म. टा. प्रतिनिधी, नाशिक
म्हसरूळ परिसरातील शिवाजीनगर भागात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत धारदार चाकूचा वापर करण्यात आल्याने दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयितांपैकी पाच जणांना अटक केली आहे.
विजय दत्तात्रेय उगले (वय २६, रा. श्रीराम पार्क सोसायटी, शिवाजीनगर) आणि नागेश ओंकारनाथ मरकड (२२, हिरावाडी) अशी जखमींची नावे आहेत. विजय उगले याने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी साडेदहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील बजाज शोरूम पाठीमागे तो उभा असताना गंजपथ परिसरातील भुऱ्या ऊर्फ अनिकेत रमेश बागूल, भूषण देशमुख, नागेश मरकर (दोघेही राहणार हिरावाडी) आणि पुष्पक माने आदींनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून पोबारा केला. त्याचप्रमाणे अनिकेत बागूल याच्या तक्रारीनुसार, दुकानातून घराकडे जात असताना विशाल चंद्रमोरे म्हणाला, की भुऱ्याभाई आला आहे, आता मिटून जाईल. यावेळी अनिकेतने कशाला थट्टा करतो, असे म्हटल्याने चंद्रमोरेसह तुषार भोसले, विशाल झांजरे, विजय उगले (रा. शिवाजीनगर) आदींनी मारहाण करीत विजय उगले याने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने मित्र नागेश मरकड याच्या डोक्यास दुखापत केली. या घटनेत पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जामीन दिला असून, हवालदार पगार व कांगणे तपास करीत आहेत.
--
रोकड लांबविली
अंगावर घाण पडल्याचे सांगत मदतीच्या बहाण्याने भामट्याने रोकडसह धनादेश असलेली बॅग लांबविल्याची घटना भक्तिधाम परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र सत्यनारायण गौड (रा. तेली गल्ली, रविवार पेठ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. सोमवारी दुपारी आप्पाची मिसळ या हॉटेल परिसरात ही घटना घडली. राजेंद्र गौड सोमवारी दुपारी भक्तिधाम परिसरात गेले होते. या हॉटेलसमोरून ते पायी जात असताना वाटेत त्यांना एक तरुण भेटला. पँटला घाण लागल्याचे सांगून त्या तरुणाने हॉटेलमधून पाणी घेऊन घाण धुवून टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गौड हॉटेलमध्ये गेले असता हॉटेलमधील बाकड्यावर ठेवलेली बॅग घेऊन सदर तरुणाने पोबारा केला. बॅगेत ८२ हजार ५०० रुपयांची रोकड आणि एक लाख रुपयांचा धनादेश होता. घटनेचा अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
--
वृद्धेमुळे चोरटा गजाआड
घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे. वृद्धेने वेळीच आरडाओरड केल्याने हा प्रकार घडला असून, सजग नागरिकांनी पकडून चोरट्यास बेदम चोप देत त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना काझीगढी भागात घडली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश गंगाधर बाविसे (२०, मूळ रा. वाशीम, हल्ली गाडगे महाराज पुलाजवळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दमयंती आत्माराम कराळे (७५, रा. शीतळा देवी, काझीगढी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. दमयंती कराळे या घरात एकट्या असल्याची संधी साधून संशयिताने चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कराळे आपल्या घरकामात व्यस्त असताना संशयिताने उघड्या घरात प्रवेश केला. यावेळी काही कळण्याच्या आत त्याने कराळे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धेने वेळीच गांभीर्य ओळखून आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी मदतीला धावून आले आणि संशयित त्यांच्या हाती लागला. नागरिकांनी संशयितास बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. महिला उपनिरीक्षक अनवणे तपास करीत आहेत.
--
जमिनीच्या वादातून हल्ला
जमिनीच्या वादातून टोळक्याने एकावर हल्ला केल्याची घटना कोकणीपुरा भागात घडली. टोळक्याने लोखंडी सळई आणि फायटरचा वापर करीत संबंधितास बेदम मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी १३ संशयित आरोपींविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रफ अल्लाउद्दिन, अल्लाउद्दिन अब्दुल कादिर, मोबतसीर अल्लाउद्दिन कोकणी, नजीम गयाउद्दिन कोकणी, शहनवाझ अब्दुल कादिर, गयाउद्दिन अब्दुल कागीर, सल्लाउद्दिन अब्दुल कादरी, शहानवाज मेहमूद कोकणी, अब्दुल्ला अल्लाउद्दिन कोकणी, उसामुद्दिन शब्बीर कोकणी, मोईन शब्बीर कोकणी, शहानवाज सईद कोकणी आणि गुलामउद्दिन गयास कोकणी (रा. सर्व फाळकेरोड, भद्रकाली) अशी संशयितांची नावे आहेत. इफ्तियार गुलाम गौस कोकणी (रा. कोकणीपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी इफ्तियार कोकणी मालाबाबा दर्गा परिसरात असताना जमिनीच्या वादातून संशयितांनी लोखंडी रॉड व फायटरने मारहाण केली. या प्रकरणी शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक कासर्ले तपास करीत आहेत.
--
दुचाकीस्वाराचा मोबाइल खेचला
जमिनीवर पडलेला कागद उचलत असल्याची संधी साधत चोरट्यांनी दुचाकीस्वाराचा मोबाइल खेचून पोबारा केला. ही घटना मायको सर्कल परिसरात घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गणपतराव आहिरे (रा. पाटीलनगर, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. शनिवारी रात्री मायको सर्कल येथून आहिरे दुचाकीने घराकडे जात असताना ही घटना घडली. रस्त्यात आहिरे यांना फोन आला. त्यामुळे दुचाकी थांबवून ते बोलण्यात व्यस्त झाले. त्यावेळी खिशातील कागद पडल्याने तो उचलण्यासाठी आहिरे खाली वाकले असता दुचाकीच्या सीटवर ठेवलेला त्यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल पाठीमागून दुचाकीवर आलेल्या त्रिकुटाने पळवून नेला. हवालदार क्षीरसागर तपास करीत आहेत.
--
चार दुचाकींची चोरी
शहरात चार दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरून नेण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सरकारवाडा अंबड, इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पवननगर येथील विजयकुमार सुरेश तिवारी शनिवारी कामानिमित्त राजीव गांधी भवन परिसरात आले होते. सुयोजित संकुल येथे पार्क केलेली त्यांची दुचाकी (एमएच १५, डीजे ८५२५) चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार सातभाई तपास करीत आहेत. दुसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली. डोमू रतिलाल यादव (रा. एमआयडीसी, अंबड) यांची दुचाकी (एमएच १५, जीडी ५७२७) चोरीस गेली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. सिडकोतील साईबाबानगर भागात राहणारा परवेज अलिम इस्माईल शेख हा युवक शुक्रवारी (दि. २८) दुपारी पांडवलेणी भागात गेला असता त्याची दुचाकी (एमएच १५, ईएन २७६८) चोरट्यांनी हातोहात लांबविली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, विजयनगर येथील सोपान भास्कर गांगुर्डे (रा. साईपूजा अपार्टमेंट, चेहेडी पंपिंग) यांची दुचाकी (एमएच १५, बीक्यू ०२०६) रविवारी रात्री त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली. नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.