म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील इतिवृत्तासह अनेक विषयांना आक्षेप घेत विरोधी गटाच्या सभासदांनी गोंधळ घातला. त्यामुळे सत्ताधारी संचालकांनी ही सभा अवघ्या तासाभरात आटोपती घेतली. काही सभासदांनी 'नहीं चलेगी नहीं चलेगी.. दादागिरी नही चलेगी'च्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. मात्र, या गोंधळात सभेच्या पटलावरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभा संपल्यानंतर विरोधी गटाने सभागृहातच ठाण मांडत निषेध नोंदवत आपली नाराजी व्यक्त केली. जेलरोड येथील इंगळेनगर शाखेतील सभागृहात झालेल्या या सभेत सुरुवातीला विषयपत्रिकेवरील सर्व विषय वाचून ते मंजूर करण्यात आले. प्रकाश गोहाड यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. लागलीच सभा संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विरोध करणाऱ्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर अॅड. सुनील बोराडे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचा मुद्दा उपस्थित करून त्यावर अध्यक्ष व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही नसल्यामुळे ते नामंजूर करण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्थापन खर्च नियमापेक्षा सात कोटींनी जास्त आहे, भांडवली खर्च किती केला आहे, तो दिसत नसल्यामुळे ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश गोहाड यांचे सभासदत्व रद्द करण्यासही विरोध केला. या सर्व मुद्द्यांचे निवेदन सभेने स्वीकारावे, असे त्यांनी सांगितले. मात्र, अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी ते फेटाळल्यानंतर सभेत गोंधळाला सुरुवात झाली. सभेत विरोध करणाऱ्यांमध्ये पां. भा. करंजकर, शिरीष लवटे, सतीश मंडलेचा, चंद्रकांत विसपुते, हेमंत गायकवाड, संतोष क्षीरसागर, अतुल धोंगडे, श्याम गोहाड, साहेबराव खर्जूल आदी सभासद होते. हिंमत असेल तर चर्चा करा सभेच्या व्यासपीठासमोर येत सभासदांनी आपला विरोध दर्शवला. तब्बल पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. या वेळी या सभासदांनी 'हिंमत असेल तर चर्चा करा, नाही तर खुर्च्या खाली करा' अशा घोषणाही दिल्या. या गोंधळात सत्ताधारी संचालकांनी राष्ट्रगीताला सुरुवात केली अन् सभाही संपली. विरोध असणारे विषय घेऊन तयार केलेले फ्लेक्सचे पोस्टर परिधान करूनच सभासदांनी आपला संताप व्यक्त केला. पोस्टर सर्वांचे लक्ष वेधत होते. अध्यक्ष धावले विरोधकांवर सभेत विरोध दिसू लागल्यानंतर बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी व्यासपीठावरून उडी घेत विरोधकांवर धावले; पण इतर सभासदांनी त्यांना शांत केल्यानंतर ते परतले. या वेळी त्यांची शाब्दिक चकमकही झाली. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आतापर्यंत असा गोंधळ कधीच झाला नाही. सत्ताधारी संचालकांनी सभा संपवण्याची घाई केली तर विरोधी सदस्यांनी मुद्दे रीतसर मांडले नाहीत, असे सांगत एका ज्येष्ठ सदस्याने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. सभासदत्व रद्द केल्यानंतर गोहाड यांनी संताप व्यक्त करीत बँकेच्या कारभारावर आरोप केले.दहा वेळा सभासद रद्द केले तरी पुरून उरेल, असेही ते म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट