म. टा. प्रतिनिधी, नाशिक 'गणेशोत्सव हा आनंदोत्सव असला तरी त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचता कामा नये. उत्सव काळात कर्णकर्कश ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून होणारे ध्वनी प्रदूषण थांबवा,' असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. ध्वनीप्रदुषणाद्वारे पर्यावरण संवर्धनाला बाधा आणणारी गणेश मंडळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सण आणि उत्सव हे मांगल्याचे प्रतिक असले तरी उत्साहाच्या भरात पर्यावरण संवर्धनाला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी देखील सुजान नागरिकांनी घेणे अपेक्षित आहे. परंतू ग्रामीण भागात उत्साहाला उधान आल्यानंतर गणेश भक्त पर्यावरण संवर्धनाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळते. म्हणूनच या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाची काळजी वाहण्याबाबत जिल्हा प्रशासन आग्रही आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांना देण्यात आल्याची माहीती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी पोलिसांना ध्वनीमापक यंत्रही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तपासणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश अधीक्षकांना देण्यात आले आहे. ध्वनी प्रदुषणाचे निकष न पाळणाऱ्या मंडळावर दंडात्मक तसेच अन्य कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. तीन दिवस वाजवा रे वाजवा गणेशोत्सव काळात २१ ते २३ सप्टेंबर असे तीन दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास आणि देखावे सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. रविवारी २३ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. त्यामुळे मिरवणुकांमध्ये रात्री १२ पर्यंत मर्यादीत आवाजात ध्वनीक्षेपके वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याखेरीज २१ आणि २२ सप्टेंबर रोजी देखील गणेश भक्तांना देखावे पहाता यावेत याकरीता रात्री १२ पर्यंत देखावे सुरू ठेवण्यास मंडळांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जनापूर्वीचे शेवटचे दोन दिवस गणेश भक्त रात्री १२ पर्यंत देखाव्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट