'तिरथ में तो सब पानी' … म. टा. प्रतिनिधी, नाशिक मनुष्य प्राण्याचं आयुष्य सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा गोष्टींबरोबर व्यापलेलं असतं, दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्यावर कोणत्या ना कोणत्या विषयाने संवाद सुरू होतो. सामाजिक स्तरावरचा विषय केव्हा व्यक्तिगत स्तरावर येतो हे दोघांनाही समजत नाही आणि त्यातून घडत जाते नाट्य महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्यावतीने आयोजित ५८ व्या राज्य नाट्य स्पर्धेत 'तिरथ में तो सब पानी' या नाटकाचा प्रयोग संस्कृती नाशिक या संस्थेच्यावतीने रविवारी सकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सादर झाला. नाटकाची सुरुवात होते तेव्हा एक स्त्री, मिसेस साने आणि एक पुरुष, मिस्टर राजापूरकर हे रस्त्यावर उभे असतात. यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. हे दोघेही स्त्री पुरुष रात्री उशिरापर्यंत रिक्षाची वाट पहात थांबलेले असतात. खूप वेळ होऊन जातो तरीही रिक्षा मिळत नाही आणि लगेचच पाऊस सुरू होतो. त्यावेळी दोघांच्या संवादाला सुरुवात होते. स्वत:बद्दल, स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल, भूतकाळाबद्दल ते दोघेही रात्रभर बोलतात. मनुष्य प्राण्याचं आयुष्य हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक गोष्टींबरोबर सर्वात जास्त व्यापलेले असते. एखादी स्त्री धार्मिकतेचा बाऊ करून एखाद्या महाराजांच्या सर्वात जास्त अधिन होते तेव्हा तिला भानावर आणण्यासाठी सांगावे लागते की, तिरथ में तो सब पानी हैं. तिचे महाराजांना अधिन होणे, स्वत: तिचे समाधानी असणे राजापूरकरच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीबद्दल असे अनेक प्रवाह या नाटकात आहे. नाटकाचे लेखन सुरेश राघव यांचे होते तर दिग्दर्शन व प्रकाश योजना विनोद राठोड यांची होती. निर्मिती प्रमुख शाहू खैरे, नेपथ्य गणेश सोनवणे, पार्श्वसंगीत अमोल काबरा, वेशभूषा किशोरी शेळके, रंगभूषा माणिक कानडे, मंच वस्तु वैशाली खाटिकमारे यांची होती नाटकाला विशेष सहाय्य रवींद्र कदम व सुनील ढगे यांचे होते. नाटकात प्रमुख भूमिका लक्ष्मी गाडेकर व प्रशांत हिरे यांनी साकारल्या. --------- आजचे नाटक विजय नाट्य मंडळ 'व्हईल ते दणक्यातच' लेखक - नेताजी भोईर दिग्दर्शक - नंदा रायते
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट