म. टा. वृत्तसेवा, जेलरोड इगतपुरी रेल्वे स्टेशनवर रविवारी रेल्वेतर्फे ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे नाशिककरांना मुंबईला जाऊन दिवाळी शॉपिंगचा आनंद लुटता आला नाही. तसेच दिवाळीच्या सुटीसाठी मामाच्या गावाकडे जाता न आल्याने बच्चे कंपनीही हिरमुसली. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस मनमाड-दौंड-कल्याण मार्गे धावली. तर एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, इगतपुरी-मनमाड शटल रद्द करण्यात आली. भुसावळ-पुणे एक्स्प्रस्ही रद्द झाल्याने पुण्याला जाणाऱ्यांचे हाल झाले. दिवाळी अगोदरचा रविवार म्हणजे मुंबईला जाऊन खरेदी करण्याची नाशिककरांसाठी पर्वणी असते. मात्र, रेल्वे गाड्या रद्द झाल्याने त्यांना मुंबईला जाता आले नाही. मध्य रेल्वेच्या तिसऱ्या मार्गासाठी इगतपुरी स्टेशनवर रुट रिले इंटरलॉकिंग पॅनल आणि यार्ड रिमॉडलिंग काम केले जात आहे. त्यामुळे महिनाभरापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रविवारी पहाटे पावणे चारपासून दुपारी दोनपर्यंत इगतपुरीत ट्रॅफिक, पॉवर आणि एसएंडटी ब्लॉक घेण्यात आला. मुंबईला जाणाऱ्या व मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या ब्लॉकच्या काळात अर्धा ते दीड तास उशिराने धावल्या. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोड स्टेशनपर्यंतच धावली. मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसने नाशिकरोडहून प्रस्थान केले. एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस २.१३ पासून पाचपर्यंत कसारा येथे, एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस २.२० पासून ४.५० पर्यंत खडवली स्टेशनमध्ये, कल्याणमार्गे जाणारी एर्नाकुलम-हजरत निझ़ामुद्धीन मंगला एक्स्प्रेस २.५० पासून ४.५० पर्यंत आसनगाव येथे थांबली. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस तसेच बरेली-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या भुसावल मंडळ येथे थांबल्या. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचीही गैरसोय झाली. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस १०.५५ वाजता ऐवजी दुपारी एकला सुटली. अडीचपासून ते पावणे पाचपर्यंत ती आटगाव स्टेशनवर थांबून राहिली. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी ११.१० ऐवजी १.२० वाजता सुटली. दुपारी २.४० ते ४.५० या वेळेत ती वासिंद स्टेशनवर थांबून राहिली. मुंबई-हावडा एक्स्प्रेस सकाळी ११.०५ ऐवजी दीडला निघाली. ही गाडी २.५० पासून ५.२० पर्यंत खडवली स्टेशनवर थांबली. एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस २३.३५ वाजता ऐवजी ५ नोव्हेंबरला ४.३० वाजता निघेल. मुंबई-गोरखपूर विशेष गाडी २.२० ऐवजी सोमवारी (दि. ५) रात्री साडेबाराला निघेल. एसटी, टॅक्सीचा आधार रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांनी एसटीबसचा आधार घेतला. नाशिकरोड बसस्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. ट्रॅव्हल्स कंपन्यांचाही चांगला व्यवसाय झाला. काही प्रवाशांनी टॅक्सीने कसारा गाठले. तेथून लोकलने मुंबई गाठले. व्यावसायिक व नोकरदारांनी कार शेअरिंग करून मुंबई गाठली आणि आपली कामे पूर्ण करुन सायंकाळी पुन्हा नाशिककडे प्रस्थान केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट