Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बाबरी मशिद पतनाचा मालेगावी निषेध

$
0
0

विविध संघटनांकडून मोर्चा, सामूहिक अजान

म. टा. वृतसेवा, मालेगाव

अयोध्येतील बाबरी मशिद पतनाला २६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शहरात विविध संघटनांच्यावतीने मोर्चा काढून व नमाज अदा करीत या घटनेचा निषेध करण्यात आला. येथील माजी आमदार मौलाना मुफ्ती व नगरसेवक बुलंद एकबाल यांच्या नेतृत्वाखालील बाबरी मशिद बचाव कमिटीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

मुशावरत चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. पेरीचौक मार्गे हा मोर्चा किदवाई रोडवरील शहिदों की यादगार येथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले. मोर्चाचे याच ठिकाणी सभेत रुपांतर झाले. माजी आमदार मौलाना मुफ्ती यांनी या घटनेचा निषेध करीत काही जातीयवादी मंडळी राममंदिर बांधण्याचा घाट घालत असल्याचा आरोप केला. यावेळी रस्त्यावरच अजान देण्यात आली. त्यानंतर प्रांताधिकारी मोरे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मुस्तकिन डिग्नीटी, माजी स्थायी समिती सभापती एजाज बेग उपस्थित होते.

आमदार आसिफ शेख यांच्या तहफुज मिल्लत अ‍ॅक्शन कमिटी व इन्सानियत बचाव संघर्ष समितीच्यावतीने दगडू ऑईल मिल परिसरात सामूहिक अजान देण्यात आली. यावेळी बाबरी मशिद पुन्हा उभारण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. महापौर शेख रशीद शेख शफी, साबीर गौहर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मालेगाव आवामी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन उपअधिक्षक, सात पोलिस निरीक्षक, २२ उपनिरीक्षक, ३१० शिपाई , ३५० गृहरक्षक दलाचे जवान तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कुत्ता गोळी’चे कनेक्शन हिमाचलमध्ये!

$
0
0

पुरवठा करणाऱ्या सूत्रधाराला होणार लवकरच अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालेगावमध्ये नशेसाठी वापरत असलेल्या कुत्ता गोळीचे कनेक्शन थेट हिमाचलमध्ये आहे. गोळीचा बेकायदेशीर पुरवठा करणाऱ्या सूत्रधाराची माहिती मिळाली असून त्याला लवकरच अटक होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) सहाय्यक आयुक्त प्रवीम मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात मालेगावमध्ये अगोदर ६ गुन्हे दाखल करून ८ जणांना अटक केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मालेगावमध्ये पोलिस प्रशासन व अन्न औषध प्रशासनाने संयुक्त मोहीम आखली असून याची कारवाई आता अंतिम टप्प्यात आहे. पंधरा दिवसानंतर ही मोहीम पूर्ण होईल. त्यानंतर ही गोळी मालेगावमध्ये मिळणार नसल्याचेही मुंदडा यांनी सांगितले. झोपेसाठी वापरण्यात येणारी अल्प्रालोझम या गोळीचे उत्पादन कायदेशीर असले तरी तीचा पुरवठा हा बेकायदेशीरपणे होत असल्याचे कारवाईत उघड झाले आहे. मालेगावमध्ये अधिकृत औषध दुकानात ही गोळी फक्त वैद्यकीय उपचारासाठी दिली जाते. पण, बेकायदेशीररित्या ही गोळी मोठ्या प्रमाणात विकली जाते.

दुसऱ्या राज्यातून पुरवठा

मध्य प्रदेश, राजस्थान व गुजराथमधून या गोळीचा पुरवठा केला जातो. पण, गोळीचे उत्पादन हे हिमाचलमध्ये होत असल्याचे आढळले. त्यानंतर येथील प्रशासन व कारखान्याला सुद्धा पत्र पाठवून त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. तूर्त मालेगावमध्ये अधिकृतपणे औषधी वापरासाठी १० ते १५ मेडिकल स्टोअरर्समधून ही गोळी विकली जात आहे.

भद्रकालीमध्ये तपास

मालेगावप्रमाणेच नाशिकमध्ये या गोळीचा वापर नशेसाठी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या दिशेने येथेही तपास केला. पण, त्यातून अद्याप काहीच हाती लागले नाही. या गोळीचा नशेसाठी वापर होत असेल तर त्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.

लोगो : मटा इम्पॅक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थ्री पेजसाठी ठिय्या आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. शेतीपिकांसाठी पाणी आहे, तर वीज नाही. वीज आहे तर पाणी नाही अशी भयावह स्थिती असताना शेतीसिंचनासाठी वीजवितरण कंपनीने दिवसा थ्री पेज वीजपुरवठा करावा. तसेच रात्री शेतशिवारात सिंगल पेज वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.

गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता अनिल उईके यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

यावेळी उपअभियंता अनिल उईके यांना निवेदन देण्यात आले. बागलाण तालुका शासनाने दुष्काळी तालुका जाहीर केलेला आहे. शेती सिंचनासाठी अत्यल्प पाणी उपलब्ध असून, सदर पाण्यावर शेतकऱ्यांना शेती सिंचनाबरोबर गुरांसाठी पाण्याचा प्रश्‍न सोडवायचा आहे. त्यामुळे सध्या सिंचनासाठी थ्री पेज पुरवठा दिवसा मिळवा अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात राजेंद सोनवणे, भारत खैरनार, केशव मांडवडे, अमोल बच्छाव, सतीश शेवाळे नितीन सोनवणे, काकाजी सोनवणे, जिभाऊ सोनवणे, सुभाष पाटील, धर्मेद्र सोनवणे, बापू मोरे, मनोज निकम, ताराचंद देवरे, वैभव सोनवणे, लोटन जाधव, मनोज निकम, अरूण सोनवणे, बाळासाहेब मोरे आदी उपस्थित हेाते.

000

बिबट्याचा मृत्यू

सटाणा : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील डाळिंब बागेत गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास एक बिबट्या मृताअवस्थेत आढळला. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी दौलत कडू वाघ शेतात हा बिबट्या आढळला. वाघ हे दुपारी तीनच्या सुमारास डाळिंबाच्या बागेत फेरफटका मारत असताना त्यांना उग्र वास येत होता. त्यानंतर त्यांनी परिसरात पाहणी केल्यानंतर बांधाजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. जायखेडा पोलिसांच्या मदतीने ताहराबाद परिक्षेत्राचे अधिकारी नीलेश कांबळे यांनी पंचनामा केला. बिबट्याचा तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगा, जगायचं तरी कसं?

$
0
0

केंद्राच्या पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा; मागण्यांचा भडिमार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पावसाच्या आशेवर पेरणी केली मात्र आता सगळं जळून खाक झालं...दुबार पेरणीनंतर देखील हाती काहीच लागले नाही...जनावरांना चारा नाही की पिण्यासाठी पाणी नाही...कर्जाचा डोंगर मात्र वाढतोच आहे. अशात जगायचं तरी कसं मॅडम तुम्हीच सांगा? दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे हे शब्द आहेत तालुक्यातील मेहुणे येथील शेतकरी शिवाजी देवरे यांचे. केंद्रीय पथकाच्या दुष्काळ पाहणी दौरा गुरुवारी झाला. त्यावेळी हतबल शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांची परिस्थिती आणि ओकंबोकं शिवार पाहून पथकालाही काही सुचेनासं झालं होतं.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने तालुक्यातील मेहुणे, वऱ्हाणे व जळगाव (नि) या परिसरातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. पथकात श्रीमती छवी झा, शालिनी सक्सेना, आर. डी. देशपांडे, ए. के. तिवारी आदींसह विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, तहसीलदार ज्योती देवरे, कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, बांधकाम सभापती मनीषा पवार, विनोद शेलार, मेहुणे येथील उपसरपंच निवृत्ती देवरे उपस्थित होते.

मेहुणे गावातील शेतकरी शिवाजी देवरे यांच्या भुईमुग शेताची पाहणी करण्यासाठी पथक दाखल झाले त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. ६ लाखांचे कर्ज डोक्यावर असून दुष्काळी परिस्थितीने ते फेडायचे कसे? अशी विवंचना त्यांनी बोलून दाखवली. मेहुणे परिसरात अत्यल्प पावसामुळे शेतकरी बेजार झालेला आहे. मात्र बँक कर्जवसुलीसाठी ताकदा लावते तर वीज कंपनी सक्तीची वसुली करतात अशी तक्रार देखील शेतकऱ्यांनी पथकासमोर मांडली. वऱ्हाणे शिवारातील बाजीराव महादू पवार यांचा डाळिंबाच्या बागेची पथकाने पाहणी केली. पाण्याअभावी बाग करपली असून, आता साडेतीन लाखाचे कर्ज फेडायचे कसे, अशी विवंचना त्यांनी बोलून दाखवली.

तालुक्यातील जळगाव (नि) शिवारातील भिका काशिनाथ बालनोर यांच्या शेतातील ज्वारी, बाजरी पिकाची पाहणी करताना शेतकऱ्यांनी ४० वर्षांतील हा भीषण दुष्काळ असल्याची बाब पथकाच्या लक्षात आणून दिली. सरकारने दिलेली कर्जमाफी तुटपुंजी आहे. सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पाण्याचे टँकर द्यावे, चारा छावण्या उभाराव्यात, दुष्काळी भागातील सर्व शिधापात्रिकाधारकांना रेशन द्यावे, पिकविम्याचे पैसे मिळावेत अशा मागण्यांचा भडीमार यावेळी केंद्रीय पथकावर परिसरातील शेतकऱ्यांनी केला.

पथक आले अन् पाणी मिळाले

मेहुणे गावात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गुरुवारी केंद्रीय पथकाचा दौरा दरम्यान गावात पाणीचा टँकर आल्याने या परिसरातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव समोर आले.

विमा कसा काढू?

केंद्रीय पथकातील महिला सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना काही प्रश्न विचारले. 'क्या आपने फसल बीमा निकाला है? यावर उत्पन्न नसल्याने पैसेच नाही तर विमा कसा काढू? असा प्रतिप्रश्न केला तसेच आजवर काढलेल्या विम्याचा लाभ मिळालाच नसल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. बाटलीबंद पाण्याला तरी किंमत आहे पण आमच्या दुधाला भाव नाही अशी तुलना करीत शेतकऱ्यांनी पथकाला दुष्काळाची दाहकता लक्षात आणून दिली.

२५ मिनिटांत दिसला दुष्काळ

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

चांदवड तालुक्यातील गावांमध्ये पडलेल्या दुष्काळाची पाहणी केंद्रीय समितीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळच्या पाहणी केली. तालुक्यातील हर्नूल, हर्सूल येथील शेतकऱ्यांचे कांदा, टोमॅटो पिकांच्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. या पथकाने अवघ्या २५ मिनिटांत दुष्काळाची पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सायंकाळी ५.४५ च्या सुमारास तालुक्यातील हर्सूल येथे समितीने नामदेव रौंदळ यांच्या कांदा व टोमटो पिकांची पाहणी केली. तेथून १५ मिनिटात काढता पाय घेत लगेचच पाच मिनिटाच्या अंतरावर मनमाड-चांदवड रस्त्याला लागून असलेल्या वैजयंती भोसले यांच्या कांदा शेतीची व चिकूच्या बागेची पाहणी अवघ्या १० मिनिटांत आटोपली. त्यानंतर चांदवड शासकीय विश्रामगृहावर साधारणत ३० मिनिटांच्या विश्रांतीनंतर पथक नाशिककडे रवाना झाले.

यावेळी पथकातील अधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी भीमराव दराडे, सिद्धार्थ भंडारे, प्रवीण महाजन, वासंती माळी, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण माणकर, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे आदींसह महसूल, कृषी, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दराडे बंधू लाटतायभुजबळांच्या कामाचे श्रेय

$
0
0

राष्ट्रवादीचे मढवई यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, येवला

आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळेच हिवाळी अधिवेशनातील २१ डिसेंबर रोजीच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये येवला मतदार संघातील सहा रस्त्यांचे मजबुतीकरण, रुंदीकरण डांबरीकरण तसेच विविध पुलांच्या बांधकामासाठी एकूण १० कोटी ४० लाखांच्या निधीची तरतूद झाली. मात्र, उशिरा जाग आलेल्या आमदारद्वयी दराडे बंधूकडून रस्त्यांची कामे आपणच मंजूर केल्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई यांनी केला आहे.

नरेंद्र दराडे यांनी मतदार संघातील ५ कोटींचे रस्ते मंजूर केल्याचे संदेश सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले जात आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मढवई यांनी केला आहे. येवला मतदारसंघातील सहा रस्त्यांचे मजबुतीकरण, रुंदीकरणासाठी आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे. मात्र दराडे बंधूंनी या कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये, असे मढवई यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्प हा २१ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला व त्याबाबत दराडे बंधूना ५ डिसेंबर रोजी उशिरा जाग येते यातच सर्वकाही दडले आहे. मतदारसंघातील जनता ही दुधखुळी नाही, अशी टीका देखील मढवई यांनी केली आहे.

चार वर्षांपूर्वी झालेल्या राज्यातील सत्तांतरानंतर तालुक्यातील मंजूर केलेल्या विविध विकासकामांबाबत पूर्वीचे अन् आताचे सत्ताधाऱ्यांमध्ये अनेकदा श्रेयवादाचे चित्र समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील राजकीय नेतेमंडळींमध्ये शासनाने मंजूर केलेल्या विविध विकास कामांवरून कलगीतुरा रंगला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून केंद्रीय समितीचा काढता पाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. या वेळी त्वरित आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांनी करूनही समितीने कोणतेही ठोस आश्वासन न देता काढता पाय घेतल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गुरुवारी (दि. ६) दुसऱ्या दिवशी समितीने अमळनेर तालुक्यातील जुनोने व पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण परिसरात पाहणी केली. या ठिकाणी चाऱ्याअभावी गुरे विकल्याची माहिती शेतकऱ्यांनी समितीला दिली.

या समितीमध्ये केंद्रीय जलआयोगाचे संचालक आर. डी. देशपांडे, सहसचिव छवी छा, डिपार्टमेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए. के. तिवारी, एमएनसीएफसीच्या सहायक संचालिका डॉ. शालिनी सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर आदी उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी जुनोने येथील शेतकरी रमेश अमृत पाटील व निंबा नथ्थू धनगर यांच्या शेतात पाहणी करून माहिती जाणून घेतली. चारा उपलब्ध नसल्याने बाहेरून चारा मागवावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जेथे चारा व पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी जनावरांची सोय करावी लागत आहे. काही जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. सुमारे ५९९ जनावरे आतापर्यंत विकली गेली आहेत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

अजूनही ९० गावांना टँकर सुरू
गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बिलखेडा (ता. धरणगाव) येथील विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे. जोपर्यंत विहिरीत पाणीसाठा उपलब्ध आहे, तोपर्यंतच गावाची तहान भागणार आहे. त्यानंतर पुन्हा पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार असून, टँकरने पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासणार आहे. यासाठी वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे. भर पावसाळ्यात पाच ते सात गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. सद्यस्थितीत ८८ ते ९० गावे ही टँकरने तहान भागवत आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी समितीला दिली.

या समस्या केव्हा सोडविणार?
दुष्काळामुळे रोजगार नसल्याने सुमारे २२ कुटुंब परराज्यात स्थलांतरित झाले आहेत. सुमारे दीडशे ग्रामस्थ कामासाठी गुजरात राज्यात गेले असल्याची माहितीही समितीला ग्रामस्थांनी दिली. पंधरा ते वीस कुटुंब ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यात मजुरीसाठी रवाना झाले आहेत. गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजनांची मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली. समितीने बुधवारी (दि. ५) जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत या गावातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीचा सकारात्मक अहवाल केंद्राला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या या समस्या केव्हा सोडविणार, याकडे बळीराजा नजरा लावून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे भयमुक्त करणार

$
0
0

महापालिका प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेमध्ये निश्चित परिवर्तन घडवून आणू. धुळे शहराला भयमुक्त करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गुरुवारी सायंकाळी धुळे महापालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्यात आले होते. या वेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

धुळे शहराच्या विकासासाठी सत्ता आमच्या हाती असणे गरजेचे आहे. आता सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. धुळे शहराचा विकास झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सत्ता आल्यानंतर लगेचच शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देईल आणि विकासकामांना सुरुवात केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी धुळेकरांना दिले.

आमच्या पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी टक्केवारीची भाषा केली तर त्याला तत्काळ घरी पाठवून देऊ, असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी उमेदवारांना दिला. विकासासाठी पैशांची कमतरता भासू देणार नाही, धुळे शहरात आता कायद्याची पद्धत वापरावी लागेल त्याशिवाय बदल घडणार नाही. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले असून, आता बेरोजगारीचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचेही ते म्हणाले. आता कोणालाही काही बोलू द्या, टीका करू द्या, पण महापालिकेमध्ये सत्ता भाजपची येणार आणि धुळे शहर एका वर्षात बदलून टाकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, आमदार अनिल गोटे यांच्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलणे टाळले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार ए. टी. पाटील, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, शिरीष चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, धुळे महापालिकेची निवडणूक धुळ्याचे भविष्य ठरवणारी असून खूप महत्त्व निवडणुकीला आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त विकास धुळे महानगरपालिके खुंटला असल्याचे ते म्हणाले. आता बदल घडवून आणायचा असून, येत्या वर्षभरात धुळे शहरात बदल घडवून आणू त्यासाठी भाजपच्या हाती एक हाती सत्ता देण्याचे ते म्हणाले. जळगावचे उदाहरण देत धुळ्यातही लगेच कामांना सुरुवात करू, असेही मंत्री महाजन म्हणाले.

काँग्रेस आघाडीची भाजपवर टीका
भाजप सत्तेचा दुरूपयोग करीत असून, धुळे महापालिकेची निवडणूक जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने सत्याच्या मागे जावे. ज्यांनी आजपर्यंत काम केले, त्यांच्याच पाठीशी उभे रहावे, असे आवाहन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी धुळेकर जनतेला उद्देशून केले. महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-मित्र पक्ष आघाडीचा संयुक्त जाहिरनामा गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील, आमदार अमरिश पटेल, जि. प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार कुणाल पाटील, आमदार डी. एस. अहिरे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष शाम सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, अनिल मुंदडा उपस्थित होते. या वेळी हर्षवर्धन पाटील, नसीम खान यांनी भाजपच्या कार्य पद्धतीवर जोरदार टीका केली. मंत्री गिरीश महाजन यांनी वेगवेगवळ्या निवडणुकांमध्ये लोकांना मोठमोठी आश्‍वासने देऊन धनशक्तीच्या जोरावर भाजपला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांची दिशाभूल करणाऱ्या भाजपवाल्यांना धुळ्यातील जनता नक्कीच धडा शिकवेल, अशा स्वरुपाचा विश्‍वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबा प्रकरणी भिडे गुरुजींना अखेर जामीन

$
0
0

नाशिक:

शेतातील आंबे खाल्ल्याने मुलं होतात, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

नाशिक येथील एका जाहीर सभेत संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास मुलं होतात, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हे आंबे खाल्ल्याने आतापर्यंत १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी भिडे गुरुजींच्या विरोधात कोर्टात सुनावणी सुरू होती. मात्र चारही सुनावणीला ते उपस्थित राहिले नव्हते. आज भिडे गुरुजींनी कोर्टात उपस्थित राहून त्यांची बाजू मांडली असता कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

भिडे यांची नाशिक येथे सभा झाली होती. या सभेत त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला होता. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही गोष्ट कोणालाच सांगितले नाही. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाव घसरल्याने शेतकऱ्याने कांदे रस्त्यावर फेकले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या महिनाभरात सातत्याने ढासळणाऱ्या कांदा बाजारभावामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या संतप्त भावनेचा पारा वरवर सरकू लागला आहे. एकरी अगदी मोठा खर्च करतानाच कष्टाने पिकविलेल्या कांदयास सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक होत असतानाच, उन्हाळ कांदयास प्रतिक्विंटल अवघा १८२ रुपये भाव मिळाल्याने एका शेतकऱ्याने बाजारसमितीत विक्रीसाठी आणलेला आपला सात क्विंटल कांदा निराशेपोटी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच फेकून दिल्याची घटना शुक्रवारी येवल्यात घडली.

यंदाच्या हंगामात ‘कांदा’बाजारभावाने उत्पादक शेतकऱ्यांचा अक्षरशः वांधा केल्याने शेतकरी मोठया अर्थसंकटात सापडला गेला आहे. गेल्या काही दिवसात कांदा बाजारभावाचा आलेख अगदी खालीखाली येत असल्याने तर शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटू लागला आहे. येवला तालुक्यातील पारेगाव येथील वैभव ज्ञानेश्वर खिल्लारे या तरुण शेतकऱ्याने कांद्यास अगदी कवडीमोल बाजार मिळाल्याने निराशेपोटी आपला कांदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच फेकून दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. वैभव खिल्लारे यांनी एका ट्रॅक्टर ट्रॉलीमधून जवळपास ६ ते ७ क्विंटल उन्हाळ कांदा येवला बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. कांदा लिलावात त्यांच्या कांदयास अवघा १८२ रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाल्याने खिल्लारे यांचा अपेक्षाभंग झाला. नाराज झालेल्या खिल्लारे यांनी आपला हा कांदा संबंधित व्यापाऱ्याच्या खळयावर न नेता, तो बाजार समितीच्या गेटबाहेरच खाली करून देत रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीनिशी घरचा रस्ता धरणे पसंत केले. खिल्लारे यांनी बाजार समिती बाहेरील मनमाड-नगर राज्य महामार्गावरच ओतून दिलेल्या या कांदयावरून पुढे असंख्य वाहने भरधाव वेगाने गेली आणि कांदयाचा अक्षरशः चुराडा झाला.

‘उन्हाळ कांदा उत्पादनापोटी एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च आला होता. आज ना उदया चांगला बाजारभाव मिळेल या आशेने अगदी जीवापाड कांदा चाळीत कांदयाची साठवण केली होती. मात्र, आज विक्रीसाठी आणलेल्या कांदयास १८२ रुपये असा कवडीमोल भाव मिळाला होता. हा कांदा विकून अवघे साडेबाराशे-तेराशे रुपये हाती पडले असते. त्यातही कांदा बाजार समितीत आणण्यासाठी ट्रॅक्टरला पाचशे रुपयांचे डिझेल टाकावे लागले होते. त्यामुळेच कांदा फेकून देणेच पसंत केले.
- वैभव खिल्लारे, शेतकरी

कांदा बाजारभावाचा वांधा, शेतकऱ्यांच्या गळयात संकटाचा फंदा

शेतशिवारात राबराब राबताना श्रम अन् घामाचे दोन अधिकचे दाम हाती टेकवणारे नगदी पिक अशी ओळख समजल्या जाणाऱ्या ‘कांदा’ पिकाच्या बाजारभावाने यंदा उत्पादक शेतकऱ्यांचा चांगलाच ‘वांधा’ केला आहे. नव्हे तर, गेल्या अनेक महिन्यात महत्वपूर्ण भरवशाच्या ‘उन्हाळ’ कांदयाने कवडीमोल बाजारभावाच्या रूपाने शेतकऱ्यांच्या हाती तुरी दिल्यावर त्यानंतर बाजारात आलेल्या ‘लाल’कांदा बाजारभावाने देखील उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील गेल्या काही महिन्यात कांदा बाजारभावात कमालीची घसरण होताना शेतकऱ्यांसमोर ‘अर्थसंकट’ उभं ठाकलं आहे. येवला बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात शुक्रवारी (दि.७) उन्हाळसह लाल कांदयाची जवळपास साडेपाचशे ट्रॅक्टरद्वारे आवक झाली होती. येथे उन्हाळ कांदयास किमान १४२ ते कमाल ५९९ असा बाजारभाव मिळाला असला, तरी एकूण २७५ रुपये हि सरासरी ढासळलेल्या कांदा बाजारभावाचे एकंदरीत चित्र दर्शवून गेली. नव्याने आलेल्या लाल (पोळ) कांदयास शुक्रवारी येवला बाजार समितीत प्रतिक्विंटल किमान ११४ ते ८५१ रुपये (सरासरी ७००) असा बाजारभाव मिळाला असला, तरी देखील हा बाजारभाव अगोदरच मोठया आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सावरणारा नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुत्रवियोगाने पित्याचेही निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

घरातील कर्त्या मुलाने शेतीत काही पिकत नाही आणि शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडावे अशा विवंचनेत असल्याने मृत्यूला कवटाळले. त्याच्या उत्तर कार्यानिमित्त तेराव्याच्या दिवशीच पुत्रवियोगाने वडिलांचेही निधन झाल्याची हृदयदावक घटना निफाड शहरात घडली.

विठ्ठल लहानू जाधव या द्राक्षउत्पादक शेतकऱ्याने ११ नोव्हेंबर रोजी विषारी औषध सेवन केले होते. निफाड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचे रविवार २५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंब दुखवियोगात असतानाच दशक्रिया विधी पूर्ण झाला. विठ्ठल यांचा शुक्रवारी तेराव्याचा विधी होता. मात्र, त्याच दिवशी रात्री एक वाजेच्या सुमारास विठ्ठल यांचे वडील लहानू जाधव यांचे निधन झाले आणि जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. अत्यंत शोकाकुल वातावरणात लहानु जाधव यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. लहानु जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन सुना, दोन मुली असा परिवार आहे.

लहानू जाधव यांचे मोठे पुत्र विठ्ठल यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यात आपल्यावर २७ लाख रुपयांचे कर्ज असून शेती करणे परवडत नाही. कर्ज फेडावे तरी कसे असा प्रश्न असल्याने मी जीवनाला हरलो आहे. म्हणून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कुटुंबीयांना मित्र परिवाराने आधार द्यावा, अशी विनंतीही विठ्ठल यांनी चिठ्ठीतून केली होती. विठ्ठल यांची सामाईक ५९ आर जमीन आहे. त्यांनी द्राक्षबाग लावलेली होती. त्यांच्यावर निफाड नागरी सहकारी पतसंस्था आणि निफाड विकास कार्यकारी सोसायटी यांचे कर्ज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

$
0
0

\Bसेवानिवृत्तांचा स्नेहमेळावा उत्साहात\B

नाशिक : भारत प्रतिभूति मुद्रणालयांतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा प्रथम स्नेहमेळावा नाशिकरोड येथे उत्साहात पार पडला. विविध विषयांवर चर्चा करण्याबरोबरच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या. त्यानंतर दैठणकर, अग्निहोत्री, सौंदाणकर, सदावर्ते यांनी गीत गायन करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी रवींद्र पंचाक्षरी, अरुण देशमुख, श्रीधर जोशी, सुभाष सदावर्ते, विजय गंगवाणी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुपर ब्रेन्स’चे उद्या बक्षिस वितरण

$
0
0

'सुपर ब्रेन्स'चे उद्या बक्षिस वितरण

आयआयटी परीक्षेविषयीही मिळणार मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'सुपर ब्रेन्स २०१८' ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेचा निकाल व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची माहिती उद्या (९ डिसेंबर) गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत बक्षिस वितरण होणार आहे. त्याबरोबर, आयआयटी प्रवेश परीक्षेविषयी मार्गदर्शनदेखील केले जाणार आहे.

भविष्यात भारताला चांगले व कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने टाइम्स ग्रुपतर्फे 'सुपर ब्रेन्स' परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. आयआयटीयन्स पेस हे या स्पर्धा, परीक्षेचे नॉलेज पार्टनर होते. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या परीक्षेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्याचे आयआयटीयन्स तयार करण्याच्या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात तर दुसरा टप्पा २ डिसेंबर रोजी पार पडला. जे विद्यार्थी सुपर ब्रेन्स परीक्षेच्या पहिल्या व दुसऱ्या राउंडमध्ये सहभागी झाले होते, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसोबत उद्या होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणे आवश्यक आहे. बक्षिस वितरणानंतर आयआयटीयन्स पेसचे सुमितेंद्र श्रीवास्तव आणि सुनील कुमार हे दोघे विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याविषयी सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

- -

बक्षिसांची लयलूट

या परीक्षेत विजेत्या होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक इयत्तेच्या गटातून तीन-तीन बंपर बक्षिसे दिली जाणार आहेत. दहावीच्या गटातून पहिले बक्षीस ब्रॅण्डेड लॅपटॉप, दुसरे बक्षीस ब्रॅण्डेड टॅब, तर तिसरे बक्षीस अॅमेझॉन किंडल हे असणार आहे. तर आठवी व नववीच्या गटासाठी प्रत्येकी पहिले बक्षीस अकरा हजार रुपये रोख, दुसरे बक्षीस आठ हजार रुपये रोख, तिसरे बक्षीस पाच हजार रुपये रोख मिळणार आहेत. तसेच पहिल्या १० उत्तम गुण प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना गिफ्ट व्हाऊचर्स मिळतील. तसेच टॉप १०० स्पर्धकांना आकर्षक स्कॉलरशिप मिळणार आहेत.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजी खुलासा

$
0
0

... हे तर अंधाऱ्या खोलीत

काळी मांजर शोधण्यासारखे!

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शुक्रवारी (दि. ७) रोजी नाशिक न्यायालयात हजर राहवे लागले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी पंचवटीत काळाराम मंदिर येथे प्रभूश्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी "माझ्या विरोधातील आरोप म्हणजे अंधार असलेल्या खोलीत काळी मांजर शोधण्यासारखे आहे," असे वक्तव्य केले.

न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर भिडे गुरुजी पंचवटीत दाखल झाले. काळाराम मंदिरात गाभाऱ्यात श्रीरामाचे दर्शन त्यांनी घेतले. महंत सुधीरदास यांनी त्यांना काळाराम मंदिराविषयी माहिती दिली. काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर आदी या वेळी उपस्थित होते. काळाराम संस्थानतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ तसेच काळारामाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. ते मंदिरात आले तेव्हा मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाल शौर्य’चे पुन्हा पलायन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, रावेर

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल याने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील श्रीराम गोकूळ आश्रमातून पलायन केले आहे. मध्य प्रदेश पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. नीलेश याआधीही आपल्या भावासोबत घर सोडून गेला होता.

मुक्ताईनगर कोथळी येथील संत मुक्ताईनगर मंदिरावर बॅक वॉटरमध्ये येथे ३० ऑगस्ट २०१५ रोजी पाण्यात बुडणाऱ्या ११ वर्षीय मुलाला वाचविल्याने बाल शौर्य पुरस्कार देवून नीलेश भिल याचा केंद्र सरकारतर्फे गौरविण्यात आले होते. मात्र त्यानंतर २०१७ मध्ये नीलेश त्याच्या लहान भावाला घेवून घर सोडून निघून गेला होता. आधी त्याचा भाऊ सापडला व नीलेश हा नऊ महिन्यांनी गोरखपूर येथे सापडला होता. पोलिसांनी दोघांना आईच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्यास शैक्षणिक पुनर्वसनासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील गायत्री ट्रस्ट संचलित श्रीराम गोकूळ आश्रमात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणीही त्याने चौकीदाराची नजर चुकवून मंगळवारी पहाटे आश्रमातून पळ काढला. त्याच्या आईने याबाबत ब·ऱ्हाणपूर पोलिसात तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफडीए’ अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा निफाड

पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील वणी पाचोरे येथील हॉटेल व्यावसायिकाकडून अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी विजय जयसिंग पाचपुते यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे.

पिंपळगाव येथील वणी पाचोरे फाट्याजवळील हॉटेलला अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल परवाना निलंबनाबाबत नोटीस काढण्यात आली होती. यावर दिलेल्या उत्तरावर या विभागाने याबाबत सकारात्मक अहवाल द्यावा यासाठी अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी वर्ग २ यांनी २० हजार लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत हॉटेलच्या मालकाने 'एसीबी'कडे तक्रार केली. त्यानुसार 'एसीबी'ने सापळा लावला. 'एफडीए'चे अधिकारी विजय जयसिंग पाचपुते यांना हॉटेल मालकाकडून नाशिक येथे महामार्ग बसस्थानक जवळ शुक्रवारी १५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाकडून जिल्हास्तरीय युवक महोत्सव जानेवारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने जानेवारी महिन्यात जिल्हास्तरीय युवक महोत्सव होणार आहे. युवक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या महोत्सवाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या.

जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयाची संख्या लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यात दोन विभाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये जळगाव विभाग आणि एरंडोल विभाग अशा दोन विभागांचा समावेश आहे. जळगाव विभागात, जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांसह विद्यापीठ परिसराचा समावेश राहील. तर एरंडोल विभागात एरंडोल, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव आणि भडगाव हे तालुके असतील. एरंडोल विभागाचा महोत्सव ५ जानेवारी, २०१९ रोजी बी.पी.कला, एम.एम.ए. विज्ञान व के.के.सी.वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव येथे तर ७ जानेवारी रोजी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, शिरसोली रोड, जळगाव येथे जळगाव विभागाचा युवक महोत्सव होणार आहे.

९ जानेवारी रोजी कुसुंबा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात धुळे जिल्ह्याचा आणि ११ जानेवारी रोजी तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे नंदूरबार जिल्ह्याचा युवक महोत्सव होईल. या जिल्हास्तरीय युवक महोत्सवातील कला प्रकारनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके प्राप्त महाविद्यालयांचा विद्यापीठस्तरीय युवक महोत्सव १७ ते १९ जानेवारी २०१९ रोजी विद्यापीठात होणार आहे. या वर्षीपासून ललित कला प्रकारात मेहंदी या उपप्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. युवक महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कार्य व काव्य यांची माहिती होण्यासाठी पोस्टर्स व विविध प्रचार साधनांद्वारे जनजागृती केली जावी असे यावेळी ठरले.

बैठकीस डॉ. प्रिती अगरवाल, प्राचार्य एन. टी. थोरात, प्रभारी प्राचार्य मिलींद बिलदीकर, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. ए. बी. चौधरी, अमोल मराठे, मनिषा चौधरी, प्रा. विलास चव्हाण, डॉ. राम पेटारे, डॉ. पंकजकुमार नन्नवरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कम्पाऊंडिंग पॉलिसीतील इमारतीही ठरल्या अनधिकृत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर विकास नियंत्रण नियमात सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावरील इमारतींचा भोगवटा प्रमाणपत्र तांत्रिक कारणाने रखडले असताना या सर्व रस्त्यांवरील इमारती विविध कर विभागाने अनधिकृत ठरवत त्यांना तीनपट दंड आकारणीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. कम्पाऊंडिंग पॉलिसीमध्ये सदर इमारतींचे प्रकरणे नियमीतीकरणासाठी दाखल असतानाच, विविध कर विभागाने नोटिसा पाठविल्याने मिळकतधारक हवालदिल झाले आहेत, तर महापालिकेच्या या भूमिकेमुळे व्यावसायिकही गोंधळले असून, पालिकेचे नेमके धोरण काय असा सवाल उपस्थित केला आहे.

महापालिकेने मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ६२ हजार मिळकतींना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा पाठविल्या आहेत. परंतु, या कारवाईत आता कपाट प्रकरणासोबतच डीसीपीआर बदलांमुळे बंधन आलेल्या सहा व साडेसात मीटरवरील इमारतीही आल्या आहेत. नऊ मीटर रुंदीखालील रस्त्यांवर शासनाने टीडीआर अनुज्ञेय नसल्याचे परिपत्रक काढून या इमारतधारकांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील दोन्ही बाजूला भूसंपादन करून नऊ मीटर रुंदीचा एफएसआय देण्याचा पर्याय समोर आला आला. शासनाने जाहीर केलेल्या कंपाऊंडिंग पॉलिसीअंतर्गत व्यावसायिकांनी प्रकरणे दाखल केल्यानंतर कपाटांचा प्रश्‍न सुटेल, अशी अपेक्षा आहे. सहा व साडेसात मीटर रस्त्यावरील इमारतींचे प्रकरणे नगररचनात प्रलंबित असतानाच कर विभागाने मात्र त्या मिळकती अनधिकृत ठरवून तीनपटीने कर आकारणीच्या नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाखोंची बिले पाहून मिळकतधारक भयग्रस्त झाले असून, त्यांनी थेट बिल्डरांकडे तगादा लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मिळकतधारक आणि बिल्डरांमध्येच वाद सुरू झाले आहेत.

निलंबन करा : सैय्यद

अधिक दराने कर विभागाने पाठविलेल्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या विरोधात राजकीय पक्षही आक्रमक झाले आहे. स्थायी समितीचे सदस्य मुशीर सैय्यद यांनी देयके व लाखोंच्या नोटिसा पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. वाढीव बिलांमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी सैय्यद यांनी केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायीवर सादर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा तालुक्यात आज वीज नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

महापारेषणाच्या अत्यंत तातडीच्या दुरुस्ती कामामुळे शनिवारी (दि. ८) देवळा तालुका व परिसरात सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. विजेअभावी होणाऱ्या गैरसोयीबद्दल परिसरातील वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महापारेषणकडून भेंडी येथील २२० केव्ही अतीउच्चदाब उपकेंद्रात अत्यंत महत्त्वाचे व तातडीचे आपत्कालीन देखभाल दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कळवण विभागांतर्गत भिलवाड, भूउर, बेज, खामखेडा, निवाने आणि खर्डा या ३३/११ केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ११ केव्ही वाहिन्यांवरील वीजपुरवठा सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाकाराचा जन्म वेदनेतूनच होतो

$
0
0

नाट्यसंमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कलाकाराचे कलाजीवन उगाचच साकारले जात नाही तर सर्व कला समृद्ध होत गेल्यानंतर त्याचा परिपाक म्हणून तो कलाकाराची भूमिका साकारतो. कलाकाराचा जन्म वेदनेतूनच होतो, असे प्रतिपादन मराठी नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित वि. वा. शिरवाडकर लेखन, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी व बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराचे वितरण महाकवी कालिदास कलामंदिरात शुक्रवारी झाले. याप्रसंगी शिलेदार बोलत होत्या. यावेळी मंचावर नाट्य परिषद अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, मध्यवर्ती परिषेदचे दीपक करंजीकर, नियामक मंडळाचे सदस्य सचिन शिंदे, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, तसेच पुरस्कारमूर्ती ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आमदार हेमंत टकले यांसह कलाकारांची उपस्थिती होती.

दादासाहेब फाळके आणि वसंत शिंदे यांची आठवण निघाली असल्याने खूप छान वाटत आहे. भाषणबाजी करण्यापेक्षा त्यांचा एक किस्सा सांगणार असून वसंत शिंदे जेव्हा दादासाहेबांकडे चित्रपटात काम करण्यासाठी जात तेव्हा त्यांना स्वत: दादासाहेब अभिनय शिकवत असत. एकदा गणपती स्तवनाला नृत्य करायचे काम त्यांच्याकडे असताना ते विचित्र अंगविक्षेप करायला लागले; मात्र 'वशा, छान नाचतोय, नाच लेका' असे सांगत दादासाहेब प्रोत्साहन देत राहिले. मात्र, वसंत शिंदे बेशुद्ध पडल्यावर सर्वांच्या लक्षात आले, की गणपतीच्या मुखवट्यामध्ये विंचू होता व तो त्यांना डंख मारत होता. म्हणून कलाकाराचा जन्म वेदनेतून होतो, असे शिलेदार यांनी सांगितले.

प्रशांत दळवी यांना वि. वा. शिरवाडकर नाट्यलेखन तर मोहन जोशी यांना प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशांत दळवी यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती असल्याने निर्माता दिलीप जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कार्यक्रमात हेमंत टकले यांना बाबुराव सावंत पुरस्कार तसेच डोमेन एक्पर्ट कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने दीपक करंजीकर आणि विजय साळवे, नंदा रायते, सुनील देशपांडे, मुरलीधर तांबट, आनंद बापट, सुगंधा शुक्ल, सुनील भास्कर, प्रकाश नन्नावरे, डॉ. राजेश आहेर, डॉ. अविनाश आंधळे, डॉ. राजीव पाठक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी बागेश्री वाद्यवृंदाच्या वतीने नांदी सादर करण्यात आली. सुनील ढगे यांनी प्रास्ताविक केले.

कानेटकर पुरस्कार मिळणे भाग्याचे लक्षण आहे. रायगडाला जाग येते तेव्हा नाटकात मी संभाजीची भूमिका करीत असे तेव्हा कानेटकरांनी मला 'तुम्ही शोभता' अशी पावती दिली होती. ती माझ्यासाठी आजही आनंददायी आहे.

- मोहन जोशी

नाटककारांची मांदियाळी एकत्र आल्याने खूप आनंद होत आहे. आयुष्याच्या सायंकाळी मिळालेला हा पुरस्कार विशेष महत्त्वाचा आहे.

- आमदार हेमंत टकले

बक्षिसे वाटण्याचा कंटाळा

नाट्य संमेलनाची अध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक गावाला जाऊन बक्षिसे वाटणे आणि रंगकर्मींना भेटणे हेच काम राहिले असून माझे गाणे बासनात गुंडाळून ठेवले आहे. खरे तर या गोष्टीचा मला वैताग आला आहे. पुन्हा आता नाशिकमध्येही तेच करायचे, यामुळे मला काय करावे सुचत नाही. परंतु हरकत नाही, असे म्हणून कीर्ती शिलेदार यांनी भाषणास सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेलगंगा पॅटर्न’ कारखानदारीसाठी प्रेरक

$
0
0

गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे सुतोवाच

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

बेलगंगा पॅटर्न राज्यातील अडचणीत असलेल्या साखर कारखाणदारीसाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केला. तब्बल १० वर्षांनंतर चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा कारखान्याचा गाळप हंगाम शुक्रवारी सुरू झाला. याप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते.

लोकसहभागातून सुरू झालेला हा राज्यातील पहिलाच कारखाना आहे. कारखान्याचे गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगाम शुभारंभ झाला. यावेळी श्री. शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्वर माऊली (बेलदारवाडी), स्वामी केशवानंद सरस्वती, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, गृह व नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील, सहकारराज्य मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेश जैन, आमदार डॉ. सतीष पाटील यांच्या हस्ते उसाची मोळी टाकून गव्हाणपूजन करण्यात आले.

उसाला २ हजार रूपये भाव देणार

कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी कारखाना उभा करताना अनेक अशक्य बाबींवर कशी मात केली? याचे अनेक दाखले देऊन लोकसहभागातून स्थानिक भूमिपूत्रांनीच कारखाना सुरू केल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. कारखाना सुरू करण्यासाठी माजी मंत्री सुरेश जैन, आमदार एकना‌थ ‌खडसे, बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे तसेच शेतकरी, भागभांडवलदार यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगत भविष्यात कारख‌ान्याच्या जागेवर दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्याचे तसेच कारखान्यातील डिस्टेलरी सुरू करण्यासाठी २० कोटी रुपयांचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकरीच आमचा केंद्रबिंदू असून, सुरुवातीला शेतकऱ्यांच्या उसाला २ हजार रुपये भाव देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

खडसेंची आमदारांवर टीका

बेलगंगा कारखाना सुरू करतो, असे सांगून ज्यांनी संपूर्ण तालुक्यात पदयात्रा केली, कारखान्यावरच्या नावावर शेतकरी-कामगारांच्या भावनांशी खेळ करून ज्यांनी निवडणुका लढल्या, निवडूनही आले त्यांनी नंतर कार‌खाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची टीका खडसे यांनी केली. कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार ए. टी. पाटील व आमदार उन्मेष पाटील अनुपस्थित असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images