मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना खडा सवाल; सूस्त यंत्रणा लागली कामाला
म. टा प्रतिनिधी, नाशिक
काही ठिकाणी सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बोट ठेवले. धिम्या गतीने सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत जाब विचारतानाच कामे केव्हापर्यंत पूर्ण करता अशी थेट विचारणा केल्याने अधिकारी गडबडले. प्रशासनाने मागून घेतलेल्या मुदतीचीही मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतली असून त्यामुळे जिल्ह्यातील विविध विभागांची यंत्रणा कामाला लागली आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या जिल्ह्यतील सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयाच्या नियोजन हॉलमध्ये झालेल्या या आढावा बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यात ७७ टक्के तर जिल्ह्यात ८७ टक्के पाऊस झाला. अनेक तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात उत्पादनात सरासरी २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाण्याअभावी रब्बीबाबतही शेतकऱ्यांना धाकधूक असून त्यावरील उपाययोजनांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत झालेले पंचनामे, त्याचे निष्कर्ष याबाबतचा सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे आदेश यंत्रणेला दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावाही घेण्यात आला. जिल्ह्यात १११ कामे अद्याप पूर्ण झाली नसून त्यापैकी ४७ कामे एकट्या चांदवडमधील तर २६ कामे सुरगाण्यातील असल्याची माहिती बैठकीत पुढे आली. ही कामे प्रलंबित का, अशी विचारणा करतानाच ती केव्हापर्यंत पूर्ण करता हेही अधिकाऱ्यांकडून वदवून घेण्यात आले. पंतप्रधान आवास योजना, पेयजल योजना, कृषी सिंचन योजना, रस्ते विकास, समृद्धी महामार्ग याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. रेंगाळलेल्या कामांबाबत उत्तरे देताना अधिकाऱ्यांची धांदल उडाली.
आवश्यकतेनुसार मदत
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत असून नाशिक अशा आंदोलनांचे केंद्रबिंदू ठरले आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र, अनेक तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांपुढं निर्माण झालेले प्रश्न या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. निफाड, नांदगाव, मालेगाव यांसारख्या काही तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून टंचाईग्रस्त भागात सरकार आवश्यकतेनुसार मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. निविदा प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत विभागीय आयुक्तालयापर्यंत पाठपुरावा करा, असे निर्देशही देण्यात आले.
योजना पूर्णत्वासाठी नियोजन करा
सरकारने राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या असून ही कामे फेब्रुवारी २०१९ अखेर पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीला पालकमंत्री महाजन यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य सचिव डी. के. जैन, अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, राहुल आहेर, विभागीय आयुक्त राजाराम माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव पी. वेलरासू, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते आदी उपस्थित होते.
..
आढावा बैठकीत
विषयांची वानवा
दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आढावा घेत असल्याने जिल्ह्याचे अनेक प्रलंबित विषय मार्गी लागण्याची संधी या निमित्ताने चालून आली. बैठकीच्या अजेंड्यावरही जिल्हावासीयांच्या विकासाला गती देणारे विषय असणे आवश्यक होते. मात्र, अवघे दोन-तीन राज्य पातळीवरील विषय जिल्ह्याच्या बैठकीत घुसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घसा कोरडा होईपर्यंत प्रश्न मांडणारे आमदार आपल्या मतदार संघांमधील विकासाला गती देणारे महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात अपयशी झालेत की जिल्हा प्रशासनाला हे प्रश्न अजेंड्यावर घेण्यास सवड झाली नाही, अशी चर्चा रंगली.
रस्त्यांची मलमपट्टी
मुख्यमंत्र्यांचा ताफा महाराष्ट्र पोलिस अकादमीमधून नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयापर्यंत जाणार होता. त्यानंतर तेथून पुन्हा ओझर विमानतळापर्यंत हा ताफा जाणार असल्याने या मार्गांच्या डागडुजीची विशेष काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली. एरवी ज्या मार्गावरून नागरिकांना नेहमी खड्ड्यातून वाट काढावी लागते त्या नाशिक-पुणे महामार्गासह अन्य काही रस्त्यांवरील खड्डे गुरुवारी (दि. ४) रात्रीच घाईघाईने मुरूम टाकून बुजविण्यात आले.
आयुक्तालय जणू छावणीच
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांचा ताफा नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयामध्ये येणार असल्याने या परिसराला छावणीचे रूप आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता. विभागीय आयुक्तालयाकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.