केंद्र सरकारची घोषणा ... - कांद्यासाठी नाशिक, कर्नाटकच्या गदग आणि धारवाड, गुजरातच्या भावनगर आणि बिहारच्या नालंदा येथे क्लस्टर होणार - ५० कोटी रुपये निधी मिळणार - सहकारी संस्था, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी संघटना यापैकी कुणीही या क्लस्टरसाठी अर्ज करू शकणार .... म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक घरातील किचनमध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्याद्वारे प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तिन्ही पिकांचे सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंतच्या किचनमध्ये अनन्यसाधारण स्थान आहे. या पिकांचे दर नेहमीच कमी-अधिक होत असल्याने त्याचा परिणाम ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही घटकांवर होतो. त्यामुळेच हा विषय राष्ट्रीय राजकारणाचाही अलीकडे महत्त्वाचा भाग बनला आहे. हीच बाब ओळखून केंद्रीय कृषी प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने 'ऑपरेशन ग्रीन' योजना हाती घेतली आहे. त्याद्वारे चांगल्या दर्जाच्या पिकांची लागवड, उत्पादन, उत्तम साखळी, साठवणुकीसाठी चांगले पर्याय आणि देशभरातील दरांवर नियंत्रण हे सारे करणे शक्य होणार आहे. कांद्यासाठी नाशिक, कर्नाटकच्या गदग आणि धारवाड, गुजरातच्या भावनगर आणि बिहारच्या नालंदा येथे क्लस्टर विकसित केले जाणार आहेत. क्लस्टरसाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. सहकारी संस्था, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी संघटना यापैकी कुणीही या क्लस्टरसाठी अर्ज करू शकणार आहे. वितरण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच या पिकांवर आधारित उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ... टोमॅटोसाठी सात राज्यात क्लस्टर टोमॅटोसाठी चित्तूर आणि अनंतपूर (आंध्र प्रदेश), कोलार आणि छिक्कबल्लापूर (कर्नाटक), मयूरभंज आणि किओन्झर (ओरिसा) आणि साबरकांथा (गुजरात) येथे तसेच बटाट्यासाठी आग्रा, फिरोझाबाद, हथरस, अलिगढ, फारुखाबाद, कन्नौज (उत्तर प्रदेश), हुगळी आणि पूर्व वर्धमान (पश्चिम बंगाल), नालंदा (बिहार) येथे क्लस्टर विकसित केले जाणार आहे. ... बटाटा, कांदा आणि टोमॅटो ही अतिशय महत्त्वाची पिके आहेत. त्यामुळे या पिकांसाठी क्लस्टर विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या काळात ते साकार होतील आणि त्याद्वारे देशातील शेतकरी आणि ग्राहकांनाही त्यामुळे थेट फायदा मिळेल, असे आमचे नियोजन आहे. - हरसिम्रत कौर, केंद्रीय कृषी प्रक्रिया उद्योग मंत्री ... नाशिकच्या कांद्याला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे. निर्यातीमध्ये नाशिकच्या कांद्याचा सर्वाधिक वाटा आहे. नाशिकमध्ये कांद्याचे क्लस्टर होणार असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. यामुळे मागणी वाढल्यास व्हरायटीही येऊ शकेल. हे क्लस्टर नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेटच आहे. - नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट