म. टा. प्रतिनिधी, नाशिक बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी द्यावयाच्या मदतीचा आठ कोटी ७७ लाख रुपयांचा तिसरा हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला आणि मालेगावमधील ३८ हजार ६३ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत वर्ग करण्यात येणार आहे. दिवाळीच्या तोंडावर ही मदत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी खरीपात सात तालुक्यांमध्ये कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे या तालुक्यांमधील ५३ हजार ३९३ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठविला. नुकसान भरपाईपोटी २६ कोटी ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार एप्रिल २०१८ मध्ये पहिला तर जुलैमध्ये दुसरा हप्ता प्रशासनाला प्राप्त झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत १७ कोटी ५६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली. आता पुन्हा मालेगावसाठी पाच कोटी ३९ लाखाची तर येवल्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन कोटी ३७ लाख रुपयांची मदत प्राप्त झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे. सोमवारनंतर ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट