Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वनवासी मंदिरात रामनामाचा जप

0
0

येवला : अयोध्येत जन्मस्थळी श्रीराम मंदिराची निर्मिती व्हावी यासाठी राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्यानगरीत गेले. येवला तालुक्यातील ८० जणांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, अयोध्यात जाऊ न शकलेल्या शेकडो युवा शिवसैनिकांनी येवल्यातील पुरातनकालीन प्रसिद्ध अशा वनवाशी राम मंदिरात महाआरती केली. यावेळी विधान परिषद आमदार किशोर दराडे, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. आयोध्येत राम मंदिर निर्मितीच्या मागणीसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लॉकरमधील गहाळ दागिन्यांची भरपाई करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र बँकेच्या लॉकरमधून गहाळ झालेल्या दागिन्यांची जबाबदारी बँकेने झटकल्यानंतर जिल्हा ग्राहक न्यायमंचाने बँकेला दणका देत गहाळ दागिन्यांचे ४ लाख ६ हजार रुपये व्याजासह देण्याचे आदेश बँकेला दिले आहेत. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी सात हजार व अर्जाचा खर्च पाच हजार असा बारा हजारांचा दंडही ठोठावला आहे. या निकालामुळे ग्राहकांच्या सेवेकडे दुर्लक्ष करणे बँकेला चांगलेच महागात पडले आहे.

गंगापूर रोडवर राहणाऱ्या जॅकलीन विजय फ्रान्सिस यांनी कॉलेजरोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार केल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. फ्रान्सिस यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मौल्यवान दागिने व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहण्यासाठी २०१४ मध्ये २५ हजार रुपये अनामत रक्कम भरुन लॉकर घेतले. या लॉकरमध्ये सोन्याचे नेकलेस, मोठी पोत, मंगळसूत्र, बांगड्या असे सहा लाख रुपये किमतीचे दागिने ठेवले होते. नाताळ सणानिमित्त यातून दागिने काढले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा लॉकरमध्ये ते ठेवले. त्यानंतर पतीच्या मृत्यूचा दाखला व एफडीच्या पावत्या व इतर कागदपत्रांची आवश्यकता असल्याने महिनाभरानंतर बँकेत गेले. त्यानंतर बँक व्यवस्थापकाने प्रतिनिधी पाठवला व त्यांनी लॉकर उघडून दिले. त्यावेळी शिपाईसुद्धा लॉकर रूममध्ये आला व फोटोला हार लावत होता. तेव्हा शिपायाला इनचार्ज महिलेने 'तू माझ्या परवानगीशिवाय लॉकर रूममध्ये कसा आला' अशी विचारणा केली. 'ही हार लावण्याची वेळ आहे का' असेही सुनावले व नंतर ती निघून गेली. दरम्यान, आपण लॉकर बघितल्यानंतर सोन्याचे दागिने असलेला बॉक्स नसल्याचे आढळले. त्यानंतर लगेच इनचार्जच्या लक्षात आणून दिले. त्यांनी आम्हाला काहीही माहिती नाही. लॉकर तुमचे आहे. त्याची चावी तुमच्याकडे असते. तुम्ही लॉकरचा वापर करता. तेव्हा आम्ही तेथे नसतो. लॉकर बंद केले व त्यातून सोन्याच्या दागिन्यांचा डबा गेला तर त्याची जबाबदारी आमची नाही, असे सांगितले. त्यानंतर बँक व्यवस्थापकाकडे याबाबत तक्रार करण्यासाठी गेले तर त्यांनी नियम व अटी वाचा, असे सांगून मदत करण्यास नकार दिला. यावेळी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची विनंती केली. पण, त्यालाही नकार दिला. उलट अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, अशी धमकी दिली. त्यानंतर तीन दिवसांनी आपण गंगापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. पण, पोलिसांना बँकेने तपासाकामी सहकार्य केले नाही. सीसीटीव्ही फुटेज पंधरा दिवसांचे असते, असे बँकेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे दागिने गहाळ होण्यामागे बँकेच्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय आला. पोलिसांनीही घटनेचा तपास केला नाही.

बँकेने फेटाळले आरोप

या तक्रारीवर बँकेने आपली बाजू मांडतांना सांगितले की, लॉकरच्या दोन चाव्या असतात. त्यापैकी एक लॉकरधारकाकडे व दुसरी संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाकडे असते. दोन्ही चाव्या लावल्याशिवाय लॉकर उघडले जाऊ शकत नाही. लॉकर उघडताना व्यवस्थापक बरोबर जातो व त्यानंतर तो बँकेची चावी लावून ते बाहेर पडतात. त्यामुळे लॉकरधारकाने कोणती वस्तू ठेवली व बाहेर काढली हे व्यवस्थापकाला माहीत नसते. त्यामुळे लॉकरमधून झालेल्या चोरीस अगर नुकसानीची कोणतीही जबाबदारी नाही. बँकेच्या नियमानुसार चौकशी केली आहे. पैसे उकळण्यासाठी तक्रार केली आहे. ती फेटाळण्यात यावी.

सेवेत कमतरतेचा ठपका

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ग्राहक न्यायमंचाने निकाल देताना सांगितले की, लॉकरमधून चोरी अगर नुकसानीची जबाबदारी बँकेची नाही. पण, लॉकर्सबाबत सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची आहे. लॉकर्सच्या ठिकाणी बँक इनचार्जशिवाय कोणाला प्रवेश दिला जात नाही. पण, शिपाई आला होता. त्याचप्रमाणे दागिने गहाळ झाल्यानंतर बँकेने तक्रार दाखल करायला हवी होती. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज ९० दिवसांपर्यंत ठेवता येते, असे मुद्दे उपस्थित करून सेवा देण्यास कमतरता केली असे सांगत दागिन्यांचे पैसे करण्याचे आदेश देऊन दंडही ठोठावला. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी दिला. फ्रान्सिस यांच्या बाजूने अॅड. के. एस. शेळके यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर ऑर्गन इतिहासजमा झाले असते!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑर्गन या वाद्याला नवे स्वरूप दिले नसते तर ते आतापर्यंत इतिहासजमा झाले असते. आज ते केवळ वस्तुसंग्रहालयात पहायला मिळाले असते. मी ऑर्गनला माझे आयुष्य दिले आणि त्याने मला जगप्रसिद्ध बनवले. आता त्याचा भारतातून परदेशात हा प्रवास मनाला सुखकारक वाटतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ ऑर्गन निर्माते उमाशंकर ऊर्फ बाळ दाते यांनी केले.

'आयाम' निर्मित आणि 'ग्रंथ तुमच्या दारी' यांच्या वतीने 'अवलिया' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकमेव ऑर्गन निर्माता उमाशंकर दाते यांची मुलाखत व गाण्यांचा कार्यक्रम शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात रंगला. यावेळी दाते पुढे म्हणाले की, ऑर्गन हे युरोपातून ब्रिटिशांबरोबर आलेले वाद्य आहे. परंतु, ते भारतात स्थिर झाले आणि ते नामशेष होण्याच्या काळात त्यावर संशोधन करून त्याचा प्रचार प्रसार वाढवला. त्याचबरोबर अनेक कार्यक्रमदेखील केले. त्याची परिणती म्हणून आपल्याकडे ऑर्गन निर्मितीच्या ऑर्डर येण्यास सुरुवात झाली. आता संपूर्ण जगात आपण ऑर्गन पुरवतो. मी सध्याचा एकमेव ऑर्गन निर्माता असून महाराष्ट्र, भारत आणि संपूर्ण जगात मी ऑर्गन वाजविण्याचे कार्यक्रम केलेले आहेत. काळाच्या ओघात नामशेष होऊ पाहणाऱ्या रिड ऑर्गनचे संशोधन करून त्याची पुनर्निर्मिती करून या दुर्मिळ वाद्याला नवसंजीवनी दिली आहे. त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील घेण्यात आली. स्वत: सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या कार्यशाळेला भेट दिली आणि हे काम समजावून घेतले तो अविस्मरणीय क्षण होता. विशेष म्हणजे या ऑर्गनच्या निर्मितीसाठी मला वर्षभराची रजा मंजूर करून देण्याचे काम मंत्री महोदयांनी केले, ही घटना भावनाशील करणारी आहे. रत्नागिरी जवळच्या अडिवऱ्हे या गावाचे नाव संपूर्ण जगात गाजत आहे. कारण तेथे एकमेव ऑर्गन निर्माता राहतो, तेथून सर्व जगभरात ऑर्गन जातात हे अभिमानास्पद कार्य असल्याचे दाते म्हणाले.

कार्यक्रमाचा प्रारंभ 'पंचतुंड नररूंड मालधर' या संगीत शाकुंतलमधील नांदीने करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे होते. मुलाखत मधुरा गोरे यांनी घेतली. गायन आनंद अत्रे यांनी केले. तर त्यांना तबल्यावर साथ शुभम जोशी यांनी केली. तांत्रिकबाजू आदित्य राहणे यांनी सांभाळली.

ऑर्गनवरील गाण्यांची मेजवानी

मुलाखतीच्या दरम्यान 'दिन गेले भजनाविन सारे' हे संत कबीराचे भजन आनंद अत्रे यांनी सादर केले. त्यानंतर 'कोण तुजसम सांग मज गुरूराया' हे 'संगीत सौभद्र'मधील पद दाते यांनी ऑर्गनवर सादर केले. आनंद यांनी, 'हे सुरांनो चंद्र व्हा', 'सूरत पिया की' तर ऑर्गनवर दाते यांनी 'वद जाऊ कुणाला शरण' हे पद वाजवून दाखवले. या प्रस्तुतीनंतर बॉलिवूडच्या गाण्यांना ऑर्गन वापरता येईल का, या प्रयोगशीलतेतून 'आओगे जब तुम साजना', 'फिर ले आया दिल', 'लागी तुमसे मन की लगन' या तीन गाण्यांची एकत्रित मेडली ऑर्गनवर सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमानी उद्यानाच्या कर्मचाऱ्यास मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोडच्या मुक्तिधाम येथील महापालिकेच्या सोमानी गार्डनमध्ये दारू पिण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून तिघांनी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. राजेंद्र किसन पाठक (रा. इच्छामणीनगर, शिवाजीनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमानी गार्डनचे त्यांनी शुक्रवारी (दि. २३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गेट बंद केले. त्यावेळी संशयित निखिल (रा. भालेराव मळा, नाशिकरोड), हर्षद (रा. सुभाषरोड, नाशिकरोड), ओम (रा. भालेराव मळा, नाशिकरोड) हे तिघे आले आणि त्यांना गार्डनमध्ये बसून मद्यप्राशन करायचे होते. त्यासाठी त्यांनी गेट उघडण्यास सांगितले. कर्मचारी पाठक यांनी नकार दिल्याने संशयित तिघांनी त्यांना लाठ्याकाठांनी बेदम मारहाण केली. पाठक यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

घरातून दागिने लंपास

जेलरोडच्या नेहरूनगरमध्ये घरातून अज्ञात चोरट्याने नऊ हजार रुपयांचे दागिने चोरून नेलेत. या प्रकरणी के. प्रसाद के. कृष्णा (रा. नेहरूनगर, जेलरोड) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने १९ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या दरम्यान कृष्णा यांच्या घरात प्रवेश करून सुटकेसमध्ये ठेवलेले नऊ हजार रुपयांचा सोन्याचे झुमके चोरून नेले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

आडगाव नाका येथे घरफोडी

आडगाव नाका येथील अभंगनगरमध्ये बंद घराचा कुलूप कोयंडा तोडून घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले. नरेंद्र निंबाजी देशमुख (रा. भालचंद्र अपार्ट., अभंगनगर, आडगावनाका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, देशमुख कुटुंब २१ ते २४ तारखेदरम्यान घरी नसताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे झुमके, अर्धा ग्रॅमची नथ असा ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. जयंत पवार यांची‘आएमए’वर निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व मविप्रचे मालेगाव तालुका संचालक डॉ. जयंत पवार यांची दिल्ली येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) कार्यकारिणीवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

देशभरातून डॉक्टरांची आयएमएच्या कार्यकारिणीवर निवड केली जाते. डॉक्टरांच्या हिताबरोबरच समाजहितासाठी आयएमए काम करीत आहे. १९२८ मध्ये स्थापना झालेल्या 'आएमए'चे तीन लाख डॉक्टर सभासद आहेत. ही संघटना जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था आहे. या संघटनेच्या भारतभर दोन हजार शाखा आहेत. या संस्थेच्या कार्यकारिणीवर डॉ. जयंत पवार यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल डॉ. पवार यांचे मविप्र संस्था व मालेगावातील डॉक्टरांच्या संघटनांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माओवादाचा मार्ग हिंसेचाच

0
0

कॅप्टन स्मिता गायकवाड यांचे प्रतिपादन

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

हिंसेच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्याचे, हिटलरपेक्षा तीव्र उद्दिष्ट माओवाद्यांचे असते. त्यामुळे शहरापर्यंत पोहचू पाहणाऱ्या या विषयाबाबत नागरिकांनी सजग असायला हवे, असे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात 'शहरी माओवादाचे संकट' या विषयावर त्यांनी स्लाईड शोद्वारे सादरीकरण केले. यावेळी मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक डॉ. मधुकर आचार्य, डॉ. सुरेश हावरे, रविराज बावडेकर, पत्रकार किरण शेलार उपस्थित होते. देशाच्या सुरक्षा यंत्रणेसमोर आव्हान बनू पाहणाऱ्या शहरी माओवादाचा चेहरा अलिकडे स्पष्ट होऊ लागला आहे. पण या शहरी माओवादाच्या बांधणीला सत्तरच्या दशकापासूनच सुरुवात झाली आहे. नक्षलवादाच्या नावाखाली माओची लोकशाहीविरोधी विचारसरणी यात छुप्या मार्गाने कार्यरत राहते. लोकशाहीसाठी हा माओवाद म्हणजे येऊ घातलेले संकट आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

कोरेगांव भीमा प्रकरण व एल्गार परिषदेनंतर माओवादाचा प्रश्न प्रखरतेने जनतेसमोर आला. या प्रकरणी सत्यशोधन समितीच्या अहवालातील नोंदीही त्यांनी स्लाईड शोद्वारे मांडल्या. जनतेच्या भावना भडकावून त्यांचे भांडवल करायचे आणि समाजात असंतोष निर्माण करायचा. संसदीय मार्गाच्या अनुसरणाचा देखावा करून आतून मात्र हिंसेच्या मार्गाचेच समर्थन करायचे, असा माओवाद्यांचा अजेंडा आहे. सरकारविरोधात सत्तेसाठीच्या या हिंसक युद्धात निरपराध जनतेलाही माओवादी ओढत आहेत, असे त्यांनी सांगितले.

वेळीच सावध व्हा!

'मी टू अर्बन नक्षल हॅशटॅग' अशी मोहिमसुद्धा सोशल मीडियावर चालवली गेली. पण यात सहभागी होणाऱ्या सेलिब्रेटींपासून तर जनसामान्यांपर्यंत अनेकांना यामागील माओवाद्यांचा चेहरा ठाऊक नाही. अशा पद्धतीने माओवाद्यांची कारस्थाने तुमच्या शहरांपर्यंत व पर्यायाने तुमच्यापर्यंत पोहचत असल्याने वेळीच सावध व्हा, असे आवाहन त्यांनी केले. माओवाद्यांना करण्यात आलेली अटक ही त्यांनी माओवादाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या कार्यक्रमांमुळे झाल्याचेही गायकवाड म्हणाल्या.

\B

(फोटो : सतीश काळे) \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्न विचारणारे शत्रू नव्हे!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून कामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नोकऱ्या कमी होत नसून, नोकऱ्यांची दरवाजे बंद होऊ लागली आहेत. सर्व उच्च शिक्षितांना नोकऱ्या देऊ म्हणणाऱ्या मोदी सरकारने फक्त मोठ्या उद्योगपतीच्या तिजोरीत वाढ केली आहे. या मुद्यांवर सरकारला कामगारांनी प्रश्न विचारल्यास त्यांची मोठ्या प्रमाणावर गळचेपी केली जात आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जात आहे. लोकशाहीत असलेला अभिव्यक्तिचा अधिकार मोदी सरकार हिरावून घेत आहे. मोदी सरकार, तुमच्या चुकीच्या धोरणांबाबत प्रश्न विचारल्यास त्या व्यक्तिला तुम्हा शत्रू का समजता?,' असा प्रश्न आयटक राष्ट्रीय महासचिव अमरजित कौर यांनी मोदी सरकारला केला. आयटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनातील संविधान जागर सभेत त्या बोलत होत्या.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 'आयटक'चे १८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे नाशिक-पुणे महामार्गावारील श्रीकृष्ण लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या अधिवेशनात कामगारांच्या रिक्त जागा, पेन्शन प्रश्न, शेतमजूरांना किमान वेतन यांसह शेतकरी आत्महत्या या विषयावर संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविधांगी चर्चा करण्यात आली. अधिवेशनात रविवारी दुपारी ३ वाजता आयटक राष्ट्रीय महासचिव अमरजित कौर (दिल्ली) यांनी संविधान जागर सभा घेतली. या सभेत अमरजित कौर यांनी मोदी सरकारावर टीका केली. कौर म्हणाल्या, 'केंद्र व राज्यात असलेल्या सरकारने कामगारांच्या हल्ला चढवला आहे. पे कमिशनमध्ये बदल केल्याने कामगारांचे अधिक शोषण होत आहे. ट्रेड युनियनवरही सरकार हल्ले करत आहे. आंदोलनापूर्वीच अटक करण्यात येत आहे. आंदोलन डावलण्याचा प्रयत्न करत कामगारांचे खच्चीकरण होत आहे. देशात मल्टिनॅशनल कंपन्यांची संख्या वाढत असून, कर्मचाऱ्यांची मात्र कमी होत आहे. हे सर्व कर्मचाऱ्यांवर हल्ले होणाऱ्या घटना आहेत. पुढच्या निवडणुकीत मोदी सरकारला कामगारांची ताकद दाखवून देण्याची गरज असल्याचे मत अमरजित कौर यांनी मांडले.

\Bआम्ही देशभक्त आहोतच\B

'आयटकचे योगदान स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत आयटकच्या माध्यमातून कामगारांचा एल्गार आणि स्वातंत्र्य योगदानात कामगारांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे कम्युनिस्ट देशभक्त नाहीत, असा दावा भाजपा किंवा आरएसएसने करु नये. आम्ही देशभक्त आहोतच, पण देशभक्तीच्या नावाखाली संविधानात दिलेले अधिकार वापरू न देण्याची तुमची वृत्ती गैर आहे', असे म्हणत अमरजित कौर यांनी मोदी सरकार व आरएसएसवर टीका केली.

\B

कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही लढणारच...

\B'किमान वेतनासाठी लढणाऱ्या आयटकच्या आंदोलनाकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात. अच्छे दिन येणार म्हणून अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते. हक्कासाठी भांडणाऱ्यांवर कारवाई करत कायद्यात अडकवले जाते. पण भांडवलदारांवर कोणतीही कार्यवाही फडणवीस सरकार करत नाही. येत्या २०२० मध्ये आयटकला शंभर वर्षे पूर्ण होत असून, त्या पार्श्वभूमीवर कामगारांची संघटना अधिक मजबूत होणार आहे. नाशिकमध्ये ५० हजार कामगारांची एकजूट करायची असून, कामगारांच्या एल्गारासाठी आयटक झटणार आहे. मग कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही लढणारच...', असे मत अधिवेशनाच्या समारोप सत्राचे अध्यक्ष राजू देसले मांडले.

\B

लाल सलाम...

\Bअधिवेशनात सहभागी झालेल्या हजारो कामगारांची रॅली द्वारका येथील खरबंदा पार्क ते अधिवेशनाच्या ठिकाणापर्यंत काढण्यात आली. दुपारी १.३० वाजता निघालेल्या या रॅलीतून 'लाल सलाम, लाल बावट्याचा विजय असो', अशा घोषणा देत कामगार-शेतकऱ्यांच्या एकजुटीचा एल्गार दाखविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी प्रश्नात राजकारण नको

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'पाणी हा आता कळीचा मुद्दा झाला असून, पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पाणी प्रश्नात राजकारण व पक्षीय मतभेद नकोत. शेतकरी बांधवानी कमी पाण्यात होणाऱ्या शेतीची आधुनिक तंत्रे शिकावी.' असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी कृषिथॉनमध्ये केले.

कृषिथॉन २०१८ प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी सकाळी 'महिला शेतकरी सन्मान सोहळा' आयोजित करण्यात आला. यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जि.प.सदस्या अमृता पवार ,माजी खासदार देविदास पिंगळे, नाडाचे अध्यक्ष विजूनाना पाटील तसेच संयोजन समिती अध्यक्ष खा. हरिशचंद्र चव्हाण उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संयोजक संजय न्याहारकर यांनी व संचालिका अश्विनी न्याहारकर यांनी केले.

भुजबळ म्हणाले,'शेतीमध्ये ७५ टक्के महिलांचे योगदान असले तरी त्यांच्या नावावर शेतीचा हिस्सा फक्त १२ टक्के आहे. शेतीत महिला राबतात. जगातील प्रगतशील देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात ४० टक्के वाटा महिलांचा असतो. भारतात तो फक्त १७ टक्के आहे, असेही ते म्हणाले.

हरितक्रांती होऊनही आत्महत्या

भुजबळ म्हणाले, 'शेतमालाला दीडपट हमीभावाची घोषणा झाली. मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व त्याच्या परिवाराच्या कष्टांचा विचार होत नाही. देशात हरितक्रांती होऊनही शेतकरी आत्महत्या का होतात? याचा विचार व्हायला हवा. शेती खर्चिक झाली असून, जीएसटीचा बोजा वाढला आहे.'

तापीचे पाणी गुजरातला

'तापी खोऱ्यातील पाणी आपण अडवू शकत नसल्याने गुजरातला जाते. मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होत आला आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल,' असे सांगून ते पुढे म्हणाले, शेतीतील प्रगतीसाठी अनेक मार्ग आहेत. योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावा.'

समुद्राचे पाणी शुद्ध करा

खा. हरिशचंद्र चव्हाण म्हणाले,'नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी मुंबईला देण्यापेक्षा समुद्राचे पाणी शुद्ध करून मुंबईकरांना द्यावे. ही काळाची गरज असून, हे अशक्य नाही. त्यामुळे पाण्यावरून होणारा संघर्ष कमी होईल.'

हेल्मेटबाबत जनजागृती

नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त यावी व हेल्मेट वापराबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने कृषिथॉन प्रदर्शनात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर पोलिस ठाण्यातर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी, नागरिकांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनोज दिंडे यांचा सन्मान

0
0

\Bमनोज दिंडे यांचा सन्मान

\Bनाशिक : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या येथील मनोज दिंडे यांना 'ग्लोबल बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील पी. एन. दोशी वूमन कॉलेज ऑडिटोरिअम येथे आयोजित संमेलनामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानवसेवा विकास फाऊंडेशन व किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, दखल गोरवांक व पदक देऊन अशोक गोरे यांच्या हस्ते दिंडे यांचा सन्मान करण्यात आले. यापूर्वी दिंडे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रोडचा दुसरा टप्पा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामास रविवारी अखेर सुरुवात झाली. महापालिका प्रशासनाने काम सुरू करताच सीबीएस ते त्र्यंबकनाका हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. त्र्यंबकनाका ते मेहेर सिग्नल या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली असून, दुपारपासून वाहतुकीतील बदल लागू करण्यात आले. यामुळे मुख्य चौकांमध्ये काही काळ वाहतूक कोंडी उद्भवली होती.

दिवाळीपूर्वी याच मार्गावर दोन दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर 'वन-वे' चा प्रयोग करण्यात आला होता. आता काम पूर्णत्वास जाईपर्यंत हा मार्ग एकेरी राहणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत त्र्यंबकनाका-अशोकस्तंभ या रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाच्या एका बाजूकडील काम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूच्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू होती. रस्त्याच्या कामामुळे या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीची मोठी समस्या सातत्याने निर्माण होत गेली. त्यामुळे यातून पर्याय म्हणून दिवाळीपूर्वी २३ व २४ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या मार्गावर एकेरी वाहतुकीचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर ऐन दिवाळीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सदरचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

परंतु, आता वाहतूक शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी अधिसूचना काढली आहे. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा मार्ग स्मार्ट रोडचे काम पूर्णत्वास जाईपर्यंत एकेरी वाहतुकीसाठीच वापर केला जाणार आहे. यानुसार आवश्यक त्या उपाययोजना महापालिका व कंत्राटदार यांनी या मार्गावर केल्याचा दावा करण्यात आला आहे. वाहतूक मार्गात बदल केल्याशिवाय येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. त्यास पर्याय नसल्याने वाहनचालकांनी सहकार्याची भूमिका घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन उपायुक्त पाटील यांनी केले आहे.

वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग

पंचवटीकडून सीबीएसकडे जाताना- रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - शालिमार - शिवाजीरोड - सीबीएस या मार्गाचा अवंलब करावा. तसेच त्र्यंबकनाका - सातपूरकडे जायचे असल्यास शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषदेमार्गे त्र्यंबकनाका या मार्गाचा वापर करावा.

गंगापूररोड-रामवाडी पुलाकडून येणारी वाहतूक

सर्व प्रकारच्या वाहनांना मेहेर सिग्नल-सीबीएस-त्र्यंबकनाक्याकडे जायचे असल्यास त्यांनी अशोकस्तंभ - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - मेहेर सिग्नल

अशोकस्तंभ - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - शालिमार - शिवाजीरोड - सीबीएस- अशोकस्तंभ - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - शालिमार - खडकाळी सिग्नल - जिल्हा परिषद-त्र्यंबकनाका - सातपूर या मार्गांचा किंवा गंगापूर नाका - कॅनडा कॉर्नर - टिळकवाडीमार्गे सीबीएस या मार्गाचा वापर करावा.

मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे येणारी वाहने

मुंबईनाका - वडाळानाका - द्वारका - आडगाव नाका - काट्या मारुती- निमाणी

सिडको व सातपूरकडून पंचवटीकडे येताना

मायको सर्कल - जुना सीटीबी सिग्नल - एचडीएफसी सर्कल - कॅनडा कॉर्नर - जुना गंगापूर नाका - रामवाडी किंवा ड्रीम कॅसलमार्गे पंचवटीकडे

या ठिकाणी बॅरेकेडिंग

त्र्यंबक नाका, सीबीएस आणि अशोक स्तंभ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळी चोरी इंदिरानगरला सुरूच

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर भागात सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी झाले नसून पोलिसांकडून याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येत आहे. येथील स्वामी समर्थ केंद्राजवळून पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सुमारे १लाख ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना पाटेकर (६५, रा. सु किरण सोसायटी, मुरबाड, कल्याण, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्या त्यांची मुलगी दीपाली धारणकर (रा. अथर्व सोसायटी, स्वामी समर्थ केंद्राजवळ, इंदिरानगर) येथे आल्या होत्या. स्वामी समर्थ केंद्रजवळ, लक्ष्मीदर्शन अपार्टमेंटसमोरून शनिवार (दि. २४) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास पायी जात होत्या. समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन तरुण आले. गाडीवरील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पाटेकर यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून बजरंग सोसायटीच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस करतात तरी काय?

इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ चार भिंतीत बसूनच काम करतात का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यावर गस्त घातली जात नसल्याने इंदिरानगरवासीयांना चोरीच्या अशा प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी आता लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समुद्री सुरक्षेबाबत राष्ट्रीय परिसंवाद

0
0

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित कान्होजी आंग्रे मेरीटाइम रिसर्च इन्स्टिट्यूट, भोसला सैनिकी महाविद्यालय व मुंबई विद्यापीठाचे नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'भारतीय समुद्रतटीय सुरक्षा' या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले आहे. या राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनासाठी ३० नोव्हेंबर सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्रीमंत रघुजी राजे आंग्रे हे उपस्थित राहणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय संरक्षणराज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित राहणार आहेत. हा परिसंवाद फिरोजशहा मेहता भवन व संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे होणार आहे. या परिसंवादात समुद्रीय क्षेत्रात वारंवार उद्भवणाऱ्या भारतीय तटीय सुरक्षा संदर्भातील आव्हाने यासंदर्भात परिसंवादामध्ये चर्चा होणार आहे, अशी माहिती सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर व कामरीचे संचालक कमांडोर आर. एस. धनकर यांनी दिली.

भारतीय किनारा याची एकूण लांबी ७५१६.६ किमी असून बेकायदेशीर मासेमारी, अनधिकृत घुसखोरी, तस्करी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. दहशतवाद आणि विद्रोही विचार याला खतपाणी घालणाऱ्या शक्ती यांच्या विरोधात लढा उभारण्यासाठी आवश्यकता आहे. भारतीय तटीय सुरक्षा क्षेत्रात विविध भागधारकांची एकत्रित अशी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ताब्यातील संस्था व या विषयातील सुधारणा करण्याची आवश्यकता असलेले कायदे, धोरण आणि निर्देश त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी या परिसंवादाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी साधणार चतुर्थीचा मुहूर्त!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंन्ट बँकच्या २१ संचालकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्यामुळे सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. सोमवारी संकष्ट चुतर्थी असल्यामुळे हा मुहूर्त साधण्याचाही प्रयत्न या निमित्ताने बघायला मिळणार आहे. या निवडणुकीतील प्रमुख दोन पॅनल आपल्या समर्थकांसमोर अर्ज दाखल करणार असल्यामुळे नामकोच्या निवडणुकीत राजकीय घडामोडी वेगाने होणार आहे.

२३ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी अगोदर ३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्याचप्रमाणे २२७ सभासदांनी उमेदवारी करण्यासाठी ५५८ अर्ज तीन दिवसात नेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांची संख्याही वाढणार असल्याचे चित्र आहे. १९ ते २७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्यामुळे २६ व २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ३ पर्यंत हे उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी वैध यादी जाहीर केली जाणार आहे.

ढोल्या गणपतीचे दर्शन

'नामको'त सत्ताधारी माजी संचालकांचे असलेले प्रगती पॅनलने याअगोदरच १६ उमेदवारांचे अर्ज दाखल केले असले तरी ते पुन्हा सर्व उमेदवारांबरोबर पुन्हा सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पॅनलचे उमेदवार अशोकस्तंभ येथील ढोल्या गणतीचे दर्शन घेऊन एकत्र जमणार आहेत. त्यानंतर सोहनलाल भंडारी, वसंत गिते, यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे उमेदवार व समर्थक नामकोच्या मध्यवर्ती कार्यालयात अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.

'सहकार'ची जोरदार तयारी

विरोधी पॅनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार पॅनलनेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयारी केली आहे. पॅनलचे नेते भास्करराव कोठावदे, अजय ब्रम्हेचा, गजानन शेलार, ललित मोदी यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलचे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. या अगोदर फक्त पॅनलतर्फे ललित मोदी यांनी अर्ज दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संविधान जागर वर्तनातून दिसावा

0
0

नियोजन विभागाचे सहसचिव तुकाराम मुंढे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संविधानाच्या तत्त्वांनुसार भारताला अपेक्षित असलेला विकास झाला आहे का, याचा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. संविधानात लिखित प्रत्येक शब्दामागील अर्थ जाणून घेणे भारतीय नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. देशाची आर्थिक प्रगती करून भागणार नाही तर न्याय, समता आणि बंधुतेच्या आधारे सर्वांगिण विकासाची व्याख्या आपण जाणून घेतली पाहिजे. त्यासाठी संविधानाचा जागर करणे, हे द्योतक आहे. संविधानाचा जागर कार्यक्रमांतून होईलच, तसेच प्रत्येकाच्या वर्तनातून संविधानाचा जागर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मंत्रालय नियोजन विभागाचे सहसचिव तुकाराम मुंढे यांनी केले.

नाशिकच्या संविधान सन्मान समितीच्या वतीने रविवारी (दि.२५) कालिदास कलामंदिरात 'संविधान जागर परिसंवाद' झाला. मंत्रालय नियोजन विभागाचे सहसचिव तुकाराम मुंढे यांनी या परिसंवादाचे उद्घाटन केले. माजी न्यायाधीश व विधी तज्ज्ञ अनिल वैद्य, प्रसिद्ध वक्ते व सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि सर्वोच्च न्यायालयाचे अॅडव्होकेट डॉ. गुणरत्न सदावर्ते हे परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी जागर संविधानाचा या विषयावर सहसचिव मुंढे म्हणाले, की भारतातील प्रत्येकाला आर्थिक न्याय मिळणार नाही, तोपर्यंत सामाजिक व राजकीय न्याय मिळणार नाही. आर्थिक न्यायाचा अर्थ असा की, प्रत्येक नागरिकाचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी नागरिकांना सक्षम करणे होय. प्रत्येकाची आर्थिक बाजू सक्षम झाल्यास सामाजिक व राजकीय तेढ कमी होऊन सर्वांगिण न्याय प्रत्येकाला मिळेल. तसेच स्वातंत्र्य आणि विचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून विचारप्रणालीच्या जोरावर बंधुता टिकवणे शक्य होते. संविधानावर होणारे सर्व विचारमंथन फक्त कार्यक्रमांपुरतेच न राहता, ते आचरणात आणायला हवे.

परिसंवादात इतर वक्त्यांनी संविधानावर विविधांगी चर्चा करत संविधानातील तत्त्वे नाशिककरांना सांगितले. परिसंवादास नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bबदलीबाबत बोलणे टाळले

\Bमहापालिकेच्या आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बुधवारी (दि. २१) बदली झाली. नऊ महिन्यांपासून महापालिकेत चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले मुंढे यांच्यात आणि लोकप्रतिनिधींमध्ये वाद कायम होते. बदलीनंतर अवघ्या तीन दिवसांत मंत्रालय नियोजन विभाग सहसचिव म्हणून मुंढेंनी नाशिकमधील खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात आपल्या भाषणातून मुंढे बदलीबाबत वक्तव्य करतील, अशी चर्चा कार्यक्रमाच्या पूर्वी उपस्थितांमध्ये रंगल्याचे दिसले. मात्र, कार्यक्रमाच्या विषयास अनुसरूनच बोलत बदलीबाबत कोणतेही वक्तव्य करणे मुंढेंनी टाळले.

\Bअन् टाळ्यांचा कडकडाट

\Bतुकाराम मुंढे यांचा परिचय करून देताना सूत्रसंचालकाने 'मुंढेंसारखे शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष अधिकारी नाशिकला अगदी अल्प कालावधीसाठी लाभले. त्यांच्या बदलीचा संपूर्ण कार्यकाळ त्यांना उपभोगायला मिळाला असता, तर नाशिककरांच्या सोयीची अधिक कामे झाली असती. मुंढें यांच्यासारखा अधिकारी नाशिकला कायम मिळावा', अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ तीन ग्रामपंचायतींचा कारभार कोणाच्या हाती?

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात दोन महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षणामुळे अनेक ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे या तीनही ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक अद्याप झालीच नाही. यावरून प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे.

धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीनही ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाच्याही निवडणुका झाल्या. मात्र, सदस्य संख्या निम्यापेक्षाही कमी असल्याने ग्रामपंचायत कायद्यानुसार रचना अपूर्ण राहिली. नवनिर्वाचित सदस्यांच्या हाती अद्याप कारभार दिला नाही, नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठकच कोरम अभावी न झाल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. पंचायत समिती प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले. जिल्हाधिकारी कार्यालयही हतबल ठरल्याने त्यांनीही निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शनासाठी धाव घेतली आहे.

दोन महिन्यापूर्वी इगतपुरी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांव सदो या ग्रामपंचायतींचाही समावेश होता. तेथे निम्यापेक्षाही कमी जागाही रिक्त राहिल्याने नवनिर्वाचित सदस्य मंडळाच्या हाती कारभार सोपविण्याबात कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कायद्यानुसार या तीनही ग्रामपंचायतीत रचना अपूर्ण राहिल्याने नवनिर्वाचित सदस्य मंडळाची पहिली सभा झालेली नाही अथवा घेता आलेली नाही. याबाबत तहसील व पंचायत समिती प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले आहे. पेच गंभीर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.

अस आहे ग्रामपंचायतींमधील घोळ

धारगाव

एकूण सदस्य संख्या - ९

निवडून आलेले सदस्य -३

रिक्त जागा- ६

सोमज

एकूण सदस्य संख्या - ७

निवडून आलेले सदस्य - ३

रिक्त जागा- ४

नांदगांव सदो

एकूण सदस्य संख्या - ११

निवडून आलेले सदस्य - ४

रिक्त जागा- ७

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंगसाठी 'गेट' परीक्षा अनिवार्य नाही

0
0

नाशिक:

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली गेट परीक्षा अनिवार्य असल्याचा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये होता. मात्र, अखिल भारतीय तंत्रिकी शिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईद्वारे परीक्षा अनिवार्य नसल्याचे परिपत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला असून त्यांना दिलासा मिळाला आहे.

इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम पूर्ण करताना एक्झिट परीक्षा म्हणून गेट बंधनकारक करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना गेट द्यावी लागणार अशी चर्चा गेल्या आठवड्यात सुरू होती. परंतु ही परीक्षा अनिवार्य नसल्याचे परिपत्रक तंत्रिकी शिक्षण परिषदेने नुकतेच जाहीर केले आहे. गेट परीक्षा एक्झिट नावाने घेतल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेत किमान गुण मिळवून उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला संबंधित विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळणार नव्हते. परंतु परिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसते आहे.

शासकीय अथवा खासगी क्षेत्रातील नोकरीसाठी गेट परीक्षा ग्राह्य धरली जाते. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून गेट स्पर्धेची काठीण्य पातळी आणि विद्यार्थ्यांचा इतर क्षेत्राकडील वाढता कल जास्त असल्याने परीक्षेला अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या वर्षांपासून इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी गेट परीक्षा एक्झिट म्हणून अनिवार्य करण्यात आल्याचा चर्चा आणि पोस्ट व्हायरल होत होत्या. परंतु तंत्रिकी शिक्षण परिषदेने गेट परीक्षा अनिवार्य नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून अनिवार्य होणाऱ्या गेट परीक्षेच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. परिषदेने जाहीर केलेल्या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे. सोशल मीडियावरदेखील परीक्षा अनिवार्य असल्याच्या पोस्ट आणि चर्चा होत असताना जाहीर झालेल्या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेट परीक्षा अनिवार्य असल्याची चर्चा कॉलेजमध्ये चालू होती. परंतु एआयसीटीईकडून परिपत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार अशी चिंता विद्यार्थ्यांना असताना एआयसीटीईच्या निर्णयामुळे विद्यार्थी समाधानी आहेत.
- हर्षद उकार, विद्यार्थी

दरवर्षी लाखो विद्यार्थी गेटला अर्ज करतात परंतु काठिण्यपातळीमुळे बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी किमान गुण मिळवून पास होतात. परंतु इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यावर बाहेर पडण्यासाठी गेट ही एक्झिट परीक्षा म्हणून घेणे अनिवार्य नाही, हा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. त्याऐवजी संबंधित दुसरी परीक्षा घेतली जावी.
- प्रा. हर्षल शेलार, संदीप विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता सेनेला युतीचा साक्षात्कार होईल

0
0

नांदेड : अयोध्येतील रामाच्या दर्शनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीबाबत साक्षात्कार होईल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. खासदार दानवे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आढावा बैठका घेत आहेत. सोमवारी नांदेड लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी दानवे म्हणाले, 'शिवसेना पक्षप्रमुखांनाही रामाच्या दर्शनांनतर युतीचा साक्षात्कार होऊ शकतो. युती होवो अथावा न होवो राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघात व २८८ विधानसभा मतदारसंघात पक्षाचे काम जोराने सुरू आहे. युती झाली नाही तर पक्षाला लोकसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा मिळतील असा दावा त्यांनी केला. युती झाली तर सर्वच्या सर्व जागांवर आमचा विजय होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वागत हाइट्स’ची विधानपरिषदेत लक्षवेधी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत ठरलेल्या 'स्वागत हाइटस्' या इमारतीचा विषय आता थेट ‌विधानसभा अधिवेशनात पोहचला असून, आमदार रामराव वडकुते यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सादर केली आहे. शहर अभियंता संजय घुगेंवर कारवाई का केली नाही, याबद्दलचा जाब पालिकेला शासनाकडून विचारण्यात आला आहे. इमारत अनधिकृत असेल तर, या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे उघड झाले असून कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंढेंनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का केली नाही, असा प्रश्न लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, स्वागत हाइट्स प्रकरणात सातपूर पोलिसांनी घुगेसह आहेर, खाडे यांना सहआरोपी केले असून, त्यांच्यासंदर्भातील माहिती पालिकेकडून मागवली आहे. त्यामुळे पालिकेसमोर पेच पडला आहे.

स्वागत हाइटस प्रकरण गेल्या वर्षभरापासून शहरात गाजत असून पालिकेने ही इमारत अनधिकृत ठरविल्यानंतर या इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. गेल्या महासभेत शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड आणि मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी सोमवारच्या महासभेत स्वागत हाइटसचा पाणीपुरवठा तोडल्यावरून महासभेत मुद्दा उपस्थित केला. नगररचना विभागाना रीतसर बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिला असताना दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न करता रहिवाशांवर कारवाईचा अट्टहास का असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तसेच या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या शहर अभियंता संजय घुगे, उपअभियंता सी. बी. आहेर, खाडे यांच्या चौकशीसाठी प्रभारी नगररचना सहाय्यक संचालक उदय धर्माधिकारी यांना नियुक्त केल्याचे सांगितले. त्यामुळे या तीन अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असतानाच स्वागत हाइटसचे प्रकरण आता थेट विधानपरिषदेत पोहचले आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सातपूर पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सातपूर पोलिसांत ९ नोव्हेंबर व २३ डिसेंबर २०१७ रोजी दोन गुन्हे दाखल आहेत. या इमारतींच्या बिल्डरांवर हे गुन्हे दाखल असून पोलिसांनी आता या प्रकरणात अधिकाऱ्यांचा सहभाग पाहता घुरे, खाडे, आहेर यांना सहआरोपी करून घेतले आहे.तसेच या तीनही अधिकाऱ्यांबाबत महापालिकेला पत्र लिहून त्यांच्या प्राधिकृत अधिकारासंदर्भात माहिती मागवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम पाळा, संकट टाळा!

0
0

praven.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

...

नाशिक : गिर्यारोहणाचा छंद जीवावर बेतू नये तसेच, निर्जनस्थळी संकटात सापडणाऱ्या गिर्यारोहकांना तात्काळ मदत पोहोचविता यावी याकरिता जिल्हा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सरसावले आहे. गिर्यारोहकांची सुरक्षा जपतानाच यंत्रणेची धावपळ टाळण्यासाठी प्राधिकरणाने आदर्श नियमावली बनविण्याचे काम हाती घेतले आहे. गिर्यारोहकांनी गिर्यारोहणापूर्वी स्थानिक प्रशासनासह ग्रामस्थांना प्राथमिक माहिती देणे त्यामध्ये अभिप्रेत असून, यामुळे जीवितहानी टाळणेही शक्य होणार आहे.

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेलेले २२ गिर्यारोहक कोकणकडा येथे एक हजार फूट खोल दरीत अडकून पडल्याचा प्रकार नुकताच घडला. या गिर्यारोहकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी तेथील प्रशासनाला एनडीआरएफची मदत घ्यावी लागली. पावसाळ्यात वसईजवळील एका गडावर काही गिर्यारोहक अडकून पडल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली होती. चांदवड (जि. नाशिक) येथे अमली किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याने पुण्यातील हेमेंद्र आदतराव या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता. हरिहर आणि पांडवलेणी येथेही असे प्रकार घडले आहेत.

थंडीत ट्रेकिंगचे प्रमाण वाढते. परंतु, ट्रेकिंग ठिकाणाची आणि संसाधनांची पुरेशी माहिती नसल्याने हे हौशी ट्रेकर्स अडचणीत सापडतात. मोबाइलला नेटवर्क न मिळणे, संपर्क साधण्यासह विविध अडचणींमध्ये भर पडते. अशा संकटग्रस्त ट्रेकर्सची ऐनवेळी माहिती मिळाल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागते. हेच प्रकार टाळण्यासाठी ट्रेकर्ससाठी आदर्श नियमावली बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ट्रेकर्स गिर्यारोहणाला जातील त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला त्याबाबत पुर्वसूचना देणे या नियमावलीनुसार अभिप्रेत आहे. त्यामध्ये संबंधित गावातील ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य इतकेच नव्हे तर ग्रामस्थ यापैकी कुणालाही ते माहिती देऊ शकतात. ट्रेकिंगसाठी जाणाऱ्यांची नावे, वय आणि पत्ता, ट्रेकिंगची कालमर्यादा याबाबतची प्राथमिक माहिती त्यांनी देणे या नियमावलीनुसार अपेक्षित आहे. याखेरीज ट्रेकर्सकडे संबंधित परिसरातील पोलिस स्टेशन, पोलिस चौकी, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला माहिती देण्याचा पर्यायदेखील उपलब्ध असणार आहे. ही माहिती मदत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असा विश्वास जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

...

फिटनेस प्रमाणपत्र गरजेचे

आदर्श नियमावलीत फिटनेस प्रमाणपत्राचा अंतर्भाव केला आहे. ट्रेक आयोजित करणाऱ्या अॅडव्हेंचर्स ग्रुपच्या प्रमुखांनी ट्रेकमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. संबंधिताचे नाव, पत्ता, फोन क्रमांक, फोटो यासह अर्ज महसूल विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलिस किंवा संबंधित गावातील स्थानिक प्रशासनाकडे जमा केल्यास संकटसमयी त्यांना आवश्यक ती मदत पोहोचविणे, जीवीतहानी टाळणे शक्य होऊ शकेल असा विश्वास आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.

...

..कोट..

ट्रेकिंगलाच नव्हे, तर कुठल्याही साहसी पर्यटनाला जाण्यापूर्वी संबंधितांनी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला माहिती देणे अपेक्षित आहे. त्यामुळेच आदर्श नियमावली बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

- रामदास खेडकर, मुख्य अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ आवारात शाळेचा बनावट दाखला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहनांचे बनावट वाहन विमा प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांमध्ये एकाने एम. ए. बीएडचे शिक्षण घेतले असून, हे त्रिकुट प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातच शहरातील कोणत्याही शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला देत होते, असे पोलिस तपासात निष्पण्ण झाले आहे.

अनू उर्फ सचिन बाबासाहेब साळवे (मल्हार बंगला, मखमलाबादरोड), शांतिला केरूजी निकम (५५, शिवरामनगर, टाकळीरोड) आणि राजू सगीर कादरी (३५, शिवरामनगर, टाकळीरोड) अशी या तिघा संशयितांची नावे आहेत. बनावट वाहन विमा प्रमाणपत्राचे प्रकरण सप्टेंबर २०१८ मध्ये उघडकीस आले होते. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम २५ सप्टेंबर २०१८ रोजी खटला विभागात खटल्यांचा निपटारा करीत असताना दोन वाहनांच्या विम्याबाबत शंका निर्माण झाली. कदम यांनी अधिक चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र, वाहनचालकांनी ज्या आरटीओ एजंट्सच्या माध्यमातून विमा घेतला ते फरार झाले होते. या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे संशयितांच्या मागावर असताना २४ नोव्हेंबर रोजी साळवे त्यांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, इन्शुरन्स कंपनी तसेच विविध सरकारी विभागाचे १६ रबरी स्टॅम्प, त्यासाठी लागणारे साहित्य, पेन ड्राइव्ह, वेगवेगळ्या कंपन्यांचे बनावट इन्शुरन्स, शाळा सोडल्याचे दाखले, बनावट रेशन कार्ड, एक मोपेड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कोर्टाने त्यास २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज कोर्टाने त्याच्या कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ केली. दरम्यान, साळवेकडे केलेल्या चौकशीत निकम आणि कादरी यांची नावे समोर आल्याने त्यांना आज, सोमवारी पंचवटी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आणखी मोठा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

बनावट दाखले आणि रेशनकार्ड

या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले की, शाळा सोडल्याचे बनावट दाखले आणि बनावट रेशनकार्ड संशयितांकडून हस्तगत करण्यात आले. आरटीओ आवारातच ते याचे वितरण करीत होते. हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, बनावट कागदपत्रांचे किती आणि कोणत्या वाहनचालकांना विकत देण्यात आले याचा तपास सुरू आहे. यातील साळवेने एमएबीडचे शिक्षण घेतले असून, आणखी बरेच प्रकार यामुळे समोर येतील, असे कड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images