भाजपविरोधात एकजूट राखण्याचे प्रा. कवाडे यांचे विरोधी पक्षांना आवाहन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आरएसएस प्रणित भाजप सरकारचे आव्हान समस्त विरोधी पक्षांनी स्वीकारावे. पक्षापेक्षा देशहिताचा विचार करावा. देशातील संकट दूर करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवून एकास एक उमेदवार द्यावा, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. यावेळी त्यांनी ज्या मतदारसंघात ज्यांचे मतदार जास्त असेल तेथे त्या पक्षाला संधी द्यावी, असेही त्यांनी सूचिविले.
अनुसूचित जाती समितीच्या आढावा बैठकीसाठी नाशिकला आल्यानंतर प्रा. कवाडे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार हल्ला करत भाजपचा सत्तेचा माज उतरवण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवणे गरजेचे असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या भाजपला फक्त ३७ टक्के मतदान मिळाले. विरोधी पक्षांना त्यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली. त्यामुळे विरोधी मतांची ताकद जास्त आहे. ती एकजुटीने समोर येण्याची गरज आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सर्वच विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षासह इतर पक्षांच्या एकत्रित बैठका झाल्याची माहिती प्रा. कवाडे यांनी दिली.
मनसेची भूमिका महत्त्वाची
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सामावून घेण्याची शिफारस 'राष्ट्रवादी'ने केली आहे. पण, 'मनसे'ला आपली परप्रांतीयविरोधी भूमिका बदलावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनाच तो निर्णय घ्यावा लागेल. राज्यात सर्वच ठिकाणी परप्रांतीयाची संख्या मोठी असल्याचेही प्रा. कवाडे यांनी सांगितले.
'एमआयएम'ने देशाचे प्रश्न घ्यावे
'एमआयएम'ने आपल्या भूमिका बदलून देशाच्या प्रश्नांचा विचार करायला हवा. याअगोदर 'एमआयएम'ने नांदेडसह इतरत्र यश मिळाले पण, नंतर ते मिळाले नाही. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला कळू लागले आहे की या पक्षाची मदत करून भाजपला मदत होत आहे. त्यामुळे जनताही हुशार झाली आहे, असेही प्रा. कवाडे यांनी सूचित केले.
हुकूमशाही पद्धत
देशात भाजप सरकार जनतेला गुलाम करण्याचे काम करत आहे. ही प्रवृत्ती मोदीच्या रुपात देशात हुकूमशाही प्रस्थापित करत असून लोकशाही नष्ट होत असल्याचे कवाडे यांनी सांगितेल. देशात लोकशाही टिकली पाहिजे. त्यातून देशाचा विकास होणार आहे, असेही ते म्हणाले.
जातीय उन्माद
देशात धार्मिक व जातीय उन्माद तयार केला जात आहे. देशाची जनता उद्विग्न झाली आहे. ही परिस्थिती देशाच्या एकसंघाला व एकात्मतेला मारक ठरणारी आहे. देशात भाजपचा चार वर्षांचा कारभार बघितला तर देशाला कोणत्या वळणार देश हा पक्ष नेत आहे हे दिसते. ही देशासाठी चिंतणीय बाब आहे, असही प्रा. कवाडे म्हणाले.
धर्मनिरपेक्षता महत्त्वाची
भाजप सरकार भारतीय संस्कृतीचे अवमूल्यन करण्याचा प्रकार करत आहे. धर्मनिरपेक्षतेशिवाय देश एकसंघ राहू शकत नाही. पण, या देशात धार्मिक व जातीय उन्माद सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे. त्यातून मानवी मूल्यांची अवहेलना होत आहे. या सरकारला आरक्षण, संविधनाचे वावडे असून मनुस्मृतीवर प्रेम आहे. सरकार जातीयव्यवस्थेचे समर्थक असल्याचाही आरोप त्यांनी केला.