कळवण : सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी ट्रस्टच्या आवारात बोकडबळीच्या पुन्हा प्रथा सुरू होणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावरील वातावरण तापले. बोकडबळीच्या मुद्द्यावरून बुधवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवत ट्रस्ट कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले. ट्रस्ट प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गडावरील बोकडबळीच्या प्रथेला पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चा झाली. मात्र ट्रस्टने या प्रथेला जोरदार विरोध दर्शविला आहे. दसऱ्याच्या निमित्ताने सप्तश्रृंगी गडावर बोकडबळी देण्याची प्रथा होती. गेल्या वर्षी या प्रथेच्या निमित्ताने देण्यात आलेल्या सलामीवेळी (बंदुकीतून हवेत गोळीबार करणे) काही भाविक, देवस्थानचे कर्मचारी वर्गाला दुखापत झाली होती. त्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्टमार्फत ही प्रथा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशही काढले होते. ग्रामस्थांनी त्यावेळी गावाबाहेर जिल्हा परिषदेच्या शाळेत बोकडबळीचा कार्यक्रम केला होता. देवस्थान ट्रस्टच्या आवाराबाहेर बोकडबळीला आजही हरकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र बुधवारी दुपारी कळवण तालुका प्रशासन व ग्रामस्थ व भाविक यांच्यात बोकडबळी होऊ द्यावे, दुष्काळी परिस्थिती आहे, जुन्या परंपरेला खंडित होऊ देऊ नका अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी यांनी याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्ट आवारात ही प्रथा पूर्णपणे बंद राहील, अशी भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आपले व्यवसाय दीड तास बंद ठेवले. तहसीलदार कैलास चावडे यांनी समजूत काढल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट