Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पानी रे पानी तेरा रंग…...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिस में मिला दो लगे उस जैसा' या 'शोर' हिंदी चित्रपटातील गाण्याप्रमाणे नाशिक-नगर आणि मराठवाड्याचे राजकारण सध्या फिरते आहे. नाशिक-नगरमधून पाणी सोडण्याच्या निर्णयावरून मराठवाड्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेसह छोटे पक्षही एकत्रितपणे लढा देत असताना नाशिक-नगरमध्येही पाणी सोडण्याविरोधात असाच लढा सुरू आहे. ऐन हिवाळ्यात या पाण्याने पुढाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांची पंचाईत केली असून, एकाच पक्षाच्या नेत्यांचे पाण्यावरून वेगवेगळे रंग जनतेस अनुभवयास येत आहेत. काही वर्षांपूर्वी समन्यायी पाणी वाटपाचा कायदा करणारे आघाडीतले नेते आता हा कायदा किती अन्यायकारक आहे याचा दाखला देत फिरत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा हा बदलेला रंग कळीचा मुद्दा ठरतो आहे.

नाशिक-नगरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने नाशिक-नगरच्या धरणांमधून जायकवाडीसाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दोन्ही प्रांतातील राजकारण ढवळून निघाले आहे. पुढील वर्षी लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका असल्याने साहजिकच पाणी हा प्रमुख मुद्दा असणार, हे निश्चित आहे. त्याचाच प्रत्यय सध्या नाशिक-नगर आणि मराठवाडा विभागातील जनतेला येतो आहे. सन २०१६ मध्येही मराठवाड्याला उर्ध्व गोदावरी पट्ट्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले होते. त्या वेळी नाशिक-नगरमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाला या दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेस, राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने तीव्र विरोध केला होता; तर भाजपने मात्र मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची भूमिका घेत पाणी सोडण्यास भाग पाडले होते. आताही तिच परिस्थिती असताना भाजपने नाशिकमध्ये मात्र पलटी खाल्ली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दगाफटका नको म्हणून मराठवाड्यातील भाजपचे आमदार पाणी सोडण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत असतानाच, नाशिक-नगरमधील भाजप नेते पाणी सोडण्यास विरोध करीत आहेत. नाशिकमधील एका आमदाराने तर थेट आपल्या कार्यकर्त्यामार्फत पाणी सोडण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. भाजपसोबतच नाशिक नगरमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे एकमेकांना पाण्यात पाहणारे पक्ष चक्क पाण्यावरून एकी दाखवत सरकारविरोधात आंदोलनात उतरले आहेत; तर दुसरीकडे मराठवाड्यातही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी आपले विचार-मतभेद बाजूला ठेवून नगर-नाशिक विरोधात आंदोलनासह सर्व मार्गांचा अवलंब करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे पाण्याच्या रंगात राजकीय पक्षांचे विचार-आचारही बदलून गेल्याचे चित्र राज्यात पहायला मिळत आहे. मतपेटीच्या स्वार्थासाठी एकाच पक्षाचे नेते, पाण्यावरून एकमेकांविरोधात उभे ठाकून केविलवाणे राजकारण करीत असल्याने दुष्काळाच्या दाहकतेच्या चटक्यांची चाहूल लागत असतानाही जनतेचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

आघाडीची डबल ढोलकी!

समन्यायी पाणीवाटप कायदा हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने रात्री एक वाजता बहुमताने मंजूर केला होता. परंतु, सत्तेवरून पायउतार होताच या कायद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीतल्या दोन प्रांतातल्या नेत्यांनी आता वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. मराठवाड्यातले आघाडीचे नेते या कायद्याचे समर्थन करीत आहेत, तर नाशिक-नगरमधील आघाडीचे नेते आता हा कायदाच किती अन्यायकारक आहे, याचा दाखला देत आहेत. त्यामुळे पाण्यावरून एकाच पक्षाच्या दोन प्रांतांतील वेगवेगळ्या भूमिका चर्चेचा विषय झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळी अंक कधीच खूप श्रीमंत झाले नाहीत!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी अंक हा आपला सांस्कृतिक उत्सव आहे, त्यातून आपल्या साहित्य परंपरा डोकावतात त्यामुळे तो भरजरीच असावा. 'सावाना'चा दिवाळी अंक असाच भरजरी आहे. परंतु, एकंदरीतच दिवाळी अंकांबाबत मला वाटते, की ते व्यवहाराने कधीच खूप श्रीमंत झाले नाहीत. एखाद्या दिवाळी अंकाच्या पन्नास हजार प्रती खपल्या असे कधी ऐकिवात नाही. असे का होते, याचाही विचार आपण करायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे काढण्यात येणाऱ्या 'साहित्य सावाना' या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर 'सावाना'चे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, व्यासपीठ दिवाळी अंकाचे संपादक हेमंत पोतदार यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्य सावाना या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. हेमंत पोतदार म्हणाले, की आपण आजकाल मोबाइलमध्ये फार व्यग्र होत आहोत. मुले आपले अनुकरण करतात म्हणून मुलांसमोर पेपर वाचा, ती पुस्तके वाचतील. दिवाळी अंक ही आपल्या साहित्य संस्कृतीची श्रीमंती आहे, ती आपण जपली पाहिजे. प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. 'सावाना'चे जे चांगले उपक्रम आहेत ते आम्ही सुरू ठेवले आहेत ते अधिक चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे बेणी यांनी सांगितले. डॉ. बोडके यांनी स्वागत केले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

व्यावहारिक दृष्टिकोनाची निकड

सोनार म्हणाले, की आजमितीस वाचनसंस्कृती गरजेची आहे. वाचनालयात येऊन पुस्तके वाचणाऱ्यांची वानवा असतानाच 'साहित्य सावाना'सारखा दिवाळी अंक काढणे मोठे धारिष्ट्याचे आहे. परंतु, आपल्या वाचकांवर त्यांना विश्वास आहे. दिवाळी अंकाबाबत बोलायचे झाले, तर यातील कलाकाराने व्यावहारिक राहिले पाहिजे. आपण खणखणीत असल्यावर पैसे मोजून घेतले पाहिजेत. आता तर काही संपादक फुकट चित्रे काढून मागतात, मुखपृष्ठ फुकट मागतात. आम्ही छापतो आहोत हेच खूप झाले, असे म्हणतात, त्यांनी कलाकारांची कदर केली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोनस आला रे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सातपूर आणि अंबड औद्यौगिक वसाहतीतील ३३ कंपन्यांनी बोनसची घोषणा केली आहे. कामगारांना १६ ते ५० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार असून यामुळे शहरातील बाजारपेठेत मोठे चलनवलन घडून येणार आहे. बोनस जाहिर झाल्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या सीटू संलग्न कारखान्यांमध्ये कामगारांना दिवाळी भेट मिळाली आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सातपूर एमआयडीसीतील सीटू संलग्न १९ कारखान्यांमधील कामगारांना २० ते ५० हजारांपर्यंत बोनस जाहीर करण्यात आला आहे. अंबड एमआयडीसीतील १४ कारखान्यांमधील

कामगारांना १६ ते ४८ हजार रुपयांपर्यंत बोनस जाहीर करण्यात आले असल्याचे सीटू संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील इतर कारखान्यांमध्ये बोनसची यशस्वी बोलणी सुरू असल्याचे सीटू संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

कामगारांना बोनस जाहीर झाल्याने त्यांच्यासह कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारखाना व्यवस्थापनाशी योग्य बोलणी झाल्यानेच कामगारांची दिवाळी गोड होणार

असल्याचे सीटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले. बोनसचे करार करण्यासाठी सीटू संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. कराड, उपाध्यक्ष ठोंबरे, आर. एस. पांडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार व कारखान्यातील कमिटी सदस्यांनी भाग घेतला. विशेष म्हणजे बंद झालेला कारखाना क्लासिक फुड्स येथील कामगारांनादेखील २० टक्के बोनस व्यवस्थापनाने दिला आहे. त्यांचा बोनस बँकेत जमा करण्यात आल्याचे सीटू संघटनेचे सोनजे यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेला चालना

दिवाळी बोनसच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध सवलतींचा वर्षाव केला जात आहे. आता बोनस जाहीर झाल्याने कामगारवर्गाची बाजारपेठेत पावले वळणार आहे. परिणामी शहरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यामुळे व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

यंदा उशिरा बोनस

दिवाळीच्या किमान १५ आधी बोनस जाहीर करून त्याची रक्कम कामगारांना द्यावी, असे आवाहन कामगार उपायुक्तालयाकडून गेले होते. मात्र, यंदा खासगी कंपन्यांनी लवकर बोनस जाहीर केला नाही, तसेच रक्कमही कामगारांना दिली नाही. त्यामुळे दिवाळीचे अवघे दोन-तीन दिवस आधी कामगारांच्या हाती पैसे पडणार आहेत. महिना अखेरीस किंवा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औद्योगिक वसाहतीत पगार अदा केला जातो. यंदा दिवाळी बोनस आणि मासिक पगार या दोन्हींची रक्कम एकत्रितपणे ऑक्टोबरअखेर कामगारांना प्राप्त होणार आहे. ही रक्कम मोठी असल्याने बाजारपेठेत खरेदीचा उत्साह राहणार आहे.

सातपूर एमआयडीसी

कंपनी- बोनस

टीडीके इप्कॉस- २८ ते ३८ हजार

सोमेश फोर्जिंग- २० ते ३८ हजार

युनायटेड इंजिनीअरिंग- डीए व बेसिक अधिक १६ टक्के

इंडियन व्हॉल्व- वेतनाच्या २० टक्के

सिंग क्वारी- डीए अधिक बेसिक मिळून २५ टक्के

सिंग इंजिनीअरिंग- डीए अधिक बेसिक मिळून २५ टक्के

आनंद आय पॉवर- २० हजार

जयनिक्स इंजिनीअरिंग- ३४ ते ३८ हजार

गोल्डी प्रेसिजन- २२ हजार

क्लासिक फूडस- वेतनाच्या २० टक्के

एम. जी. इंडस्ट्रिज- १७ हजार ३००

शेरिन ऑटो- १९ हजार ५००

चैतन्य फार्मासुटिकल- १६ टक्के

सुपर कॉलेपसिबल- १६.६६ टक्के

सुयोग रबर- २० टक्के

सिप्रा इंजिनीअरिंग १- १८ ते ४५ हजार

सिप्रा इंजिनीअरिंग २- डीए अधिक २० टक्के किमान २८ हजार

इंटेक कंट्रोल- महिन्याचे एक वेतन

ऑर्बिटल सिस्टिम्स- १८ ते ४८ हजार

अंबड एमआयडीसी

कंपनी- बोनस

एआयसी इंडस्ट्री- २० ते ३५ हजार

नाशिक स्टिल- १२ हजार

नाशिक फोर्ज- १६ ते २० हजार

नोवतियार इलेक्ट्रिक सिस्टिम- ३५ ते ४२ हजार

कॅपिटल फुड्स- १७ ते २५ हजार

अॅडम फेब्रिवर्क्स- १६ ते ४० हजार

फोनोटेक्स फायबर कॉस्ट- २९ ते ४४ हजार

अल्फ इंजिनीअरिंग- २२ ते २९ हजार

आर्ट रबर इंडस्ट्री- १६ हजार ८००

नाशिक ऑटोटेक- १६ हजार ८००

ओके टूल्स- १५ हजार

ब्ल्यू क्रॉस लॅबोरेटरीज- २५ हजार ४००

तुषार इंडस्ट्रिज- १६ ते १८ हजार

तुषार प्रेसिकॉम- १६ ते १८ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचे विषप्राशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील विवाहितेने सोमवारी (दि. २९) दुपारी चार वाजेच्या सुमारास पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. अंजना अभिमन्यू गिते असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी हरीभाऊ शंकर जायभाये (५५, रा. जयवंतनगर, ता. भूम, जि. उस्मानाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंजनाचा पती अभिमन्यू भिकाजी गिते व आशाबाई राजेंद्र मोरे या दोघांविरोधात एमआयडीसी मुसळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून अभिमन्यू व आशाबाई मोरे यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे अंजना गिते यांना निदर्शनास आल्यानंतर तिने पतीस वारंवार समजावून सांगितले. त्यानंतरही त्यांचे कारनामे सुरूच होते. दरम्यान, सोमवारी (दि. २९) याच कारणावरुन अभिमन्यू गिते याने पत्नी अंजना हिस शिवीगाळ व मारहाण केली. त्याचा राग आल्याने तसेच अभिमन्यू व आशाबाई यांच्या जाचास कंटाळून अंजना हिने विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान रात्री साडेदहा वाजता तिची प्राणज्योत मालवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडला घरफोडींची दहशत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोड परिसरात घरफोडी गुन्ह्यांचा धडका सुरूच असून, परिसरातील नागरिकांनी चोरट्यांचा धसका घेतला आहे. दुकान फोडण्याचे दोन गुन्हे उघडकीस आलेले नसताना आता घरफोडीचे दोन गुन्हे गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले असून, यात चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या घटना नवशा गणपतीनगर भागासह जनलक्ष्मी बँकेमागे घडल्या आहेत.

पहिल्या घटनेत चोरट्यांनी गंगापूर रोडवरील नवशा गणपतीनगरमध्ये असलेल्या आयुर्वेदन बंगल्यात घरफोडी केली. चोरट्यांनी २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत दीपक सुधाकर कुलकर्णी यांच्या बंद बंगल्याच्या पाठीमागील किचन रुमच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातून ९ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, प्रत्येकी साडेबारा ग्रॅमचे दोन सोन्याचे नेकलेस, १७ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या चेन, नऊ ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, दोन हिऱ्याच्या अंगठ्या, मोत्याच्या दागिन्यांचा सेट व इतर दागिने असे एक लाख ९६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.

गंगापूर रोडवरील जनलक्ष्मी बँकेच्यामागे असलेल्या लक्ष्मीनिवास सोसायटीत चोरट्यांनी घरफोडी करीत ६४ हजारांचे दागिने लांबविले आहेत. या प्रकरणी शांतीलाल तुळशीराम पवार (७७, लक्ष्मीनिवास सोसायटी) यांनी फिर्याद दिली. चोरट्यांनी २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान पगार यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत सोन्याच्या बाळ्या, झुमके, अंगठी, टॉप्स, रामपान, चांदीच्या वस्तू, निरंजन, करंडा, लक्ष्मीमूर्ती, वाट्या, चांदीचे मेडल, जोडवे, पादुका, १४ हजारांची रक्कम, लॉकरच्या चाव्या असा ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडीत लांबविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरमध्ये आजपासून कबड्डीचा थरार

$
0
0

पाच दिवस सुरू राहणार सामने; आंतरराष्ट्रीय खेळाडू, पंचांची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील आडवा फाटा मैदानावर आजपासून (दि. ३१) येत्या चार नोव्हेंबरपर्यंत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. एकूण सहा कबड्डी मैदानांवर हे सामने रंगणार असून, तब्बज दहा हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची सुविधा करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी असणार. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सहभाग असलेल्या कबड्डीचा थरार रिप्लेसह बघता यावा यासाठी मोठ्या स्क्रीनची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच, सिन्नर यांच्या सौजन्याने ६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा बुधवारपासून सुरू होत आहे. जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे व सह्याद्री युवा मंच, सिन्नर या संस्थेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातून पुरुषांचे २५ संघ तर महिलांचे २० संघ सहभागी होणार आहेत. जवळपास ५४० पुरुष व महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच राज्यभरातून ७० पंच स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी मातीची सहा मैदाने असणार आहेत. या मैदानांवर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतून निवडला जाणारा पुरुष व महिला संघ ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

प्रो कबड्डीमुळे या खेळाला गतवैभव प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात वर्षभरात अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र मानाची व महत्त्वाची स्पर्धा समजली जाणारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सिन्नरला होणे ही प्रत्येक सिन्नरकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेतील कबड्डीचा थरार कबड्डीप्रेमींना पाहायला मिळावा गॅलरी बनविण्यात आली आहे. स्क्रीनवर थेट प्रेक्षपण दाखविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख तथा सह्याद्री युवा मंच सिन्नरचे अध्यक्ष उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शरद कातकाडे, बाळू घुगे, किरण मिठे, विजय गीते, अमोल भामरे, शिवराम सांगळे आदी प्रयत्नशील आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवणी

या कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून सिन्नरकरांना खेळासोबतच मनोरंजनाचा देखील लाभ मिळणार आहे. त्यासाठी भव्य स्टेजची उभारणी करण्यात असून १ नोव्हेंबर रोजी 'चला हवा येउद्या'फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा कार्यक्रम तसेच २ आणि २ तारखेला नाशिक जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतीक कार्यक्रम पार पडणार आहेत.

३३ वर्षांनी पुन्हा संधी

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनाची संधी सिन्नर तालुक्याला प्रथमच मिळाली आहे. सन १९८५ साली मनमाड येथे वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी या स्पर्धा भरविण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे. या स्पर्धेत राज्यातील महिलांचे २५ व पुरुषांचे २५ असे ५० संघातील सहाशेच्यावर खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत ५० प्रशिक्षक, ५० संघ व्यवस्थापक, १०० पंच व विविध जिल्ह्यातील संघटनांचे व राज्य संघटनेचे १०० पदाधिकारी तसेच १०० स्वयंसेवक असे १ हजाराच्यावर व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. एकाचवेळी ६ मैदानांवर प्रकाशझोतातले सामने होणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू खेळणार असून पुरुषांचे ५१ व महिलांचे ४१ असे ९२ सामने होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिव्ह्यूनंतर भुजबळांच्या सुरक्षेत वाढ?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मागील महिन्यांपासून वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी मिळालेल्या धमकीच्या पत्रामुळे या सुरक्षेत वाढ होऊ शकते.

भुजबळ यांना धमकीचे पत्र मिळाल्याची बाब रविवारी समोर आली. मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचा दाभोलकर, पानसरे करू, अशी धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांना सुरक्षा पुरविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना क्राइम ब्रँच आणि विशेष शाखा विभागाचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले, की धमकीचे पत्र मिळण्यापूर्वीच भुजबळ यांना वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या सुरक्षाव्यवस्थेत निवासस्थानाबाहेर गार्ड देण्यात येतात. याशिवाय एक अधिकारी व चार कर्मचारी असतात. भुजबळांना मिळालेल्या धमकीच्या पत्राबाबत तपास सुरू आहे. सुरक्षेत वाढ करण्याबाबत लवकरच एक रिव्ह्यू घेण्यात येईल. त्याचा तपशील वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे मगर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाकीतील माणुसकीने ‘नकोशी’ला नवजीवन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तीन आठवड्यांपूर्वी प्राण कंठाशी आलेल्या स्थितीत सापडलेल्या 'नकोशी'ने खाकीतील माणुसकीने पुन्हा उभारी घेतली आहे. यासाठी पुढाकार घेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करून २३ दिवस मायेची ऊब देणाऱ्या रोहिणी दराडे यांनी 'बेटी बचाओ'चा नारा प्रत्यक्षात उतरविला आहे.

गेल्या ७ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास खंबाळे शिवारात अनाथाश्रमाच्या भिंतीलगत अर्भक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने तेथे पोहोचले असता अवघ्या एक दिवसाची 'नकोशी' भिंतीलगत ठेवलेली आढळली. या अर्भकास मुंग्या लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने या अर्भकास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीनंतर हे अर्भक सातव्या महिन्यात जन्माला आल्याचे स्पष्ट झाले. या अर्भकाचे वजन अवघे ९०० ग्रॅम होते. त्यामुळे या अल्प वजनाच्या 'नकोशी'ला जगविण्याचे आव्हान पोलिस अन् डॉक्टरांसमोर उभे राहिले होते. 'तिला' प्रीमॅच्युअर कक्षातील आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी यात विशेष लक्ष घातले. त्यांच्या पत्नी रोहिणी दराडे यांनीही आपल्या कन्येसह वेळेवेळी रुग्णालयात जाऊन 'तिची'देखभाल केली. जिल्हा रुग्णालयातील बाल विभागाने याबाबत सहकार्य केले. पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात बाल कक्षात महिला पोलिस नाईक नेमून 'तिच्या'देखभालीवर भर दिला. महिला पोलिस नाईक ऋतुजा कुमावत, पद्मा चव्हाण, योगिता पुंड, माया गाडे, नीता पटेकर यांनी २३ दिवस स्वत:च्या बाळाप्रमाणे 'तिची' काळजी घेतली. रुग्णालयाचे कर्मचारी अन् या साऱ्यांमुळे 'नकोशी'ने चांगलीच उभारी घेतली. ९०० ग्रॅमवरून तिचे वजन १५०० ग्रॅमवर गेल्याने 'तिची' वाढ सर्वसामान्य बालकांप्रमाणे होऊ लागल्याने 'तिला' मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले. या प्रकारामुळे खाकीतील माणुसकीचा प्रत्यय आला.

--

आधाराश्रमाकडे केले सुपूर्द

'नकोशी'ला जिल्हा रुग्णालयातून सोडल्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या पत्नी रोहिणी दराडे यांनी 'तिला'कुशीत घेत नवे कपडे अन् गरजेचे साहित्य देत अशोकस्तंभावरील घारपुरे घाट येथील आधाराश्रमाकडे सुपूर्द केले. या 'नकोशी'चे 'गार्गी' असे नामकरणही करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारागृह अधीक्षकांच्या निवासस्थानी मोडतोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांच्या निवासस्थानात तीन संशयित व्यक्तींनी विनापरवानगी प्रवेश करून परिसरातील साहित्याची मोडतोड केल्याची घटना रविवारी (दि. २८) रात्री घडल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणी कारागृह शिपाई कैलास टोपा राठोड (वय ५२) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी कैलास राठोड रविवारी रात्री कारागृह अधीक्षकांच्या निवासस्थानी कर्तव्य बजावत असतांना या निवासस्थानाच्या पूर्वेकडील बाजूस तीन व्यक्ती अंधारात पळून जातांना बघितले. यावेळी राठोड यांनी निवासस्थानी जाऊन पाहणी केली असता मुख्य दरवाजा उघडलेला दिसून आला. आतमध्ये पाण्याचे नळ व वॉश बेसिन्स तोडलेले आढळून आले. त्यामुळे संपूर्ण निवासस्थानात पाणी साचलेले होते. समोरच लॉन्सवर चार नळ व दोन गॅस बर्नरही फेकलेल्या अवस्थेत राठोड यांना आढळून आले. या प्रकाराची माहिती त्यांनी कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्यात तीन व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार, अॅट्रॉसिटीसह खंडणीचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात युवतीवर हॉटेल व्यावसायिकाने बलात्कार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून, युवकाविरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा तर युवकाच्या आईच्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी पीडितेसह तिच्या साथीदाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीचे नाव शुभम आनंद गाडेकर असे आहे. गत वर्षी एका बँकेत त्याची उपनगर भागात राहणाऱ्या पीडित युवतीशी ओळख झाली होती. मैत्रीचे रुपांतार प्रेमात झाल्याने त्याने लग्नाचे आमिष दाखवून युवतीस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एकत्रित काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत संशयिताने हे कृत्य केले. काही काळापूर्वी पीडितेने तरुणामागे लग्नाचा तगादा लावला. त्यातूनच हा प्रकार पोलिसांपर्यंत गेला. संशयिताने पीडितेस जातीवाचक शिवीगाळ करीत लग्नास नकार दिल्याने या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम १९८९ कलम ३ (१) (१२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक आयुक्त रमेश पाटील करीत आहेत.

दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित युवकाची आई संगीता गाडेकर यांनी उपनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, जून २०१७ मध्ये शुभम आणि पीडितेची ओळख झाली. त्यानंतर पीडिता आणि बाळासाहेब बोडके नावाचा तिचा साथीदार मुलगा शुभम यास गाठून लग्नाची गळ घालत होते. संशयितांनी शुभम यास उपनगर पोलिस स्टेशन, बिटको पोलिस चौकी आणि उपहारगृहात गाठून युवतीस १५ लाख व बोडके यास २० लाख रुपये खंडणीची मागणी केली. ३५ लाख दे नाही तर बलात्कार आणि अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. संशयितांनी घरी आणि रेस्टॉरंटमध्ये शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी एका बँकेत काम करणाऱ्या त्या युवतीसह तिच्या साथीदाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईमध्ये उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारची धोरणे राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी मारक असून या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदान येथे मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील २०० कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ४ हजार ८४९ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु, त्यापैकी ३३०० कोटी रुपयांचेच कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १५०० कोटी रुपयांचे प्रत्येक कर्मचाऱ्याला ११९० रुपये ग्रेड पेच्या स्वरूपात वाटप करावे, अशी मान्यताप्राप्त संघटनेची मागणी आहे. जाहीर केलेल्या सर्व निधीचे वाटप केले असेल तर त्याची विगतवारी जाहीर करा, असे आव्हान संघटनेने सरकार आणि महामंडळ प्रशासनाला दिले आहे. परंतु, त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याने उपोषण करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात एसटी महामंडळाचे नाशिक जिल्ह्यातील सुमारे २०० कर्मचारी सहभागी झाले. महामंडळामध्ये स्वच्छतेचे खासगीकरण करण्यात आले असून बस स्थानकात थिएटर सुरू करण्याचा घाट घातला जातो आहे. एसटी बसेसपैकी काही बसेसचे ट्रकमध्ये रुपांतर करून त्याद्वारे मालवाहतूक करण्याचाही महामंडळाचा उद्देश आहे. एसटीला संपविण्याचा घाट घातला जात असून मान्यता प्राप्त संघटनेचा या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागल्याचा दावा संघटनेचे पदाधिकारी प्रमोद भालेकर यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंद्रप्रस्थ कॉलनीत तरुणाची आत्महत्या

$
0
0

नाशिक : गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना इंद्रप्रस्थ कॉलनीत घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अथर्व दीपक सोमवंशी (२०, रा. इच्छामणी गणपती मंदिराजवळ, उपनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने सोमवारी (दि. २९) दुपारी आपल्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास घेतला होता. हे लक्षात येताच त्याचे चुलते दिलीप सोमवंशी यांनी त्यास तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७७ डॉक्टरांची फसवणूक

$
0
0

टर्की सहलीच्या नावाखाली गंडा; 'आयएमए'च्या अध्यक्षांकडून पोलिसांकडे फिर्याद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील आयएमएच्या डॉक्टरांची सहल टर्की (तुर्कस्तान) येथे घेऊन जाणाऱ्या रोवरकेशन हॉलिडे या टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीने ऐन वेळी सहल रद्द करून डॉक्टरांची तब्बल ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचा प्रतिनिधी अमित किशोर शहा (३४, रा. बी-३०४, अशोका रॉयल, अशोका मार्ग) या संशयितास अटक केली. पर्यटन आणि अभ्यास दौऱ्यासाठी आयएमए संघटनेचे ७७ डॉक्टर टर्की येथे जाणार होते. या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर आवेश पलोड (रा. सुमती सोसायटी, शास्त्रीनगर) यांनी फिर्याद दिली. 'आयएमए'चे ७७ डॉक्टर सदस्य टर्की येथे पर्यटन व अभ्यास दौऱ्यासाठी जाणार होते. यासाठी रोवरकेशन कंपनीने प्रत्येक डॉक्टरकडून एक लाख ११ हजार रुपये प्रवासाचा खर्च घेतला होता. टर्की येथे सहल जाणार असताना जुलै ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत रोवरकेशन कंपनीने ८५ लाख रुपये जमा करून घेतले. दरम्यान, सहलीची तारीख १० ते १२ दिवसांवर येऊन ठेपली असताना रोवरकेशन कंपनीने हात वर केले. कॉलेजरोडवरील युनिटी पार्कसमोर रोवरकेशन टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचे कार्यालय असून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी संशयित आरोपी शहा यास अटक केली.

जादा पैसे, पर्यटकांची मागणी

संशयित शहा याने डॉ. पलोड यांना फोन कॉल करून टर्कीची सहल परवडत नसल्याचे सांगितले. तसेच आणखी ८० पर्यटक आणि आणखी ३० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी शहाने केली. ही मागणी पूर्ण केल्याशिवाय सहल निघणार नाही, असे त्याने स्पष्ट केल्याने 'आयएमए'ने बैठक घेतली. बैठकीतील चर्चेअंती डॉ. पलोड यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरफुटी रोखण्यासाठी नवी समिती

$
0
0

सिनेट सभेत पुणे विद्यापीठाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बीएससीच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरल झाली होती. भविष्यात अशा प्रकारांना आळा बसविण्यासाठी विद्यापीठाने आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या मार्गदर्शनातून विद्यापीठाचा आयटी सेल अधिक बळकट करण्यात येणार असल्याची माहिती मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्यांनी दिली.

विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या सिनेट सभेत सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी बीएससीच्या पेपरफुटीच्या संदर्भाने स्थगन प्रस्ताव दाखल केला होता. यामुळे या सभेत नाशिकचा विषय चर्चिला गेला. या प्रकरणी तयार करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार १७ ऑक्टोबर रोजी नाशिकमधील एका महाविद्यालयातून बीएससी अभ्यासक्रमाचा कॉम्प्युटर सायन्स विषयाचा पेपर सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाला होता. या अहवालाबाबत सिनेट सदस्यांची चर्चा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्याशी झाली आहे. या आठवड्यात संबंधित परीक्षा केंद्रावर कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पेपरफुटी प्रकरणी काम करणाऱ्या चौकशी समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांनी स्थगन प्रस्तावावर बोलताना सिनेट सदस्यांना दिली.

एप्रिलमध्येही नाशिकमधून या प्रकारे पेपर व्हायरल झाले होते. या प्रकरणी फौजदारी कारवाई सुरू असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सदस्यांना सांगितले. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपयोगात आणलेल्या जमिनीच्या मोबदल्यात विद्यापीठास अल्प भाडे दिल्याच्या मुद्द्यावरून सदस्यांनी अधिसभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी याप्रश्नी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. विद्यापीठात नव्या अध्यासनांच्या निर्मितीसंदर्भातही काही सदस्यांनी सूचना मांडल्या.

सायबर सुरक्षेवर लक्ष

विद्यापीठाची वेबसाईट काही महिन्यांपूर्वी हॅक होऊन प्रश्नपत्रिका फुटली होती. याप्रकरणी विद्यापीठाचा मेल आयडी हॅक झाल्याचे विद्यापीठाने म्हटले होते. यानंतर पुन्हा काही प्रकरणात इतर अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या होत्या. सातत्याने येणाऱ्या या सायबर अडथळ्यांवर मात करण्यासाठी विद्यापीठाचा आयटी सेल अधिक मजबूत करण्यात येणार आहे.

लोगो : शाळा/कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शब्दमल्हार’चे उद्या प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'शब्दमल्हार'च्या प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या 'शब्दमल्हार' या मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. १ नोव्हेंबर) रोजी होत असून प्रकाशनानिमित्त 'संवाद मैफल' या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ख्यातनाम अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलाखत अभिनेता ललित प्रभाकर घेणार आहेत.

शब्दमल्हार या अंकात ज्योती सुभाष यांनी लेखन केले असून तोच योग साधून त्यांच्याच हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. ज्योती सुभाष यांची आजवरची नाटक, चित्रपट, मालिका यांमधील नेत्रदीपक कामगिरी रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली आहे. अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक आणि वाचक अशा त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या अंतरंगाचा वेध 'संवाद मैफल'मधून उलगडेल. त्यांच्याशी अभिनेता ललित प्रभाकर हा आताच्या काळातील नव्या पिढीचा प्रतिनिधी आणि साहित्याचा अभ्यासक, नाटकांचा चाहता या नात्याने संवाद साधणार आहेत; तरी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन 'शब्दमल्हार' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्ट न्यूज

$
0
0

अनुदानाचा लाभ

घेण्याचे आवाहन

नाशिक : राज्य सरकारच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर व ट्रॅक्टरचलित औजारांसाठी अनुदान देण्यात येते. नाशिक तालुक्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण, तसेच महिला शेतकरी गटातून प्राप्त अर्जातून सोडत काढण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. १) सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात येणार आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी सोडतीला उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

अल्पसंख्याक आयोगाचे

अध्यक्ष आज मालेगावात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सरकारी विश्रामगृहावर बुधवारी (दि. ३१) सकाळी दहाला त्यांचे आगमन होईल. सकाळी साडेदहाला ते मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतील. सकाळी ११ वाजता ते नागछाप झोपडपट्टीतील नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी करणार आहेत. या घटनेबाबत दुपारी १२ वाजता अप्पर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी साडेतीनला ते नाशिककडे मार्गस्थ होतील.

मालेगाव शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव शहरात जुन्या आग्रा रोडवर म्युनिसिपल हायस्कूल ते सुपर मार्केटपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न व वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून १८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जुन्या आग्रा रोडवरील दूध बाजार ते खोकानाका, कुसुंबा रोडवर गोंडवाड ते नवीन बसस्थानक, इमाम अहमद रजा रोड (शहीद टॉवर ते नवीन बसस्थानक) या मार्गांवर मोटार वाहन कायदा १९८८ कलम ११५ नुसार जड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात येत असल्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी कळविले आहे.

भाडेकरूची माहिती

देण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यात सर्व पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात भाडेतत्त्वावर घर देणाऱ्या घरमालकांनी अनोळखी व्यक्तींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घरमालक किंवा घराचे वहिवाटदार असलेल्या सर्व व्यक्तींनी मालकीची, ताब्यातील घरे भाडेकरू, पोटभाडेकरू किंवा भाडेपट्टा कराराने घेणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती त्या कार्यक्षेत्राच्या पोलिस स्टेशनला विहित नमुन्यात लेखी देणे बंधनकारक आहे. याशिवाय संबंधितांना घरे भाड्याने देऊ नये किंवा रहिवासासाठी हस्तांतरित करू नये असे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अप्पर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. १८ डिसेंबर २०१८ पर्यंत हा आदेश अमलात राहील. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झाडू’न सारे कामाला

$
0
0

दीपोत्सवामुळे साऱ्या शहरात सध्या चैतन्य अवतरले आहे. बोनस, सानुग्रह अनुदान अन् सणाची उचल यामुळे नागरिकांची पावले बाजारपेठांकडे वळली आहेत. मात्र, सध्या शहरावर साथरोगांचे सावट असल्याने दिवाळीत त्यावर नियंत्रण राहावे यासाठी महापालिकेच्या साऱ्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. दीपोत्सव आरोग्यदायी करण्यासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्थाही त्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

०००००००००००००००००००००

शहरभर स्वच्छतेचा जागर

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सणासुदीतही स्वाइन फ्लू, डेंग्यूसह साथींच्या आजाराचा प्रकोप कायम राहिल्याने महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे.

महापालिकेच्या सर्व ३१ प्रभागांमध्ये ३ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत प्रभागातील नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे. प्रभागातील सर्व नाल्यांची पाहणी करून पाणी वाहते करणे, धूर फवारणी, जंतुनाशक फवारणी, घरोघरी जाऊन डेंग्यू, चिकूनगुन्या, मलेरिया, स्वाइन फ्लू आदी आजारांबाबत जनजागृतिपर पत्रके वाटण्याचे काम मलेरिया विभागामार्फत केले जात आहे.

सध्या 'ऑक्टोबर हीट' असूनही शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू, व्हायरल फीवर यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्वाइन फ्लूने तर कहरच केला असून, २६ दिवसांत ३२ रुग्णांना जीव गमवावा लागणार आहे. यात महापालिका हद्दीत आठ रुग्ण दगावले आहेत. डेंग्यू संशयित रुग्णांचा आकडा ४५१ पर्यंत पोहोचला आहे. या आजारांचा उद्रेक नाशिककरांसाठी जीवघेणा ठरू लागल्याने सणासुदीच्या निमित्ताने शहर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

--

सर्वच विभागांवर जबाबदारी

घनकचरा व्यवस्थापन व मलेरिया विभागांसह बांधकाम, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, उद्यान या विभागांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले असून, या विभागांना कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सहाही विभागांतील ३१ प्रभागांमधील सर्व मुख्य रस्ते, चौकांत घंटागाडीमार्फत केरकचरा संकलन, गावठाण भागातील उघड्या गटारींची स्वच्छता, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण याविषयी नागरिकांचे प्रबोधन, खुल्या भूखंडांवरील गवत काढणे, सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे.

--

सर्वंकष स्वच्छतेवर भर

मलनिस्सारण विभागामार्फत भुयारी गटारींचे चेंबर दुरुस्त करणे, चेंबरवर ढापे टाकणे ही कामे देण्यात आली आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करणे, जलवाहिन्यांची व्हॉल्व्ह दुरुस्ती, दूषित पाणीपुरवठा रोखणे, आदी कामे पाणीपुरवठा विभागामार्फत, तर प्रभागातील बंद पथदीपांची दुरुस्ती व मुख्य रस्त्यावरील हायमास्ट दुरुस्तीचे काम विद्युत विभागाकडे सोपविण्यात आले आहे. उद्यानांतील गाजरगवत काढणे, लॉन कटिंग, दुभाजकातील झाडांची छाटणीचे काम उद्यान विभागामार्फत केले जात आहे. बांधकाम विभागामार्फत प्रभागातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या, फुटपाथवरील गवत काढणे, दुभाजकाच्या कडेची माती व गवत काढणे, अंतर्गत रस्त्याचे गवत काढण्याचे काम केले जाणार आहे.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

'सानुग्रह'ने दिवाळी गोड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वर्ग क व ड मधील कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा सुधारित आदेश काढला आहे. गेल्या दिवाळीपासून मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविकांनाही यंदा सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांसह मानधनावरील कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकामिळून तब्बल पाच हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेतन मिळत असल्याने त्यांना अनुदानातून वगळण्यात आले आहे. महासभेने महापालिकेतील सर्व साडेसात हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येकी १४ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव प्रशासनाकडे सादर केला होता. महापालिकेच्या हजेरीपटावरील साडेपाच हजार कर्मचाऱ्यांसह मानधनावरील कर्मचारी, अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. प्रशासनाला तो ठराव प्राप्त झाल्यानंतर लेखा विभागाने त्यावर सकारात्मक शेरा मारत आयुक्त मुंढे यांच्याकडे पाठविला होता. परंतु, महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे वेतन शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे कारण देत आयुक्तांनी सानुग्रह अनुदान फक्त ड वर्गाच्या कर्मचाऱ्यांना देण्याचा विचार केला होता. या निर्णयामुळे दोन ते अडीच हजार जणांनाच लाभ होणार होता. आयुक्तांच्या आर्थिक शिस्तीमुळे सानुग्रह अनुदान मिळेल की नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती. परंतु, प्रशासन आणि लेखा विभागाने त्यांचे मन वळविण्यात यश मिळविले होते. त्यानुसार प्रशासनाने क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश काढला होता. परंतु, पुन्हा मानधनावरील कर्मचारी आणि अंगणावाडी सेविकांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात महापौर, सभागृहनेत्यांनी प्रशासनाला पत्र सादर केले होते. त्यानंतर प्रशासनाने सानुग्रह देण्याबाबत मंगळवारी सुधारित आदेश काढला आहे. त्यात महापालिकेच्या क व ड कर्मचाऱ्यांसोबतच आता मानधनावरील कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांनाही लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेत चार हजार ७८८ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार असून, त्यांची दिवाळी गोड होणार आहे. प्रशासनाने यासंदर्भात लेखा विभागाला संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सदरची रक्कम जमा करण्याचे आदेश काढले आहेत. महापालिकेतील वर्ग अ व ब च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना मात्र यंदा सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

--

'त्या' सेविकांनाही मिळणार लाभ

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कमी पटसंख्येचे कारण देत १३६ अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना कमी केले आहे. त्यामुळे या सेविका व मदतनिसांना पुन्हा कामावर घेण्याचा वाद सुरू आहे. या महिला गेल्या दिवाळीपासून महापालिका सेवेत मानधनावर होत्या. त्यामुळे आयुक्त मुंढे यांनी आता या कमी केलेल्या २७२ अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सेविका आणि मदतनिसांचीही दिवाळी गोड होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ६७ टँकरद्वारे भागविली जातेय तहान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असून, ग्रामीण भागातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी दोन दिवसांत ११ टँकरला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी आजमितीस ६७ टँकर धावत आहेत. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ सिन्नर तालुक्याला बसते आहे.

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागत असल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतींकडून टँकरची मागणी वाढू लागली आहे. जिल्ह्यातील ५८ गावे आणि २०३ वाड्या अशा एकूण २६१ ठिकाणी ६७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या टँकरच्या रोज १६२ फेऱ्या होत असून, येवला, नांदगाव, सिन्नर व बागलाणमध्ये दाहकता अधिक असल्याने याच तालुक्यांमध्ये सर्वाधिक टँकर धावत आहेत. राज्य सरकारने आठ तालुके दुष्काळसदृश जाहीर केले असले तरी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या आदेशान्वये गंगापूर-दारणा आणि पालखेड धरणसमूहातून ३.२४ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडावे लागण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पाण्याची दाहकता अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाळा सुरू होता, तेव्हापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, मालेगाव, नांदगावसह बागलाण, येवला, चांदवड, सिन्नर या तालुक्यांमधून टँकरची मागणी वाढू लागली आहे. याशिवाय ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत २६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

जिल्ह्यात बागलाण तालुक्यातील गावे आणि वाड्या अशा सात ठिकाणी सात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. मालेगाव तालुक्यातील गावे आणि वाड्या अशा एकूण ४९ ठिकाणी ११ टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे. देवळा तालुक्यातील चार ठिकाणी एका टँकरद्वारे, तर नांदगाव तालुक्यातील गावे आणि वाड्या अशा एकूण ६६ ठिकाणी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सिन्नर तालुक्यात सर्वाधिक ९३ ठिकाणी १४ टँकर पाणी घेऊन धावत आहेत, तर येवल्यात ४२ ठिकाणी ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. काही तालुक्यांमधून आणखी काही प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, त्यामुळे टँकरची संख्या या आठवड्यात ७० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

तालुका- टँकरची संख्या

सिन्नर-२०

येवला-१९

मालेगाव-१२

बागलाण-७

नांदगाव-७

देवळा-१

चांदवड-१

.....................................

एकूण-६७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूट पाडणाऱ्यांना धडा शिकवू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या वादात महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी उडी घेतली असून, स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मराठा समाज हा स्वाभिमानी व स्वकर्तृत्वावर मोठा असून, समाजाच्या नावाने खंडणी गोळा करणाऱ्यांमागे समाज जाणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मराठा समाजात फूट पाडण्यासाठी नवा पक्ष स्थापन करणाऱ्यांना समाज धडा शिकवेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यावरून मराठा समाजातच गटतट पडले आहेत. सभागृहनेते पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कोपर्डी घटनेनंतर महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने ५८ मोर्चे स्वयंस्फूर्तीने निघाले. त्यामुळे मराठा समाजाला आता एकत्रित करण्यासाठी व त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेण्यासाठी काही जणांकडून राजकीय पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगत, या निर्णयामुळे समाजाचे नुकसान होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पक्ष स्थापण्याबाबत यापूर्वीचा अनुभव चांगला नसून, राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे. याचा बोध घेऊन मराठा समाजाने पावले उचलावीत. स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या नावाखाली मराठा समाज विभक्त करण्यास किंवा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास होणाऱ्या नुकसानीच पक्ष स्थापन करणारेच जबाबदार राहतील, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या नावाने पक्ष स्थापन करणाऱ्यांच्या नादी समाजाने लागू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

स्मारक अरबी समुद्रातच करा

शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनावेळी झालेल्या दुर्घटनेनंतर स्मारकाची जागा बदलण्याची मागणी केली जात आहे. मात्र, पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, शिवाजी महाराजांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांची स्मारके सरकारने अगोदर मंजूर केलेल्या जागेवरच करावीत, अशी मागणी केली आहे. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमनेही उधळली असून, मराठा समाजातील नेत्यांना जे जमले नाही, ते फडणवीस यांनी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोषित भारनियमन

$
0
0

इंदिरानगर परिसरात दिवसभरात सहा वेळा वीजपुरवठा खंडित

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरात सध्या कोठेही नसले तरी इंदिरानगरला भारनियमन ही नित्याची गोष्ट झाली आहे. इंदिरानगर परिसरात मंगळवारी दिवसभरातून किमान पाच ते सहा वेळा तासाभरासाठी वीजपुरवठा खंडित होत होता. याबाबत महावितरण कंपनीच्या कार्यालयात चौकशी केली असता कोणतेही उत्तर मिळाले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वेळेवर बिल भरून सुद्धा नागरिकांना हा त्रास का सहन करावा लागतो असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

इंदिरानगर भागात विद्युत पुरवठ्यावरून वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत असतात. इंदिरानगर आणि विजेचा लपंडाव हे सूत्रच झालेले असून इंदिरानगरला कायमच होणाऱ्या या अघोषित भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. इंदिरानगरला बऱ्याचदा वीजपुरवठा खंडित होत असतो, त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. महावितरण कंपनीच्या काही कामामुळे दर शनिवारी भारनियमन होते. मात्र, हाता भारनियमन होण्याचे प्रमाण आणि वेळापत्रकच राहिलेले नाही. या प्रश्नी नागरिकांनी बऱ्याचदा महावितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रारीसुद्धा केल्या आहेत. मात्र, त्यावर कोणतीही कारवाईच होत नसल्याचे या प्रकरणाकडे महावितरण कंपनी आणि लोकप्रतिनिधी लक्ष देणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इंदिरानगर परिसरातील साईनाथनगर, इंदिरानगर, राजीवनगर, पांडवनगरी पाथर्डीचा काही भाग याठिकाणी मंगळवारी सकाळपासून भारनियमन सुरु होते. एक-एक तास वीज पुरवठा खंडित होत होता. तसेच सायंकाळीही बराच काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने आगामी दिवाळीतही अशीच परिस्थिती राहणार काय, असा प्रश्न रहिवाश्यांना पडला आहे. ऐन सणासुदीच्या काळात अशा पद्धतीने भारनियमन करून महावितरण कंपनीला काय साध्य करावयाचे आहे, असा संतप्त सवाल नागिकरांनी उपस्थित केला आहे.

तक्रारींकडे दुर्लक्ष

इंदिरानगर भागातील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून याबाबत कोणतीही सूचना दिली जात नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर कारण जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नाही. अनेकदा अधिकारीही फोन उचलत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

इंदिरानगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. वेळेवर बिले भरून सुद्धा असा त्रास का सहन करावा लागतो? ग्रामीण भागाप्रमाणे इंदिरानगर भागाची अवस्था झाली आहे. यामुळे आपण नक्की शहरात राहतो की ग्रामीण भागात, असा प्रश्न पडतो. या प्रश्नी तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित आहे.

- राम कुलकर्णी, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images