कुठलेही सामाजिक कार्य पुढे जाते ते प्रबोधनात्मक, रचनात्मक व संघर्षात्मक या तीन अंगांनी. थोडीच लोक अशी असतात जी याचा सर्वसमावेशक उपयोग करतात. राहा सरांनी या तिन्ही अंगांचा उपयोग तर केलाच; पण त्याला संशोधनाची जोडीही दिली.
अजित बर्जे, नाशिक रोड
Top of the World...! कुठल्याही मित्राने कधीही फोन केला व हाऊ आर यू असे विचारले. की विशिष्ट लकबीत हमखास मिळणारे हे उत्तर ठरलेले. मित्रांसमवेत दिलखुलास रमणारा हा अवलिया निसर्गाचा विषय आला, की मात्र गंभीर होत परिचितांबरोबरच कुठल्याही उच्चपदस्थाला पर्यावरणाच्या दुर्गतीविषयी खडे बोल सुनवायला मागे- पुढे पाहायचा नाही. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांपासून ते देश पातळीवरील पर्यावरण क्षेत्राशी निगडित, नावाजलेल्या संस्था, संघटना व व्यक्तींना बिश्वरूप राहा माहिती नसतील असे विरळच. अशा या निसर्गावर मनापासून प्रेम करणाऱ्या व त्याच्या रक्षणासाठी झपाटलेपणापासून कार्य करणाऱ्या व्यक्तीचे अकाली जग सोडून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले.
मित्र परिवारामध्ये 'शाँखो' नावाने परिचित असलेले हे उमदे व्यक्तिमत्त्व वयाच्या साठीतही शाळेतल्या सवंगड्यांशी ऋणानुबंध जपून होते. स्वत: अतिशय निर्मळ मनाचे असल्याने नवख्या व्यक्तीवरही चटकन विश्वास टाकून त्याला आपलेसे करून घ्यायचे. मनस्वी व दिलदार असलेला हा माणूस मुळातच साहसी व उत्साही असल्यामुळे स्वच्छंदपणे जगला. शालेय जीवन मुंबईत तर महाविद्यालयीन शिक्षण मदुराईत झाले. मसाल्याच्या बांगा असलेल्या मित्रांमुळे तमिळनाडूतील जंगलात फिरताना निसर्गाची ओळख झाली व पुढे नोकरीनिमित्त पुन्हा मुंबईत आल्यावर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या रूपाने बहरली. पुढे ट्रेकिंगची आवड जोपासताना त्याला फोटोग्राफीचीही जोड मिळाली. स्वभावत:च कुठलीही गोष्ट मनापासून करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे निसर्गछायाचित्रणाला जी चिकाटी व सहनशीलता लागते, त्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले व त्याचा प्रत्यय काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने आले.
कालांतराने वडिलांच्या व्यावसायिक निवृत्तीनंतर त्यांनी नाशिकला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला व राहा सरांना त्या रूपाने एक वेगळे विश्व खुले झाले. टेक्स्टाइल व स्पेशालिटी फॅब्रिकशी संबंधित विविध व्यवसाय-नोकरी करताना त्यांनी नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत स्वत:चा उद्योग सुरू केला. त्यातही पुढे ठराविक उत्पादनाची नियमित मागणी सुरू झाल्यामुळे उद्योगाचे दैनंदिन कामकाज आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर सोपवून नाशिक जिल्हा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात झाली. अल्पावधीतच काही समविचारी मित्रांबरोबर त्यांनी एका अनौपचारिक निसर्गगटाची स्थापना केली. पुढे निसर्गकार्याला ठोस स्वरूप देण्याची गरज लक्षात आल्यावर नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या नावाची संस्था २००२ मध्ये रीतसर स्थापन केली गेली, ज्याचे ते संस्थापक अध्यक्ष झाले. त्यातून त्यांच्या कार्याची पट विस्तारला व पुढे त्यांचा नियमितपणे बीएनएचएस, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, वर्ल्डवाइड फंड-नेचर, सालीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री आदी संस्थांशी निकटचा संबंध प्रस्थापित झाला. मध्यंतरी त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत त्यांना सरकारतर्फे नाशिक जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षकपद देण्यात आले, जे पुढे त्यांनी प्रभावीपणे वीस वर्षे सांभाळले.
यात दरम्यान साधारण २००२-२००३ मध्ये माझा त्यांच्याशी परिचय झाला. आजसारखे त्या वेळी नांदूरमध्यमेश्वर, काही मोजके पक्षी मित्र व निरीक्षक वगळता, फारसे परिचित नव्हते. सर्वसामान्यांना त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने वन विभागाला त्यावर एक माहितीपत्रक प्रसिद्ध करायचे होते. त्या माहितीपत्रकामध्ये लागणारी छायाचित्रे राहा यांच्याकडून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना भेटायला सांगितले. त्या निमित्ताने त्यांची झालेली ओळख केवळ माझी निसर्ग जागरूकता वाढण्यात झाली असे नाही, तर पुढे निसर्ग-पर्यावरणाची कारवी रिसोर्स लायब्ररी सुरू करण्याची प्रेरणाही काहीअंशी त्यातून आम्हाला मिळाली. पुढे संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी लागणाऱ्या छपाईच्या निमित्ताने नियमित भेट घडत गेली. त्या वेळी डिजिटल फोटोग्राफीचा उदय झाला नव्हता. छपाईच्या कामासाठी राहा सरांनी काढलेल्या फोटोंच्या ट्रान्स्परन्सी वापरून आम्ही काम करत असू. त्यांच्या फोटोंचा साठा एवढा प्रचंड होता, की आम्ही त्यांच्या कारखान्यात तासन् तास प्रोजेक्टरद्वारे त्यातून योग्य छायाचित्र निवडण्यासाठी घालवायचो. त्यातूनच पुढे त्यांनी घेतलेल्या छायाचित्रांचे विषयाप्रमाणे वर्गीकरण करून ठेवण्याचे काम हातात घेण्याचे आम्ही ठरविले व अवांतर वेळ मिळेल तेव्हा आम्ही ते सुरूही केले; पण त्याचा आवाका बघता एका मर्यादेपुढे ते काम पुढे सरकलेच नाही. त्या स्लाइड्सवरून आम्ही इतर अनेक गोष्टींबरोबरच पाणथळ व गवतीमाळ पक्ष्यांवर दोन कॅलेंडरही प्रसिद्ध केली. पुढे डिजिटल तंत्रज्ञान आल्यावर काम सोपे होत गेले. त्यातूनच पुढे नाशिकमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांवर समग्र पुस्तक करण्याची कल्पना पुढे आली व आठवड्यातले तीन दिवस असे सलग दोन-अडीच वर्षाच्या प्रयत्नातून नाशिक डिस्ट्रिक्ट हे पुस्तक तयार झाले.
कुठलेही सामाजिक कार्य पुढे जाते ते प्रबोधनात्मक, रचनात्मक व संघर्षात्मक या तीन अंगांनी. थोडीच लोक अशी असतात जी याचा सर्वसमावेशक उपयोग करतात. राहा सरांनी या तिन्ही अंगांचा उपयोग तर केलाच; पण त्याला संशोधनाची जोडही दिली. त्यांनी सहकाऱ्यांबरोबर केलेल्या प्रारंभिक कामाची दखल घेत 'बीएनएचएस'नी त्यांना नाशिकबरोबरच महाराष्ट्रातील प्रमुख पक्षीस्थळांच्या निश्चिती करण्यासाठी अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे काम दिले. त्यानंतर वन खात्याबरोबरच अन्य संस्थांच्या सहकाऱ्याने मनुष्यवस्तीजवळ राहणाऱ्या लांडग्यांचा अभ्यास, माळढोक, तणमोर, पांढऱ्या चोचीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड, बर्ड रिंगिंग गवतीमाळ पक्ष्यांचे जीवनचक्र या व अशा अन्य प्रकल्पांवर त्यांनी सतत काम केले. सततच्या जंगल भटकंतीतून, तीक्ष्ण निरीक्षणातून त्यांनी नाशिक जिल्ह्यात कधीही नोंद न झालेल्या पिवळ्या गळ्याचा भारीट, रानपिंगळा, पुना स्किंक सापसुरळी अशा अनेक दुर्मिळ प्रजातींची नोंद पुराव्यानिशी दिली. त्यांच्या कार्याचा मेरूमणी म्हणता येईल, असे कार्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम संयुक्तरीत्या उभे राहिलेले ३५० हेक्टर क्षेत्रफळ असलेले बोरगड संवर्धन राखीव वनक्षेत्र स्थानिक प्रजातीची दीड लाखाहून अधिक झाडं केवळ लावली नाही तर जगवलीदेखील. सुरुवातीची काही वर्षे पाण्याची सोय नसताना उन्हाळ्यात त्यांच्या जीपमध्ये पाण्याचे ड्रम भरून स्वत: झाडांना पाणी द्यायला ते जायचे. बोरगडच्या पायथ्याशी असलेल्या तुंगलदरा गावाला आज ते जंगल विविध अंगाने उपयोगी पडत आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांचा अधिवास असलेल्या अंजनेरी क्षेत्राला राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
ग्रामीण भागात गलोलने पक्षी मारणे ही सर्वसाधारण बाब, पण त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेता त्याला पायबंद घालणे गरजेचे होते. ग्रामस्थांशी व मुलांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधून त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण आणण्यात संस्थेला यश आले आहे. जनप्रबोधनासाठी ते निसर्ग चित्रकला स्पर्धा, कार्यशाळा, सायकल रॅली, परिसंवाद, नेचर कॅम्प, स्थळभेटी यांसारखे अनेक उपक्रम सातत्याने राबवत होते. शहरी शाळांच्या नेचर क्लबच्या वर्गणीतून ग्रामीण भागातील मुलांसाठी संपूर्णत: मोफत स्थळभेटीचे आयोजन, विविध उद्योगांच्या आर्थिक व कृतिशील सहभागातून ग्रामीण भागात जनजागृतीसाठी उपक्रम राबवणे नित्यनेमाने चालू असायचे. ते गेल्यानंतर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांच्या आलेल्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या होत्या. पक्ष्यांचं पर्यावरणातलं महत्त्व लोकांना समजावं व त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा, यासाठी कायमस्वरूपी केंद्र उभारण्याची कल्पना त्यांना सुचली. गंगापूर धरण परिसरातील त्यांच्या खासगी जागेत केवळ दोन महिन्यात विहंग पक्षी परिचय केंद्र योजनेचे स्वरूप ठरविण्याआधीच त्यांनी वन्यजीव सप्ताह व गांधी जयंतीचा २ ऑक्टोबर हा मुहूर्त उद्घाटनासाठी लगोलग घोषित केल्यामुळे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी एका बाजूला त्यांनी व मी त्याच्या मांडणीसाठी व दुसरीकडे वास्तुरचनाकार व त्यांच्या चमूने दिवस-रात्र एक केले. त्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकला मिळालेल्या नाशिककरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मिळालेली दाद हुरूप देणारी ठरली. यामुळे विहंग नाशिककरांपर्यंत पोहोचले.
केवळ विरोधासाठी विरोध असा त्यांचा विकासकामांना आक्षेप कधीच नव्हता; पण तो एकांगी होऊ नये याबाबत ते दक्ष असायचे. स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या गंगापूर धरण परिसरातील बोट क्लबला त्यांनी त्यासाठीच विरोध केला होता. कैकवेळा नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यापेक्षा गंगापूर धरणावर फ्लेमिंगो पक्षी अधिक संख्येने असत. त्याबरोबरच तुलनेने संख्या कमी असली तरी पक्ष्यांच्या प्रजातींचे वैविध्य धरण परिसरातील गवतीमाळ प्रदेशामुळेही समृद्ध होते. त्याचा बचाव व्हावा ही त्यांची त्यामागे तळमळ होती; पण पुढे तो प्रकल्प होणार हे निश्चित झाल्यावर स्पीड बोटऐवजी पॅडल बोट असाव्यात, यासाठी ते आग्रही होते. त्याच्या उद्घाटनाच्या ाकार्यक्रमाला जरी ते उपस्थित होते तरी मंचावर उपस्थित राहण्याची विनंती होऊनही निषेध म्हणून ते व्यासपीठावर गेले नाहीत.
जंगलातील अवैध वृक्षतोड असो, गाळ काढण्याच्या नावाखाली धरण परिसरातील बेकायदा मुरूम उत्खनन असो, अवैधरीत्या बाळगलेले पक्षी-प्राणी असो वा इतरही अनेक गोष्टी, आपली व वन्यजीव संरक्षकपदाची जबाबदारी दिवसाच्या कुठलाही प्रहर असो, त्यांनी असोशीने पाळली. रात्री-बेरात्री लागणाऱ्या वणव्यांबरोबरच पर्यावरणाच्या अनेक प्रश्नांवर स्थानिक गावकरी, तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वयकाची भूमिका ते समर्थपणे निभावत. ज्या दिवशी त्यांना पक्षाघाताचा झटका आला, त्याच दिवशी दोन तास अगोदर ते जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटले होते. अंजनेरी राखीव क्षेत्रात होऊ घातलेल्या हेलिकॉप्टर राइडच्या व्यवसायिक उपक्रमाचा लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांच्या अधिवासावर होऊ शकणाऱ्या आघाताचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी ती भेट होती.
आजारपणाच्या काळात तब्येतीत चढ-उतार होत असताना पक्षाघाताची तीव्रता जाणून घेण्याची चाचणी म्हणून डॉक्टरांनी त्यांना पक्ष्यांची शास्त्रीय नावे विचारली तेव्हा त्यांच्या अचूक उत्तराने डॉक्टरही अचंबित झाले होते. 'पक्ष्यांनी आज त्यांचा सच्चा मित्र गमावला' ही गिरीश टकले यांची राहा सरांबद्दलची प्रतिक्रिया अधिक बोलकी ठरते. हिमालयाच्या शिखररांगेतील एक असलेल्या पुमोरी शिखराच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले होते. शेरपा भाषेत त्याचा अर्थ होतो 'डोंगरकन्या'. अशा या डोंगराएवढ्या विशाल मनाच्या माणसाची स्मृती वटवृक्षाच्या रोपट्याच्या रूपाने बोरगडच्या पायथ्याशी जरी सांकेतिक रूपाने जपली असली तरी त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.