म. टा. वृत्तसेवा, धुळे
महानगरपालिकेची सत्ता भाजपाच्याच ताब्यात येणार असून, फिप्टी प्लसने उमेदवार निवडून येतील. सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम दररोज नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (दि. ५) महापालिका निवडणूकीचा भाजपचा विकासनामा जाहीर केला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, डॉ. माधुरी बाफना, विनोद मोराणकर आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री महाजन म्हणाले की, शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, भाजपच्या हातात मनपाची सत्ता दिल्यास सुरुवातील पाणीप्रश्न निकाली काढण्यात येईल. त्यानंतर नाशिक, जळगाव, औरंगाबादच्या बरोबरीने शहराचा विकास करण्याचा प्रयत्न राहील. शहरात गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस, काँगेसच्या हातात महापालिकेची सत्ता होती. मात्र, शहरात कोणताही बदल झालेला दिसत नाही. शहराचा विकास मागे पडला असून, तो आता भाजप पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नाशिक व जळगावच्या लोकांनी आमच्यावर विश्वास दाखविला तो विश्वास धुळेकरही दाखवतील. मात्र एकदा महापालिकेत भाजपाला संधी द्यावी लागेल आणि शहराचा कायापालट त्याशिवाय होणार नाही, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
जळगावकर धुळ्यात दाखल
महापालिका निवडणुकीला आता फक्त दोन दिवस शिल्लक असताना जळगावातील काही दिग्गज लोकप्रतिनधी आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर शहरात ‘MH 19’ पार्सिंगच्या चारचाकी बुधवार सायंकाळपासून मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. यामुळे आता मंत्री महाजन यांच्यावर भाजपने महापालिका निवडणुकीसाठी टाकलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जळगावहून फौजफाटा हळूहळू दाखल होत असून, ते नेमकी कोणती जादू सत्ता काबीज करण्यासाठी वापरतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांची आज सभा
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज (दि. ६) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्यात येत असून महापालिका निवडणूकीत भाजपकडून रिंगणात असलेल्या ६२ उमेदवारांची शहरातील पांझरा नदीकिनारी महाकाली मंदिराजवळ प्रचार सभा होणार आहे. यात मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच याचवेळेत सायंकाळी ७ वाजता आमदार अनिल गोटे यांचीही शिवतीर्थ चौक येथे सभा होणार आहे. यामुळे भाजपचे मुख्यमंत्री व भाजपचे शहरातील आमदार गोटे यांच्या पक्षवादामुळे एकाच वेळी दोन जणांच्या सभा होणार आहेत. भाजपविरुध्द स्वाभिमानी भाजपा लोकसंग्राम यांच्यातील प्रचाराची अखेरचा सामना आज होणार आहे. यातून मतदार नेमके कोणाच्या हाती सत्ता देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट