राममंदिराच्या मुद्याला भाजप प्रदेशाध्य दानवे यांच्याकडून बगल
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आगामी लोकसभा निवडणुकीत विकास हाच मुद्दा असणार असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राममंदिर प्रश्नाच्या मुद्दाला बगल दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभर पुन्हा राममंदिर मुद्दा चर्चिला जात असल्याने हा मुद्दा निवडणुकीत असेल का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी असे उत्तर दिले.
नाशिक येथे दिंडोरी व नाशिक लोकसभाच्या मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी दानवे नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे हे राज्यभर आढावा बैठका घेत असून जळगाव व धुळे येथे त्यांना पक्षाच्या अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागले. पण, नाशिकमध्ये असलेला वाद उघडपणे त्यांच्यासमोर कोणी मांडला नाही. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, की मी राज्यभर दौरा करत असून कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, बुथ गठण करतांना सांगितलेली २३ कामांची पूर्तता झालेली आहे का, ते बघणे व लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचा उद्देश या दौऱ्यात आहे. राज्यात विधानसभा निहाय २०८ विस्तारक तर लोकसभा निवडणुकीसाठी ४८ विस्तारक काम करत आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बुथ तयार केले असून एका विधानसभा मतदारसंघात सरासरी ३०० बुथ प्रमुख आहे. त्यांच्याबरोबरच ७ हजार ५०० कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे एका लोकसभा मतदारसंघात ४८ ते ५० हजार कार्यकर्ते काम करणार असल्याचा हिशोबही त्यांनी मांडला.
कुठेय महागाई?
देशात मागणी आणि पुरवठा यातील अंतर वाढत गेले तर वस्तूंच्या किमतीही वाढत जातात. पण, ते तात्पुरते असतात. देशात महागाई कुठे आहे? असा प्रतिप्रश्नही दानवे यांनी पत्रकारांना केला.
मित्रपक्षाच्या मतदार संघातही काम
राज्यात आम्ही मित्रपक्षाच्या मतदार संघातही पक्ष मजबूत करत आहोत. ज्यावेळी त्यांना हा मतदारसंघ सुटेल त्यावेळी त्यांना या कार्यकर्त्यांचा फायदा होईल, असे सांगून दानवे यांनी शिवसेनेबद्दल अधिक बोलणे टाळले. आमचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची माहिती देण्यावर आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आम्ही बळ देणार आहोत, असेही ते म्हणाले.
भामरे-गोटे वादावर सौम्य भूमिका
धुळे येथे जाहीर सभेत आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी फोटो लावला नाही म्हणून घातलेल्या धुडगुसावर पक्ष काय कारवाई करणार, या प्रश्नावर दानवे यांनी 'या संघटनात्मक बाबी आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार अनिल गोटे यांच्यातील वाद पक्ष हस्तक्षेप करून सोडवेल' असे सांगितले.
गुंडांमुळे वाढतात मतदार
धुळे येथे गुंडांना पक्षप्रवेश दिल्याने भाजपवर टीका होत असतांना दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रवेश देतांना वेगवेगळ्या पक्षातून लोक येतात. त्यांना आम्ही पद कुठे देत आहोत, त्यांच्या प्रवेशामुळे मतदार वाढत असेल तर काय हरकत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पक्षप्रवेश देतांना स्थानिक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.