केंद्राच्या पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा; मागण्यांचा भडिमार
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
पावसाच्या आशेवर पेरणी केली मात्र आता सगळं जळून खाक झालं...दुबार पेरणीनंतर देखील हाती काहीच लागले नाही...जनावरांना चारा नाही की पिण्यासाठी पाणी नाही...कर्जाचा डोंगर मात्र वाढतोच आहे. अशात जगायचं तरी कसं मॅडम तुम्हीच सांगा? दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे हे शब्द आहेत तालुक्यातील मेहुणे येथील शेतकरी शिवाजी देवरे यांचे. केंद्रीय पथकाच्या दुष्काळ पाहणी दौरा गुरुवारी झाला. त्यावेळी हतबल शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांची परिस्थिती आणि ओकंबोकं शिवार पाहून पथकालाही काही सुचेनासं झालं होतं.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने तालुक्यातील मेहुणे, वऱ्हाणे व जळगाव (नि) या परिसरातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. पथकात श्रीमती छवी झा, शालिनी सक्सेना, आर. डी. देशपांडे, ए. के. तिवारी आदींसह विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, तहसीलदार ज्योती देवरे, कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, बांधकाम सभापती मनीषा पवार, विनोद शेलार, मेहुणे येथील उपसरपंच निवृत्ती देवरे उपस्थित होते.
मेहुणे गावातील शेतकरी शिवाजी देवरे यांच्या भुईमुग शेताची पाहणी करण्यासाठी पथक दाखल झाले त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. ६ लाखांचे कर्ज डोक्यावर असून दुष्काळी परिस्थितीने ते फेडायचे कसे? अशी विवंचना त्यांनी बोलून दाखवली. मेहुणे परिसरात अत्यल्प पावसामुळे शेतकरी बेजार झालेला आहे. मात्र बँक कर्जवसुलीसाठी ताकदा लावते तर वीज कंपनी सक्तीची वसुली करतात अशी तक्रार देखील शेतकऱ्यांनी पथकासमोर मांडली. वऱ्हाणे शिवारातील बाजीराव महादू पवार यांचा डाळिंबाच्या बागेची पथकाने पाहणी केली. पाण्याअभावी बाग करपली असून, आता साडेतीन लाखाचे कर्ज फेडायचे कसे, अशी विवंचना त्यांनी बोलून दाखवली.
तालुक्यातील जळगाव (नि) शिवारातील भिका काशिनाथ बालनोर यांच्या शेतातील ज्वारी, बाजरी पिकाची पाहणी करताना शेतकऱ्यांनी ४० वर्षांतील हा भीषण दुष्काळ असल्याची बाब पथकाच्या लक्षात आणून दिली. सरकारने दिलेली कर्जमाफी तुटपुंजी आहे. सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पाण्याचे टँकर द्यावे, चारा छावण्या उभाराव्यात, दुष्काळी भागातील सर्व शिधापात्रिकाधारकांना रेशन द्यावे, पिकविम्याचे पैसे मिळावेत अशा मागण्यांचा भडीमार यावेळी केंद्रीय पथकावर परिसरातील शेतकऱ्यांनी केला.
पथक आले अन् पाणी मिळाले
मेहुणे गावात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गुरुवारी केंद्रीय पथकाचा दौरा दरम्यान गावात पाणीचा टँकर आल्याने या परिसरातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव समोर आले.
विमा कसा काढू?
केंद्रीय पथकातील महिला सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना काही प्रश्न विचारले. 'क्या आपने फसल बीमा निकाला है? यावर उत्पन्न नसल्याने पैसेच नाही तर विमा कसा काढू? असा प्रतिप्रश्न केला तसेच आजवर काढलेल्या विम्याचा लाभ मिळालाच नसल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. बाटलीबंद पाण्याला तरी किंमत आहे पण आमच्या दुधाला भाव नाही अशी तुलना करीत शेतकऱ्यांनी पथकाला दुष्काळाची दाहकता लक्षात आणून दिली.
२५ मिनिटांत दिसला दुष्काळ
म. टा. वृत्तसेवा, चांदवड
चांदवड तालुक्यातील गावांमध्ये पडलेल्या दुष्काळाची पाहणी केंद्रीय समितीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळच्या पाहणी केली. तालुक्यातील हर्नूल, हर्सूल येथील शेतकऱ्यांचे कांदा, टोमॅटो पिकांच्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. या पथकाने अवघ्या २५ मिनिटांत दुष्काळाची पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
सायंकाळी ५.४५ च्या सुमारास तालुक्यातील हर्सूल येथे समितीने नामदेव रौंदळ यांच्या कांदा व टोमटो पिकांची पाहणी केली. तेथून १५ मिनिटात काढता पाय घेत लगेचच पाच मिनिटाच्या अंतरावर मनमाड-चांदवड रस्त्याला लागून असलेल्या वैजयंती भोसले यांच्या कांदा शेतीची व चिकूच्या बागेची पाहणी अवघ्या १० मिनिटांत आटोपली. त्यानंतर चांदवड शासकीय विश्रामगृहावर साधारणत ३० मिनिटांच्या विश्रांतीनंतर पथक नाशिककडे रवाना झाले.
यावेळी पथकातील अधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी भीमराव दराडे, सिद्धार्थ भंडारे, प्रवीण महाजन, वासंती माळी, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण माणकर, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे आदींसह महसूल, कृषी, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.