कोर्टापुढे लावली हजेरी; पुढील सुनावणींना हजर राहण्याची अट म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक माझ्या शेतातील आंबा खाल्याने मुलगाच होतो, असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोर्ट कारवाईस समोरे जावे लागणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे अखेर आज शुक्रवारी जिल्हा कोर्टात हजर झाले. यापुढील प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याच्या अटीवर कोर्टाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. जी. पांडे यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. साधारणत: तीन ते चार महिन्यांपासून या प्रकरणाची नियमीत सुनावणी सुरू असली तरी भिडे गुरुजी हजर झाले नव्हते. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहाटेच्या सुमारास भिडे गुरूजी आपल्या फौजफाट्यासह शहरात दाखल झाले. साधारणत: ११ वाजेच्या दरम्यान गुरुजी धारकऱ्यांसह कोर्टात पोहोचले. सरकारी पक्षातर्फे बाजू मांडताना अॅड. आर. वाय. जाधव यांनी भिडे गुरुजी यांनी मांडलेली भूमिका शासन व मुलींविरूध्द असल्याचे स्पष्ट केले. 'बेटी बचाव बेटी पढाव' या अभियानालाच विरोध वक्तव्य भिडे यांनी केले असून, त्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होऊ शकतो. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन यामुळे झाले असून, त्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याची भूमिका अॅड. जाधव यांनी मांडली. बचाव पक्षातर्फे अॅड. अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला. संभाजी भिडे यांचा सरकारच्या कोणत्याही अभियानास व धोरणास विरोध करण्याचा उद्देश नव्हता. प्रथमदर्शनी त्यांच्याकडून कोणताही गुन्हा झाल्याचे निदर्शनास येत नाही. या खटल्याशी संबंधित पुरावे यापूर्वीच कोर्टात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे भिडे गुरूजी या पुराव्यांबाबत ढवळाढवळ करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्या वयाचा विचार करताना त्यांना जामीन मंजूर करण्याची विनंती अॅड. भिडे यांनी कोर्टाकडे केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने भिडे यांना जामीन मंजूर केला. यापुढे होणाऱ्या सुनावणीदरम्यान कोर्ट देईल त्या आदेशावेळी हजर राहण्याचे फर्मान कोर्टाने दिले. दरम्यान, संभाजी भिडे यांना सुनावणीवेळी हजर राहण्याबाबत सूट मिळावी, अशी विनंती बचाव पक्षाने कोर्टाकडे केली असून, त्यावर १४ तारखेच्या सुनावणीवेळी निर्णय होऊ शकतो, असे अॅड. भिडे यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांना टाळले! कोर्टातील सुनावणी पूर्ण होताच भिडे गुरुजी यांनी अॅड. अविनाश भिडे यांच्या चेंबरमध्ये जाऊन चर्चा केली. यानंतर पोलिस संरक्षणात ते सांगलीकडे रवाना झाले. कोर्टातील धारकऱ्यांची गर्दी आणि भिडे गुरूजी यांना होणारा संभाव्य विरोध लक्षात घेता पोलिसांनी कोर्टात चोख बंदोबस्त तैनात केला होता. कोरेगाव भीमा तसेच नाशिकमधील त्या वक्तव्या प्रकरणी भिडे यांचे मत जाणून घेण्याचा सर्वच माध्यमप्रतिनिधींनी प्रयत्न केला. मखमलाबाद नाक्यावरील राजपाल नगर येथे आणि कोर्टातही भिडे यांनी प्रसारमाध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमलेल्या शेकडो धारकऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना विरोध केला. कोर्टात हा वाद वाढल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत सर्व धारकऱ्यांना बाहेर काढले. काय आहे प्रकरण? पंचवटीत १० जून २०१८ रोजी झालेल्या एका सभेत मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी यांनी माझ्या शेतातील आंबे खाल्याने मुलेच जन्माला येतात, असे विधान केले होते. याबाबत 'लेक लाडकी अभियान'तर्फे आरोग्य विभागाच्या पुणे येथील अतिरिक्त संचालकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, हे प्रकरण महापालिकेकडे आले. महापालिकेच्या एका समितीने केलेल्या चौकशीनुसार कोर्टात खटला दाखल करण्यात आला. या खटल्यास भिडे यांनी हरकत घेतली. मात्र, दोन दिवसांपूर्वी जिल्हा कोर्टाने ही हरकत फेटाळली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट