म. टा. प्रतिनिधी, नाशिक नृत्य हे संवादाचे माध्यम ठरू शकते का याचे उत्तर निश्चित हो असे येईल. केवळ संवाद नव्हे तर थेट रसिकांच्या हृदयाला भिडणारा प्रभावी संवाद नृत्य साधते याची प्रचिती नाशिककर रसिकांना रविवारी सृजनोत्सवातून आली. सृजन नृत्य विद्यालय व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान यांच्या वतीने परशुराम सायखेडकर नाट्यगृहात रेषा एज्युकेशन सेंटरच्या सौजन्याने सृजनोत्सव-२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे नववे वर्ष होते. प्रारंभी नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव, लता पाटील, हेमलता कांडेकर, स्वाती भामरे आणि पेंग्विन अॅकॅडमीच्या संचालक ज्योती कटाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सृजनोत्सवचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर भरतनाट्यमला सुरूवात झाली. सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि सृजन नृत्य विद्यालयाच्या संचालिका शिल्पा देशमुख यांच्या विद्यार्थिनींनी गणेशवंदनेने भरतनाट्यमला सुरुवात केली. अलारिपु, पुष्पांजली, माखनचोरी, सरस्वती कौतुकम, किर्तनम, पदम यांसारख्या रचनांवर नृत्य करीत विद्यार्थिनींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यानंतर श्री अरविंद घोष यांच्या कवितांवर नृत्य सादर करण्यात आले. संकल्पना व नृत्य संरचना पुण्यातील अंजली बागल यांची होती. बागल यांच्या विद्यार्थिनींनी अरविंद घोष यांच्या कवितेतील एकेक ओळ नृत्याविष्काराच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविली. परंपरा व नवता यांचा सुंदर मेळ घालत नृत्य सादर करण्यात आला. रसिकांनी देखील या कलावंतांच्या कलेला हृदयापासून दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अर्चना कुलकर्णी, प्रीतम नाकील आदींनी परिश्रम घेतले. - सभागृहासाठी पाठपुरावा करू शहरातील कलावंतांना सराव करता यावा याकरीता कायमस्वरुपी सभागृहाची आवश्यकता आहे. हे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडे निश्चितच पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी नगरसेविका डॉ. भालेराव यांनी दिली. तर कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावा याकरीताच सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह जिल्हाभरातील कलावंतांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे आवाहन नगरसेविका भामरे यांनी यावेळी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट