म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाते हे गुंफलेले असते, ते कितीही उलगडण्याचा प्रयत्न केला तरी शेवटपर्यंत त्याचे मर्म कळत नाही, अशा नात्यांच्या आठवणी 'ऋतू आठवणींचे' नाटकातून उजळवण्यात आल्या. ५८ व्या राज्य नाट्य स्पर्धेत मंगळवारी कलाकुंभ बहुद्देशीय संस्थेच्या (फिल्मी कट्टा) वतीने 'ऋतू आठवणींचे' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या नाटकाचे लेखन पराग घोंगे यांनी तर दिग्दर्शन हेमंत गव्हाणे यांनी केले होते. पती-पत्नी, आई व प्रेयसी अशा चार पात्रांभोवती हे नाटक फिरते. प्रेयसीसाठी पती पत्नीला घटस्फोट देण्याची प्रक्रिया सुरू करतो. या दरम्यान हे चौघे जण एकमेकांना भेटत राहतात. या भेटीत त्यांना समोरची व्यक्ती तिच्या जागी कशी योग्य आहे, याची जाणीव होते. मात्र, तरी घटस्फोट होतो आणि आठवणींच्या कोलाजातून प्रत्येकाला घुसमट सहन करावी लागते, अशी नाटकाची कथा होती. या नाटकात महेश खैरनार, निशिगंधा घाणेकर, गायत्री पवार, मयूरी विसपुते यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य राजेश भालेराव, संगीत वेदांत हातवळणे, प्रकाशयोजना रवी रहाणे, रंगभूषा ललित कुलकर्णी यांची होती. मनोज नागपुरे, राजा पाटेकर, अरुण गिते, रफीक सय्यद, राजेश जाधव, संध्या दुबे, ज्ञानेश्वर वाघ, अमोल थोरात यांनी निर्मिती सूत्रधाराची जबाबदारी सांभाळली. आजचे नाटक लोकहितवादी मंडळाचे 'कळसुत्री' स्थळ : परशुराम साईखेडकर नाटगयृह वेळ : सायंकाळी ७ वाजता लोगो : राज्य नाट्य स्पर्धा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट