खडसेंना दणका; दमानियांना दिलासा औरंगाबाद : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. त्यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे माजी मंत्री खडसे यांना चांगलीच चपराक बसली आहे. अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबर २०१६ मध्ये जनहित याचिका दाखल केलेली होती. या याचिकेमध्ये त्यांनी श्री. खडसे यांचे चोपडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरील ९ कोटी ५० लाखाचा एक १० लाखांचा असे दोन डीडी जोडलेले आहेत. या संदर्भात नोटीस प्राप्त झाल्यावर श्री. खडसे यांनी, चौकशी केली असता हे डीडी खोटे असून, बनावट दस्तेवजआधारे तयार करण्यात आलेले आहेत. आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच हे करण्यात आले. हे बनावट डीडी आणि त्या संदर्भातील खोटा दस्तऐवज खरे असल्याचे भासवून खंडपीठात दाखल याचिकेमध्ये त्याचा उपयोग करण्यात आला. हे डीडी आरोपींनी कसे मिळविले, त्यांच्याकडे कसे आले याच्या तपासासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. मात्र गुन्हा नोंदविण्यास नकार देण्यात आल्यानंतर मुक्ताईनगर न्यायालयातून १५६ (३) अन्वये आदेश प्राप्त करवून फसवणूक, कटकारस्थान, बनावट दस्तऐवज तयार करणे आदी विविध कलमांखाली श्रीमती अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुऱ्हाडे, सदाशिव सुब्रमण्यम आणि चार्मीन फर्न्स यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.खोटे स्टँप्स बनवून फसवणूक केल्याचा आरोपही त्यात करण्यात आला. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अंजली दमानिया व अन्य पाच जणांविरुद्ध १३ जून २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 'शेल' कंपनीमधील पैसा हा मंदाकिनी खडसे आणि गिरीष चौधरी यांच्या खात्यात आला. याविषयीची संपूर्ण माहिती दमानिया यांनी याचिकेत दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिली होती. कुठलाही तपास न करता या विभागाने राजकीय दबावामुळे त्यांना व खडसे यांना या प्रकरणातून वाचविल्याचे याचिकेत म्हटले होते. दमानिया यांचा मानसिक छळ करण्यासाठीच १५ महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्दबात्तल करण्यात यावा, अशी विनंती दमानिया यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. जळगाव, नाशिक, धुळे, बुलढाणा, जालना आणि नंदूरबार या सहा जिल्ह्यांमध्ये अंजली दमानिया यांच्याविरुद्ध २८ अब्रू नुकसानीचे दावे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक गुन्हा ऑगस्ट महिन्यातच औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला होता. सोमवारी खंडपीठाने मुक्ताईनगरमध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. एकनाथ खडसे यांच्याविरुद्धचा लढा चालूच ठेवणार आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. या याचिकेत दमानिया यांनी स्वत:च आपली बाजू मांडली. अन्य पाच याचिकाकर्त्यांतर्फे विजय पाटील यांनी युक्तिवाद केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट