मनमाड, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड तालुक्यावर संकट
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
दरवर्षी दिवाळीच्या आठवडाभर आधी फुलणारा मनमाड, नांदगाव, चांदवड येथील बाजारपेठ दिवाळी दोन दिवसावर आली तरी ठप्प आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या गर्दीने गजबजणारी बाजारपेठ दुष्काळजन्य स्थितीमुळे यंदा अजूनही सामसूम आहे. त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवावर दुष्काळची काजळी पडली आहे.
दुष्काळामुळे मनमाड, नांदगाव, चांदवड, येवला, निफाड भागातील किराणा व कापड व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर मनमाडला बाजारासाठी येतात. तसेच येवला येथेही पैठणीसाठी मोठी गर्दी होते. सणावाराला मनमाडमध्ये ग्रामीण भागातील ग्राहकांची जणू जत्रा भरते. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रोजच्या खाण्याचे व जगण्याचे वांदे झाल्यामुळे सणवार साजरे करणे दूरच आलेला दिवस कसा काढवा अशी अवस्था ग्रामीण जनतेची झाली आहे. कापडाच्या बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
मनमाडच्या बाजारात दिवाळी उंबरठ्यात येऊन पोहचली तरीही मंदीचे सावट आहे. किराणा व कपडे याना दिवाळीत अधिक ग्राहक असल्याचे व्यापारी संघटनेचे किशोर नावरकर सांगतात. मात्र यंदाच्या दिवाळीत किराणा व कपडे व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर माल आणूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने या व्यावसायिकांवर ग्राहकाची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. किराणा माल व कपडे या व्यतिरिक्त इतर चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे दिवाळीत लोकांचा कल असतो. मात्र यंदा कोणत्याच बाजारपेठेत चहलपहल दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही संकटात सापडले आहेत.
दुष्काळामुळे फर्निचर, मोबाइल इतर गृहोपयोगी वस्तू विकल्या जातील की नाही, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. मिठाई व फराळाच्या दुकानात देखील यंदा अद्याप शुकशुकाट असून, ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली व आर्थिक संबंध असणारी मनमाडची बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलणार कधी? याकडे व्यापाऱ्यांचे डोळे लागले आहेत.
कोट
१९७२ पेक्षा भयानक दुष्काळस्थिती नांदगाव तालुक्यात दिसत आहे. मनमाडच्या बाजारपेठेत दिवाळी दिसत नाही. शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे बाजारपेठेत पैसा नाही. मनमाड बाजारपेठेत शेतकरी हाच मोठा ग्राहक असल्याने दुष्काळामुळे दिवाळीत मंदीची लाट आहे.-
शांतीलाल गांधी, व्यापारी मनमाड
नांदगाव तालुक्यातील दुष्काळामुळे मनमाडच्या बाजारपेठेत सन्नाटा आहे. दिवाळीत ग्रामीण भागात अंधार आहे. पर्यायाने मनमाडचा बाजार ठप्प आहे.--किशोर नावरकर
जनावरांना चारा नाही. पिकपाणी नसल्यामुळे कसली दिवाळी आणि कसले काय? आल्या दिवसाची आम्हाला चिंता आहे. - सुधाकर थोरमिसे,
भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
येवला : यंदा दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या येवला व निफाड तालुक्याचे नाव राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत न घेतल्याने तालुक्यात सर्वदूर संतापाची लाट उसळली आहे. आमदार छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यासह निफाड हे दोन तालुके दुष्काळी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भुजबळ यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दुष्काळी परिस्थितीची आठवण करून दिली आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातच ३१ ऑक्टोबरला राज्यातील दुष्काळी तालुक्यांची घोषणा केली. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा, तर देवळा, इगतपुरी, नाशिक व चांदवड या तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. मात्र, दुष्काळात होरपळत असूनही येवला व निफाड या दोन तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, अशी खंत आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
गिरणातील पाण्यासाठी निवेदन
मनमाड : नांदगांव मतदार संघात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे दुष्काळाची स्थिती आहे. नांदगाव तालुक्यातील गावे वाड्या, वस्त्या, तांडे, नांदगाव मतदार संघात समाविष्ट असलेली मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागत आहे. त्यामुळे नांदगांव मतदार संघाला टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गिरणा धरणात पाणी आरक्षित करण्यात यावे अशी मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शेतकरी