गायन वादनाची साथ राजेंद्र उगले, अरुण इंगळे, दत्ता अलगट, शुभम लांड़गे, अपूर्व इंगळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्ट

$
0
0

\Bशिबिराचा समारोप\B

नाशिक : श्री कैवल्यनाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भारत सेवाश्रम, तपोवन येथे आयोजित अध्यात्मिक शिबिराचा समारोप झाला. या कार्यक्रमात दोनशेपेक्षा अधिक सदस्य सहभागी झाले होते. कार्यक्रमात दुरजुती चॅटर्जी महाराज यांनी 'सकारत्मक वृत्तीची निर्मिती आणि आत्मिकशांती' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ट्रस्टचे अध्यक्ष अनिरबन भौमिक, सचिव डॉ. प्रियनाथ घोष, स्वाती भौमिक, सुनीता रॉय, मलय देव, अलोक मालाकर, महिंद्रा दास यांसह ट्रस्टचे इतर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bसिडको शाखेचे उद्घाटन\B

नाशिक : छावा क्रांतीवीर सेनेच्या सिडको शाखेचे शनिवारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग यांच्या हस्ते उट्घाटन करण्यात आले. यावेळी युवा शहर उपाध्यक्ष रोहित गोसावी, कार्याध्यक्ष अनिल खरात, प्रदिप बोखारे, शंकर पाटील, विक्रम थापा, अक्षय शर्मा, संतोष सरोदे, शुभम निकम, रितेश भुजबळ, चेतन कुरकुरे, निखिल पवार, विजय जगताप, अजय गांगुर्डे, कुशल बागुल, ऋतिक शेलार यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्सुरा फेस्टमध्ये रंगले नाशिककर

$
0
0

'मित्सुरा'त रंगले नाशिककर

विविध स्पर्धांचे आयोजन; कलाकारांना संधी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेमोस्ट्रेशन्स, विविध खेळ, प्रदर्शन, कविता, तसेच नृत्य, नाटक, सेल्फी तसेच शिल्पकला यांचे प्रदर्शन, काळ्या रंगाचे कापड अंथरलेली अलिबाबाची गुहा, विविध धातुंचा गणपती, तब्बल ४३ तास खर्च करून रेखाटलेली रांगोळी, अशा एक ना अनेक कलाकृतींनी भरलेल्या मित्सुरा आर्ट फेस्टिव्हलमध्ये नाशिककर रविवारी रंगले.

सकाळी ८ वाजता फेस्टला सुरुवात झाली. मित्सुरा आर्टमध्ये प्रवेशद्वार अतिशय प्रभावी बनविण्यात आले असून तीन द्वारांमध्ये हे विभागण्यात आले आहे. मध्ये प्रवेश करताच नटसम्राट सिनेमावर आधारित रांगोळीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. जोकर, पाण्यातले बगळे, काळ्या कापडामधील मोठी गुहा, नळ्यांनी तयार केलल्या बाहुल्या, तसेच लाकडाचा बनवलेला बंगला अशा कलाकृतींनी आर्ट फेस्ट परिपूर्ण होता. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रॉक बॅण्ड परफॉर्मन्स, शास्त्रीय संगीत, नृत्य गायन व नाटक हे कार्यक्रम झाले. गोदापार्क, आसाराम बापू ब्रीजजवळ, गंगापूर रोड येथे सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत हा फेस्ट झाला.

शौर्य सामाजिक संस्थेच्या विद्यमाने हा 'मित्सुरा' आर्टफेस्ट आयोजित करण्यात आला होता. नाशिककरांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने झालेल्या या फेस्टिवलमध्ये विविध स्पर्धा व खेळांचे प्रदर्शन झाले. गायनापासून तर शिल्पकलेपर्यंत सर्वच कलागुणांचा समावेश असणारा हा आर्ट फेस्ट नाशिककरांसाठी मेजवानीच ठरला. प्रत्येक खेळात पालकांना तसेच विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. चित्रकला, अक्षरलेखन, हस्तकला यांच्या कार्यशाळा, तसेच गायन, वादन, शास्त्रीय संगीत, नाटक अशा सर्वच कलांचा या फेस्टमध्ये समावेश होता. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पॉट ड्रॉईंग स्पर्धा तसेच नृत्य गायनाच्या स्पर्धादेखील यावेळी झाल्या. गेम्स, झुम्बा व योगा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात लहानपणचे खेळ खेळण्याची संधी पालकांना देण्यात आली. फेस्टमध्ये कला व फूडसाठी विविध ५० स्टॉल्स मांडण्यात आलेले होते. तेथे खवैय्यांनी आनंद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकाला कार बदलून द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उत्पादन दोष असलेल्या वाहनांची विक्री केल्यामुळे ग्राहक न्यायंचाने होंडा कारला वाहन बदलून देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाचा खर्च म्हणून ५ हजार असा १५ हजारांचा दंडही ठोठावला आहे. त्याच मॉडेलचे वाहन देणे शक्य नसेल, तर वाहनांची किंमत ९ लाख ५८ हजार ८०० रुपये व्याजासह परत करण्याचा विकल्पही दिला आहे.

मखमलाबाद रोडवरील डॉ. स्वप्नील जगदिश गवारे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे ऋषभ होंडा मोटार प्रा. लि. व होंडा कार प्रा. लि. यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर हा निकाल न्यायमंचाने दिला आहे. गवारे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, होंडा कार प्रा. लि. ने उत्पादित केलेली होंडा सिटी (क्र. एम. एच. १५, ईएक्स ९९८२) हे वाहन त्यांनी ऋषभ होंडा मोटार प्रा. लि. यांच्याकडून ९ लाख ५८ हजार ८०० रुपयांना विकत घेतले. वाहनाची २४ महिन्यांची वॉरंटी देण्यात आली होती. मात्र, वाहन विकत घेतल्यापासून क्लचमध्ये आवाज येत असल्याने कंपनीच्या शो रूममधून क्लच सिलेंडर स्लॅव्ह विनामूल्य बदलून दिले. तरीदेखील वाहनातील दोष दूर झाला नाही. तांत्रिक दोष असलेले वाहन विक्री करून सामनेवाला यांनी सेवा देण्यास कमतरता केलेली आहे.

या तक्रारीवरुन होंडा मोटारकडून सांगण्यात आले की, एआरएआय यांनी अॅप्रूव्हड केल्यानंतरच विवादीत वाहन तक्रारदारांना विक्री करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांना वेळोवेळी सहकार्य करून समाधान केले आहे. तसेच वाहनांचा पार्टदेखील विनामूल्य बदलवून दिलेला आहे. वाहनांचा अयोग्यरीत्या वापर केल्याने वाहनात दोष निर्माण झालेला असण्याची शक्यता आहे. वाहन तपासणीसाठी घेऊन येण्याबाबत तक्रारदारांना वेळोवेळी कळवूनदेखील तक्रारदार यांनी त्यांच्याकडे वाहन तपासणीसाठी आणले नाही. वाहनात कोणताही तांत्रिक दोष नाही. सेवा देण्यास कोणतीही कमतरता केली नाही.

कंपनीचा दावा फेटाळला

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमंचाने वाहनाचा अयोग्य रितीने वापर केल्याने वाहनात दोष निर्माण झाल्याचा कंपनीचा दावा फेटाळला. विक्री केलेल्या वाहनांबद्दल तक्रार केल्यानंतर तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर क्लचही बदलून देण्यात आल्याचे कंपनीने मान्य केले आहे. वाहन विकत घेतल्यानंतर सुमारे तीन महिन्यांतच समस्या उत्पन्न होणे. त्यानंतर दुरुस्ती करुन पार्ट बदलून देणे व त्यानंतरही दोष कायम राहणे ही गोष्ट वाहनात दोष असल्याचे शाबित करते. त्यासाठी तज्ज्ञ पुराव्याची गरज नाही. होंडा कार प्रा. लि.ने वाहन विक्री केल्यामुळे त्यांनी ती बदलून द्यावी व त्याच मॉडेलची कार उपलब्ध नसल्यास व्याजासह पैसे परत करावे असा निर्णय दिला. ऋषभ होंडा मोटर विक्रेते असल्यामुळे त्यांना उत्पादन दोषाबाबत जबाबदारी टाकता येणार नाही. म्हणून त्यांच्या विरुद्धचा अर्ज फेटाळला. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे - कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी दिला. गवारे यांच्याकडून अॅड. एम. आर. आहेर यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलच्या कंत्राटदाराची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सेंट्रल जेलचे कंत्राट घेतलेल्या व्यावसायिकाची इंदूर येथील कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मनोज विष्णू उबराणी (३८, रा. मोटवाणीरोड, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. उबराणी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथील व्हाइट गोल्ड एजन्सीच्या श्वेतल जैन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. उबराणी हे ठेकेदार असून, काही वर्षांपूर्वी त्यांनी सेंट्रल जेलमधील एकाचा कामाचा ठेका घेतला होता. उबराणी यांनी घेतलेल्या कामासाठी ६ एस ग्रे कॉटन यार्न हा कापसाचा दोरा आवश्यक होता. त्यामुळे त्यांनी हा माल इंदूर येथील व्हाइट गोल्ड एजन्सीकडून मागविला. मात्र, फेब्रुवारी २०१७ पासून आतापर्यंत कंपनीने शुद्ध कापसाचा दोरा न पुरविता पॉलिस्टर मिक्स केलेले कापसाचे दोरे पुरविले. उबराणी यांनी याबाबत कंपनीकडे तक्रार करून पॉलिस्टर मिक्स दोरा परत घेऊन जाण्याबाबत कळविले. मात्र, कंपनीने उबराणी यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. दोऱ्याच्या मोबदल्यात उबराणी यांनी कंपनीला नऊ लाख ६९ हजार रुपये दिले होते. तेही त्यांना परत करण्यात आले नाहीत. त्यामुळे उबराणी यांनी उपनगर पोलिस स्टेशन गाठून संशयित श्वेतल जैन यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. जी. जगदाळे करीत आहेत.

जयभवानी रोडवर घरफोडी

जयभवानीरोड परिसरातील रचना कॉलनी येथील घर फोडून चोरट्यांनी ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत घडली. या प्रकरणी महेंद्र ताराचंद गायकवाड (रा. रचना कॉलनी, आडकेनगर) यांनी फिर्याद दिली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून आत प्रवेश केला. तसेच कानातील चेन जोड, कानातील टॉप्स, नेकलेस, नथ असा ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एम. डी. परदेशी करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर छापा

इंदिरानगरमधील मुरलीधरनगर भाजी मार्केटसमोर पत्र्याच्या शेडच्या शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून इंदिरानगर पोलिसांनी सात संशयित जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झाली.

उघड्यावर जुगार खेळणाऱ्या महावीर उर्फ पप्पू रमेश भदरगे, अनिल वसंत नाडे, अमोल मनोज घाटे, अरुण दामोदर हांडे, इंदर अहलाजी डोंगरे, गजानन बळीराम मानकुटे आणि वंजी लखा गायकवाड यांना अटक केली. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी सर्व संशयित मटका जुगारा खेळताना सापडले. संशयितांकडून जुगाराचे साहित्य आणि दोन हजार ७७० रुपये हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक राजू भगवान राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार आर. के. शेख करीत आहेत.

शिडीवरून पडल्याने मृत्यू

घरातील शिडीवरून पडलेल्या महेश जगन्नाथ पाटील (५०, रा. पाटील गॅरेजमागे, देवळाली गाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २२) सायंकाळच्या सुमारास घडली. शिडीवरून पडल्याने पाटील यांच्या डोक्यास दुखापत झाली. त्यांना लागलीच आडगाव नाका परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून पाटील यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार अश्पाक शेख करीत आहे.

दुचाकीसह सायकल चोरीला

इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी तर दुसऱ्या एका घटनेत सायकल चोरीला गेल्याची घटना घडली. विठ्ठल काशिनाथ पाटील (रा. शिखरेवाडी, नाशिकरोड) यांची २५ हजार रुपयांची दुचाकी (एमएच १५ डब्ल्यु ७९४३) १६ डिसेंबर रोजी इमारतीच्या पार्किंगमधून चोरीस गेली. तर, परमिंदर कौर हरविंदर घुमन (रा. इच्छामणी रो हाऊस, रायन स्कुलच्या बाजूला) यांची ७ हजार रुपये किमतीची सायकल चोरीस गेली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या कम्पांउडमधून १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कामगारांचा ९ जानेवारीला मोर्चा

$
0
0

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसाठी ८ आणि ९ जानेवारी रोजी देशव्यापी संप करण्यात येणार असून, कंत्राटी कर्मचारी संघटनांतर्फे ९ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघातर्फे देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघातर्फे रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी 'आयटक'चे राज्यसचिव राजू देसले, महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर, धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी, महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांसह कंत्राटी कामगार उपस्थित होते. राज्य सरकारने मेगा भरतीची प्रक्रिया राबविण्यापूर्वी राज्यातील सरकारी कार्यालयांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी प्रमुख मागणी महासंघाने केली आहे. राज्यातील विविध विभागाच्या ५२ कंत्राटी कर्मचारी संघटनांनी यासाठी महासंघाला पाठिंबा दिला असून, ९ जानेवारीला या संघटनांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यात तीन लाख कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून, त्यांना समकक्ष पदावर काम करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्याचे महासंघाने सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रथम दीड लाख रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन लागू करावे, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. मात्र सरकार कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई एकाच वेळी लढली जाईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.

\B...तर लाँग मार्च\B

९ जानेवारीला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. सरकारने मेगा भरतीच्या पूर्वी कंत्राटी कामागारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येईल, असे महासंघाचे अध्यक्ष जाधवर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images