म. टा. प्रतिनिधी, नाशिक जायकवाडीला अधिकाधिक पाणी मिळावे यासाठी मराठवाडा आग्रही असले तरी नाशिकमधील उपलब्ध पाणी, त्याची आवश्यकता आणि त्याचा वापर याबाबतची तपशीलवार माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा औरंगाबादवारी करावी लागणार आहे. पाण्याची उपलब्धता आणि वापराबाबत नाशिक आणि औरंगाबादमधील अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आकडेवारीत तफावत असल्याने पुढील बैठकीतच नेमक्या आकडेवारीचा उलगडा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. नाशिकमधील निम्म्याहून अधिक तालुके दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करीत आहेत. जिल्ह्याला आतापासूनच टंचाईच्या झळा जाणवत असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना मराठवाड्याने जायकवाडीसाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातून सहा टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. याबाबत औरंगाबादमध्ये महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणने सोमवारी बैठक बोलावली होती. त्यामध्ये मराठवाड्याला पाण्याची अधिक गरज का, याबाबतची माहिती देताना अधिकाऱ्यांनी आकडेवारी सादर केली. नाशिकसाठीची पाण्याची आवश्कता आणि उपलब्ध पाणीसाठा कमी असल्याची माहिती सादर केली. मात्र, दोन्ही विभागांनी सादर केलेल्या आकडेवारीत तफावत असल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही माहिती सादर करण्यासाठी औरंगाबादवारी करावी लागेल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी घेणार १९ ला आढावा जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे आरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या आठवड्यात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी विविध विभाग आणि यंत्रणांची पाणी आरक्षणाची मागणी समजून घेण्यासाठी बैठक बोलावली होती, ज्यामध्ये शहरासह आसपासच्या परिसराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नाशिक महापालिकेने ४,६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदवली आहे. औद्योगिक वसाहती, पाणीपुरवठा योजना आणि तत्सम यंत्रणांची पाण्याची मागणी समूजन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १९) पाणी आरक्षणाची बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर शेवटच्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाणी आरक्षणाची बैठक होण्याची शक्यता आहे. गाळाशिवाय पाणीमोजणी आवश्यक मराठवाड्याकडून होणारी पाण्याची मागणी आणि पाणी द्यावेच लागेल या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सूचक विधानानंतर गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे संस्थापक देवांग जानी यांनी प्रस्तावित पाणी विसर्गाबाबत हरकत घेतली आहे. वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गंगापूर धरण ५.६२ टीएमसी क्षमेतेचे असून, मेरी संस्थेच्या २००२ च्या सर्वेक्षणानुसार धरणात ४३.७५ एमसीयूएम म्हणजेच २७.५ टक्के गाळ होता. अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ असून, मध्यम स्वरूपाच्या पावसातही धरण ९५ टक्के भरून जाते. गाळामुळे या धरणाची जल साठवणुकीची क्षमता कमी झाली आहे. गंगापूर धरणातील पाणीमापक यंत्र गाळासह पाण्याचे लाइव्ह स्टोअरेज दाखविते. धरणातील गाळ वजाजाता उपलब्ध पाणीसाठ्याची मोजणी होणे आवश्यक आहे. समन्यायी पाणीवाटपाच्या सबबीखाली नाशिककरांवर अन्याय होता कामा नये, अशी मागणीही जानी यांनी नोंदवली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट