म. टा. प्रतिनिधी, नाशिक हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे (एचएएल) राफेल हे लढाऊ विमान बनविण्याची क्षमता नाही. एचएएल हे काम वेळेत पूर्ण करू शकत नाही, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात एचएएल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शहरात मोर्चा काढला. सीतारामन यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, तसेच माफी मागावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. बी. डी. भालेकर मैदान येथून हा मोर्चा काढण्यात आला. एचएएलने १९६५ पासून ७५ वर्षांत मिग २१, मिग २७, सुखोई ३० यांसारख्या विमानांचे यशस्वीरीत्या उत्पादन पूर्ण केले आहे. वेळेत गुणवत्तापूर्ण उत्पादन देण्याचे काम एचएएल कर्मचाऱ्यांनी केले आहे. सुखोई ३० चे काम अंतिम टप्प्यात असून, २०२० नंतर आमच्याकडे काम नसेल. काम मिळावे याकरिता संरक्षणमंत्री व संरक्षण राज्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगण्यात आली. एचएएलला बदनाम करून राफेलचे काम १५ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या रिलायन्स कंपनीला देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. वेळेत गुणवत्तापूर्ण काम देऊन भारतीय वायुसेनेचे हात बळकट करण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही या निवेदनामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आठवडाभरापूर्वी केलेल्या या विधानाबद्दल संरक्षणमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी संघटनेचे माजी जनरल सेक्रेटरी संजय कुटे यांनी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट