Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

खडसे दमानिया

0
0

खडसेंना दणका;

दमानियांना दिलासा

औरंगाबाद : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. त्यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे माजी मंत्री खडसे यांना चांगलीच चपराक बसली आहे. अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबर २०१६ मध्ये जनहित याचिका दाखल केलेली होती.

या याचिकेमध्ये त्यांनी श्री. खडसे यांचे चोपडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरील ९ कोटी ५० लाखाचा एक १० लाखांचा असे दोन डीडी जोडलेले आहेत. या संदर्भात नोटीस प्राप्त झाल्यावर श्री. खडसे यांनी, चौकशी केली असता हे डीडी खोटे असून, बनावट दस्तेवजआधारे तयार करण्यात आलेले आहेत. आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच हे करण्यात आले. हे बनावट डीडी आणि त्या संदर्भातील खोटा दस्तऐवज खरे असल्याचे भासवून खंडपीठात दाखल याचिकेमध्ये त्याचा उपयोग करण्यात आला. हे डीडी आरोपींनी कसे मिळविले, त्यांच्याकडे कसे आले याच्या तपासासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. मात्र गुन्हा नोंदविण्यास नकार देण्यात आल्यानंतर मुक्ताईनगर न्यायालयातून १५६ (३) अन्वये आदेश प्राप्त करवून फसवणूक, कटकारस्थान, बनावट दस्तऐवज तयार करणे आदी विविध कलमांखाली श्रीमती अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुऱ्हाडे, सदाशिव सुब्रमण्यम आणि चार्मीन फर्न्स यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.खोटे स्टँप्स बनवून फसवणूक केल्याचा आरोपही त्यात करण्यात आला. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अंजली दमानिया व अन्य पाच जणांविरुद्ध १३ जून २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 'शेल' कंपनीमधील पैसा हा मंदाकिनी खडसे आणि गिरीष चौधरी यांच्या खात्यात आला. याविषयीची संपूर्ण माहिती दमानिया यांनी याचिकेत दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिली होती. कुठलाही तपास न करता या विभागाने राजकीय दबावामुळे त्यांना व खडसे यांना या प्रकरणातून वाचविल्याचे याचिकेत म्हटले होते. दमानिया यांचा मानसिक छळ करण्यासाठीच १५ महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्दबात्तल करण्यात यावा, अशी विनंती दमानिया यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. जळगाव, नाशिक, धुळे, बुलढाणा, जालना आणि नंदूरबार या सहा जिल्ह्यांमध्ये अंजली दमानिया यांच्याविरुद्ध २८ अब्रू नुकसानीचे दावे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक गुन्हा ऑगस्ट महिन्यातच औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला होता. सोमवारी खंडपीठाने मुक्ताईनगरमध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

एकनाथ खडसे यांच्याविरुद्धचा लढा चालूच ठेवणार आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. या याचिकेत दमानिया यांनी स्वत:च आपली बाजू मांडली. अन्य पाच याचिकाकर्त्यांतर्फे विजय पाटील यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोफत पास, त्याला नियमांचा फास!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींअंतर्गत मोफत बससेवेचा लाभ दिला जाणार असून, नाशिक तालुक्याचाही त्यामध्ये समावेश आहे. या तालुक्यांना सरकारने देऊ केलेल्या सवलती लागू असतील, असा शासननिर्णय असला तरी नाशिक तालुक्यात समाविष्ट शहरातील विद्यार्थ्यांना मात्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोफत बसपासच्या सुविधेपासून दूर लोटले आहे. दोन सरकारी विभागांच्या समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.

दुष्काळी परिस्थितीपासून काहीसा दिलासा मिळावा याकरिता सरकारने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना आणि सवलती लागू केल्या आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २०१८-१९ च्या उर्वरित शैक्षणिक सत्राकरिता शिक्षणासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे याबाबतचे पत्र नाशिक विभागाला ५ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाले असून, शनिवारपासून (ता. २४) ही सवलत लागू करण्याची तयारी नाशिक विभागाने सुरू केली आहे. या सवलतीचा लाभ जिल्ह्यातील ५५ हजार विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

५५ हजार विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ

१८० दुष्काळी तालुक्यांसाठी राज्यात मोफत पास सवलत

२४ नोव्हेंबरपासून सवलत लागू करण्याची तयारी

सवलतीच्या निर्णयानंतर पडलेले प्रश्न

नाशिक तालुका दुष्काळी असताना या तालुक्यातील शहरी विद्यार्थ्यांना सवलत का नाही?

दुष्काळी तालुक्यातील नव्याने पास घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ का मिळू नये?

मोफत पासबाबत विद्यार्थ्यांत संभ्रम

दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिकचाही समावेश असल्याने शहरी विद्यार्थ्यांनाही मोफत बस प्रवासाची सवलत देणे अनिवार्य असल्याची भूमिका सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केली. मात्र, राज्यमार्ग परिवहन महामंडळाने ही मोफत बसपास सेवा शहरी बससेवेकरिता अनुज्ञेय नाही, असे परिपत्रकान्वये स्पष्ट केल्याने शहरी विद्यार्थ्यांना मोफत बसपास सेवेचा लाभ मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे, तर शहर वगळता नाशिक तालुक्यातील अनेक गावांपर्यंत शहर बस धावतात. या बसेस विद्यार्थ्यांची मोफत वाहतूक करणार की नाही, असा सवालही आता तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून उपस्थित होऊ लागला आहे.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खो स्पर्धेचे आयोजन

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा परिषद शाळा तोरंगण (हरसूल) यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद शाळा तोरंगण येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून जळगाव येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचा प्राथमिक संघ निवडण्यात येणार आहे ही स्पर्धा जिल्हा परिषद शाळा तोरंगण ( हरसूल ) येथे होणार असून स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अन्य पर्यायांचा अवलंब करण्याऐवजी आत्महत्येसारखा टोकाचा पर्याय जिल्ह्यातील शेतकरी अवलंबत आहेत. एकीकडे पाणीटंचाईमुळे शेती कसणे कठीण झाले असताना शेतकरी आत्महत्याही वाढू लागल्या आहेत. बागलाण, दिंडोरी व नांदगाव ही तीन तालुके शेतकरी आत्महत्येच्या घटनेने पुन्हा हळहळली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे चालू वर्षात ९२ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील परमोरी या गावातील रहिवासी विलास सुकदेव महाले (वय ४८) यांनी रविवारी सकाळी शेतामध्ये विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. गावात गट क्र. २२२ मध्ये त्यांचे सामाईक क्षेत्र आहे. दुसरी घटना बागलाण तालुक्यात घडली आहे. येथील टेंभे गावात अशोक उत्तम ठोके यांनी १६ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला सोमवारी (दि. २२) प्राप्त झाला. ठोके यांच्या नातलगांनी शवविच्छेदन न करताच अंत्यविधी केल्याचे बागलाण तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. तिसरी घटना नांदगाव तालुक्यातील पळाशी येथे घडली. योगेश नाना सांगळे (वय ३२) या शेतकऱ्याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही. मात्र, या घटनांबाबत जाबजबाब नोंदवून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेतीन लाख मिळकती अनधिकृत!

0
0

- महासभेत लक्षवेधी चर्चेत आयुक्तांचा दावा

- बांधकामे नियमितीकरणासाठी कंपाउंडिंगचा पर्याय

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील २ लाख ६९ हजार अनधिकृत मिळकतींबाबत आपण उच्च न्यायालयाला नव्हे, तर राज्य शासनाला अहवाल सादर केल्याची कबुली देत सर्वेक्षण झालेल्या ३ लाख २७ हजारांपैकी २ लाख ६९ हजार मिळकती अनधिकृतच असल्याचा पुनरुच्चार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेत केला. तसेच, हा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे सांगत या मिळकतींची पडताळणी करूनच कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. मिळकती नियमितीकरणासाठी कंपाउंडिंग पॉलिसीचा पर्याय इसून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ६२ हजार मिळकतींवर तब्बल १८ पट दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

नाशिकमधील चार लाख मिळकतींपैकी २ लाख ६९ हजार मिळकती अनधिकृत असल्याच्या बातमीवरून नाशिककरांची ऐन दिवाळीत झोप उडाली होती. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या महासभेत सभागृहनेते दिनकर पाटील व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावर लक्षवेधी प्रस्ताव सादर केला. सुमारे २.६९ लाख मिळकती शोधून काढल्याबद्दल उच्च न्यायालयाने आयुक्त मुंढे यांची पाठ थोपटल्याच्या सोशल मीडियावरील वृत्ताबाबत आक्षेप नोंदवत त्यांनी चर्चा घडवून आणली. अजय बोरस्ते यांनी हल्लाबोल करीत चुकीच्या सर्वेक्षणामुळे धार्मिक स्थळांवर जे संकट कोसळले तेच आता नाशिककरांच्या घरांच्या बाबतीत घडणार असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. नाशिक उद्ध्वस्त करण्याचा कट कदापि सहन केला जाणार नाही, असे सांगत जे सर्वेक्षणच पूर्ण झाले नाही त्या संदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करून स्वत:ची पाठ थोपवून घेण्याचा प्रताप आयुक्तांनी कसा केला, असा सवाल बोरस्ते यांनी केला. यावर स्पष्टीकरण देताना मुंढे यांनी आपण उच्च न्यायालयात नव्हे, तर शासनाला अहवाल सादर केला असून, मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या बाबी अहवालाद्वारे शासनासमोर मांडल्याचे स्पष्ट केले. पुढे हा अहवाल शासनाने न्यायालयाला सादर केला का, याविषयी आपल्याला माहिती नसून, वापरात परस्पर बदल अथवा मंजूर लेआउटपेक्षा अतिरिक्त बांधकाम आढळल्यानेच या २ लाख ६९ हजार मिळकती एमआरटीपी कायद्याने निर्धारित केलेल्या अनधिकृत बांधकामांच्या व्याख्येनुसार अनधिकृत ठरल्याचा दावा केला.

मनपा हद्दीतील खेडे भागातील ग्रामपंचायत काळातील बांधकामे आता अनधिकृत कशी ठरविणार, असा प्रश्न उध्दव निमसे यांनी उपस्थित केला. पंडित आवारे यांनी गुंठेवारीतील बांधकामांचा मुद्दा मांडला. उच्च न्यायालयात अहवाल सादर केला नव्हता, तर त्या संदर्भातील वृत्त फेसबुकला टॅग कसे केला असा सवाल दिलीप दातीर यांनी केला. कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे, मनसे गटनेते सलिम शेख, कल्पना पांडे, दीपक दातीर, सुदाम डेमसे, अजिंक्य साने, ॲड. श्यामला दीक्षित, संतोष गायकवाड आदी सदस्यांनी चुकीच्या सर्वेक्षणाद्वारे थेट कारवाई चुकीची असल्याचे नमूद केले. उच्च न्यायालयात अहवाल सादर केला नव्हता, तर चुकीच्या वृत्ताचा ट्विट का केले, असा सवाल सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केला. चुकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा आसूड ओढणारे आयुक्त स्वत:च्या चुकीबाबत स्वत:वर काय कारवाई करणार, असा जाब विचारत मुंढेंची कोंडी केली.

--

मनपा मुख्यालयही अनधिकृत का?

सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मिळकतींवरून प्रशासनाचीच कोंडी केली. वापरात बदल आणि अतिरिक्त बांधकामामुळे शहरातील २.६९ लाख बांधकामे अनधिकृत ठरले आहेत. यावर मनपा मुख्यालयाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कधी मिळाला आणि त्यात बदल केले नाहीत काय असा सवाल पाटील यांनी केला. सन १९९३ मध्ये बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेल्या महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन तसेच, पंडित कॉलनीतील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या इमारतीतही गेल्या काही वर्षांत अनेक बदल घडले आहेत, मग या इमारतीही अनधिकृत ठरविणार का, असा मूलभूत प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. यावर प्रशासन मात्र निरुत्तर झाले.

...

जागृतीसाठी ट्विट केले!

उच्च न्यायालयाने आयुक्तांची पाठ थोपटल्याचे वृत्त चुकीचे होते, तर त्यास ट्वीट कसे केले, असा सवाल दिनकर पाटील, दिलीप दातीर आदी सदस्यांनी केला. यावर उच्च न्यायालयाबाबतच्या वृत्ताला नव्हे तर अनधिकृत बांधकामांबाबत नाशिककरांना जागृत करण्यासाठी आपण ट्वीट केल्याचा खुलासा करून मुंढेंनी यावेळी वेळ मारून नेली.

...

महापौरांनी घेतला बदला

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आयुक्त तुकाराम मुंढे यांना बोलावून देखील ते आपल्या शेजारी उभे राहिले नाहीत, उलट हात झटकून रूसून का बसले, अशी विचारणा सभागृहनेते दिनकर पाटील यांनी सभागृहात केली. यावर आपण येण्यापूर्वीच प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला गेला होता. पदाधिकाऱ्यांनी आपली वाट का बघितली नाही, असा प्रतिप्रश्न आयुक्त मुंढे यांनी प्रोटोकॉलची आठवण करून दिली. यावर नेहरू उद्यानात आयोजित कार्यक्रमात पदाधिकारी आयुक्तांची वाट पाहत थांबले होते. आयुक्त आले परंतु थेट उद्यान बघण्यासाठी निघून केले. त्यामुळे आज आयुक्तांची वाट न पाहता प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

...

आयुक्तांचा दावा

- २.६९ पैकी १ लाख मिळकतींमध्ये परस्पर वापरात बदल केल्याचे आढळले आहे.

- १.२५ लाख मिळकतींमध्ये ३० चौ. मी. पेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम झाले आहे.

- या मिळकतींच्या वापरात बदलाची मनपाकडून रितसर परवानगी घेणे तसेच, कंपाउंडिंग पॉलिसीत प्रस्ताव दाखल करण्याशिवाय पर्याय नाही.

- नगररचना विभागामार्फत या मिळकतींची फेरपडताळणी केली जाणार असून, त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

...

महापौरांच्या सूचना

- करलागू नसल्याचे आढळलेल्या ६२ हजार मिळकतींवर कारवाई करण्यास हरकत नाही.

- इमारतीतील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सदनिकाधारकांवरच कारवाई केली जावी, त्यासाठी संपूर्ण इमारत अनधिकृत ठरवली जाऊ नये.

- सिडकोतील रहिवाशांना न्याय दिला जावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाही जाता आले पंढरी म्हणून आलो त्र्यंबकेश्वरी’

0
0

त्र्यंबकेश्वर : 'नाही जाता आले पंढरी म्हणून आलो त्र्यंबकेश्वरी' असे म्हणत शेकडो वारकऱ्यांनी संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीवर माथा टेकत समाधीच्या बाजूस असलेल्या विठ्ठलरखमाईच्या चरणांचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर येथे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारकरी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतल्यानंतर गर्भगृहात समाधीच्या पाठीमागे विठ्ठल रखमाईचेही दर्शन घेतले. संत निवृत्तिनाथ मंदिराचा जिर्णोद्धार सुरू आहे. पाषाणातील मंदिर साधरणत: पाच सहा फुटापर्यंत बांधले गेले आहे. पूर्वीचे समाधी मंदिर आहे तसे ठेवून बाजूने घडीव नक्षीदार दगड लावण्याचे काम सुरू आहे. दरम्यान कुशावर्तावर स्नानासाठी आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनसाठी भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परफेक्ट मर्डर’मधून वाईट प्रवृत्तीचा नाश

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एका परफेक्ट किलरकडे एकाला मारण्याची दिलेली सुपारी, त्या किलरकडून सुपारी देणारालाच लागलेली गोळी, त्यातून त्याच्या टार्गेटने तेथे त्याला दिलेली दुसरी एक सुपारी आणि किलरला दुसऱ्या टार्गेटविषयी जडलेले ममत्वाचे नाते अशा गुंतागुंतीचे नाटक होते 'द परफेक्ट मर्डर'. राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी हे नाटक सादर झाले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे.

बाईसाहेबांकडे गडगंज संपत्ती आहे, तब्बल ५० एकर शेतीवाडी, बागायत, बागबगीचे असलेल्या आई-वडिलांच्या इस्टेटीची एकमेव वारस बाईसाहेब; परंतु तिचा नवरा श्रीमंत प्रचंड उधळपट्टी करणारा, पैसे उधळणारा, दारू याचा शौकीन असतो. त्याला बाईचाही नाद लागलेला असतो. श्रद्धा तिचे नाव. एकदिवस त्याच्या त्रासाला कंटाळून ही श्रद्धा तिचा मित्र किलर यशवंत याला श्रीमंतच्या खुनाची सुपारी देते. यशवंतला स्वत:च्या डोक्याने खून करू नको, असे सांगत ती तिचा प्लॅन बनवते. तो आपण परफेक्ट मर्डर दाखवू, असे त्याला सांगते. मात्र, प्रत्यक्ष खुनाच्या दिवशी यशवंतकडून श्रीमंतसाठी सुटलेली गोळी श्रद्धालाच लागते. ते पाहून श्रीमंत आपल्या बायकोला, बाईसाहेबला मारण्याची सुपारी यशवंतला देतो. यशवंत किलरच असतो, त्याला फक्त पैसा हवा असतो. त्यामुळे तो होकार देतो. यशवतचे श्रीमंतच्या घरी येणे जाणे सुरू होते; परंतु ही बाईसाहेब त्याच्या आईच्या वयाची असल्याने दोघांमध्ये मायलेकराचे नाते निर्माण होते. ती यशवंतला दत्तक घेण्यासाठी मृत्युपत्र करते. ते श्रीमंतला पटत नाही. श्रीमंत बाईसाहेबांसाठी डोकेदुखी असते. यातून यशवंतच मार्ग काढतो. त्याचे बाईसाहेबशी नाते घट्ट झालेले असते, तो त्यांची सेवा शुश्रुषा करतो. एक दिवस बाईसाहेबांचा खून होतो. श्रद्धा अचानक उगवते. पुढे श्रीमंत कुणाकुणाचा काटा काढावा म्हणून चरफडतो, अशा आशयाची 'द परफेक्ट मर्डर'ची कथा होती.

नाटकाचे लेखन सुधाकर गाढवे यांचे तर दिग्दर्शन सुनील गायकवाड यांचे होते. नेपथ्य व प्रकाशयोजना ईश्वर जगताप, पार्श्वसंगीत भूषण भावसार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा निशा काठवटे यांचे होते. रंगमंच सहाय्य रविकांत शार्दुल यांचे होते. या नाटकात मिलिंद गायकवाड, सुनिता भगत, पुष्पेंद्र जाधव व हेमांगी ठाकूर यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

पराग घोंगे लिखित 'ऋतु आठवणींचे'

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

लोगो : राज्य नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाच्या जखमेवर अवकाळीचे मीठ

0
0

दिंडोरी, चांदवड, सिन्नर, निफाड परिसरात वादळी पाऊस

टीम मटा

दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाच्या जखमेवर सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: मीठ चोळले आहे. निफाड, दिंडोरी, सिन्नर, चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणो जपलेल्या द्राक्षबागा, कांदा, टोमॅटो आदी पिकांना या अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. रब्बी पिकांना या पावसाचा फायदा होणार असला तरी त्यांचे क्षेत्रफळ खूपच कमी आहे.

दिंडोरीत बागांमध्ये पाणी

दिंडोरी : पंधरा दिवसात तालुक्यात बेमोसमी पावसाने दुसऱ्यांदा अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी तालुक्यातील वरखेडा, तळेगाव, कोराटे, ढकांबे, खडक सुकेने, चिंचखेड, जोपुळ, पालखेड, निळवंडी, पाडे, लखमापूर, दहेगाव, ओझे, परमोरी, कादवा कारखाना, वणी, बोपेगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने पोंगा व फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

द्राक्षमणी गळणार!

निफाड : तालुक्यातील शिवडी, शिवरें, कुंदेवाडी, रसलपूर या गावांसह गोदाकाठ भागातील म्हाळसाकोरे, चांदोरी, चितेगाव, पिंपळस, कसबेसुकेणे, करंजी, ओझर, पिंपळगाव परिसरातही वादळी पाऊस झाला. वादळवारा आणि विजांच्या कडकडाट झालेल्या या बेमोसमी पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. पाऊस सुरू होताच निफाड शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात काळोख पसरला होता. सुमारे अर्धा तास निफाड शहरात पाऊस झाला. थोडावेळ थांबल्यानंतुर पुन्हा अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांवर विपरित परिणाम होणार आहे. फुलोरा अवस्थेतील द्राक्षमण्यांची गळ होण्याचा धोका वाढला आहे. पावसाचे पाणी द्राक्षघडांत साठून घडकुज वाढण्याची भीती आहे.

मनमाडमध्ये जोरदार सरी

मनमाड : सोमवारी सायंकाळी मनमाड शहरासह नांदगाव परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सोमवारी सायंकाळी मनमाड शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी साडे पाच वाजता अर्धा तास पाऊस झाला. या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सात वाजेनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरातील विद्युतपुरवठा खंडित झाला. मनमाड शहर व परिसरात पाऊस झाला मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी परिसरात फारसा पाऊस झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या प्रज्ज्वलला उपविजेतेपद…

0
0

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आसामच्या तेजपूर येथे जालेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्ज्वल सोनावणेने १३ वर्षी गटात एकेरी प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करित रौप्यपदक पटकावले.

प्रज्ज्वलला उप-उपांत्यपूर्व फेरीत आसामच्या अनिमेश गोगईने चांगली लढत दिली. प्रज्ज्वलने या सामन्यातील पहिला सेट २७-२५ असा जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये प्रज्ज्वलला ११-२५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये त्याने संयमाने खेळ करून निर्णायक तिसरा सेट २५-१५ असा जिंकून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत प्रज्ज्वलने उत्तराखंडच्या अंश नेगीचा २१-०७ आणि २१ - १५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना महाराष्ट्रातील ठाण्याच्या ओम गोवंडी सोबत त्याचा सामना रंगला. या सामन्यात पहिला सेट ओम गोवंडीने २१-१५ अशा फरकाने जिंकून आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये प्रज्ज्वलने जोमाने खेळ करून हा सेट २१-१६ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. परंतु तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये ओम गोवंडीने प्रथमपासून सावध खेळ करून हा सेट २१-१४ असा जिंकून विजेतेपद मिळविले. नाशिकच्या प्रज्ज्वलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ओम गोवंडी आणि प्रज्ज्वल सोनावणे हे दोघेही दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून एकत्र खेळतात.

प्रज्ज्वलने याआधी गेल्या महिन्यात गुंटूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. प्रज्ज्वल गेल्या सात वर्षांपासून नाशिकच्या शिवसत्य मंडळात प्रशिक्षक मकरंद देव यांच्याकडे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे. प्रज्ज्वलच्या या यशाबद्दल नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव अनंत जोशी, उपाध्यक्ष एस. राजन, डॉ. शिर्मिला कुलकर्णी, फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ आदिंनी अभिनंदन केले.

येत्या २२ नोव्हेंबरपासून कडप्पा (आंध्र प्रदेश) येथे आयोजित राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रज्ज्वल सहभागी होणार आहे. प्रज्ज्वल या स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे.

--मकरंद देव, प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूळव्याधीसंदर्भातील गैरसमज होणार दूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्ल्ड पाइल्स डेनिमित्त महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आज, मंगळवारी (दि. २० नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजता शंकराचार्य हॉल, गंगापूररोड या ठिकाणी 'मूळव्याध आजार समज व गैरसमज' या विषयावरील सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. एस. आर. रायते आणि एस. एम. पाटील हे असून, डॉ. ज्ञानेश निकम हे 'मूळव्याध आजार समज व गैरसमज' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी उपस्थितांना थेट डॉक्टरांना आपले प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईदों की ईद उद्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इस्लामी कालगणनेनुसार ईद-ए-मिलाद अर्थात, ईदों की ईद बुधवारी (दि. २१) साजरी केली जाणार आहे. ईदनिमित्त शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते. त्यामुळे या ईदला ईदों की ईद असेही म्हटले जाते.

ईद-ए-मिलाद दिनदर्शिकेमध्ये आज, मंगळवारी (दि. २०) ईद दाखविण्यात आली आहे. परंतु, मुस्लिम कालगणनेनुसार ईद-ए-मिलाद बुधवारी (दि. २१) साजरी होणार आहे. बुधवारी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी होणार असल्याची माहिती शहर-ए-खतीब हाफिज हिस्सामुद्दीन खतीब यांनी दिली. इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्म ५ वाजून २८ मिनिटांनी झाला, त्यामुळे ५ वाजून ३० मिनिटांनी सलामपठण होणार आहे. घरोघरी खीर व पुरीचे वाटप केले जाणार आहे. ईद-ए-मिलादनिमित्त दुपारी ३ वाजता भद्रकाली परिसरातील चौक मंडई ते बडी दर्गा या मार्गावर जुलूस काढण्यात येणार आहे. यामध्ये मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. जुलूसमध्ये कोणत्याही मंडळाने डीजे वाजवू नये. जुलूसमध्ये सहभागी होताना इस्लामी पगडी आणि टोपी परिधान केलेली असावी, असे शहर-ए-खतीब यांनी सांगितले आहे. इस्मालच्या शिकवणीनुसार जुलूसनिमित्त सर्वत्र सुख-शांती नांदावी, मानवांची सर्व त्रासापासून सुटका व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. ईदचा उत्साह मुस्लिम बांधवांमध्ये दिसून येत आहे. भद्रकाली परिसरात सर्व ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, परिसरातील कपडे, मिठाईची दुकानेदेखील सजल्याचे दिसून येत आहे.

--

\Bकॉलेजेसलाही उद्या सुटी

\Bदिनदर्शिकेमध्ये ईद-ए-मिलादची शासकीय सुटी मंगळवारी दाखविली आहे. मात्र, ईद बुधवारी साजरी होणार असल्याने शहरातील कॉलेजेसनी बुधवारी सुटी देऊ केली आहे. त्यामुळे आज, मंगळवारी शहरातील सर्व कॉलेजेसचे कामकाज सुरू असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बीचेही सर्वेक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणीटंचाईमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका रब्बी हंगामातील पिकांनाही बसण्याची शक्यता असून रब्बी पिकांच्या लागवडीशी संबंधित प्राथमिक स्वरूपाची माहिती सादर करा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात पिक घेणाऱ्या जिल्ह्यातील २८३ गावांची माहिती संकलित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

खरिपातील पिके करपून गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर करून आठ प्रकारचे लाभ लागू केले आहेत. जिल्ह्यात आठ तालुके आणि १७ महसुली मंडळांमधील शेतकरी वर्गाला या आठ सवलतींचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात जमिनीतील ओलीवर घेतलेल्या रब्बी पिकांनाही दुष्काळी परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने रब्बी हंगामाशी संबंधित आताची आणि यापूर्वीच्या काही वर्षांची माहिती सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात १० तालुक्यांमधील २८३ गावे रब्बीची आहेत. या गावांमधील पिक लागवडीची प्राथमिक माहिती गोळा करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात रब्बीतील दुष्काळी गावांनाही दुष्काळी सवलती लागू केल्या जाण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

चारा वाहतुकीस बंदी

दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाली असून ही तीव्रता येत्या काळात अधिक वाढत जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्यातील पशुधनास पुरेसा ठरेल की नाही, याबाबतची साशंकता आहे. यातच जिल्ह्यातून परराज्यात चाऱ्याची वाहतूक सुरू असल्यास कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत संबंधितांना नोटीस बजावणेही प्रशासनाला कठीण होऊन बसणार आहे. म्हणूनच जिल्ह्यातील शिल्लक अहवाल परराज्यात जाऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्ह्यातून चारा वाहतुकीस बंदी घातली आहे. पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला मज्जाव करण्यात आला असून ग्रामीण पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभाग, कृषी विभाग आदींना योग्य कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समिती १६ सदस्यांचीच

0
0

प्रशासनाचा नऊ सदस्य निवडीचा प्रस्ताव महासभेने फेटाळला

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने महासभेत दुसऱ्यांदा ठेवलेल्या नऊ सदस्यीय शिक्षण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव महासभेने फेटाळून लावला असून, शिक्षण समिती ९ ऐवजी १६ सदस्यांची करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासनासाठी ही मोठी चपराक मानली जात आहे.

नगरसचिव विभागाच्या वतीने २६ ऑक्टोबरच्या महासभेत शिक्षण समितीसाठी ९ तर, वृक्षप्राधिकरण समितीच्या ७ सदस्य निवडीचा प्रस्ताव सादर केला होता. या महासभेत शिक्षण समितीच्या सदस्य निवडीचा प्रस्ताव आल्यानंतर नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी सदरचा प्रस्ताव चुकीचा ठरवत गेल्या वेळेस १६ सदस्य असताना आता नऊच सदस्य का, असा सवाल केला. त्यावर नगरसचिवांना व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. समितीचा प्रस्ताव विखंडित झालेला नसताना नऊ सदस्यांची घाई का, असा सवाल करीत तो मागे घेण्याची मागणी केली. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी महापालिकेचा ठराव अस्तित्वात असल्याचे सांगितले. त्यामुळे ९ सदस्य आले कुठून असे सांगत भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली. त्यावर नगरसचिवांनी महासभेत लेखी देत सदरील प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोमवारच्या महासभेत नगरसचिवांकडून पुन्हा शिक्षण समिती ही ९ सदस्यांचीच करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी पुन्हा आक्षेप घेतला. महासभेचा ठराव क्र. ६३ हा विखंडित झालेला नसताना आणि शिक्षण समितीचा जुनाच ठराव कायम असताना समिती १६ ऐवजी ९ सदस्यांची का, असा सवाल केला. त्यावर प्रशासनाच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढेंनी शिक्षण मंडळ स्थापन करता येणार नाही असे सांगत कलम ३० व मनपा अधिनियम १९९० नुसार समिती ही ९ सदस्यांचीच राहणार असा दावा केला. त्यावर बग्गा यांनी समिती १६ सदस्यांची असावी व कार्यकाल हा अडीच वर्षाचा असावा हा ठराव शासनाने निलंबित केला आहे. परंतु, हायकोर्टाने या निलंबनाला स्थगिती दिली असल्याने १६ सदस्यांचा ठराव कायम आहे. तसेच, कलम ३०/७ नुसार समितीच्या नियमावलीत बदल करण्याचा अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला. समितीच्या सदस्य संख्येवरून मुंढे आणि बग्गा यांच्यात महासभेत नियमावरून जुगलबंदी रंगली. अखेर समिती ९ सदस्यांची केली तर, आपण कोर्टात जाऊ असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील, उद्धव निमसे, सलिम शेख यांच्यासह सर्वपक्षीय सदस्य १६ जणांच्या समितीवर ठाम राहिले. मुंढे नऊ जणांच्या समितीवर शेवटपर्यंत ठाम राहिले. सभागृहाचा कल लक्षात घेत महापौरांनी प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावत समिती ९ ऐवजी १६ सदस्यांची करण्याचे निर्देश देत दोन दिवसात तौलनिक संख्याबळानुसार नावे जाहीर करण्याची घोषणा दिली. त्यामुळे आता प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

...

प्रशासनावर हल्लाबोल

- शाहू खैरे : शिक्षण समितीच्या निर्णयात महासभेचा अधिकार डावलला जात आहे.

- शिवाजी गांगुर्डे : प्रत्येक वेळी आयुक्त म्हणतील तोच कायदा चालणार नाही.

- गजानन शेलार : शिक्षण समिती १६ सदस्यांची करून टाका, प्रशासन चूक की बरोबर ठरवत बसेल.

- अजय बोरस्ते : प्रशासनाने गोलमाल उत्तर देण्याऐवजी शिक्षण समितीबाबत स्पष्ट भूमिका मांडावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षप्राधिकरणाचा अर्हता प्रस्ताव फेटाळलाआता नगरसेवकांची वर्णी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेत शिक्षण समितीप्रमाणे वृक्षप्राधिकरण समितीच्या प्रस्तावावरही सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. वृक्ष समितीवर बीएस्सी (अॅग्री) पदवी अर्हताधारक सदस्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव होता. परंतु, या प्रस्तावावरही सदस्यांनी आक्षेप घेतला. शैक्षणिक अहर्तेच्या अटीवरही नगरसेवकांनी शंका उपस्थित करीत प्रशासनाकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप केला. उद्यान विभागाने अटी शर्थींचा पाढा महासभेसमोर वाचला. परंतु, महापौरांनी शिक्षण समितीप्रमाणेच प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावत वृक्षप्राधिकरण समितीवरही नगरसेवकांमधून सात सदस्य पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार देण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रशासनाला या प्रस्तावातही बॅकफूटवर यावे लागले आहे.

..

आयुक्त मुंढे यांची चिडचिड

शिक्षण समिती व वृक्षसमिती प्रस्तावावरून सदस्यांनी वारंवार खुलासा करण्यास भाग पाडल्याने संतप्त झालेल्या मुंढे यांनी आतापर्यंत एकाच विषयावर तीन वेळा खुलासा केला आणखी किती वेळा खुलासा करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. परंतु, सदस्यांचे समाधान होईपर्यंत खुलासा करावा लागेल, असे महापौरांनी बजावले. त्यामुळे मुंढे यांनी खुलासा देण्यावरून चिडचिड झाली. खुलासा करण्याबाबत तुम्ही कमीपणा वाटू देऊ नका, असे दिलीप दातीर यांनी सांगत महापौर पीठासन अधिकार असल्याची आठवण मुंढे यांना करून दिली.

...

महासभेत डॉ. कलाम यांची प्रतिमा

महासभेच्या सभागृहात माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांची प्रतिमा लावण्याची मागणी अपक्ष नगरसेवक मुशीर सैय्यद यांनी केली होती. देशातील माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या प्रतिमा सभागृहात लावण्याची परंपरा आहे. मुशीर यांच्या प्रस्तावाला सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्तेंसह सर्व गटनेत्यांनी महासभेत मंजुरी दिली होती. त्यामुळे सोमवारच्या महासभेत मुशीर सैय्यद यांनी महापौरांना डॉ. अब्दुल कलाम यांची प्रतिमा भेट दिली. त्यामुळे महासभेत अन्य नेत्यांच्या सोबतीला आता डॉ. कलाम यांची प्रतिमाही महासभेत लावण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबार

0
0

गोळीबारात तिघे जखमी

जबलपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री जबलपूर पूर्व मतदारसंघात भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. या दरम्यान झालेल्या गोळीबारात तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या मतदारसंघातून काँग्रेसचे लखन घनघोरिया आणि भाजपचे आंचल सोनकर रिंगणात आहेत. रविवारी रात्री मतदारांना साड्या वाटण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाचे एक पथक तपासासाठी आले होते. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता दोन गटात दगडफेक व गोळीबार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फूटसाल स्पर्धेत पुणे, पालघर विजेते

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फुटसाल असोसिएशन ऑफ नाशिक आणि के. एन. डी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात आयोजित मिनी आणि सब ज्युनियर गटाच्या फूटसाल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे आणि पालघर संघांनी विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत २२ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धा प्रथम साखळी आणि नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात आल्या. या स्पर्धेत मिनी गटात पालघरच्या संघाने अंतिम लढतीत पुण्याचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर सब ज्युनियर गटात पुण्याच्या संघाने जोमाने खेळ करून अंतिम लढतीत ठाण्याचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर तथा नगरसेवक अशोक मुर्तडक, माजी स्थायी समिती सभापती राहुल ढिकले, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, नगरसेवक अनंता सूर्यवंशी, अशोक दुधारे, आनंद खरे, नितीन हिंगमिरे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत विजयी, उपविजयी संघांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक चषक, मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धाचा अंतिम निकाल

१४ वर्षे मुले

पुणे - प्रथम क्रमांक

ठाणे - दुसरा क्रमांक

१२ वर्षे मुले

पालघर - प्रथम क्रमांक

पुणे - दुसरा क्रमांक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंड भरतोय रिक्षावाला...

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेटसक्तीच्या कारवाईची धामधूम संपवीत शहर पोलिसांनी सोमवारी बेशिस्त रिक्षाचालकांकडे मोर्चा वळविला. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या कारवाईनंतर पोलिसांनी शहरातील २६ ठिकाणांवर तब्बल १७०० रिक्षाचालकांवर कारवाई करीत सुमारे चार लाखांचा दंड वसूल केला. पोलिसांची कारवाई सुरू होताच रस्त्यांवरील रिक्षांची चाके दुपारपर्यंत थंडावली होती.

हेल्मेटसक्तीच्या कारवाईबाबत कडक भूमिका घेणाऱ्या शहर पोलिसांनी १३ पोलिस स्टेशन हद्दीतील प्रत्येकी दोन अशा २६ ठिकाणी नाकाबंदी केली. अगदी बॅरिकेडिंग करीत येणाऱ्या प्रत्येक रिक्षांची तपासणी करण्यात आली. नेहमीप्रमाणे ही कारवाई दुचाकीचालकांवर होईल, असा अंदाज वर्तविला जात असताना पोलिसांनी रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली. रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक रिक्षा थांबवून कागदपत्रे, गणवेश, बॅच, फ्रंट सीट अशी कसून तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईची माहिती मिळताच शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रिक्षा बेपत्ताच झाल्या होत्या. शालिमार, नाशिकरोड, द्वारका अशा नेहमी वर्दळीच्या ठिकाणीसुद्धा प्रवाशांना रिक्षा सापडेनाशा झाल्या होत्या. सीबीएस ते सिडको, सातपूर, पंचवटीतील निमाणी, गंगापूररोड, द्वारका ते पाथर्डी या रस्त्यांवर याचा विशेष परिणाम जाणवला. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, २५० कर्मचारी व वाहतूक विभागाचे १० अधिकारी व २२५ वाहतूक पोलिस या कारवाईत सहभागी झाले होते. सतत दोन दिवस दंडात्मक कारवाईला सामोरे जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनी सोमवारी रिक्षावर कारवाई सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले.

--

साठ रिक्षा केल्या जप्त

या कारवाईदरम्यान पोलिसांनी एक हजार ७६८ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून तीन लाख ९२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. कागदपत्रे अथवा थेट फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या ६० रिक्षा ताब्यात घेण्यात आल्यात. जप्त करण्यात आलेल्या रिक्षांवर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे. दरम्यान, सोमावरी सायंकाळच्या सुमारास फक्त वाहतूक शाखेनेसुद्धा रिक्षाचालकांवर कारवाई केली.

--

कारवाई सुरूच राहणार

सोमवारी फक्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. अशी कारवाई आज, मंगळवारी (दि. २०)देखील होण्याची शक्यता असून, फक्त रिक्षाच नव्हे, तर हेल्मेट व सीट बेल्ट वापराकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनासुद्धा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सर्वच वाहनधारकांनी या नियमांचे पालन करीत दंडात्मक कारवाई होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

०००००००

नाशिकरोडला पळताभुई थोडी

नाशिकरोड : शहर वाहतूक शाखा क्रमांक चारतर्फे नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या कारवाईत एकूण ४०० रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे बेशिस्त रिक्षाचालकांना पळताभुई थोडी झाली होती. याशिवाय दंडात्मक कारवाईला न जुमानणाऱ्या २० रिक्षाचालकांच्या रिक्षा वाहतूक शाखेने ताब्यात घेतल्या असल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक संजय बांबळे यांनी दिली. या कारवाईत नाशिकरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे प्रभाकर रायते यांच्यासह तिन्ही पोलिस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.बहुतेक रिक्षाचालकांनी दंडात्मक कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली. काही रिक्षाचालकांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याचेही टाळले. फंटसीट प्रवासी वाहून नेणे, गणवेश नसणे, परवाना नसणे, परमिट नसणे, गाडीची कागदपत्रे नसणे, विमा नसणे आदींसारख्या कारणांखाली रिक्षाचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

०००

देवळालीत रिक्षा 'गायब'

देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प परिसरात रिक्षांच्या तपासणी मोहिमेत कागपत्रे, लायसन्स, बॅच, गणवेश आदींची तपासणी करण्यात आली. सहा नंबर नाका येथे राबविलेल्या मोहिमेत ६२ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येऊन १३ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. या कारवाईमुळे अनेक रिक्षाचालकांनी दुपारपर्यंत आपल्या रिक्षा रस्त्यांवर आणल्याच नाहीत. या कारवाईत सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संपत लोंढे, उपनिरीक्षक अंकुश जाधव,दिलीप पवार वाहतूक शाखेचे धनराज दार्मुल्य, गौरव साळवे,नितीन साळुंखे, सुदाम झाडे आदींसह दहा कर्मचारी सहभागी झाले होते.

--

खाकीतील माणुसकीचे दर्शन

रिक्षांवरील कारवाईदरम्यान येथील सहा नंबर नाका परिसरात तपासणीसाठी उभे असलेले सहाय्यक निरीक्षक संपत लोंढे, उपनिरीक्षक अंकुश जाधव यांना एका रिक्षातून वृद्ध आजारी व्यक्तीस दवाखान्यात नेले जात असल्याचे आढळले. त्यांनी संबंधित रिक्षाचालकाला दंड न आकारता उपचारांसाठी लवकर जात यावे म्हणून तातडीने सोडून दिल्याने खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन यावेळी घडले.

000000

सातपूरला पोलिसांशी हुज्जत

सातपूर : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता रिक्षाचालकांनादेखील पोलिसांनी लक्ष्य करीत धडक कारवाई सुरू केली आहे. सातपूर परिसरात विशेष मोहिमेत विनापरवानाधारक, बॅच नसलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली कारवाईदरम्यान अनेक रिक्षाचालकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शांतेत सांगत कारवाई तुमच्या

सुरक्षेसाठी असल्याचे समजूत काढून सांगितले. त्र्यंबकेश्वररोड या मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी पोलिसांकडून रिक्षांची तपासणी करण्यात आली.

0000

सिडकोत १६३ जणांवर कारवाई

सिडको : हेल्मेट व सीट बेल्टची कारवाई झाल्यानंतर अंबड पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करून सुमारे ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. अंबड पोलिसांनी १६३ रिक्षाचालकांवर कारवाई करून ३२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. त्रिमूर्ती चौक, दत्त चौक परिसरातही ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत रिक्षाची कागदपत्रे नसणे, जादा सीट भरणे आदी प्रकारांत रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी ही माहिती दिली. बहुतांश रिक्षाचालक वाहतुकीचे नियम पाळत असल्याचे सकारात्मक चित्रही दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकवरील हल्लेखोरांना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अवघ्या काही तासात तिघांना हल्लेखोरांना अटक केली. या संशयीतांना कोर्टाने सोमवारी (दि. १९) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

विक्रम रुपचंद तसंबड, प्रदीप उर्फ पिंटू परशुराम तसंबड आणि सोनू उर्फ संदेश प्रकाश साळवे (रा. तिघे मातंगवाडा, जुने नाशिक) या संशयित आरोपींची नावे आहेत. हल्ल्याची घटना शनिवारी (दि. १७) मध्यरात्री झाली होती. माजी नगरसेवक दलोड हे द्वारका परिसरातील मिरजकर कॉम्प्लेक्स येथे त्यांच्या गंगा काजू प्रक्रिया केंद्रावर काम करीत असतांना ही घटना घडली होती. मागील भांडणाची कुरापत काढून संशयितांनी दलोड यांच्यावर चॉपरने वार केले होते. यावेळी दलोड यांचा मुलगा सिद्धार्थ दलोड आणि भाचा सौरभ बागडी हे दोघे दलोड यांच्या मदतीस धावून गेले असता संशयितांनी त्यांनाही बेदम मारहाण करीत गंभीर जखमी करून पोबारा केला होता. या घटनेत दलोड बापलेकासह भाचा गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर वडाळा नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिद्धार्थ दलोड याच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासाका रस्त्यासाठी चार कोटींचा निधी

0
0

जेलरोड : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बंगालीबाबा ते नाशिक साखर कारखाना रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. देवळालीचे आमदार योगेश घोलप यांनी सध्या सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावला आहे. साडेचार किलोमीटरच्या या रस्त्यासाठी चार कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती घोलप यांनी दिली.

या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी घोलप यांनी बजेट पुरवणीत मागणी केली होती. तिची दखल राज्य शासनाने घेत निधी उपलब्ध केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० ला जोडणाऱ्या या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने आमदार योगेश घोलप यांनी अर्थसंकल्प पुरवणीत तरतुदीची मागणी केली होती. निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडमधून सोडले पाणी

0
0

पिण्यासाठी : ३५० दशलक्ष घनफूट

सिंचनासाठी : १५०० दशलक्ष घनफूट

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा मुहूर्त अखेर पाटबंधारे विभागाने सोमवारी साधला. दुपारी साडेचार वाजता पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पिण्यासह सिंचनासाठी हे आवर्तन सोडण्यात आल्याने दिंडोरी, निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पाणी सोडू, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पाटबंधारे विभागाने सोमवारी (दि. १९) पाणी सोडण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष दिली होती. आश्वासन न पाळल्यास अधिवेशनात हैदोस घालू, असा इशारा भुजबळ यांनी दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने सोमवारी दुपारी साडेचारपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला. सकाळी १० वाजताच हा विसर्ग सुरू करण्यात येणार होता. परंतु, विंचूरजवळ पाणीगळतीची शक्यता असल्याने कॅनॉलच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. पिण्यासाठी ३५० दशलक्ष घनफूट, तर सिंचनासाठी १५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. दुपारी साडेचारपासून साधारणत: एक हजार क्यूसेकने विसर्ग सुरू केला जाणार असून, पुढील तीन आठवडे तो सुरू राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images