कारावासाचा आदेश कारणी लागावा!
अरविंद जाधव,
arvind.jadhav@timesgroup.com
नियम पायदळी तुडविल्याने काही फरक पडत नाही, अशा धारणेला जिल्हा कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे छेद देण्याचे काम केले. लायसन्स नसताना वाहन ताब्यात दिले या एवढ्या एका कारणामुळे कोर्टाने युवकाच्या वडिलांना सुद्धा कारावासाची शिक्षा ठोठावली. कोर्टाचा हा कारावासाचा आदेश कारणी लागला म्हणजे मिळवले.
---
भरधाव स्कोडा कारने दिलेल्या धडकेत तीन महिला मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी कोर्टाने शेख फैज फारूख, फारूख हबीब शेख या दोघा पिता-पुत्रांना दोषी ठरवित सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली. २६ मे २०१७ रोजी मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला होता. विनापरवाना स्कोडा सुपर्ब ही कार भरधाव चालवित त्यांनी हर्षद श्यामकुमार पाटील यांच्या स्विफ्ट डिझायर कारला धडक दिली होती. या अपघातात सरिता भामरे, रेखा पाटील व योगिनी भामरे या महिलांचा मृत्यू झाला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. आर. टंडन यांनी शेख फैज फारूख याला दोन वर्षे सश्रम कारावास आणि २७ हजार ६०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर फारूख हबीब शेख याला तीन महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यातील फारूख हबीब शेख यांचा दोष हा होता की त्यांनी मुलाकडे लायसन्स नसताना त्यास वाहन चालविण्यास दिले. याबाबत साधारणत: दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने कायदा केला होता. मुलाकडे लायसन्स नसताना त्यास वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवर यामुळे कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच कायद्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात नव्हे तर विभागात या प्रकारचा हा पहिला निर्णय झाला असावा.
खरंतर कोर्टाकडून शिक्षा होणे आणि समाजाने त्यातून बोध घेणे, हेच सार्वभौम प्रजासत्ताक देशाला अपेक्षीत आहे. पण दुर्दैवाने तसे होत नाही. समाजातील २० टक्के गुन्हेगार विरूध्द ८० टक्के समाज असे चित्र हळुहळू पालटत असून, व्हाईट कॉलर क्राईममुळे ही टक्केवारी अगदीच उलट दिशेने प्रवास करू लागली आहे. वाहतूक नियमांबाबत उलट स्थिती असून, ८० टक्के समाज नियमांकडे दुर्लक्ष करण्याकडे तर २० टक्के समाज नियमांचे पालन करण्याकडे लक्ष देतो.
खुनासारख्या गुन्ह्यात जन्मठेप आणि फाशीची शिक्षा होऊ शकते, हे माहिती असूनही खून होणे बंद झालेले नाही. हत्या सारख्या प्रकारात एकतर अती राग किंवा सूड हे मानवी घटक महत्त्वाचे असतात. ते व्यक्तीनिहाय आणि घटनेनुसार बदलू शकतात. त्याचमुळे शिक्षेचा इतिहास माहिती असूनही नाशिकसारख्या शहरात दरवर्षी जवळपास ४० जणांची हत्या होते. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण कमी वाटू शकते. प्रत्येक गुन्ह्याची व्याप्ती, त्यातील मानवी संबंध, इर्षा, इतिहास हा वेगवेगळाच असतो. पण, शेख पिता पुत्राबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टंडन यांनी दिलेल्या निकालाबाबत तसे म्हणता येणार नाही. शहरात दरवर्षी लाखो वाहनचालकांवर कारवाई होते.
शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अगदीच कमकुवत असून, त्याचा ताण वाढलेल्या वाहनांच्या संख्येतून दिसून येतो. अगदी दहावी पास झालेल्या मुलास लागलीच ट्युशन, कॉलेज आणि इतर क्लासेससाठी किमान दुचाकी घेऊन द्यावी लागते. पालकांना आपल्याच चिंता मोठ्या वाटत असल्याने किंबहुना त्यातून बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नसल्याने लायसन्स, वाहन शिकवणे याबाबी गौण ठरतात. युवकांना नैसर्गिकरित्या येणारी उर्मी योग्य मार्गावर खर्ची घालविण्यासाठी योग्य तो पर्याय मिळाला नाही की त्यांना वाहनांचे आकर्षण स्वस्थ बसू देत नाही. आज इयत्ता पाचवी किंवा सातवीतील मुलांना अद्ययावत वाहनांबाबत जितकी माहिती आहे तितकी त्यांच्या पालकांना असणे दुर्मिळ म्हणावे लागेल. त्याचमुळे जिल्हा कोर्टाचा आदेश याच सुशिक्षीत समजल्या जाणाऱ्या ८० टक्के जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.
अलीकडच्या काळात रस्ते अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. नाशिक शहरात डिसेंबर महिन्याअखेरीस १९० जणांचा बळी गेला आहे. यामध्ये 'हिट ऍण्ड रन' अर्थात बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. या अपघातांचा विचार करता याशी निगडीत कायदेशीर आणि सामाजिक संदर्भांचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. अपघाताच्या घटनांबाबत आपण कायद्यावर खूप अवलंबून राहातो. त्यानंतर आपण रस्त्यांना, तसेच वाढती वाहतूक आणि मद्यपान यांसारख्या गोष्टींनाही दोष देत असतो. सध्याची रस्त्यांची परिस्थिती, लोकांनी दारू पिऊन गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळले जाणे इत्यादी कारणांबाबत खूप चर्चा होते. त्याबाबत कायदा करा, कडक कारवाई करा असेही सातत्याने म्हटले जाते. पण कडक शिक्षा करून प्रश्न सुटणार नाहीत. अर्थात कुठलीही घटना असो, दोषी व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. पण अशा घटना घडण्यामागची जी मूलभूत कारणे आहेत, ती आपण समजून घेतली पाहिजेत. या सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे, आपण स्वीकारलेली दळणवळण यंत्रणेची पद्धती. माझ्याजवळ कार आहे का? ती कोणत्या प्रकारची आहे, किती मोठी आहे, एकूण किती कार माझ्याकडे आहेत? गरज एकाची आहे तरी मी दोन-तीन घेऊ शकतो का? या संदर्भातच आपल्या विकासाच्या भ्रामक कल्पना बनलेल्या आहेत आणि त्याकडेच आपण सर्व वळलो आहोत.
जगाच्या पाठीवर जी मोठी शहरे आहेत, तिथे सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यात आलेली आहे. तिथे अपघाताचे प्रमाण कमी आहे आणि लोक त्या ठिकाणी सगळीकडे व्यवस्थित पोहोचू शकतात. हा साधा मुद्दा कोणीच कधी लक्षात घेत नाही. मुंबई, पुणे आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये पायी चालणाऱ्यांचे प्रमाण मोठे दिसते. म्हणजे रस्ते हे केवळ वाहनांसाठीच आहेत, माणसे त्यावरून जाऊच शकत नाहीत इतक्या वाईट पद्धतीने आपण शहराचा विकासाच्या नियोजन भकास केले आहे. अपघातांच्या प्रत्येक प्रकाराबाबत सविस्तर विश्लेषण करता येणे शक्य आहे. वाहतूक, अपघाताच्या घटना या वैयक्तिक स्वरूपाच्या नसून, त्या सामाजिक असल्याचे भान केव्हाच हरपले आहे. त्याचाच परिपाक आपल्याला वाढत्या अपघातांच्या संख्येवरून येऊ शकतो. दुर्दैवाने त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या सिस्टिम वेगवेगळ्या असून, त्यांना आपल्या कागदापलिकडे दिसत नाही.
वाहनाचे रजिस्ट्रेशन प्रादेशिक परिवहन विभागात होते. लायसन्स देण्यासाठी हाच विभाग महत्त्वाचा असतो. या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्याकडे येणारे काम, त्यातील एजंट, त्यासाठी उभी करण्यात येणारी यंत्रणा यात सुरक्षितता हरविली जाते. यानंतर, वाहनांसाठी लागणारे रस्ते, वाहतुकीचे पायाभूत घटक उभारण्याचे काम महापालिककडे आहे. इथे ट्रॅफिक इंजिनीअर नाही की, दळणवळणाबाबत आस्था! रस्ता झाला की मग कोठे स्पीड ब्रेकर, तर कोठे बॅरकेडिंग करून वाहतुकीला अडथळा घालण्याची चढाओढ सुरू होते. वाहतूक पोलिस, रस्ता सुरक्षा समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग असे एक ना अनेक घटक यात सहभागी असून, प्रत्येकाची आपली वेगळी कैफियत आहे. राज्य सरकारने नुकतेच जिल्ह्यातील ४७ ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी साडेसहा कोटी रूपयांचा निधी दिला. अगदी चकाचक असलेल्या रस्त्यांवर होणारा हा पुनर्खर्च कमी करण्याचा विचार सुरूवातीलाच होत नाही, यातच सर्व आले. शेख पिता पुत्राला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होईल, किंवा हे कुटुंब याविरोधात वरिष्ट कोर्टाकडे दाद मागेल. हा न्यायालयीन मार्ग खूप प्रशस्त आहे. त्यासाठी पैसे असले की वेळेचे बंधन महत्वाचे ठरू शकत नाही. पण, सर्वांनाच हा मार्ग सहज ठरेल, असे नाही. तेंव्हा यापासून दूर राहण्यासाठी सावधानता महत्त्वाची असून, प्रत्येकाने याकडे लक्ष द्यायलाच हवे!